To teach or retain students? books and stories free download online pdf in Marathi

विद्यार्थी शिकवायचे की राखायचे?

विद्यार्थी शिकवायचे की राखायचे ; ऑनलाईन शिक्षणामूळं निर्माण झालेला पेच

अलिकडील काळात हा ऑनलाईनचा काळ आहे. या काळात शाळेत शिकविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाला दररोज अमूक काम करा अशा आशयाचे पत्र दररोजच प्राप्त होत असतात. ती कामं करावीच लागतात. नाही केली तर, वेतन थांबण्याची वा प्रलंबीत राहण्याची शक्यता असते. त्यातच अशी कामं करीत असतांना विद्यार्थ्यांना शिकवायचे केव्हा? असा प्रश्न पडणे साहजीकच आहे. तसं पाहता आजच्या या ऑनलाईनच्या काळात विद्यार्थी शिकवायचे की राखायचे? असा प्रश्न आजच्या शिक्षणकाळात प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.
हा विषय फार गंभीर असा विषय आहे. काही काही शाळेचं ठीक आहे. कारण त्या शाळेत बाबू आहे काम करण्यासाठी. त्या शाळेत पटसंख्याच भरपूर आहे. म्हणूनच बाबूची पोष्ट आहे व बाबू अशी ऑनलाईनची सर्वच कामं करीत असतात. परंतु ज्या शाळेची पटसंख्याच कमी आहे व ज्या शाळेत बाबू नाही. अशा शाळेत कामं करायला शिक्षकाला धडपडावं लागतं. यात एका शिक्षकापाठोपाठ शाळेचा मुख्याध्यापकही कामास लागतो व जिथं विद्यार्थ्यांना शिकविण्याची वेळ असते. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षक उपलब्ध राहात नाही. कसेतरी एका वर्गाचे रुपांतर द्विवर्गात करावे लागते व वर्ग भरवावा लागतो. अशावेळेस दोन वर्गाचे एक वर्ग नेहमीच बनवावे लागत असल्यानं पट वाढतो. अशा वाढलेल्या पटाला नीट शिकवता येत नाही. यात महत्वाची बाब ही की ह्या दोन वर्गाचं एकत्रीकरण झाल्यावर ते वर्ग शिकवता येत नाहीत. तर ते वर्ग राखावे लागतात. यावरुन प्रश्न पडतो की विद्यार्थी शिकवायचे की राखायचे?
विद्यार्थी शिकवायचे की राखायचे? हा खऱ्या शिक्षकाला नेहमी पडणारा प्रश्न. सरकारला त्याचं काहीच वाटत नाही. सरकार फक्त विद्यार्थ्यांना शिकवायचा विचार करते. परंतु सरकार काही प्रत्यक्ष शाळेत येवून शिकवीत नाही. सरकार फक्त बोलू शकतं. शिकवू शकत नाही व बोलायला काहीच जात नाही. हे सरकारलाही माहीत आहे. शिवाय सरकारला माहीत आहे की असल्या ऑनलाईनच्या धोरणानं शिक्षक शिकवू शकत नाहीत. हं, शिक्षक वर्गात मुलांना चांगलं राखू शकतात. शिवाय सरकारला तेच करायचं आहे. वरवर फक्त शासन दाखवतं की त्यांना विद्यार्थ्यांना खरंच शिकवायचं आहे. परंतु तसं कितीही वाटत असलं तरी अंतर्गत बाब ही की सरकारला विद्यार्थ्यांना अजिबात शिकवूच द्यायचं नाही. ही बाब सत्य आहे.
विद्यार्थी शिकू नये असं सरकारला वाटतं ते त्यांच्या ऑनलाईन स्वरुपाच्या धोरणामुळे लक्षात येतं. दररोज बिनकामाची पत्र निघत असतांना व ते काम करीत असतांना नाकी नव येतं व विद्यार्थ्यांकडे नित्यतेनं दुर्लक्ष होतं. दुसरी महत्वाची बाब ही की सध्या काही शाळेतील विद्यार्थी संख्या भरपूर आहे. परंतु शिकवायला शिक्षक नाहीत. शिक्षकांची भरती प्रक्रियाही बंद आहे. अशावेळेस शाळेला शिक्षक मिळत नाहीत. तंतोतंत आणि नेमकेच शाळेत शिक्षक मिळत आहेत. त्यातच कधीकधी ऑनलाईन शालेय वेळेतच काही काही तांत्रिक स्वरुपाची प्रशिक्षणंही करावी लागतात. यात विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षच होते. तशीच काही काही सरकेरच्या कामासाठी शिक्षकांना जुंपलं जातं. मग कसा होईल विद्यार्थ्यांचा अभ्यास. यातूनच विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास होत नाही. कारण शिक्षकांना अशा कामामुळेच शिकवता येत नाही. हं, महत्वपुर्ण गोष्ट ही की राखता नक्कीच येवू शकते.
विद्यार्थी विकास लक्षात घेवून महत्वपुर्ण गोष्ट ही सांगाविशी वाटते की सरकारनं फक्त विद्यार्थी शिकविण्याकडे जास्त कल द्यावा. त्यासाठी ऑनलाईन कामं विशेषकरुन बंद करावीत. अन् ती जर कामं करुनच घ्यायची असेल तर ती बाबूंनी करावी. अशा शाळेची सर्व कामं त्या त्या बाबूंकडे हस्तांतरीत करावीत. असे जर झाले तर विद्यार्थ्यांना शिकविणारा शिक्षक सहज विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी उपलब्ध होवू शकतो. विद्यार्थी राखायचा प्रश्न उद्भवत नाही. विद्यार्थीही चांगले शिकू शकतात हे तेवढंच खरं आहे. मुळात भाग असा की विद्यार्थी शिकावेत. मग ती गरीबाची असो की धनिकांची. त्यांचं नुकसान सरकारनं आपल्या ऑनलाईन कामामुळं करु नये म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०