Power of Attorney 2 - 4 books and stories free download online pdf in Marathi

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ४

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ४

भाग ३  वरून पुढे वाचा  ....

काही दिवस असेच वाट पाहण्यात गेले. उत्सुकता वाढत होती, पण साहेब, निश्चिंत होते, ते म्हणाले, की मुळीच काळजी करू नकोस, निवड होणार याची मला पक्की खात्री आहे.

एक दिवस संध्याकाळी विभावरी हिरमुसलं तोंड करून आली. माई एकदम धसकल्या. किशोर पण अजून आला नव्हता, विभावरी आली आणि न बोलता सोफ्यावर बसली.

चेहरा खूप उतरला होता. माईंनी काळजीने विचारलं “ अग काय झालं? जरा सांगशील का?”

“मला एक वर्षा साठी अमेरिकेला जावं लागणार आहे ,माई,” – विभावरी.

“अग काय, सांगतेस काय? असं अचानक? अरे, देवा! मग आता?” माईंनी बावचळून अनेक प्रश्न विचारले.

“मी जमणार नाही असं सांगीतलं आहे, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही.” – विभावरी.

हे बोलणं चालू असतांनाच किशोर आला. या दोघींचे चेहरे पाहून त्याला अंदाज आलाच,  की काही तरी वेगळं घडलं आहे म्हणून.

“काय झालं?” – किशोर.  

“मला एक वर्षासाठी अमेरिकेत जावं  लागणार आहे.” – विभावरी.

“अरे! हे काय नवीनच! काल पर्यन्त तर काहीच नव्हतं. तू काही बोललीच नाहीस.” किशोरने आश्चर्य व्यक्त केलं.

“मला पण आजच बॉस ने सांगीतलं. त्याला सुद्धा आजच कळलं.” – विभावरी.

थोडा वेळ कोणीच बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतं. मग माईच म्हणाल्या “ विभा, तू गेल्यावर माझी तर अवस्था बिकट होणार आहे. माझ्या काही पचनी पडत नाहीये हे सारं”

“विभावरी, तू सांगून पहा न,  की आत्ताच लग्न झालं आहे त्यामुळे दुसऱ्याला पाठवा. वर्षभरानंतर मी जायला तयार आहे म्हणून.” – किशोर.

“सांगून झालं, पण बॉस म्हणाला की त्याला सांगण्यात आलं आहे की मी जर नकार दिला तर नोकरीचा राजीनामा घ्या म्हणून.” – विभावरी.

“अरे बापरे असं का? तू या कंपनीत इतकी वर्ष इमाने इतबारे नोकरी केली त्याचं हे फळ? मला तर काही कळतच नाहीये.” किशोर.

“काय कारण आहे हे मलाही काळात नाहीये, पण बॉस म्हणाला, की प्रेसिडेंट ट्रंप च्या अमेरिका फर्स्ट या घोषणे मुळे सगळी आयटी इंडस्ट्री हादरली आहे. सगळीकडे अस्थिर वातावरण झालेलं आहे. त्यामुळे, नकार दिलास तर तुझी नोकरी जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुला विचार करावा लागेल.” विभावरी.

“बापरे, मग आता, अश्या परिस्थितीत तुला तर जावंच लागेल. अरे देवा.” – माई.

“नाही माई, मी उलट विचार करते आहे. मी राजीनामा देते. दुसरी नोकरी काय दोन चार महिन्यात मिळून जाईल. पगार थोडा कमी मिळेल पण तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.” - विभावरी.

“किती काळा साठी जा म्हणताहेत?” – किशोर.

“एक वर्षासाठी.” – विभावरी.

“मग काय प्रॉब्लेम आहे?” – किशोर.

“म्हणजे काय? किशोर तू बोलतो आहेस हे?” – माई आता आश्चर्याने म्हणाल्या, त्यांना असं वाटलं होतं की किशोर कडाडून विरोध करेल, पण हा तर खुशाल जा म्हणतो आहे. “विपरीतच आहे.”

“नाही आई, हे बघ, आता माझं प्रमोशन होणार, आणि माझी दूर कुठे तरी म्हणजे आख्या देशभरात कुठेही, बदली होणार. तसेही आम्हाला वेगवेगळे राहवचं लागणार आहे. समजा  माझी बदली तामिळनाड मधल्या एखाद्या गावात किंवा उत्तराखंड मधल्या गावात झाली तर महिनोन महिने भेटणं शक्य होणार नाही. मग ही अमेरिकेला असली काय किंवा पुण्यात असली काय, फरक काहीच पडणार नाहीये.” – किशोर.

“अरे पण, मी काय करु?” माई.

“तू माझ्या बरोबर, माझी जिथे बदली होईल तिथे.” एक वर्षांनंतर विभावरी वापस येईल आणि माझी पण बदली महाराष्ट्रातच होईल. मग काहीच अडचण नाही. समजा विभावरीने नोकरी बदलली, आणि सहा महीने झाल्या नंतर, त्या कंपनीने न्यूझीलंडला जायला सांगीतलं, तर काय ती पण नोकरी सोडणार का? जरा तर्क संगत विचार करा म्हणजे त्रास होणार नाही.” – किशोर म्हणाला.  

“विभावरी तुला माहीत होतं का की प्रमोशन नंतर बदली होणार आहे ते?” – माई.

“हो माई. मला कल्पना होती. साधारण पणे प्रमोशन झालं की बदली होतेच.” – विभावरी.

“आता तुम्हाला मान्य असेल, तर मी काय बोलणार? अरे, लग्नानंतरचे सर्व दिवस अभ्यास करण्यात घालवलेत, आणि आता दोघं दूर देशी. काय म्हणायचं तुम्हाला.” माई नर्वस झाल्या होत्या.

“आई, अग अशी नर्वस होऊ नकोस, वर्ष भराचा तर प्रश्न आहे. हा हा म्हणता दिवस निघून जातील. नको काळजी करू.” किशोर.

“हो माई, खरंच वर्ष कसं संपेल ते कळणार पण नाही. तुम्हाला नवीन गावात नवा अनुभव मिळेल. छान वाटेल.” – विभावरी.

तो विषय त्या दिवसापूरता  थांबला. पण रात्री किशोर आणि विभावरी दोघेही विचलित होते. त्यांना सुद्धा हा झटका सहन होत नव्हता. जरा गप्प गप्पच होते दोघेही.

“किशोर, मला काही हे बरोबर वाटत नाहीये, मी सोडते नोकरी. माईंना फार एकटं एकटं वाटेल.” – विभावरी.

“विभावरी, लाखांच्या पगाराची नोकरी सोडणं म्हणजे चेष्टा नाहीये, माझा पगार वाढेल, सगळं मिळून जवळपास सत्तर ते ऐंशी च्या घरात जाईल, आपला संसार नक्कीच चांगला चालेल, पण तुलाच घरी बसून कंटाळा येईल, पुन्हा मी नसेन. तू आणि माइच फक्त. मग कदाचित तुला आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप होऊ शकतो. मला तुझ्या पगाराचा लोभ नाहीये, पण तू नीट विचार कर आणि मगच ठरव, एवढंच मला म्हणायचं आहे.” -किशोर.

“पण किशोर, मी नोकरी सोडली तर आम्ही तुझ्या बरोबर येऊ शकतो ना, हे तू का नजरे आड करतो आहेस? मला तुझ्या शिवाय नाही जमणार रे.”- विभावरी.

“खरंच असं होऊ शकतं? हे तर फारच छान. पण मग तुझ्या करियरचं काय? मला परीक्षेच्या भरीस पाडून तू काय मिळवलं? या अभ्यासा पाई आपण आपल्या आयुष्यातले खूप रोमांचक क्षण गमावले. असं वाटलं होतं की आता आनंदी आनंदच आहे आपल्या जीवनात, पण ते म्हणतात ना “घी देखा लेकिन बडगा नाही देखा,” तशी अवस्था झाली आहे आपली. नुसती वाताहत, अजून काही नाही.” – किशोर उद्वेगाने  म्हणाला. बराच वेळ कोणीच बोललं नाही, शेवटी विभावरी किशोरच्या जवळ सरकली म्हणाली, “जाऊदे उद्या विचार करू, आजची रात्र का वाद घालत वाया घालवायची?” किशोरला पण ते पटलं आणि त्यांनी तिला मिठीत घेतलं.

दूसरा दिवस, वातावरण जरा तंगच होतं. कोणीच कोणाशी न बोलता सगळे व्यवहार आटोपत होते. त्या दिवशी किशोरला त्याची ट्रान्सफर ऑर्डर मिळाली. बिहार मधल्या दरभंगा  शहरात त्याचं पोस्टिंग करण्यात आलं होतं. पुण्याहून डायरेक्ट बिहार मधे जायचं म्हंटल्यांवर किशोर जरा दचकलाच, पण साहेबांनी त्याला धीर दिला. म्हणाले, “किशोर चिंता करू नकोस, जी ब्रँच अलॉट झाली आहे, त्याची सर्व माहिती तुला बँकेच्या मॅन्यूअल मधे मिळेल. आणि गाव कोणतंही असू दे बँकेचे व्यवहार हे ठरलेल्या नियमानुसारच चालतात. मग बिहार असुदे की पंजाब. माणसांना ओळखायला शिक आणि सर्वांशी आत्मीयतेने वाग  म्हणजे तुला काही त्रास होणार नाही.”

साहेबांनी कितीही समजावलं होतं तरी किशोरच्या मनावर टेंशन आलाच होतं. रेडियो आणि टीव्ही वर बिहारच्या ज्या बातम्या यायच्या त्यामुळे किशोर खूप घाबरला होता. घरी आल्यावर, त्यांनी ही बातमी सांगितल्यावर तर कहरच झाला. पण विभावरी जरा विचार करत होती. तिने कोणाला तरी फोन लावला. थोडा वेळ बोलल्यावर ती बेडरूम मधून बाहेर आली. म्हणाली, “ आपल्याला या शहराविषयी काहीच माहिती नाहीये, माझा एक सहकारी आहे तो दरभंग्याहून आला आहे. त्याला मी आत्ता इथे घरी बोलावलं आहे. आपण त्याच्याशी बोलू म्हणजे आपल्याला कळेल.” मग सर्वांची जेवणं झाल्यावर सगळे विभावरीच्या सहकाऱ्याची वाट पाहत बसले.

विभावरीचा सहकारी आल्यावर त्यांनी बरीच माहिती दिली. “आंबा आणि मकाणा यांचा खूप मोठा व्यापार तिथे चालतो, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज बऱ्याच आहेत पण मोठ्या अश्या दोन तीनच आहेत. आता तिथे AIIMSचं बांधकाम चालू आहे, माणसं समंजस आहेत, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांच्या व्ययक्तिक भानगडीत पडू नका. एकमेकांचे दुश्मन असलेल्या दोन्ही पार्ट्याशी तुम्ही चांगले संबंध ठेऊ शकता. तुम्ही दोघांच्या भांडणात जर पडला नाही, तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. गुंडागर्दी तर आहेच. महाराष्ट्र त्या मानाने खूपच शांत आहे. थोडी काळजी घ्या बस.” असं अत्यंत मोघम बोलून विभावरीचा सहकारी चालला गेला. काळजी मिटली नाहीच, उलट वाढलीच. आता तर सरळ सरळ सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झाला होता.

“किशोर, तू प्रमोशन नाकार, नको आपल्याला असा मानेवर टांगती तलवार ठेवणारा पैसा. कमी पैशात काटकसरीने राहू पण आनंदात राहू.”- माई.  

माईच असं म्हणाल्यामुळे भलताच पेच निर्माण झाला होता. शेवटी किशोर म्हणाला की “बघू उद्या, विचार करू आणि मगच निर्णय घेऊ. पण माई तू डोकं नको शिणवू, त्या साठी आम्ही आहोत.”

रात्री विभावरी म्हणाली “किशोर काय करायचं समजत नाहीये, तू बिहार सोडून दुसरं शहर मागून बघ ना, बिहार म्हंटलं की भीती वाटते.”

“विभावरी, आपण फार सुरक्षित जीवन जगतो आहोत, यात वाद नाही. पण पळपुटेपणा करून कसं चालेल? अग कसंही असलं तरी तिथेही माणसंच राहतात, हे बघ, मी तिथला नाही म्हंटल्यांवर, त्यांच्या कुठल्याही भांडणा मधे मी असणारच नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. काळजी नको कारूस. तू अमेरिकेत जा, मी बिहारला जातो आईला पुण्यातच ठेऊ. जरूर  पडली तर पटण्याहून पुण्याला फ्लाइट आहे, मी दोन तासात पुण्याला येऊ शकतो. फक्त तू आईला समजाव, तुझं तिला लवकर पटतं.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.