Rutu Badalat jaati - 7 books and stories free download online pdf in Marathi

ऋतू बदलत जाती... - भाग..7

ऋतू बदलत जाती...७

" हा तुमचा हट्ट आहे तर... पण लक्षात ठेवा जानकी... आता आम्ही तुमचे ऐकतो आहोत.... पण जेव्हा तुम्हाला आमच्या आयुष्यात आणायची संधी चालून येईल... तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्यापासून दूर नाही राहू देणार... आणि मी आशा करतो तुम्ही माझी वाट बघाल.." आणि तो मोठे मोठे पाऊल टाकत तेथून निघून गेला .पण झाडाच्या आडोशाला उभे राहून त्याच्या पाठीमागे आलेले वैदेहीने हे सर्व ऐकले होते....

***

आता पुढे...

वैदेही तशीच सुन्न होवून परत आली आणि आपल्या कुटीत जावून बसली..तिच्या संवेदना जणू संपल्या होत्या..त्याचं एक न एक वाक्य तिच्या कानात घुमत होतं...
"आमचं ह्रदय भृंगा बणून तुमच्या भोवती रुंजी घालतेय...आम्ही तुमच्याशिवाय नाही जगू शकत!! जानकी....जानकी....त्यांच जानकीवर प्रेम आहे...!!त्यांच जानकीवर प्रेम आहे...!!आता तिचा हुंदका फुटला..ओक्साबोक्शी रडायला लागली ,पण तोंड दाबून..आतल्याआत आक्रोश करत होती ...आणि त्या कुटीबाहेर कुणालाही ह्याची कल्पना नव्हती....तिकडे वनात जानकी तिचाही आक्रोश सुरू होता.तिचे प्रेम तिचा स्विकार करायला तयार होते...पण तिने स्वतःच्या हाताने त्याला दूर लोटले....आणि तो...चोवीस वर्षाचा युवक...वयाच्या अठराव्या वर्षापासून त्याची आई त्याच्या मागे विवाहसाठी लागलेली.. पण कुठलीच कन्या त्याच्या मनात भरत नव्हती...आणि प्रेम..ते तर... युद्ध,चढाया...यांपासून त्याला उसंत भेटेल तेव्हा तो प्रेम आदीचा विचार करेल ना..!!.पण जानकी बघताच क्षणी त्याच्या मनात भरली ...प्रथमच त्याला प्रेमाची अनुभूती झाली ..पण त्याच्या प्रेमाला विवाहाच्या पवित्र बंधनात तो बांधू शकत नव्हता....तिचे मन तो वळवू शकला नाही.

***

जानकी जवळच्या ओढ्यावर गेली,तिने आपला चेहरा धुतला आणि जणू काही झालेच नाही हा भाव घेवून आश्रमात परतली.

दुपारी आश्रमात आज कुलगुरू..विशेष शस्त्राबद्ल सांगणार होते...म्हणून वैदेही ही सज्ज होवून कुटी बाहेर आली. जानकीने तिला बघून स्मित केले....पण वैदेहीने मान फिरवून घेतली...शस्त्रात्रांच्या तालीमीतही वैदेही तीला टाळत होती.

"वैदेही नाराज आहे...तेही माझ्यावर...पण का ?.."जानकी विचार करत होती.

"जानकी..!...तुमचे ध्यान कुठे आहे..?."कुलगुरूनी दटावले तिला.

पण का कुणास ठावूक वैदेहीला आज ते चांगले वाटले, नाहीतर नेहमी जानकीवर ओरडणाऱ्या व्यक्तीचा तिला राग यायचा ...असुया ..मत्सर.... यांनी तिच्या मनात घर तर केले नव्हते...?

वैदेहीच्या मुखावर स्मित आलेले बघून जानकीला काहीतरी वेगळेच वाटले,
" आज काहीतरी वेगळे नक्की झाले आहे.. पण आज असे वेगळे काय झाले की वैदेही माझ्यावर नाराज आहे?.. काय घडले आज असे?..... व तिला अचानक आठवले." वनामध्ये राघवेंद्र तिच्यासोबत बोलला.. कदाचित ते वैदेहीने ऐकले तर नाही... वैदेही राघवेंद्र च्या मागे पुढे करत होती... म्हणजे वैदेहीलाहि राघवेंद्र आवडतो की काय ...?हे देवा किती मोठा अनर्थ झाला. देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे वैदेही आणि माझी मैत्री तुटायला नको.... कुणामुळे ही तुटायला नको.. मला वैदेही शी बोलावंच लागेल या विषयावर ...तेही आजच बोलावं लागेल जास्त दिवस केले ...तर अजून तंटा वाढत जाईल ...हो आजच बोलले पाहिजे मला...".तलवार चालवतांना ती विचार करत होती , लक्ष नव्हते तिचे आणि अचानक तलवारीचा एक घाव तिच्या हाताला लागला ती तलवार वैदेही ची होती...

" लक्ष कुठे होतं तुझं जानकी?... माझी तलवार तुझ्या हाता पर्यंत पोहोचली.. कुठे लक्ष होतं? ती धावत पळतच कुटीत गेली आणि काही वन औषधे घेऊन तिने जानकीला मलमपट्टी केली .मैत्रीच अखेर वरचढ ठरली . तिच्या जिवलग सखीचा घाव तिच्याने बघीतला गेला नाही ,जानकीची डोळे भरून आले .तिला जाणवलं की तिच्यामुळे वैदेहीला किती त्रास झाला असेल,अजाणते पणी का होईना पण वैदेही तिच्यामुळे दुखी आहे ,खूप वाईट वाटत होते जानकिला..

वैदेही जानकी ला कुटीत घेऊन गेली आणि तिला खाली आसणावर बसवले .... पाण्याचा ग्लास तिच्या ओठाशी लावला .

"घे पाणी पी... आणि तलवार चालवतांना लक्ष तिथेच असू दे.. "एवढं बोलून वैदेही जायला निघाली ,तर मागून जानकीने तिचा हात पकडला .

"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.."जानकी.

आणि तिला स्वतःजवळ आसनावर बसायला खुणावलं .वैदेही तिच्याजवळ जाऊन बसली.

"वैदेही आज असं काही घडलं आहे का ..की जे घडायला नको पाहिजे होतं..?"जानकी.

"काही घटना घडणे.. आपल्या हातात नसते जानकी ...! आराम कर.. तुला आरामाची गरज आहे, मी कुलगुरूंना सांगते ...की तू जखमी झाली आहेस.."वैदेही.

"वैदेही ..." तीने पाठमोऱ्या वैदेहीला आवाज दिला.

"मला सर्वात जास्त प्रिय आपली मैत्री आहे ... आपल्या मैत्रीमध्ये मी कोणाला येऊ देणार नाही.. मला वचन हवय वैदेही की आपली मैत्री अशीच राहील काहीही झालं तरी.."जानकी.

"हो जानकी... मी वचन देते आपली मैत्री अशीच राहील... काही झालं तरी..." आणि तिने तिला एक घट्ट मिठी मारली .दोघीजणींचे अश्रू वाहत होते, काहीच न बोलता त्या बरेच काही बोलल्या .
"हो जानकी तुझा जखम बघून मलाही कळलं ...की आपली मैत्री खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी.. ती मनातच बोलली आणि तोंडावर स्मित आले.

जानकी आणि वैदेही यांचा जन्म एकाच मुहूर्तावर काही घटकांच्या अंतराने झाला होता ,त्यामुळे त्यांची नावंही सारखी होती. राजा आणि प्रधान दोघांच्या घरी एकाच मुहूर्तावर कन्यारत्न झाले त्यामुळे राजा-राणीला जानकी शी विशेष लळा होता .लहानपणापासून ती राजवाड्यात वाढत होती .लहानाचे मोठे होतांना दोघींमध्ये मैत्री अगदी घनिष्ट झाली .सख्ख्या बहिणी पेक्षा हि जास्त होत्या त्या एकमेकांसाठी.. राजाराणी ही लहानपासून त्या जणू जुळ्या बहिणी आहेत असे त्यांना वागवत होते .त्यांचे वस्त्र,दागिने,विद्या अध्ययन सगळं काही सारखं होतं...

राजा राणींनी लहानपणापासून दिलेल्या प्रेमाच्या ओझ्याखाली जानकी कुठेतरी दबलेली होती, तिने मनात एक निश्चय केला आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकले .

जानकी लहानपणापासून तिला प्रत्येक गोष्टी सोबत करणारी ,चुकीच्या मार्गावरुन तिला परावृत्त करणारी, तिच्या साठी शिक्षा भोगणारी.. आवडणाऱ्या खाऊचा तिच्यासाठी त्याग करणारी.. आणि आजही जर तिने राघवेंद्र ला तिच्याकडे मागितले, तर कदाचित ती तोही देऊन टाकेल..." वैदेहीने ही मनात एक निश्चय केला. आणि तिच्या हि चेहऱ्यावर समाधानाचे स्मित झळकले..
दोघींनी काहीतरी ठरवले होते.
***

असेच दिवस जात होते. वैदेही आणि जानकी तो दिवस सोडला तर नेहमी सारख्याच राहत होत्या. एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होत्या ,त्याच्यात काहीच बदल नव्हता .असेच तीन महिने संपले त्यांची आश्रमातली विद्या संपन्न झाली. घरी जायचं होतं.दोघीही खूष होत्या .

दोघीही त्यांच्या राज्यात परतल्या .त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. राजा राणी ,प्रधान आणि प्रधान पत्नी ,सर्व खुश होते .त्यांचा आनंद बघून जानकी, वैदेहीही खूप खुश होत्या .असेच काही दिवस आनंदात पार पडले ,अचानक एक दिवशी वैदेही तिच्या आईच्या कक्षात काही बोलण्यासाठी जात होती, तेव्हा तिच्या कानावर हळूच काही शब्द पडले .

"महाराज वैदेही आता उपवर झाली आहे, तिच्यासाठी आपल्याला सुयोग्य वर शोधायला काही हरकत नाही..."राणी.

"तुमची चिंता आम्हाला समजते ..आम्ही शास्त्रीबुवांना तिच्यासाठी सुयोग्य वर शोधायला आधीच सांगितले आहे..."राजा.

वैदेहीला समजले, हीच सुयोग्य वेळ आहे आपण जो निश्चय घेतला होता, त्याला पूर्णत्वास नेण्याची.

"आई मला तुमच्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे.... माफ करा पण मघाशी तुम्ही जे बोललात ते मी चुकून ऐकलंय.."वैदेही

"तुम्ही ऐकलेच आहे.. तर तुमचं काय निर्णय आहे यावर" महाराज.

"मला असं वाटते की.. मला सांगायचे आहे की.." वैदेही ला पुढे शब्द सुचत नव्हते ,कसे सांगावे माता-पित्यांना तिला कळत नव्हते.

"वैदेही जे असेल ते स्पष्ट बोला ..."राणी

"मी आधीच वर शोधला आहे माझ्यासाठी..."वैदेही एका श्वासात बोलून मोकळी झाली.

राजाराणी आश्चर्याने एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले आणि नंतर जोरजोरात हसायलाही लागले.

"एवढंच बोलण्यासाठी तुम्हाला एवढी भीती ...आम्ही आमच्या कन्येला पूर्ण अधिकार दिलेत, ती तिच्यासाठी वर नक्कीच निश्चिंत करू शकते....'महाराज.

"कोण आहे तो शूरवीर आम्हाला त्याचे नाव कळेल का?.." राणी.

"सोनगड चे भावी सम्राट युवराज राघवेंद्र..."वैदेही..

महाराज थोडा वेळ विचारात पडले.." राजकुमारी तुमची पसंती निश्चितच खूप उत्कृष्ट आहे... पण मला शंका आहे.."महाराज.

" कसली शंका...महाराज"राणी.

" हे बघा सोनगड फार मोठे राज्य आहे ..आणि तुम्ही छोट्या राज्याच्या राजकुमारी आहात ...त्यांना तुम्ही त्यांच्या सुयोग्य नाही वाटल्या तर...."महाराज.

" तुमची शंका उचित आहे ,पण मला खात्री आहे. राजकुमार राघवेंद्र या विवाहास नक्की तयार होतील, पण त्या आधी मला त्यांची एक गुप्त भेट घ्यायची आहे.."वैदेही.

"गुप्त भेट कशासाठी...?" महाराणी यांनी शंका उपस्थित केली.

" आई.. मी तुम्हाला ते आता नाही सांगू शकत फक्त आपल्या एका गुप्तहेराकडून त्यांच्यापर्यंत माझा संदेश पोहोचवायला, मला तुमची मदत लागेल.." वैदेही.

"तुम्ही दोघं आधीच एकमेकांना ओळखता का? त्यांनाही तूम्ही आवडता का..?महाराज

" त्याबाबतीत मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही.. पण एवढं मात्र नक्की कि ते या विवाहास नक्की तयार होतील. ह्या विवाह मुळे तुमचा राजकीय फायदा ही होईल, तर तुम्ही कराल ना मला मदत..."वैदेही.

" आम्हाला तुमच्यावर गर्व आहे... महाराणी खरंच आमची कन्या सज्ञान झाली आहे ...आम्ही लवकरच एका गुप्तहेराकडून तुमचा निरोप युवराज राघवेंद्र कडे पाठवतो....."महाराज.

राजकुमारी वैदेही खुशीतच तिच्या महालात परत आली. आता फक्त राघवेंद्रची भेट घेऊन सर्व गोष्टी निश्चित करायच्या होत्या.

*******

"राजकुमार राघवेंद्र ...आम्ही ठरवलं आहे की ,येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर तुमचा राज्याभिषेक होईल. आणि त्याच बरोबर त्याच सोहळ्यामध्ये तुमचा विवाहही संपन्न होईल... तर लवकरात लवकर आम्ही आणलेल्या स्थळांपैकी एखादी कन्या पसंत करा ..आणि विवाहास तयार रहा.."सम्राट.
राजकुमार राघवेंद्र नुकतेच एक लढाई जिंकून परत आले होते. सकाळी त्यांचे जंगी स्वागत झाल्यावर ,संध्याकाळी होत असलेल्या पारिवारिक वार्तालापात त्यांच्या पिताश्रींनी त्यांना ठणकावून सांगितले...

"आम्हाला विचार करण्यास थोडासा वेळ द्यावा..."राघवेंद्र.

"तुमच्याकडे एक मास आहे... विचार करून कळवा..."महाराज.

ऋतू बदलत जाती....
नवीन बदलांची .....
नांदी घेवून येती...
ऋतू बदलत जाती....

क्रमक्षः.....

*****
भेटूया पुढच्या भागात...

©® शुभा.