Alvani - 6 books and stories free download online pdf in Marathi

अलवणी - ६

रामुकाका सावकाश पावलं टाकत दोघांच्या जवळ येऊन उभे राहीले. त्यांच्या खांद्याला एक पिशवी होती तर दुसर्‍या हातात एक चुळबुळ करणारा मांजराचं छोटंस पिल्लु.

“रामुकाका? अहो होतात कुठे तुम्ही? असे अचानक कुठे निघुन गेलात? काही सांगुन जायची पध्दत…”, आकाशने प्रश्नांची सरबत्तीच सुरु केली.

“सांगतो.. सांगतो.. जरा मला आतमध्ये तरी येऊ द्यात…”, रामुकाका पायर्‍या चढुन व्हरांड्यात येत म्हणाले…

“अहो काय सांगतो?? इथे काय परिस्थीती ओढावली आहे तुम्हाला माहीत आहे का? आम्ही कुठल्या संकटातुन जात आहोत…”, आकाश

“काय झालं?”, रामुकाकांनी विचारले..

मग आकाशने रामुकाका गेल्यानंतर थोडक्यात घडलेल्या घटना त्यांना ऐकवल्या.

थोडावेळ जाउ देऊन रामुकाका म्हणाले…”मी सांगीतलं होतं तुम्हाला.. तुमचाच विश्वास बसला नाही माझ्यावर…”

आकाशला तेंव्हा रामुकाकांची केलेली अवहेलना आठवली आणि त्याने खजील होऊन मान खाली घातली.

“बरं ते जाऊ द्या.. जे झालं ते झालं.. शाल्मली ताई कुठे आहेत?” रामुकाका म्हणाले

आकाशने समोरच्या खोलीकडे बोटं दाखवलं.

रामुकाका जागेवरुन उठले आणि त्या खोलीत गेले. दोन क्षण थांबुन त्यांनी खोलीत सर्वत्र नजर टाकली आणि मग निर्धास्त मनाने ते शाल्मलीजवळ गेले. मग त्यांनी खांद्याच्या पिशवीतुन एक कागदाची पुडी काढली आणि त्यात असलेली राखाडी भुकटी शाल्मलीच्या कपाळाला लावली.

आकाश काही बोलण्यासाठी पुढे झाला, पण जयंताने त्याला हाताने थांबण्याची खुण केली.

मग रामुकाकांनी ती भुकटी मोहीतच्या कपाळाला लावली, नंतर ते आकाश आणि जयंताच्या जवळ आले आणि दोघांच्याही कपाळाला ती भुकटी लावली आणि नंतर स्वतःच्याही कपाळाला ती भुकटी लावुन घेतली.

“रामुकाका? काय आहे हे? ह्या असल्या भुकटीने भुतबाधा वगैरे उतरते असा तुमचा समज आहे का?”, आकाशने न रहावुन विचारले.

रामुकाका त्याच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाले, “हे बघ आकाश.. जेंव्हा चांगले काही घडत असते ना, तेंव्हा नेहमी वाईटाची तयारी ठेवावी आणि त्याला धैर्याने सामोरे जायला खंबीर व्हावे. त्याचबरोबर, जेंव्हा एखाद्याचा वाईट काळ चालू असतो तेंव्हा चांगुलपणावर विश्वास ठेवावा. जशी दिवसानंतर रात्र आहे, तसेच रात्रीनंतर दिवस येणारच आहे, फक्त तो दिवस पहायला आपण डोळे उघडे ठेवायला हवेत.

प्रयत्न करणे आपल्या हाती आह्रे. हातावर हात घेऊन बसलो तर काहीच होणार नाही. आपण काही मांत्रीक, तांत्रीक नाही, कुठला उपाय रामबाण ठरेल हे आपल्याला माहीत नाही. गावच्या मंदीरातील हा अंगारा आहे. तो लावल्याने कोणाचे वाईट तर नक्कीच होणार नाही, झालं तर चांगलंच होईल नाही का???”

रामुकाका बोलत होते तोच शाल्मली आतल्या खोलीतुन अंगाला शाल गुंडाळुन बाहेर आली. पहील्यापेक्षा तिचा चेहरा आता बराच बरा दिसत होता. अंगात अशक्तपणा होता, पण निदान ताप उतरायला सुरुवात झाली होती.

रामुकाका आणि आकाशने एकमेकांकडे पाहीले..

“रामुकाका??? अहो कुठे होतात तुम्ही???”, रामुकाकांना पहाताच शाल्मली म्हणाली.

“सांगतो.. या.. बसा इथं.. तुमच्याशी बरंच काही बोलायचं आहे..”, असं म्हणुन रामुकाका व्हरांड्यातील एका खांबाला टेकुन खाली बसले. बाकीची मंडळीही त्यांच्याशेजारी कोंडाळं करुन बसली.

सर्वांच्या नजरा रामुकाकांकडे लागल्या होत्या.

रामुकाकांनी आपल्या पिशवीमधुन एक लाल रंगाची लांबट पुस्तीका काढुन सर्वांच्या मध्ये ठेवली, त्याला मनःपुर्वक नमस्कार केला आणि ते म्हणाले, “मला इथं आल्यापासुनच खरं तर काहीतरी विचीत्र वाटतं होतं. मलाच का? तुम्हाला का नाही? ह्याच उत्तर माझ्याकडे नाही. पण पहील्यापासुनच आपल्या व्यतीरीक्त अजुन कुणाचं तरी इथं अस्तीत्व आहे जे कदाचीत आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये पण त्याला आपण दिसतो आहोत.. कोणीतरी आपल्यावर, आपल्या हालचालींवर सतत लक्ष ठेवुन आहे असंच मला वाटत होतं. पण तुमचा माझ्यावर विश्वास बसला नाही.”

रामुकाकांनी आपल्या सदर्‍याच्या आत हात घालुन आपली गळ्यातली रुद्राक्षाची माळ बाहेर काढली. उजव्या हाताने त्या माळेचे मणी त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांना लावले, मग ती माळ आपल्या कपाळावर टेकवली आणि ते पुढे म्हणाले, “त्या रात्री मी इथेच शेजारच्या खोलीत झोपलो होतो. किंबहुना झोपण्याचा प्रयत्न करत होतो असं म्हणा. पण मला झोप लागलीच नाही.

खोलीच्या एका कोपर्‍यात मी अंगाची कोंडाळी करुन पडुन होतो. रात्री हवेतला गारवा अचानक वाढला. दातावर दात वाजायला लागले आणि मला एका विचीत्र जाणीवेने ग्रासले. खोलीत नक्कीच कोणीतरी होतं माझ्या.. सर्वांगावरुन एक सरसरुन काटा येऊन गेला. त्या अंधारात एक आकार तयार होत होता. कोणासारखा?, कश्याचा?, कश्यासाठी?… काहीच कल्पना नाही. त्या आकाराला एक न दिसणारे, ओळखु न येणारे डोळे होते जे माझ्याकडे रोखुन बघत होते.

त्या गोठवणार्‍या थंडीतही मला दरदरुन घाम फुटला. हातपाय लटपटायला लागले. वाटलं आयुष्याचा हाच तो शेवट.. आपला मृत्यु अटळ असल्याची जाणीव होऊ लागली. तिथुन उठुन निघुन जावेसे वाटत होते, पण शरीर साथच देत नव्हते. सर्व संवेदना बोथट झाल्या होत्या.

तो विचीत्र आकार काही पावलं (!?) माझ्या दिशेने आला आणि मग तिथेच थांबला. इतक्यावेळ त्याचे ते अदृश्य डोळे माझ्या डोळ्यांकडे रोखले गेले होते, पण आता ती नजर माझ्या डोळ्यांवरुन हटुन माझ्या गळ्याकडे लागली होती. संतापलेली, क्रोधीत, जळजळवणारी नजर…

नकळत माझा हात माझ्या गळ्याकडे गेला आणि माझ्या हाताला ही रुद्राक्ष्याची माळ लागली. तो आकार ही माळ बघुनच थांबला होता. त्याच्या संतापाची झळं मला जाणवत होती. तो आकार हळु हळु दोन पावलं मागे सरला आणि तेथील कपाटाला टेकुन बसला. त्याचे डोळे (!), त्याचा चेहरा (!) माझ्याकडेच बघत होता. खुप वेळ आम्ही दोघंही समोरासमोर बसलो होता.

शेवटी मी ती माळ हातात घट्ट धरली आणि डोळे मिटुन आठवतील त्या देवांचा जप करु लागलो. मी किती वेळ डोळे बंद करुन होतो मलाच ठाऊन नाही, पण जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा समोर कोणीच नव्हते. खरं तर आधीही कोणींच नव्हते. मला कोणी दिसलेच नव्हते, पण.. पण अंधारात.. अंधाराचाच एक आकार झालेला मला जाणवला होता.

सकाळ होताच मी कुणाचीच पर्वा न करता घरातुन बाहेर पडलो आणि वाट फुटेल तिकडे चालत सुटलो. खुप अंतर दुर गेल्यावर मग शरीराचे एक एक अवयव काम करु लागले, संवेदना पुर्ववत होऊ लागली. मी त्या बंगल्यापासुन खुप दुर आलो होतो, पण तुम्ही अजुनही तिथेच होतात आणि तुम्हाला झाल्या प्रकाराची कदाचीत जाणीव सुध्दा झालेली नव्हती. तुम्हाला एकट्याला सोडवुन ही जाववेना आणि परत माघारी फिरायची सुध्दा इच्छा होईना.

मग मी भोर गावात गेलो. तेथे अनेक लोकांशी बोललो, अनेकांना माझा अनुभव सांगीतला. काही लोकांनी वेड्यात काढले तर काही लोकांनी न बोलणेच पसंद केले. परंतु शेवटी एक गृहस्थ भेटले आणि त्यांच्याकडुनच ह्या बंगल्याबद्दल, इथल्या लोकांबद्दल, इथल्या घटीत/ अघटीत घटनांबद्दल ऐकायला मिळाले आणि बर्‍याचश्या गोष्टींचा उलगडा झाला.”

रामुकाका दोन क्षण थांबले, त्यांनी आळीपाळीने सर्वांकडे पाहीले. सर्वजण न बोलता रामुकाकांकडे टक लावुन पहात होते.

“बरं मग काका, आता इथुन बाहेर पडण्याचा काही मार्ग?”, आकाशने विचारले.

“त्या आधी, इथे काय घडले होते? आत्ता जे घडते आहे ते का घडते आहे हे आपण जाणून घेणे महत्वाचे आहे. एकदा ते कळाले की इथुन बाहेर कसे पडायचे ह्याचा आपल्या सर्वांना विचार करुन मार्ग काढता येईल..”, रामुकाका.

“रामुकाका.. आकाश.. नक्की काय घडले आहे इथे? मला काहीच कशी कल्पना नाही? कश्याबद्दल बोलत आहात तुम्ही?”, शाल्मली म्हणाली.

“काही नाही शमु.. मी सांगतो तुला नंतर.. रामुकाका तुम्ही बोला पुढे…”, आकाश शाल्मलीचा प्रश्न टाळत म्हणाला..

“नाही आकाश.. शाल्मली ताईंना काय घडलं होतं हे माहीत असणं गरजेचे आहे. कदाचीत दोन्ही वेळेस जेंव्हा हा प्रकार घडला तेंव्हा त्यांचे मन, त्यांचा अंर्त-आत्मा बेसावध होता. जर घडला प्रकार त्यांना सांगीतला तर त्या मनाने अधीक सक्षम होतील, कदाचीत पुढच्या वेळेस त्या मनाने खंबीर रहातील..”, रामुकाका म्हणाले.

“दोन वेळेस?? नाही रामुकाका, फक्त एकदाच झालं हे काल….”,आकाश म्हणाला..

“नाही आकाश.. मी बरोबर म्हणालो दोन वेळेस. त्या दिवशी रात्री.. ती शाल्मली नव्हती आकाश.. ती.. ती नेत्रा गोसावी होती…”, रामुकाका कापर्‍या आवाजात म्हणाले.

शाल्मली गोंधळलेल्या नजरेने सर्वांकडे बघत होती.

आकाशने एकवार प्रश्नार्थक नजरेने जयंताकडे पाहीले. जयंताने मानेनेच त्याला संमती दिली. मग आकाशने घडलेला प्रकार शाल्मलीला ऐकवला.

क्षणाक्षणाला शाल्मलीच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. आकाशचे बोलुन झाल्यावरत ती बर्‍याच वेळ सुन्न बसुन राहीली. मग अचानक अंगावरची शाल झटकुन ती उभी राहीली आणि सर्वांगावरुन तिने जोरजोराता हात फिरवला जणु काही अंगावर ५०-१०० झुरळं चढली असावीत. लगोलग ती बांथरुममध्ये गेली आणि बर्‍याचवेळ नळाने हात, पाय, तोंड धुवुन ती बाहेर आली.

शाल्मली परत त्या कोंडाळ्यात बसली तेंव्हा तिच्या डोळ्यातुन अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.

रामुकाकांनी शाल्मलीच्या खांद्यावरुन, पाठीवरुन हात फिरवुन तिला शांत केले आणि मग पुढे म्हणाले… “तर आता मी तुम्हाला ह्या बंगल्याचा, इथल्या लोकांचा आणि आपल्यात वावरणार्‍या नेत्रा आणि त्रिंबकलालचा इतिहास ऐकवणार आहे…”

त्यांनी पुन्हा एकदा सर्वांच्यामध्ये ठेवलेल्या त्या लाल रंगाच्या लांबट पुस्तकाला नमस्कार केला आणि ते पुढे बोलु लागले………

१९३० साली तत्कालीन इंग्रज कलेक्टर जॉनाथन हेअडी ह्यांनी हा बंगला बांधला. सुट्टीसाठी किंवा हवापालट म्हणुन आपल्या कुटूंबाबरोबर ते इथे रहायला येत यायचे. त्यांच्याकडे घरकामासाठी पार्वतीबाई नावाची एक महीला आणि त्यांची ३ वर्षांची छोटुकली नेत्रा दोघीजणी येत असत. १९४७ साली हिंदुस्तान स्वतंत्र झाल्यावर जॉनाथनचे कुटूंब आपल्या मातृदेशाकडे, इंग्लंडकडे परतले.

जॉनाथनच्या जाण्यानंतर विष्णूपंत आचार्य ह्यांनी हिंदुस्तान सरकारकडुन हा बंगला विकत घेतला. इंग्रजी कुटुंब परत गेले, परंतु त्यांची मोलकरीण, पार्वतीबाई आणि त्यांची मुलगी नेत्रा इथेच राहील्या. नेत्रा एव्हाना २० वर्षांची झाली होती. पार्वतीबाई थकलेल्या असल्याने विष्णूपंतांच्या घरी नेत्राच कामासाठी येऊ लागली.


नेत्रा.. दिसायला अत्यंत सुंदर होती. केवळ ती एक मोलकरीण होती आणि तिचे रहाणीमान, कपडे साध्यातले होते म्हणुन, नाही तर उंची कपड्यांमध्ये ती एखादी परीच भासली असती. तिचा गौरवर्ण, निळसर डोळे आणि सोनेरी छटा असलेले लांबसडक केस पाहून कुणी म्हणायचे एखाद्या गोर्‍यानेच पार्वतीबाईंना फळवला असणार, नाहीतर एका सर्वसाधारण रुप असणार्‍या पार्वतीबाईंना असे कन्या रत्न कुठून प्राप्त होणार? तसेही नेत्राचे वडील कोणं होते? कुठे होते? हे कुणालाच माहीत नव्हते.

नेत्राला आईशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि त्यामुळेच तारुण्यात येताच तिचे पाय जमीनीवर टेकेनासे झाले.

नेत्रा खरं म्हणाल तर काळाच्या काही वर्ष आधीच जन्माला आली होती. तिचे वागणं त्या कालावधीला साजेसे नव्हतेच. कदाचीत ती सध्याच्या कलयुगाच्या काळात चपखल वाटली असती. तारुण्यात हातात खुळखुळणारा पैसा, मदमस्त तारुण्य आणि बंधन कुणाचेच नाही असे असताना नेत्रासारखी भटकभवानी घसरली नसती तर नवलच.

ज्या काळात बायका पुरुषांसमोर मान वर करुन बघत नसत, चेहर्‍यावरुन पदर घेऊन फिरत असत त्या काळात नेत्रा अनेक तरूणांशी दिवसाढवळ्या नेत्रपल्लवी करत असे. अनेक तरुण केवळ तिच्या नजरेनेच घायाळ झाले होते.

नेत्राला आपले कौमार्य गमवायला फार वेळ लागला नाही आणि पहील्या पहील्यांदा एखादं-दुसर्‍यांदा घडलेला शरीरसंबंध नंतर मात्र वारंवार घडु लागला.

अश्यातच नेत्राची नजर विष्णूपंतांचे थोरले चिरंजीव त्रिंबकलालवर पडली. उंचापुरा, घार्‍या डोळ्यांचा, विलायतेत शिक्षण झाल्याने बोलण्या-चालण्यात एक प्रकारचा आब असलेला, गंभीर-घोगर्‍या आवाजाचा आणि बक्कळ संपत्तीचा मालक असलेला त्रिंबकलाल नेत्राला मनापासुन भावला.

अडचण फक्त एकच होती आणि ती म्हणजे त्रिंबकलाल विवाहीत होता.

परंतु काय अघटीत घडले कुणास ठाऊक, पण त्रिंबकलालची नजर वाकडी पडु लागली. नकळत घडणारी नेत्राबरोबरची नजरानजर कालांतराने वारंवार घडु लागली आणि काही दिवसांतच त्या नजरांना एक अर्थ प्राप्त झाले. सर्वांदेखत बोलणे शक्य नसल्याने दोघं जणं नजरेच्या भाषेत बोलु लागले.

उघड उघड दोघांच्या संबंधांना मान्यता मिळणे शक्यच नव्हते आणि म्हणुनच ते दोघं जणं लपून-छपून भेटु लागले. बहुतांशवेळी रात्री-अपरात्रीच तर कधी कधी दिवसा-उजेडी परंतु दुर निर्जन स्थळी.

परंतु अश्या गोष्टी लपुन थोड्या नं रहातात. ५०-१०० कि.मी.वस्ती असलेल्या त्या छोट्याश्या गावात बातम्या पसरायला वेळ लागला नाही आणि पहाता पहाता ही बातमी विष्णूपंतांच्या कानावर गेली.

विष्णूपंतांनी त्र्यंबकलालला बोलावुन घेतले. लोकं म्हणतात, विष्णूपंत त्या वेळेस रागाने थरथरत होते. त्यांच्या चेहर्‍यावर पसरलेली तांबुस छटा त्यांच्या कानातल्या भिकबाळीच्या रंगाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करत होती. त्र्यंबकलाल पंतांच्या खोलीत गेले तेंव्हा घरातल्या बायका माजघरातुन पडद्या आडु लपुन बाहेरची चर्चा ऐकण्याचा प्रयत्न करत होत्या.

त्र्यंबकलालला पाहून पंतांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सर्वप्रथम त्र्यंबकलालच्या श्रीमुखात भडकावुन दिली. पंतांचा तो आवेश पाहून त्र्यंबकलाल सत्य नाकारु शकले नाहीत, परंतु स्वतःची बदनामी टाळण्याकरता त्यांनी सर्व दोष नेत्रावर ढकलला.

’नेत्रा काळी जादू करण्यात पटाईत आहे, तिने तसेच काहीसे अघोरी करुन मला वश करुन घेतले’ असा धादांत आरोप त्याने केला.

शेवटी काहीही झाले तरी त्र्यंबक पंतांचा पोटचा पोरगा. पंतांनी त्याचे म्हणणे उचलुन धरले.

नेत्रा काळी जादु करते ही बातमी वेगाने गावात पसरली.

ज्या तरुणांना नेत्राने शैय्यासोबत नाकारली होती त्यांनी संधीचा फायदा घेऊन नेत्राला अधीकच बदनाम करायला सुरुवात केली. नेत्रामुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे, तिला गावाच्या हद्दीतुन बाहेर काढावे अशी मागणी जोर धरु लागली आणि शेवटी प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले.

गावाच्या मध्यावर असलेल्या पिंपळाच्या पाराभोवती पंचायत न्यायनिवाडा करायला बसली. सर्व पुरुषांमध्ये नेत्रा एकटी उभी होती सर्वांच्या वासनेने बुरसटलेल्या, बरबटलेल्या नजरांना नजर देत.

पंचायतीने नेत्राला दोषी ठरवले आणि तिला शिक्षा दिली ’अलवण’ची.

पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे केशमुंडन करुन त्यांना कुरुप केले जात असे आणि त्यानंतर त्यांना लाल-रंगाच्या साडीत गुंडाळले जात असे. त्याकाळी अश्या विधवा स्त्रियांना ’अलवणी’ म्हणत असतं. अश्या स्त्रियांना मरेपर्यंत त्याच वेशात विधवेचे आयुष्य घालवावे लागे.

नेत्रा विधवा नव्हती, तिचे कुणाशीही लग्न झाले नव्हते. परंतु जिच्या रुपाला भुलुन तिने अनेक तरुणांना फितवले तेच रुप नष्ट करण्याचा विडा सर्वांनी उचलला.

सर्वांसमोर तिचे मुंडन करण्यात आले. असं म्हणतात त्यावेळी नेत्रा कमालीची शांत होती. ती ना ओरडली, ना रडली. परंतु ज्यांनी तिच्या नजरेत पाहीले त्यांच्या सर्वांगाचा थरकाप उडाला.

Share

NEW REALESED