Chimukali Aesopniti books and stories free download online pdf in Marathi

चिमुकली इसापनीती

चिमुकली इसापनीती

साहित्यिक = राम गणेश गडकरी

१. चिमुकली इसापनीती/उंदीर व बेडूक

२. चिमुकली इसापनीती/दोघे सोबती

३. चिमुकली इसापनीती/लबाड गाढव

४. चिमुकली इसापनीती/देव आणि उंट

५. चिमुकली इसापनीती/कासव आणि ससा

६. चिमुकली इसापनीती/मुलगा आणि वाघ

७. चिमुकली इसापनीती/सिंह आणि उंदीर

८. चिमुकली इसापनीती/वेडे सांबर

९. चिमुकली इसापनीती/मांजर व बगळी

१०. चिमुकली इसापनीती/चिमणी आणि मुंगी

१. चिमुकली इसापनीती/उंदीर व बेडूक-

एका उंदराची एका बेडकाशी फार ओळख होती. उंदीर एका घरातील कोठीत राहात होता व बेडकाचे घर एका नदीत होते. एकदा उंदराने बेडकाला आपले घरी जेवावयास बोलाविले होते. पुढे बेडकाने उंदराला आपले घरी बोलाविले. पण नदीतून उंदराला बेडकाचे घरी जाता येईना. कारण उंदराला मुळीच पोहता येत नाही. मग बेडकाने एक तोड काढली. उंदराचे पाय आपले पायास बांधले आणि आपण पोहू लागला. यामुळे उंदीर बुडाला नाही खरा; पण नाका-तोंडात फार पाणी जाऊ लागले आणि निंमे वाटेतच बिचारा उंदीर तडफडून मेला. परंतु उंदराचे पाय बांधले होते आणि बेडूक सारखा पोहत होता. यामुळे तो मेलेला उंदीर तळाशी बुडाला नाही. पण तसाच वर तरंगत होता. हे वरून एका गरुडाने पाहिले. लागलीच गरुडाने खाली झेप टाकली आणि तो उंदरास वर नेऊ लागला. पण बेडकाचे पायही उंदराला बांधलेले होते; यामुळे तोही उंदराबरोबर वर गेला. गरुडाने दोघांनाही घरी नेले आणि खाऊन टाकले. पहा, भलती संगत केली यामुळे असे झाले. बेडूक नदीत राहणारा आणि उंदीर जमिनीवर राहणारा. यामुळे या दोघांची मेजवाणी एका बाजूस राहिली आणि गरुडाची बरीक मेजवानी झाली. यासाठी संगत फार विचाराने करावी.

२. चिमुकली इसापनीती/दोघे सोबती-

रामा व हरी या नावाचे दोघे सोबती रानातून वाट चालत होते. रामा अंगाने बराच बोजड होता; पण हरी अगदीच सडपातळ व चपळ होता. झाडीतून एखादे जनावर येईल आणि आपणाला खाईल अशी रामाला सारखी भीती वाटत होती. हरी फार बढाईखोर होता. तो रामाला फुशारकीने उगीच धीर देत होता. तो एकसारखा रामाला हसत होता आणि सांगत होता की, रामा, तू फार भितोस बुवा! अरे, एखादा वाघ आला तरी मी आहे ना! मी ताबडतोब तुझे रक्षण करीन. असे बोलत ते चालले आहेत तोच झाडीतून एक मोठी आरोळी ऐकू आली. आरोळी ऐकताच दोघेही फार घाबरले. हरी सडपातळ आणि चपळ होता; रामाला तसाच टाकून तो भरभर एका झाडावर चढून गेला. बिचारा रामा बोजड होता. तो हरीसारखा झाडावर कसा चढणार? मग तो तसाच डोळे मिटून जमिनीवर पडला! जसा काही तो मेलेलाच आहे. रामाला माहीत होते की, सिंहाला मेलेली शिकार आवडत नाही. लवकरच झाडीतून एक भला मोठा सिंह बाहेर आला. रामाला पाहताच सिंह जवळ आला आणि रामाचे नाक-कान हुंगू लागला. तो भयंकर सिंह इतका जवळ आला तरी रामाने अगदी हालचाल केली नाही व नाकातून वाराही बाहेर जाऊ दिला नाही. हरी झाडावरून हे सारे पाहात होता. अखेर, रामा मेलेला आहे असे सिंहाला वाटून तो निघून गेला. लागलीच हरी खाली उतरला व दोघेही फिरून वाट चालू लागले. आपण रामाला फसविले याची हरीला लाज वाटतच होती; पण ते सारं हशांवारी घालवावयासाठी हरीने रामाला विचारले, काय रे, सिंहाने एवढे तुला कानात काय सांगितले? रामा बोलला, हरीसारखा लबाड सोबती कामाचा नाही; बढाईखोर माणसावर भरवसा ठेवू नये, असे सिंहाने मला सांगितले आहे. हे ऐकून हरी फारच खजील झाला.

३. चिमुकली इसापनीती/लबाड गाढव-

एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपले घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून ती घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच पाणी मिठाचे गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. दुसरे खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही; उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले. मुलांनो, याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फारच मोठी शिक्षा घडते.

४. चिमुकली इसापनीती/देव आणि उंट-

एकदा उंटाने देवाजवळ तक्रार केली की, देवा, तू बाकीची जनावरे किती चांगली केली आहेस; कोणाला नखे दिली आहेस, कोणाला सुळे दात दिले आहेस आणि कोणाला शिंगे दिली आहेस, यामुळे ती जनावरे आपापले रक्षण करितात; पण मला तेवढे काहीच दिले नाहीस; मग मी आपले रक्षण कशाने करावे? बरे तर देवा, मला निदान शिंगे तरी दे.देवाने सांगितले की, बाबा रे, तू चांगला मोठा आहेस. तुला पाहूनच दुसरी जनावरे भिऊन पळून जातील; तुला शिंगे काय करावयाची आहेत? देवानी अशी समजूत घातली; पण उंट आपला हेका सोडीना. अखेर देवाला कंटाळा आला तरी उंटाची कुरकूर चाललीच होती, हे पाहून देवाने उंटाला शिंगे तर दिली नाहीतच; पण मूळचे उंटाचे मोठाले कान बरीक कापून टाकले. उंटाचे कान लहान असतात याचे कारण हेच. मुलांनो, हा अधाशीपणाचा परिणाम बरे! यासाठी नेहमी समाधानाने रहावे.

५. चिमुकली इसापनीती/कासव आणि ससा-

एक कासव हळू हळू घरी चालले होते. कासवाला लवकर चालता येत नाही; यामुळे थोडेसे चालावयासही फार वेळ लागे. हे एका सशाने पाहिले. ससा फारच जलद धावतो. तो हसून कासवाला बोलला, काय रे, तू किती सावकाश चालतोस? अशा रीतीने तू घरी कधी पोहोचणार? कासव शहाणे होते. ते बोलले, बाबा रे, तू एवढी ऐट मारू नकोस! मी सावकाश चालतो आणि तू जलद पळणारा आहेस. बरे, तर आपण एक पैज मारू. ती समोर टेकडी दिसते ना? तेथे आधी कोण पोहोचते ते पाहू बरे. हे ऐकून सशाने हसत हसत कासवाला सांगितले, चल, मला ही पैज कबूल आहे. नंतर दोघेही वाट चालू लागले. सशाने एक धाव मारून कासवाला मागे टाकले. कासव सावकाश चाललेच होते. सशाने मागे वळून पाहिले तो कासव फारच दूर! हे पाहून सशाने विचार केला की, हे कासव तर फारच मागे आहे; मग इतकी घाई कशाला हवी? आता या गार झुडपात थोडीशी झोप काढावी. कासव जरा जवळ आले की, एक उडी मारून टेकडी गाठावी. असा विचार करून ससा एका झुडपाखाली पडला व लवकरच गाढ झोपी गेला. इकडे बिचारे कासव हळू हळू चालत होते. पण ते वाटेत कोठेही थांबले नाही; सारखे चालतच होते. अशा रीतीने लवकरच ते टेकडीवर जाऊन पोहोचले. काही वेळाने ससा जागा झाला आणि पाहतो तो कासव टेकडीवर बसलेले! बिचारा ससा हे पाहून फारच वरमला. नंतर कासव बोलले, बाबा रे, कधीही ऐट मारू नये; आणि आपले काम नेहमी वेळेवर करावे. तू जलद चालणारा ससा, पण आळसाने फसलास!

६. चिमुकली इसापनीती/मुलगा आणि वाघ-

एक मुलगा एका कुरणात मेंढरे चारीत असे. जवळ शेतात शेतकरी आपले काम करीत असत. या कामकरी लोकांना फसवावयासाठी तो लबाड मुलगा दररोज उगीच ओरडत असे की, वाघ आला रे वाघ! मुलाची अशी आरोळी ऐकून बिचारे शेतकरी धावून येत व वाघबीघ काही नाही, असे पाहून परत जात. शेतकरी असे फसले की, तो मुलगा हसत सुटे. दोन चार वेळा शेतकरी असे फसले; पण पुढे मुलाची आरोळी ऐकून ते येईनातसे झाले. अखेर एकदा खरोखरीच वाघ आला. वाघाला पाहून तो मुलगा फारच घाबरला व ओरडू लागला की, वाघ आला रे वाघ! पण लोकांना वाटले की, तो लबाड मुलगा नेहमीसारखाच फसवीत असेल. अशा समजुतीने कोणीही मदतीसाठी धावून आले नाही व इकडे वाघाने मुलाची सारी मेंढरे मारून टाकली. पहा, एक वेळ खोटे बोलले की, पुढे लोक आपणावर भरवसा ठेवीत नाहीत.

७. चिमुकली इसापनीती/सिंह आणि उंदीर-

एक सिंह दररोज एका झाडाखाली निजत असे. जवळच एक उंदीर राहात होता. सिंहाला झोप लागली की, उंदीर बिळातून बाहेर येई व सिंहाची आयाळ कुरतडीत असे. तो जागा झाला की उंदीर पळून जाई. एकदा सिंह जागा होता तोच उंदीर बाहेर आला. सिंहाला झोप लागली आहे असे उंदराला वाटले आणि तो जरासा जवळ आला. पण सिंहाने लागलीच उंदराची शेपटी धरली. उंदराने पाहिले की, आता सिंह आपणाला मारणार. मग तो रडू लागला व हात जोडून सिंहाची विनवणी करू लागला की, महाराज, मला क्षमा करा. माझा जीव घेऊ नका. आपण मला मारले नाही तर मी कधी तरी आपले उपयोगी पडेन. हे ऐकून सिंहाला हसू आले व तो बोलला की, जा, वेडा कुठला. मी सिंह जनावरांचा राजा आहे आणि तू एवढासा उंदीर. तू माझे काय काम करणार? पण मला तुझी दया येते. तू आता जा; फिरून असे करू नकोस. सिंहाने सोडून देताच उंदीर घरात पळून गेला. पुढे काही दिवसांनी एक पारधी तेथे आला व झाडाखाली आपले जाळे पसरून निघून गेला. काही वेळाने सिंह निजावयाला आला. सिंहाने जाळे पाहिले नाही आणि तसाच निजू लागला. तोच जाळे अंगावर पडून सिंह खाली सापडला. हे पाहून बिचारा सिंह ओरडू लागला. आेरडणे ऐकून उंदीर बाहेर धावून आला, व सिंहाला बोलला, महाराज, घाबरू नका. मी आपला चाकर हजर आहे. आता जाळे तोडून टाकतो. असे बोलून तो दातांनी ते जाळे कुरतडू लागला. नंतर एका घटकेत उंदराने सारे जाळे तोडले आणि सिंहाला मोकळे केले. पाहा, उंदीर एवढासा जीव! पण सिंहाला कसा उपयोगी पडला. कोण कधी उपयोगी पडेल याचा नेम नाही.

८. चिमुकली इसापनीती/वेडे सांबर-

एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बरीक फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते! सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताने ते बोलले, अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बरीक माझा जीव घेतला! मुलांनो, जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!

९. चिमुकली इसापनीती/मांजर व बगळी-

एका मांजरीची एका बगळीशी फार ओळख होती. बगळी फार चांगली होती; पण मांजर मोठी लबाड होती. तिने एकदा बगळीला आपल्या घरी जेवावयास बोलावले. बिचारी बगळी भोळी होती! तिला मांजरीची लबाडी काय ठाऊक? ती तशीच आनंदात मांजरीकडे गेली. मांजरीने एका ताटात खीर आणली आणि बगळीला बोलली, ताई, आपण दोघी बहिणी बहिणी आहो, यासाठी आज एका ताटातच जेवू. असे बोलून, मांजरी जिभेने चटचट खीर चाटू लागली. पण बगळीची चोच लांब होती! तिला ताटातून खीर मुळीच खाता येईना! लबाड मांजरी खीर खातच होती. आणि मधून मधून बगळीला विचारत होती की, ताई, सावकाश होऊ दे. खीर बरी झाली आहे ना? बगळीला राग आला पण ती मुळीच बोलली नाही. उलट काही झाले नाही असे तिने दाखविले आणि हसत हसत घरी निघून गेली. पुढे मांजरीची एकदा खोड मोडावी असा बगळीने विचार केला. काही दिवसांनी तिने मांजरीला आपले घरी जेवावयास बोलावले! मांजरी आशेने बगळीकडे गेली. पण बगळीकडे बारीक तोंडाची एक बरणी होती आणि तीत आंबरस घातला. नंतर तिने मांजरीला खावयास सांगितले व आपणही रस खाऊ लागली. बगळीची मान लांब आणि बारीक होती; यामुळे तिला सहज रस खाता येत होता. पण मांजरीचे डोके पडले मोठे! ते काही बरणीत शिरेना! मांजरीने बरीच धडपड केली पण तिचे मुळीच फावले नाही. अखेर बगळीने विचारले, बाई, आजचा बेत बरा आहे ना? तू रस का खात नाहीस? खिरीसारखा चांगला रस आहे. हे ऐकून मांजरी ओशाळून घरी निघून गेली. याचे नाव जशास तसे.

१०. चिमुकली इसापनीती/चिमणी आणि मुंगी-

एक लहानशी मुंगी नदीवर पाणी पीत होती. पाणी पिता पिता तिचा पाय घसरला आणि ती नदीत पडली. जवळच एका झाडावर एक चिमणी बसली होती. ती फार दयाळू होती. मुंगी सारखी वाहून चालली होती. हे पाहून चिमणीने झाडाचे एक पान तोडले आणि ते नदीत टाकले. पानावर बसून तरंगत मुंगी जमिनीवर आली. नंतर काही वेळाने एक मुलगा तेथे आला. तो हातातील गोफणीने पाखरे मारीत असे. चिमणीला पाहताच मुलाने एक दगड उचलला आणि गोफणीचा नेम धरला. हे पाहून मुंगीने विचार केला की, चिमणीने मला मघाशी मदत केली आणि मला वाचवले. आता ती मरत आहे, तर मी तिला मदत केली पाहिजे. मग मुंगी हळूच जाऊन मुलाला कडकडून चावली. मुंगी चावताच मुलाचा नेम चुकला आणि गोफणीतून दगड खाली पडला. दगडाचा आवाज ऐकून चिमणी भूर्रकन उडून गेली. पहा, मुलांनो, आपण लोकांना उपयोगी पडलो तर लोक आपणाला उपयोगी पडतात.

***