And .. Kashinath Ghanekar .. books and stories free download online pdf in Marathi

आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर..

आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर..

पुन्हा एकदा 'सबकुछ सुबोध' असलेला "आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर.." आज गुरुवार ८ ऑक्टोबरला आपल्या भेटीस आला. अभिनेता सुबोध भावेचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा हा चित्रपट आहे. एका मागे एक असे अव्वल चित्रपट, मालिका करत सुबोध भावे आपलं मनोरंजन करत आहे. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. ‘नाथ हा माझा’ या कांचन घाणेकर लिखित कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, मोहन जोशी अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारली असून सुबोध भावे मनाला भावतो. पण बाकीच्या कलाकारांच्या भूमिकेला तितका वाव मिळाला नाही म्हणूनच हा चित्रपट 'सबकुछ सुबोध' आहे अस म्हणणे गैर ठरणार नाही. काशिनाथ घाणेकर हे कोण आहेत हे दाखवणारा हा चित्रपट! त्यांनी काळ कसा गाजवला, त्यांचा उदय आणि अस्त हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा. काशिनाथ घाणेकर आणि श्रीराम लागू हे एकमेकांच्या नाटकाला येऊन बसतात ते प्रसंग चांगले वठले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सुबोध भावे मराठीचा सुपरस्टार ठरला आहे.

काशिनाथ घाणेकर म्हणजे मराठी रंगभूमीवरचा पहिला सुपरस्टार. या माणसाच्या आयुष्यावर सिनेमा काढण्यासाठी धाडस लागणार हे निश्चित. ते धाडस दाखवण्यात आलं, ‘… आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या निमित्ताने. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एखाद्या चित्रपटात घडाव्यात अशा अनेक रंजक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या. काशिनाथ घाणेकर या नटाचे आयुष्यच एखाद्या चित्रपटाप्रमाणे होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवावा असे वाटण्यात काहीच हरकत नव्हती. त्यांचे आयुष्यच फिल्मी असल्याने या चित्रपटाची कथा आपल्याला खिळवून ठेवण्यात नक्कीच यशस्वी ठरते. काशिनाथ घाणेकर हे मराठीतील पहिले सुपरस्टार होते याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात याच सुपरस्टारचे आयुष्य दिग्दर्शकाने मांडले आहे. या सिनेमात सुबोध भावेने काशिनाथ घाणेकरांचं पात्र साकारलं आहे. या भूमिकेत तो चपखल बसला आहे. असं असलं तरीही सिनेमात भालजी पेंढारकारांच्या तोंडी एक वाक्य आहे. काशिनाथ म्हणजे सगळ्या धान्यांची सरमिसळ आहे त्यात खडेही आहेत. तसंच काहीसं या सिनेमाचंही झालं आहे. सिनेमा चांगला असला, मनोरंजन करत असला तरीही काही त्रुटी राहिल्या आहेत. मात्र सुबोध भावेचा स्वतःचा असा एक प्रेक्षक वर्ग आहे ज्याला हा सिनेमा नक्की आवडेल. आपल्या अभिनयाच्या जोरावर सुबोधने हा सिनेमा पेलून धरला आहे. घाऱ्या डोळ्यांमधल्या सुबोध भावेला काशिनाथ घाणेकरांच्या रुपात पाहणं ही एक ट्रीट आहे. त्याची संवादफेकही उत्तम! खासकरून ‘एकदम कडsssक’ आणि ‘उसमें क्या है..’ हे म्हणत स्वच्छंदपणे जगणारे काशिनाथ घाणेकर सुबोधनं उत्तमरित्या दाखवले आहेत. ह्या चित्रपटाचे संवाद प्रोमो पासूनच तरुणाईच्या तोंडी बसले आणि तेच दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि गुरु ठाकूर याचं यश आहे. सुबोध भावे ने काशिनाथ घाणेकरांची भूमिका जगली हे चित्रपट पाहतांना जाणवत.

चित्रपटाची कथा-

काशिनाथ घाणेकर (सुबोध भावे) हे डॉक्टर असले तरी त्यांना अभिनयाचे प्रचंड वेड होते. अभिनय क्षेत्रात कारकिर्द करताना त्यांची पत्नी इरावती (नंदिता धुरी) देखील त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहाते. दोघांचे अभिनय उत्तम झाले आहेत. अभिनयक्षेत्रात आल्यावर या नटाच्या आयुष्यात काय काय घडते, वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात किती उलाढाली घडतात, या नटाचे आयुष्य कसे होते हे सगळे आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातला ‘संभाजी’, गारंबीचा बापू मधला ‘बापू’, अश्रूंची झाली फुले नाटकातला ‘लाल्या’ या घाणेकरांच्या गाजलेल्या भूमिका. या भूमिका करताना त्या त्यांनी कशाप्रकारे साकारल्या असतील हे दाखवण्यात सुबोध भावे यशस्वी झाला आहे. सुबोध भावेच्या अभिनयाबद्दल कोणालाच शंका येणार नाही आणि ह्या चित्रपटात सुद्धा सुबोधने उत्तम काम केल आहे.

एका प्रसंगात जेव्हा प्रेक्षक मनासारखी दाद देत नाही तेव्हा प्रयोग सोडून जाणारे काशिनाथ, प्रेक्षकांच्या गर्दीतून जाता आलं नाही म्हणून नाटक सोडणारे काशिनाथ हे सगळे प्रसंग चेहऱ्यावरच्या हावभावांवर खेचले आहेत. एकंदरीत काय तर तुमचे मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. मध्यंतरापर्यंत सिनेमा वेगवान झाला आहे. काशिनाथ घाणेकरांचा उदय, त्यांची अभिनय करण्याची शैली, स्टेजवर एंट्री घेण्याचं कसब, मध्यंतराच्या वेळी झालेली डॉक्टर लागूंची एंट्री हे सगळं छान जमलं आहे. मात्र मध्यंतरानंतर सिनेमा काहीसा संथ होतो. शेवटाकडे जाता जाता काही वळणांवर वेग घेतो. काशिनाथ घाणेकर कसे होते? काय प्रकारे विचार करायचे? त्यांच्या आयुष्यात नाटकाचे स्थान काय होते? उतरती कळा लागल्यावर त्यांनी काय आणि कसे निर्णय घेतले या सगळ्याचा लेखाजोखा या सिनेमात मांडला गेला आहे. बाकी, सगळ्याच कलावतांनी आपली कामं चोख केली आहेत.

शेक्सपियरने माणसाच्या आयुष्याच्या रंगमंचावरील अल्पअस्तित्वाच्या क्षणभंगूर निरर्थकतेचे वर्णन करताना, लाईफ इज बट अ वॉकिंग शॅडो, या संवादात माणूस आपल्या रंगमंचावरील प्रवेशाच्या वेळी नुसते निरर्थक हातवारे आणि नखरे करून कायमचा गायब होतो, असे म्हटले होते. डॉ. घाणेकर यांनी आपल्या आयुष्याची ही क्षणभंगुरता आपल्या परीने याच निरर्थक हातवारे आणि तुर्रेबाजीने आपल्या परीने अर्थपूर्ण बनवली.

आपल्या सार्थ अभिनयाच्या जोरावर सुबोध भावेने या सगळ्या छटा उत्तमरित्या साकारल्या आहेत. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ या गाण्यात अमृता खानविलकरची छोटीशी झलक दिसते. तिने संध्या यांची भूमिका साकारली आहे. जी बाब अमृता खानविलकरची तिच आशा काळे साकारणाऱ्या प्राजक्ता माळीची. एका गाण्यातच ती दिसते. गोमू संगतीनं हे गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे. तर लाल्या हे गाणं सिनेमातलं एक लक्षात राहणारं गाणं आहे. इतर दोन गाणी सिनेमाची लांबी वाढवतात. सुबोध भावेला वगळून इतर कोणाचाही विचार आपण काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेसाठी करू शकत नाही. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे फक्त सुबोध भावेचा चित्रपट अस म्हणण चुकीच ठरणार नाही. त्याच्या अभिनयासाठी एकदा का होईना हा सिनेमा बघायला हरकत नाही.

सिनेमा का पाहावा?- सुबोध भावे उत्तम कलाकार आहे. त्यामुळे सुबोध भावेच्या अभिनयासाठी हा चित्रपट नक्कीच पाहावा. बऱ्याच लोकांना काशिनाथ घाणेकर माहित नसतील त्यामुळे ज्यांना काशिनाथ घाणेकर ठाऊक नाहीत त्यांना ते माहीत होण्यासाठी हा चित्रपट बघण्यास हरकत नाही. आणि ह्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे ह्या चित्रपटाचे संवाद. उत्तम संवादांची ट्रीट ऐकण्यासाठी हा चित्रपट जरूर पाहावा.

सिनेमा का पाहू नये?- काशिनाथ घाणेकर माहिती असतील आणि त्यांनाच डोक्यात ठेवलं असेल तर हा चित्रपट पाहिला नाही तरी चालेल.

दिग्दर्शन कसं आहे?- दिग्दर्शन चांगलं झालं आहे. दिग्दर्शनामुळे चित्रपट उत्तम बनण्यास मदत होते. हा चित्रपट दिग्दर्शकाचा पहिलाच प्रयत्न आहे आणि काही ठिकाणी अजून चांगल करता आल असत अस वाटून जाऊ शकत.

संगीत कसं आहे? - पार्श्वसंगीत उत्तम झालं आहे, दोन गाणी श्रवणीय झाली आहेत. गोमू संगतीनं हे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतांना दिसून येत. ते गाणं ह्या चित्रपटात रिक्रिएट करण्यात आलं आहे. तर लाल्या हे गाणं सिनेमातलं एक लक्षात राहणारं गाणं आहे.

लेखक दिग्दर्शक : अभिजित शिरीष देशपांडे

निर्माते सुनील फडतरे

स्टुडिओ : Viacom 18 Motion Pictures and Shree Ganesh Marketing and Film

पात्र परिचय
सुबोध भावे – काशिनाथ घाणेकर
सोनाली कुलकर्णी- सुलोचना
सुमित राघवन – श्रीराम लागू
आनंद इंगळे- वसंत कानेटकर
मोहन जोशी – भालजी पेंढारकर
प्रसाद ओक – प्रभाकर पणशीकर
सुहास पळशीकर – मास्टर दत्ताराम
नंदीता पाटकर- इरावती घाणेकर
वैदेही परशुरामी – कांचन घाणेकर