Pavan Khinditil Ladai books and stories free download online pdf in Marathi

पावन खिंडीतील लढाई

पावन खिंडीतील लढाई..

शिवाजी राजा..

मराठी साम्राज्याचा अभिमान !

शूर वीर कसा असावा याचे एक जाज्वल्य उदाहरण मराठी साम्राज्या वर राज्य करणारे दोन राजे सर्वश्रुत आहेत एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या नंतर बाजीराव पेशवे सरकार मुगलांचे साम्राज्य जिंकण्याची आणि मराठी माणसाला मुगल अन्यायातुन मुक्त करण्याची शपथ राजे नी अगदी लहान असल्या पासून घेतली होती. आपल्या शूर आणि मुत्सद्दी मातोश्री कडून राजांनी बालपणा पासून नेतृत्वाचे आणि शौर्याचे धडे घेतले होते.

तो काळ खुप वेगळा होता तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते.

मराठी माणसाला तेथे काहीच किंमत नव्हती मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे या कामासाठी त्यांनी आपल्या सर्व मित्रांची म्हणजे मावळ्यांची फौज बांधली होती. रोहिडेश्वराच्या देवळात जाऊन आपल्या सवंगड्या सोबत त्यांनी स्वराज्याची शपथ पण घेतली होती.

योग्य वेळी या सर्व मावळ्यांची मौलिक मदत मदत घेवून राजे नी मुगल साम्राज्याचा पराभव करून राज्य मिळवले व ते रयतेचा राजा बनले आणि त्यांची अभिमानास्पद कारकीर्द सुरु झाली.

राजेंच्या दरबारात अनेक विश्वासू व स्वाभिमानी आणि शूर सेवक होते राजेंच्या नुसत्या शब्दा सरशी आपले शीर उतरवून त्यांच्या पुढे “पेश “ करण्याची पण त्यांची तयारी होती.

शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली होती आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली होती. शत्रुच्या मरणोत्तर त्याला मान देणे हे फक्त शिवाजी राजेच करू जाणे.

राजेंनी आपल्या कारकिर्दीत अनेक लढाया खेळल्या व जिंकल्या, त्यातील अनेक चित्त थरारक होत्या, आणि त्यामध्ये त्यांची चतुर आणि सावध युध्द नीती दिसून येत असे. आपल्या मुत्सद्देगिरी च्या बळा वर त्यांनी अनेक पराजय बघता बघता विजयात बदलले होते. त्यापैकी नावाजलेली लढाई ही अफझल खाना सोबत होती.

ज्या लढाई मध्ये सैनिकांचे कौशल्य आणि जिद्द कामी आली अशी एक लढाई म्हणजे घोडखिंडीतली लढाई घोड्खीन्डीला पावनखिंड म्हणुन पण संबोधले जाते. घोडखिंड म्हणले की शूरवीर बाजी प्रभूंचे स्मरण होते. अत्यंत कडव्या अशा या बाजीप्रभूने राजेना अलौकिक विजय मिळवून दिला होता. या घमासान लढाईची कथा आज मी सांगणार आहे. ही लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते.छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे असे विश्वासू सेवक होते. बाजीप्रभू देशपांडे आडनाव असलेले बाजीप्रभू पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते.

राजेंनी या शूर सैनिकाला हेरले होते.

बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहुन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमधील भल्या भल्या सेनापतींना पराभवाची चव चाखायला लावली.

त्यांच्या अफझलखान या मोठ्या सेनापतीचा वध केला होता संपूर्ण आदिलशाही यामुळे खूपच अस्वस्थ होती.

शिवाजी राजेंचा पाडाव करणे हे आता खुपच आव्हानात्मक आणि महत्वाचे बनले होते.

या सर्वांचा परिणाम म्हणून आदिलशाहीने विजापूरहून सिद्दी जौहरला सर्व शक्तीनिशी छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यास सांगितले.

तसेच त्यावेळेस आदिलशाहीने मोगलांशी पण संगनमत करून छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास विनंती केली १३ जुलै १६६० रोजी ही घडलेली युद्धकथा आहे.

सिद्दी जोहर च्या भेटी दरम्यानच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे कूच केले.

आदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जौहरकडे होते, त्याला सिद्दी मसूद व फाजल खान (अफझलखानाचा मुलगा) यांची साथ होती.

सिद्दी जौहरची एकूण फौज जवळ जवळ १५,००० सैनिकांची ची होती

मात्र छत्रपती शिवाजी महाराजा कडे तेव्हा फक्त ६०० मावळे होते.

मार्च १६६० पासून राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. अफजलखानाच्या वधानंतर आदिलशाहने सिद्दी जोहरला शिवाजीराजेंविरूध्द धाडले होते. दि २ मार्च १६६० साली,सुमारे २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळ घेऊन सिद्दी शिवरायांवर चालून आला. त्यावेळी महाराज पन्हाळा किल्ल्यावर होते.

सिध्दीने पन्हाळा किल्ल्यास वेढा घातला. महाराज गडावर अडकून पडले. तिकडे शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात तळ ठोकून होता.स्वराज्यावर मोठे संकट आले होते. पुढे पावसाळ्याचे दिवस होते आणि पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते कारण राजेंना स्वराज्यात धुडगूस घालत असलेल्या शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करावयाचा होता.

यातून मार्ग काढायचा कसा यावर अनेक खलबते झाली.

सिद्दी जौहरने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना त्याला वेढा दिल्या मुळे महाराजांची स्थिती बिकट झाली होती.

सिद्दी च्या प्रचंड मोठ्या सेनेपुढे पन्हाळा किल्ला टिकवून धरणे अवघड होते. अतिशय बळकट वेढा उठवून लावण्याचे सर्व प्रयत्न फोल झाले व सरते शेवटी जौहरचा सामना करायचा असे ठरवले.

परंतु जौहरच्या मोठ्या फ़ौजेचा सरळ सामना करण्याऐवजी गनिमी काव्याने जौहरला भूल देउन निसटून् जाण्याचा बेत महाराजांनी बनवला व नव्या दमाने दुसऱ्याच किल्ल्यावरून (विशाळगडावरून) जौहरचा सामना करायचे ठरले.

यातीलच एक धाडसी सूचना राजेंचा विश्वासू सेवक शिवा काशिद यांची होती. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजासारख्या दिसणार्‍या शिवा काशिदांनी राजांकडे हट्ट धरला आणि राजेंनी काळजावर दगड ठेवून त्याच्या प्राण पणाला लावण्याच्या हट्टास मंजुरी दिली.

आता पन्हाळ्यावरून निसटण्याचा मनसुबा जवळपास पक्का झाला होता.

हिरडस मावळातील शूर अशा बांदलाचा सहाशे जणांचा जमाव राजेंनी निवडला.

पालखीसाठी भोई सुध्दा खासे निवडले.

सिद्दीस तहाचा समझोता धाडून राजेंनी त्यास गाफील ठेवले. अन राजे सही सलामत या वेढ्यातून निसटले. या अस्मानी अन सुलतानी संकटातून राजांना बाहेर पडणे शक्य झाले ते शिवा काशिदमुळेच !

गडाच्या एका बाजूने राजेंच्या वेशात वीर शिवा काशिद यास पालखीत बसवून मलकापुरच्या दिशेने पाठविले गेले. तर राजेंची पालखी मसाई पठाराच्या दिशेने गेली.

पाउस मुसळधार पडत होता याचाच फायदा घेत राजे पन्हाळ्यावरून रातोरात निसटले.

सिद्दी जोहरला गडावरून पालखी निघाल्याचा थांगपत्ता लागला.

त्याने पाठलाग करून एक पालखी पकडली. शिवाजीराजे आपल्या ताब्यात आल्यामुळे सिद्दी खुशीत होता पण लवकरच त्याला कळून चुकले की आपण दुसऱ्याच कुणाला तरी पकडले आहे.

सिद्दी जोहरचा संताप अनावर झाला

जोहरच्या सैनिकांनी शिवा काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.

शिवा काशिद खाली कोसळले; त्यांच्या छातीत भाले खुपसल्याने रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ते रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले.

तशा रक्तबंबाळ अवस्थेतही आपेल राजे आता कुठंपर्यंत पोहोचले असतील याचा शिवा काशिद शांतपणे अंदाज बांधत होते.

प्राण सोडण्यापुर्वी शिवा काशिद म्हणाले. ’अरे वेड्यांनो! सोंग घेणारया शिवाजीची पाठ पाहता आली नाही. खरया शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या, आपले हात जोडत शिवा काशिदांनी प्राण सोडला. त्यांचे प्राण पंचत्वात विलीन झाले.

तो दिवस होता १३ जुलै १६६०चा !

आणि हीच संधी साधुन छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी देशपांडे यांच्यासहित पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे कूच केले.

जेव्हा जौहरला छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे पळाले आहेत हे समजले तेव्हा त्याने सिद्दी मसूदला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागावर पाठवले व शिवाजी महाराजांनी पाठलाग चालू झाला. काही वेळाने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची त्यांना जाणीव झाली आता काही वेळातच ते गाठतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना व इतरांना पकडतील असा अंदाज होता.

तशात त्यांच्या अफाट फौजे पुढे आपल्या संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा टिकाव लागणे अशक्य आहे हे ही महाराजांनी जाणले होते

पन्हाळगड ये विशालगड दरम्यान घोडखिंड लागते. घोडखिंडीत अतिशय चिंचोळी होती व एकावेळेस एक-दोन जणच रांगेतून जातील एवढी वाट होती. अशा परीस्थितीत लढाई खुपच कठीण झाली असती तसेच अनेकांच्या हाकनाक जीवावर पण बेतण्याची शक्यता होती हे महाराजांना नको होते यातून मार्ग कसा काढावा हे शिवाजी महाराजा ना सुचेना तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशाळगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई ते स्वत: लढतील.

विशाळगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल.

बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. शिवाजीराजांना ते पटेना त्यांच्या जीवावर लढाई सोडणे त्यांना धोक्याचे वाटत होते, पण 'बाजी'च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केले सोबत ३०० मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले.,.

युद्धनीती अनुसार मावळे सैन्याची रचना बाजीप्रभूनी केली ज्यामुळे शत्रूला ही लढाई कठीण जाईल आता उरलेल्या ३०० मावळ्यांनी आडव्या आडव्या रांगा तयार केल्या अत्यंत आवेशाने पाठलागा वर आलेल्या मसूद च्या सैन्याला या युद्धनीती ची कल्पना नव्हती खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला. खूपच अडचणी ची अवस्था झाली त्यांची त्याच वेळी मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या कड्यांवर चढून दगडगोट्यांची बरसात चालू केली.

अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे केवळ एक दोनच सैनिक मराठ्यांच्या रांगेपर्यंत पोहोचत व प्रतिकार करायच्या आधीच मारले जात त्यात पुढे सरकत रहावे तर वरून दगड गोट्याची बरसात होत असे अशा प्रकारे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची जोरदार लढाई सुरु झाली.

मराठ्यांचे मावळे फक्त ३०० होते

पण या ३०० मावळ्यांनी एवढी शौर्याने लढाई केली की मसूद चे सर्व च्या सर्व सैनिक मारले गेले.

प्रत्येक मावळ्याने अक्षरशः ५५ ते ६० मसूद चे सैनिक कापून काढले आणि त्यांचे १४००० सैनिक नेस्तनाबूत केले.

खरे तर मराठ्यांच्या मावळ्यांना पण लढता लढता जीव गमवावा लागला. ते पण सर्व च्या सर्व ३०० जण लढता लढता कामी आले, इतके शुर मावळे, इतिहासात क्वचितच पाहायला मिळतात.

बाजीप्रभू, फ़ुलाजी, संभाजी जाधव, गंग्या महार, बांदल, महाजी, रागोजी जाधव, मोरे ह्यां शूर आणि चिवट मावळ्यांनी आपपल्या तलवारी पाजळीत मसूदच्या सैनिकांना परास्त केले. बाजीप्रभू तर अत्यंत आवेशाने लढत होता त्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली.

जेव्हा बाजीप्रभुला पराभूत करणे कठीण होईल असे मसूद ला वाटले तेव्हा मसूदने त्याच्या बंदूकधाऱ्या सैनिकाना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. या अकस्मात हल्ल्याने बाजीप्रभू गंभीर जखमी झाले.

बंदुकीच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीरावर अनेक घाव केल्याने ते थोड्याच वेळात रक्तबंबाळ झाले तशाही स्ठीतीत बाजी प्रभू लढत राहिले ढाल लढता लढता कुठे पडून गेली म्हणुन पागोटे काढून त्यांनी ढाली सारखे हाताला गुंडाळले व लढाई सुरु ठेवली.

हात पण तलवारीचे घाव लागून रक्तबंबाळ झाला होता तसेच दुसर्या हाताने तलवार पाजळीत मसूद च्या सैनिकांना यमसदनी पाठवत होते.

डोक्यावर काहीच नसल्याने डोक्याला पण बंदुकीच्या गोळ्याचा मार लागला होता आणि ते. रक्ताचे ओघळ.चेहेर्यावरून वाहत होते आता तर त्यांनी दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन कापा कापी सुरु केली / जखमी असुन लढत राहणे यात त्यांच्या चिकाटी चे दर्शन होत होते तशात महाराजाना दिलेला शब्द पूर्ण करणे ही तर मोठीच जबाबदारी होती.

लक्ष सगळे लढाईत होते पण कान लागले होते महाराजांच्या इशार्या कडे.

बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूं हतबल झाले. ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. कधी एकदा महाराज विशाळ गडावर सुखरूप पोचतात असे झाले होते त्यांना कोणत्याही मावळ्याने त्याही परिस्थितीत आपली जागा सोडली नाही.

किंवा कोणी घाबरून पण गेले नाही लढाई घमासान सुरूच राहिली..

मसूदचे या लढाईत प्रचंड नुकसान झाले; सर्वच्या सर्व सैनिक मारले गेले.

शिवाय शिवाजी महाराज हातून निसटले ते वेगळेच

काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले त्याना पन्हाळ गडावरील लढाई ची चांगलीच कल्पना होती त्यामुळे त्यांनी पोचता क्षणी तीन तोफांचा गजर दिला.

इकडे घोडखिंडीत बाजीप्रभू अगदी नेटाने खिंड लढवत होते

त्यांचे शरीर.. रक्तबंबाळ झाले होते सिद्दी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते.

जणु काही खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता व तांडव करीत होता तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडली.

सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.

“होय तनुची केवळ चाळण

प्राण उडाया बघती त्यातून

मिटण्या झाले आतुर लोचन

खड्ग गळाले भूमीवरी..

सरणार कधी रण प्रभो तरी..

हे कुठवर साहू घाव शिरी “..अशी अवस्था झाली होती त्यांची

आणि अखेर ते कृतकृत्य झाले. .आपण दिलेल्या वचनांची पूर्तता झाली एकदाची समाधानाने त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. .आता स्वताच्या प्राणाची त्याना पर्वा नव्हती.

मृत्यू समयी त्याच्या उघड्या डोळ्यात कर्तव्य पूर्तीचे समाधान तरळत होते..

तोफांचा गजर ऐकल्यानंतरच

आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.

अशी लढाई युद्धशास्त्रात लास्ट स्टँड मानली जाते इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी पण अत्यंत कौशल्याने विशाळगडाचा वेढा तोडला व गडावर प्रवेश केला.

विशाळगडाचा किल्लेदार रंग्या नारायण मोरे याने मोठ्या शौर्याने किल्ला लढवला व जौहरला इथेही परास्त केले.

आणि येथून पण सिद्दीला परत जावे लागले.

शिवाजीराजांना जेव्हा बाजीप्रभू च्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा त्यांच्या जीवाला जणु चटका लागला. .अशा शूर आणि इमानी सैनिकाचे जाणे मराठा सैन्याची मोठीच हानी होती छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे “वीर बाजीप्रभू “आणि “वीर शिवा काशिद” हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते.

नंतरच्या काळात शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्दी जोहरला दिला. यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला.

शिवाजी राजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.

रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणारया प्रतिशिवाजी शिवा काशिद यांच्या घरी कालांतराने शिवाजी राजे दस्तूरखुद्द स्वतः गेले. शिवा काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले. शिवा काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले. शिवा काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले. सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले. बाजीप्रभूंच्या कुटुंबियांचे देखील राजांनी सांत्वन केले.

इतिहास ह्या शूर मावळ्यांचा पराक्रम कधीच विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद आणि बाजींसारख्या मावळ्याच्यामुळेच व त्याच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवाजीराजे साकार करु शकले. महाराष्ट्र निर्मितीनंतर शिवाजी राजांचे प्रतिरूप घॆणारे शिवा काशिद व घोडखिंड आपल्या रक्ताने पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू देशपांडे या दोन्ही शूरवीरांचे पुर्णाकृती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.

वीर शिवा काशिद आणि वीर बाजीप्रभूंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा ……

बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या लढाईत बलिदान देणाऱ्यांचे यथोचित मरणोत्तर सन्मान केले. संभाजी जाधव यांचा मुलगा संताजी जाधव यांना मराठी सेनेत सामावण्यात आले. इतरांनाही सेनेत पद देवून सर्वांचा गौरव केला. अशा अनेक शूरवीराच्या बलिदानातूनच स्वराज्य उभे राहिले मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी - फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे..

ते पाहून मराठी माणसाचा उर अभिमानाने भरून येतो.

जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय भवानी ! जय शिवराय !!