Vivah books and stories free download online pdf in Marathi

विवाह

Amiita Salvi

amitaasalvi@gmail.com

लव्ह मॅरेज की ॲरेन्ज्ड मॅरेज

--------- -----------

काही दिवसांपूर्वी मी माझ्या मॆत्रिणीकडे-नीताकडे गेले होते.खूपच टेंशनमध्ये दिसत

होती. बोलण्याकडेही नीटसे लक्ष नव्हते.मी तिला त्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या

डोळ्यात पाणी तरळले. ती तिच्या मुलीविषयी-अनघाविषयी बोलू लागली. "अनघा

यंदा अठ्ठावीस वर्षांची झाली; पण लग्नाचे बघायला देत नाही. मी ठरवून लग्न

करणार नाही असे म्हणते." " तिला कदाचित् कोणी आवडत असेल." मी म्हटले.

" मी तिला तेही विचारून पाहिले. तर म्हणाली, ' तसे काही नाही.पण मी केला तर

प्रेमविवाहच करणार. ज्याला मी ओळखत नाही.ज्याचा स्वभाव, आवडी-निवडी काहीच

मला माहीत नाही त्याच्याबरोबर मी आयुष्यभराचे नाते कसे जोडू? माझ्या कल्पनेतला

साथीदार मला मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन.' तिला मी कसे समजावू?"

नीता सांगत होती. "ती म्हणते त्यातही तथ्य आहे नं? आजची पिढी असाच विचार

करते.आणि त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत असेही म्हणता येत नाही." मी अनघाची बाजू

घेऊन नीताचे टेंशन कमी करण्याचा प्रयत्न केला. "पण एकदा लग्नाचे वय उलटून

गेले, की लग्न जमणे कठीण होऊन बसेल. तिच्या मनासारखा मुलगा तिला भेटणार

कधी ? शिवाय तिच्या कल्पनेतला मुलगा तिच्या संपर्कात आला तर तो तिच्या प्रेमात

पडेल कशावरून? त्याचेही पत्नीविषयी काही आडाखे असतीलच ना? प्रेम दोन्ही

बाजूनी असावे लागते. असा ठरवून प्रेमविवाह होत नाही." नीता कळवळून बोलत

होती. तिच्या असहायतेमागे मुलीच्या भविष्याविषयी चिंता होती.

नीताची काळजी अगदी योग्य होती. प्रेम ठरवून केले जात नाही. प्रेमाचे आकर्षण

नॆसर्गीक असायला हवे. जगातील लाखो तरूण तरूणींमधून आपण एकमेकांसाठीच

जन्म घेतला आहे असे त्या दोघानाही वाटणे हा मोठा योगायोग आहे आणि

योगायोग घडवून आणता येत नाही. मग काय योगायोग जुळून येईपर्यंत वाट पहायची?

अशा दुराग्रहाचा एखादी अयोग्य व्यक्ती गॆरफायदा घेण्याची शक्यता नाकारता

येत नाही. त्यापेक्षा योग्य वयात वडीलधा-यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक पद्धतीने

विवाह ठरवणे अधीक हिताचे ठरेल.

हे खरे आहे की आपला जीवनसाथी कसा आहे याची बरीचशी कल्पना

प्रेमविवाह करताना दोघानाही असते. एकमेकांच्या रुपावर, बोलण्या - चालण्यावर,

स्वभावावर भाळूनच प्रेम निर्माण होते. पण कधी कधी छाप पाडण्यासाठी केलेले

चांगुलपणाचे ते नाटक असू शकते. समोरच्या व्यक्तीच्या संस्कारांविषयी, घरच्या

लोकांविषयी, रहाणीमानाविषयी, आर्थिक स्तराविषयी तितकीशी माहिती मिळू शकत

नाही. अगदी रोज भेटले तरी त्या काही दिवसांमध्ये स्वभावही पूर्णपणे कळतोच

असे नाही.जर जोडीदार परधर्मीय किंवा परप्रांतीय असेल तर हा अनुभव जास्त

प्रमाणात येतो आणि विवाहानंतर अपेक्षाभंगाचे दुःख पदरात पडते.

प्रेमविवाहातील दुसरी उणीव म्हणजे माणसाची सहजप्रवृत्ती अशी असते की

समान स्वभावाची व्यक्ती माणसाला आवडते.पण संसारात असे चालत नाही.दोघांपॆकी

एक जर कलाकार, संशोधक ,ध्येयवेडा असेल तर दुसरा व्यवहारदक्ष असावा लागतो.

एक भोळाभाबडा असेल तर दुसरा कणखर असावा लागतो. इथे जर दोघेही सारखेच

असतील तर घराचे काय होईल याची कल्पनाच केलेली बरी.

या गोष्टींचा काही प्रमाणात विचार ॲरेन्ज्ड मॅरेज ठरवताना केला जातो.

पत्रिकांचे गुणमेलन बरेचसे वेगवेगळ्या राशींच्या व्यक्तींच्या स्वभावातील विविधतेवरच

आधारित आहे. पण यासाठी जन्मवेळ अचूक मिळणे आवश्यक असते अन्यथा

पत्रिकेत ' छत्तीस गूण ' जुळले होते पण नवरा-बायकोचा मात्र 'छत्तीसचा आकडा '

असा विरोधाभास पहायला मिळतो.घरातील जबाबदार माणसे लग्न ठरवतात.त्यामुळे

मुला/मुलीचे शिक्षण, त्यांचे व्यक्तिमत्त्व, कॊटुंबिक पार्श्वभूमी सगळ्या गोष्टींचा विचार

करूनच विवाह ठरवला जातो , आणि अपेक्षाभंग होण्याचे प्रमाण कमी असते.

एकमेकांच्या स्वभावाविषयी विशेष माहिती नसते. पण आजकाल लग्नाअगोदर

दोन चार वेळा तरी भेट होतेच त्यावेळी काही मुद्दे स्पष्ट होऊ शकतात.

'पहिले प्रेम' ही संकल्पना जरी कवितेत मोहक वाटली तरी पति -

पत्नीच्या वॆवाहिक जीवनाला मारक ठरू शकते. कविता आणि आपले आयुष्य यात

अंतर ठेवायला नको का? तसे पाहिले तर आयुष्यात अनेक माणसे आपल्याला भेटतात

यातील अनेकजण आपल्या स्मरणात रहातात पण कोणाला किती महत्व द्यायचे

हे आपले आपण ठरवायचे असते. पति-पत्नीच्या संबंधांमध्ये जर अदृष्य भिंत उभी

रहायला नको असेल तर असा काही भूतकाळ असेल तर तो विसरून मनाची

पाटी कोरी करूनच बोहल्यावर चढायला हवे कारण लग्न म्हणजे खेळ नसतो ;

दोघांच्या आणि पर्यायाने पुढे मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. जर घरात सुख-शांती

हवी असेल तर दोघांच्याही मनात एकमेकांविषयी प्रेम आणि आदर असणे गरजेचे

आहे. पतीच्या मनात दुस-या स्त्रीला स्थान आहे हे कळल्यावर इतर कितीही

ऎष आराम मिळाले तरीही पत्नी आनंदी राहू शकत नाही.

प्रेमविवाहात हा अडसर येत नाही कारण दोघे एकमेकांना आवडल्यामुळेच

लग्नाचा निर्णय घेतलेला असतो.पण सहजीवन सुरू झाल्यावर आपला प्रियकर

बदलून गेलाय ही तक्रार सर्वसामान्य झाली आहे. लग्नाआधी प्रेयसीची पसंती

जपणारा माणूस नवरा झाल्यावर घरातल्या इतर माणसांच्या आवडी- निवडी

जपण्याच्या सूचना देतो. लग्नाआधी तिला वाटत असते की त्याचे जग आपल्या-

पासून सुरू होते आणि आपल्यापर्यंतच संपते.पण लग्नानंतर तिच्याभोवती सतत

रुंजी घालायला त्याला वेळ नसतो.त्याचे स्वतंत्र जग असते.त्याचे नातेवाईक,

मित्र परिवार, करीअर, छंद सर्व सोडून एकाच व्यक्तीभोवती किती फिरत रहाणार?

विवाहानंतर त्याने सर्वाना सोडून द्यावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे.दोघांनीही

एकमेकाना वेळ देणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच दोघांच्याही व्यक्तिमत्वाचा

विकास होण्यासाठी दोघांनी स्वतःला वेळ देणेही आवश्यक आहे. म्हणजे

लग्नानंतर आवडत्या क्षेत्रात प्रगती करता आली नाही अशी तक्रार प्रत्यक्ष आणि

अप्रत्यक्षरित्या केली जाते ती होणार नाही. आवडत्या विषयांमध्ये मन रमलेले

असेल तर कोणीही व्यक्ती प्रसन्न रहाते आणि किरकोळ वादांकडे लक्ष जात नाही.

भावनांच्या जाळ्यात स्वतःला सतत गुंतवून ठेवण्यापेक्षा आयुष्याचा सकारात्मक विचार

करून स्वतःच्या आणि घरातील इतरांच्या प्रगतीला चालना देण्याचा प्रयत्न करावा.

घरातील माणसाना शक्य होईल तितके सांभाळून घेतले तरच नाती टिकतात.

घरातील इतर माणसेही नवीन आलेल्या मुलीला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतच

असतात . जर लग्नानंतरच्या कर्तव्यांचे भान न ठेवता ती फक्त अधिकारांचाच

विचार करत राहिली तर घरातील वातावरण दूषित होते आणि या दोघांमधील

प्रेमसंवादाची जागा ऎतिहासिक नाटकांमधील पल्लेदार वाक्ये घेऊ लागतात

मुला-मुलीनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी; कोणाशीही प्रेम जमू दे

किंवा घरच्या लोकांचा कितीही दबाव येऊ दे, शिक्षण पूर्ण केल्याशिवाय आणि

स्वावलंबी झाल्याशिवाय विवाहाची घाई करणे योग्य नाही.मुलांना लग्न झाल्यावर

शिक्षण पूर्ण करणे कठीण होते.विकास खुंटतो.मिळेल ती नोकरी धरून घर चालवावे

लागते मुलीने जर शिक्षण अर्धवट सोडले तर तिचे जीवन परावलंबी होते.

कठीण परिस्थितीत कुटंब सांभाळण्याची क्षमता तिच्यामध्ये रहात नाही.

प्रेमविवाह असो किंवा पारंपारिक पद्धतीने जमवलेला विवाह असो या दोन्ही

एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हींचेही काही तोटे आहेत.पण 'लीव्ह इन

रिलेशन्स' हा त्यासाठी पर्याय होऊ शकत नाही. मुख्यत्वेकरून स्त्रियांच्या दृष्टीने

पाहू गेल्यास रोगापेक्षा हे ऒषधच भयंकर आहे असेच म्हणावे लागेल.या संबंधाना

सामाजिक व धार्मिक अधिष्ठान तर नाहीच पण कोणतेच बंधनही नाही. निसर्गाने

स्त्रीला मातृत्वाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे असे संबंध ठेवण्याचा निर्णय

म्हणजे आयुष्यासाठी एक मोठे आव्हान ठरू शकते.आचार्य अत्रेंची 'रश्मी ' म्हणते

त्याप्रमाणे पुरुषांच्या भ्रमरवृत्तीला पायबंद घालण्यासाठी त्याना ' लग्नाच्या बेडी'त

अडकवणे आवश्यक आहे.

' पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' -प्रत्येक व्यक्तीच्या विचारसरणीमध्ये फरक असतो.त्यामुळे

दोन माणसे एकत्र आल्यावर वादविवाद हे होतातच पण कालांतराने ' तुझे माझे जमेना-

तुझ्याविणा करमेना ' अशी स्थिती होते.काही विशेष कारण घडल्याशिवाय संबध

तोडत नाहीत.कधी प्रेमाने, कधी रागाने, कधी भांडत तर कधी भावूक होत एकमेकांची

काळजी घेत दोघे आयुष्य एकत्र घालवतात. कितीही मतभेद असले तरी विभक्त

होण्याची कल्पनाही त्यांच्या मनात येत नाही.हेच भारतीय संस्कृतीचे आणि येथील

विवाहपद्धतीचे मोठे यश आहे.