Devyani books and stories free download online pdf in Marathi

देवयानी (कथा )

देवयानी

अरुण वि.देशपांडे –पुणे.

धरणाच्या कुशीत असलेल्या त्या लहानश्या गावात आपल्या बहिणीकडे पवन आलेला होता.नोकरीच्या त्याच त्या रुटीन मध्ये थोडा बदल हवा म्हणून आठवडाभर सुट्टी टाकून त्याने इकडे येण्याचे ठरवलेले होते. शहरी बजबजपुरीला सरावलेले त्याचे मन या छोट्या गावात आल्यावर शांत झाले होते. सभोवतालचे निसर्गरम्य वातावरण मनास मोठेच सुखदायक वाटणारे आहे” हे त्याला जाणवत होते.

“जरा फिरून येतो ग ताई “, असे सांगून तो बाहेर पडला होता. जलाशयाच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने तो कितीतरी वेळ आपल्याच नादात चालत राहिला. त्याचे त्याला कळाले नव्हते, मावळतीला जाणऱ्या सुर्यादेवाकडे सुद्धा त्याचे लक्ष नव्हते. मध्येच थांबत त्याने हातातील घड्याळाकडे पाहिले, संध्याकाळचे साडेसहा –सात ‘दरम्यानच हे काटे अगदी आरामात फिरत आहेत असे त्याला वाटले. गंमत आहे नाही. .

इथे वेळेला पण मुळीच घाई नाहीये. .आणि माणसांना तर मुळीच घाई नाही,सगळा कसा निवांत आणि आरामात चालुये इथं सगळं.

तलावाच्या बाजूला बसण्यासाठी छान जागा होती. .पायऱ्या उतरत तळाच्या पायरीशी थांबला, दूर पर्यंत त्याची नजर फिरत होती, सगळीकडे विशाल असे निळेशार पाणी दिसत होते.. मावळतीचे सोनेरी रंग त्या पाण्यात प्रतिबिंबित होत होते..एका पायरीवर तो बसला. हळूच पाय पाण्यात सोडले, थंडगार निर्मळ पाण्याचा तो स्पर्श थेट त्याच्या मनापर्यंत जाऊन पोंचला, आपल्या मनावरती साचलेले मळभ या पाण्याच्या स्पर्शाने जणू दूर झाले आहे असे त्याला वाटत होते.

वर आकाशाकडे तो पहात होता. .संध्याकाळ सारून आता रात्र येत होती. असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या, बाजूला चंद्राची कोर हळू हळू विस्तारत होती. .मोठे सुंदर असे ते दृश्य भान हरपून टाकणारे होते..,ऑफिसातले चमकते दिवे असणारे छत,पाहण्याची सवय त्याला होती आणि आज हे इथले खुले मोकळे आकाश. .पाहणे. .हे सारेच क्षण मनात साठून ठेवावे असेच आहेत असे त्याचे मन त्याला सांगत होते.

आकाशीचा चंद्र, त्या चमचमत्या –तारका, यांचे प्रतिबिंब समोरच्या जलाशयात जणू आरश्या सारखे लखः

दिसत होते.हे मनोरम्य दृश्य पाहूनच तो मनोमन मोहरून गेलेला होता, त्याला वाटले. .माणूस निसर्गाच्या प्रेमात पडतो तेंव्हा त्याचे देहभान असेच हरपून जात असावे..” एक विलाक्षण सुन्दरसा अनुभव त्याचे मन या क्षणी नक्कीच घेत होते.

या साऱ्या जलाशयात सुंदर गोष्टींचे प्रतिबिंब उमटले आहे.त्यात उमटले नाहीये ते फक्त आपल्याच मनाचं प्रतिबिंब. .!आपल्या मनाची आठवण होताच तो अधिकच खिन्न झाला. .आठवणींचे ठसे क्षणभरात उमटले,

त्याला आठवले. .त्याचे नशीब त्यादिवशी चांगलेच असावे “, कारण चांगल्या गोष्टी घडून येण्यासाठी तितकाच चांगला योगही असावा लागतो. .असा चांगला योगही त्या दिवशी असावा. .कारण एक कंपनीत पहिल्याच प्रयत्नात त्याला नोकरी मिळाली होती.

ही नोकरी मिळाली आणि पवनचे दिवसच बदलून गेले, त्याला वाटले- नोकरी मिळवली, जणू काही जग जिंकल्याचा आनंद होतोय आपल्या मनाला, आता आपला संघर्ष संपला. .आता नोकरी आणि सुखदायी जीवन बस....! आपल्या अल्पसंतोषी मनाचे त्याला कौतुक वाटत होते. नोकरीचे काही महिनेच सरले असतील, स्थिरावलेल्या पवनच्या मागे. .घरच्यांनी लग्नाची घाई सुरु करून. .त्याच्या मागे एकच काम लावले..बाबा रे, पटकन पोरगी पसंत कर आणि होऊन जाऊ दे तुझे लग्न. .!.

पवनला काही सुचेना. .काय निर्णय घ्यावा ?,अद्याप त्याचे मन कुठेच गुंतले नव्हते, मागच्या धावपळीच्या दिवसांनी त्याला उसंत मिळू दिली नव्हती. .पोरींना पाहण्यासाठी वेळ तर मिळायला पाहिजे ना ?,पवन ने स्वतःलाच समजवले.

त्याच्या ऑफिसच्या दुसर्या एका टीम सोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. .आणि. .त्या टीम मध्ये असलेल्या एका मुलीने. .देवयानीने पवनच्या भावविश्वात प्रवेश केला. आयुष्यात वाट पाहिली. अशीच ती. ., आता त्याला भेटली होती. देवयानीला पाहताक्षणीच त्याला वाटले – आपल्या मनाने रंगवून ठेवलेली हीच ती प्रतिमा, . .जी आता आपल्या समोर आहे. प्रत्याक्ष्य रुपात. .! प्रेम-भावनेचा हा स्पर्श त्याला बावरून टाकणारा होता.

कामाच्या निमित्ताने कार्यालयीन परिचय. हळू हळू व्यक्तिगत होत गेला. .सहवासात मने जुळत गेली,खुलत गेली. आणि उमलती प्रीत बहरत गेली. .गुंतलेल्या मनाने कबुली दिली की –एकमेकांच्या सहवासाविना आता राहणे अशक्य आहे.,पण, दोघांपैकी हे गुपित कोण शब्दातून सांगणार ?प्रेमाचा हा अनोखा खेळ रंगतच होता. “ स्मार्ट-पवन, सुंदर देवयानी “,जोडी सुरेखच होती. पाहणारा म्हणयचा. .”मेड फॉर इच अदर, “ असेच आहेत ही दोघे.

आपण आपले आयुष्य कसे जगायचे ? या बाबतचा पवनचा दृष्टीकोन अगदी चार-चोघांसारखा होता.

“कष्टाने कमवावे, मानाने जगावे “, असे त्याला वाटत असायचे आणि आपल्या या भावनेला आपली देवयानी साथ देणारीच आहे “,याची त्याला खात्री होती.

त्यादिवशी. .काम संपवून पावन देवयानी सोबत एका हॉटेलमध्ये बसला, कॉफी घेत घेत गप्पा सुरु होत्या

सुंदर देवयानीकडे पहाणे हा आनंद आहे.आणि तो आपल्या मनाला मिळतोय. किती सुदैवी आहोत आपण.

पवन खूप छान मूड मध्ये होता. .तो म्हणाला. .देवयानी, मी माझ्या मनातले सांगितले आहे तुला, आज तू तुझ्या मनातले सांग..तुला कसे जगायला आवडते ?

खर सांगू पवन –आपल्या घरात सगळे वैभव, ऐशो-आराम हात जोडून उभे असावे असे मला वाटते.आपले जगणे अगदी शाही असावे..खा-प्या आणि मौज-मजा करा “,जीवन असेच जगले पाहिजे अशा मताची मी आहे.. रडगाणे गाणारे, साधे सुधे –अळणी जगण्याची कल्पना मी करू शकत नाही. .या सर्वांचा मला अतिशय तिटकारा आहे”, आय हेट..थिस ऑल..!

देवयानीचे हे शब्द ऐकून पवन मनापासून हादरून गेला, आपल्या आणि देवयानीच्या जगण्याच्या दृष्टीकोनात इतका भयानक फरक ? आपली मनं इतकी भिन्न, तरी पण काही हरकत नाही, तिच्यावरच्या प्रेमापोटी आपण हे ही करण्याचा प्रयत्न करू. ..त्यादिवशीची हे मिटिंग संपली..आपण काय बोललो हे देवयानी विसरून पण गेली असावे. .असे तिच्या वागण्यातून बोलण्यातून जाणवत होते. .त्यामुळे पवन थोडा सावरला होता.

एक दिवस तो म्हणाला- देवयानी,. .घरी येतेस का. .तुला भेटण्यासाठी माझ्या घरचे सारे उत्सुक आहेत. .तू आलीस तर सर्वांना खूप आनंद होईल, आणि मला पण छान वाटेल.

त्याचे ऐकून देवयानी मिस्कील हसत म्हणाली. .पवन..मी आज तुमच्या सोबत तुमच्या घरी आल्यावर सारेजण काय समजतील माहिती नाही का तुम्हाला ? आणि तुम्ही काय सांगितले आहे माझ्याबद्दल ? हे मला कुठे माहिती आहे हो ?

देवयानी. .माझ्या मनातले तुला समजणार नाही ? असे होऊच शकत नाही. तू सर्व जाणते आहेस. .

यावर काही न बोलता देवयानी त्याच्या घरी येण्यास तयार झाली “हे पाहून पवन मनोमन सुखावून गेला.

पवनच्या घरात देवयानीचे खूप छान स्वागत झाले, त्यादिवशी सर्वांना देवयानीचे पवनवरचे प्रेम जाणवले,

तिचे घरातले वावरणे, वागणे आणि बोलणे यातूनच तिच्या भावना जाणवत होत्या. पवन हे पाहून खूप आनंदित होत होता. त्या दिवशी हॉटेल मध्ये देवयानी जे काही बोलली हे केवळ गप्पा होत्या असेच म्हणावे लागेल कारण त्याच्या घरातले साधे सरळ वातवरण पाहून तिला काही वावगे वाटले ? . आज तर असे काहीच जाणवत नव्हते. आपल्या मनावरचे खूप मोठे ओझे उतरले आहे. .पवन मनाशी बोलत होता.

असेच एके दिवशी. .कामच्या घाई गर्दीची वेळ होती. पवन कामात पुरता बुडून गेलेला, त्याच वेळी फोन रिंग ने त्याला तंद्रीतून जागे केले..

हेल्लो पवन.. देवयानीचा परिचित असा गोड मंजुळ आवाज कानाला आणि मनाला गोड गुदगुल्या करून गेला, पवन, तुम्ही आज संध्याकाळी, हॉटेल गुलमोहरला या.खूप महत्वाचे बोलणार आहे मी आज तुमच्याशी.

कबूल केल्याप्रमाणे. .पवन हॉटेल गुलमोहरला पोंचला. ठरलेल्या टेबल समोर जाताच देवयानी दिसली. .

नेहमीच सुंदर दिसणारी देवयानी आज आपल्याला अधिकच सुंदर दिसते आहे “,असे त्याला वाटत होते.

“फिकट –गुलाबी रंगाची साडी,त्यावरची सुबक पांढऱ्या फुलांची डिझाईन खुलून दिसत होती. .केसावरती माळलेला मोगर्याचा मोहक गजरा “, क्या बात है. .! पवन ने मनात दाद देऊन टाकली. त्याच्या समोरची देवयानी मूर्तिमंत सौंदर्यवती दिसत होती.

त्याला पहातच ओळखीचे स्मित तिच्या चेहऱ्यावर खुलून आले. .तिच्या समोरच्या खुर्चीवर तो बसला. सुंदर देवयांनीकडेच एकटक बघत राहावे असा त्याला मोह होत होता. .आणि अचानक त्याला जाणवले की –

“देवयानीचे लक्ष मात्र आपल्याकडे नाहीये “,आपण समोर असून देखील तिचे डोळे मात्र कुणी येण्याची वात पहात आहेत असे वाटत होते. .हे जाणीव होताच पवन थरारून गेला, आपल्या हृदयाचे ठोके आता एका तालात पडत नाहीयेत याची त्याला तीव्र जाणीव होऊ लागली.

हॉटेलच्या गेटजवळ एक अलिशान कार येऊन थांबली,आतून एक उमदा ऐटबाज तरुण उतरला म्त्याच्या चालण्यातून, बघण्यातून जाणवत होते तो एक श्रीमंत तरुण आहे “.त्याला पहातच देवयानी खूप आनंदित झाली. इतका वेळ तिने केलेली त्याची प्रतीक्षा सफल झाली असे तिच्या चेहेर्यावरून दिसत होते.

ओळख करून देत ती म्हणाली – मि. पवन, मीट माय बेस्ट फ्रेंड मि.किशोर मेहता. पवन ने हात मिळवला. आणि ओळख झाल्याचा आनंद व्यक्त केला

देवयानी पुढे सांगू लागली – पवन, हा किशोर म्हणजे, माझ्या वडिलांच्या फास्ट-फ्रेंडचा मुलगा. आम्ही तसे बालपणीचे मित्र आहोत असे म्हटले तरी चालेल.हा खूप वर्षापासून तिकडेच होता, आता तो फमिली बिझनेस टेक-ओवर करतोय, म्हणून इकडे आलाय. .किती छान झाला ना हे ?

या किशोरबद्दल आता पुढे देवयानी आपल्याला काय सांगणार आहे याची कल्पना पवनला आली, आणि,

तिचे शब्द आपण ऐकू शकणार नाही या जाणीवेने त्याच क्षणी देवयानीकडे न पाहता, शब्द न बोलता तो तिथून बाहेर पडला, आपल्यावर प्रेम करणारी देवयानी आता तसे न करता श्रीमंत किशोरशी लग्न करणार “,हे प्रत्यक्षात घडलेले पाहणे सुद्धा त्याच्या साठी अशक्य होते.

घरी आलेला पवन पुरता उध्वस्त झाला होता. देवयानीच्या या व्यावहारिक वागण्याने त्याचे भावविश्व क्षणात कोसळून पडले. पवनचे साधे-सुधे जगणे. .किशोरच्या वैभवशाली दुनियेत काजव्यासारखे क्षुल्लक चमकणे होते. .हे सांगून देवयानीने प्रेमाचा अपमान केला आहे. हे दुखः असह्य आहे”..असे पवनला वाटत होते.

देवयानी-किशोरच्या लग्नाची पत्रिका पवनच्या घरी आल्यावर. .मात्र सगळ्यांच्या लक्षात आले की, आपल्या पवनच्या वागण्यात का फरक पडलाय. त्याला सगळ्यांनी खूप समजावले, पण काही उपयोग होईना, पवनचे मन ताळ्यावर येत नव्हते. असफल प्रेमाच्या धक्क्यातून सावरण्याची चिन्हे दिसेनात.

पवन रात्री शांतपणे झोपू शकत नव्हता. देवयानी त्याच्या मनातून हलत नव्हती. तिने असे का वागावे?,प्रेम करण्यापेक्षा. ते तोडणे जास्त सोपे असते “हेच जणू देवयानीने करून दाखवले होते. खरेच का तिची निवड करण्यात आपणच चुकलो होतो ? पवनला उत्तर सापडत नव्हते.

अशातच पवनची ताई तिथे आली. आणि त्याला सोबत गावी घेऊन आली तिने देखील समजून सांगितले,

पवन – त्या देवयानीचे खूळ तू डोक्यातून काढून टाक, तुझ्यावरचे तिचे प्रेम केवळ एक तारुण्य –सुलभ असे आकर्षण होते असेच समज. अरे “प्रेम म्हणजेच जीवनाचे सारं नव्हे. तुला अजून खूप आयुष्य जगायचे आहे, स्वतः साठी, आणि इतरांसाठी. पवन, दुसर्यासाठी जगण्यात सुद्धा किती मोठा आनंद आहे “,तू याचा अनुभव घेऊन तर बघ.”

अशा वेळी- देवयानीचे शब्द पवनला आठवत होते – पवन, स्त्री –मन प्रेमाचा अथांग सागर असते, या कोमल मनात प्रेमाची ज्योत अखंड तेवत असते. प्रेम ही खूप छान भावना आहे. असे बोलणार्या देवयानीने आपल्याला दिला तो असा स्पष्ट नकार. .!,किशोरच्या वैभवाचा इतका मोह तिला कसा पडला ?त्याला काही कळत नव्हते. .या विचारातच त्याला केंव्हा तरी झोप लागली असावी...

सकाळी सकाळी. त्याची ताई आवाज देऊन त्याला उठवत होती. .जागा झालेल्या पवन समोर तिने आलेला पेपर ठेवला. . पानावरची हेड लाईन पवन वाचू लागला. .

प्रख्यात उद्योगपती किशोर मेहता यांच्या सुविद्य पत्नी देवयानी यांची आत्म्हत्या.! त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलीय. .या साठी कुणाला जबाबदार धरू नये, त्यांच्या वाट्याला आलेल्या निराशेच्या -पोटी त्यांनी आपले जीवन संपवले होते.

देवयानीच्या आठवणीने पवनचे मन भरून आले, हे भलतेच असे पाउल का उचलले असेल तिने ? खरेच का ती वरच्या रंगाला भुलून गेली होती ? किशोरवरचे तिचे प्रेम भूल-भुलैया ठरले.

आणि आपण.. आपण तर तिच्यासाठी प्रेमाचे एक नगर वसवणार होतो, पण तिचीच इच्छा नव्हती, आपल्या मनाचे रंग तिला कळालेच नाही,आपल्या अंतरंगात ती शिरलीच नाही असेच म्हणावे लागेल.

देवयानीच्या आठवणीत रंगलेल्या क्षणांचे रंग आता उदास उदास झाले आहेत या जाणीवेने पवन नि”शब्द झालेला होता.