You are with me...! - 9 books and stories free download online pdf in Marathi

तू माझा सांगाती...! - 9

"पण त्यात गैर काय आहे? तुम्हीही एप्लाय करा ना नॅशनल हेरिटेज अँड प्रिजरवेशन ऑर्गनायझेशनमध्ये. म्हणजे आपल्याला कायम एकत्र राहता येईल."
विक्टरच्या या बोलण्यावर मात्र जनार्दन सारंग हसले. म्हणाले,
"अरे रे तर आपण असूच. पण त्यासाठी अमर व्हावं, असं मला वाटत नाही. हे आयुष्य एकदाच मिळतं आणि ही तर जीवनाची ब्युटी आहे. जर अमर झालो, तर जगण्यातली सूंदरताही आपण गमावून बसू. नाही का? जीवनातील उत्साह निघून जाईल...! आपल्याला मरण नाही हे लक्षात आल्यावर कुणी सांगावं, लोक कर्म करणं सुद्धा सोडू शकतात!" जनार्दन सारंग स्मित मुखावर आणत बोलले,
"आणि म्हणून मला माझ्या जगण्यातील एडवेन्चर मरू द्यायचं नाही! भले मी मेलो, तरी चालेल! हेच आयुष्य तृप्तीने जगून मरणं मला आवडेल. कायमचं निष्क्रिय जगण्यापेक्षा!" जनार्दन सारंग यांनी आपला निर्णय सुनावला.
तो ऐकून विक्टरला मात्र अतीव वाईट वाटलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचून जनार्दन सारंग स्मित करून मान हलवत त्यांच्या आराम खुर्चीतून उठले. विक्टरकडे येऊन त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. म्हणाले,
"नाराज होऊ नको. मी तुझ्या बरोबर असेन. कसं; ते तुला माहीत आहेच. हे लोक आपल्या मेमरीच्या आधारे जिवंत राहू पाहतात. पण जी मेमरीच मॅनिप्युलेटिव्ह आहे, तिथे ते लोक खरंच पूर्णपणे रिवाईव्ह होत असतील इथंच मला शंका आहे. मग अर्धवट आयडेंटिटी घेऊन जगाचं का ना?"
बोलत बोलत जनार्दन सारंग विक्टरला लीड करू लागले. विक्टरच्याही नकळत दोघे पुढे चालू लागले. जनार्दन सारंग यांचा हात विक्टरच्या खांद्यावर तसाच होता. ते पुढं बोलत होते,
"माणूस त्याच्या आयुष्यातील घडलेल्या घटना त्याच्या विचारांमध्ये रिक्रिएट करतो. त्याला हवी तशी. मग नको असलेल्या आठवणी पुसल्या जातात, नाही तर त्या हव्या तशा बदलल्या तरी जातात. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील शंभर टक्के भाग लक्षात राहणं शक्य नाही.
"आता हा आमचा नंदकेश! म्हणतो, त्याला जर क्लोनिंगनी पुन्हा जन्मास घेतला, तर त्या नवीन माणसाला याच्या आठवणी दाखवून तो त्याच्यामध्ये जिवंत राहू शकतो. तसे नाही झाले, तर रोबोटीक बॉडी तर असेलच. पण त्याच्या हे लक्षातच आलेले नाही, की आधीच त्याला फक्त त्याच्या आयुष्यातील साठ - सत्तर टक्के घटनाच आवडत असतील, त्यात त्याने किती रिक्रिएट केल्या आहेत हे त्यालाही माहीत नसेल. शिवाय आपण स्वतःच नाही, तर इतर लोकही आपल्या आठवणी, भावना मॅनिप्युलेट करतात. दुसरं म्हणजे मेमरी प्रिसर्व केली, तरी नंतरही ती मॅनिप्युलेट करता येते. ज्या आठवणी त्या व्यक्तीच्या नाहीतच त्याही त्याच्या मेमरीमध्ये इन्सर्ट करता येऊ शकतात.
"डीएनए मध्ये देखील फेरफार करता येतात. इतर डीएनए एकमेकांशी कम्बाकरप्करता येतात. अशात तुमचा डीएनए शुद्ध राहील याची गॅरंटी कोण देईल?
"अशात आताचा होलोग्राफीक व नंतरचा रोबोटीक व त्याही नंतरचा झालाच, तर क्लोनिंगने तयार झालेला नंदकेश किती खरा आहे यातच शंका आहे! एक तर याच्या लक्षात राहीलंय, ते आपण मॅक्सिमम साठ-सत्तर टक्के धरतोय. मग त्याचा क्लोन झालाच आणि त्याला याची मेमरी दाखवली, तर तो त्यातील पन्नास टक्के लक्षात ठेवील. त्याच्या स्वतःच्या आठवणी तयार झाल्याच असणार. हं! त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर व्हायचा!
"जोक बाजूला ठेव. पण खरंच! त्या नव्या व्यक्तीला स्वतःचं आयुष्य आहे ना? मग याचं बॅगेज त्याच्या जीवावर का?
"शिवाय मला नाही वाटत, की क्लोनिंग वरची बंदी उठेल कधी. आणि मेमरीच्या आधारावर जिवंत राहणं, हे त्या व्यक्तीला पूर्णतः परत आणत नाही."
"म्हणजे हे सगळं चुकीचं आहे का?"
"कोणाच्या वैचारिक स्वातंत्र्यावर टिप्पणी करणं हे माझ्या अधिकाराबाहेर आहे. शिवाय ते नैतिकही नाही. म्हणून मी यावर काही बोलणार नाही. शिवाय ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जागी योग्यच आहेत. पण एक सांगतो, ही मेमरी कधी ना कधी नष्ट होणार. मेगा सर्व्हर हॅक होऊ शकतो, तो करप्ट होऊ शकतो, क्लोन मधील मेमरी देखील विसरली जाऊ शकते. काहीही होऊ शकतं... मेमरी नष्ट झाली, की तो माणूस नष्ट झाला. म्हणजे अमर होण्याचा हा मार्ग देखील शाश्वत नाहीच! मग हा अट्टहास कशासाठी?"
ते दोघे चालतच होते आणि जनार्दन सारंग बोलत होते,
"तुला काय वाटतं? मी अपत्य जन्माला का घातलं नाही?"
"तुम्हाला स्वतंत्र राहायचं होतं म्हणून..." विक्टरनं चाचपत उत्तर दिलं.
"क्ट्च्! हे कारण नाही! माझं अपत्य आलं, की ते या पृथ्वीच्या संसाधनांचा वापर करणार. पण जर मी ते जन्मालाच घातलं नाही, तर त्याच्या वाटचे संसाधन आता या जगात असलेलं मूल वापरेल. यामुळे संसाधनांचा खर्च कमी होईल. हा विचार होता. हं! तुला ही अतिशयोक्ती वाटेल, पण माझा हाच विचार होता. आधीच पृथ्वीवर एवढा बोजा आहे, त्यात माझ्या मुलांचा बोजा आणि कशाला?
"आणि अमर व्हायचंच म्हणशील, तर मी याच आयुष्यात असंख्य लोकांची आयुष्यं जगतोय!"
ते बोलत बोलत जनार्दन सारंग याच्या घरातील भल्या मोठ्या वाचनलायसमोर उभे होते. आजच्या या हेवी टेक्नॉलॉजीच्या जगात जनार्दन सारंग पारंपरिक पद्धतीने एकटी मोठी लायब्ररी संभाळून होते याचं विक्टरला एक रोबोट असून नेहमीच मोठं आश्चर्य वाटत आलं होतं...
"पुस्तकं?" जनार्दन सारंग यांना काय म्हणायचं आहे, ते विक्टरला समजलं नाही.
"हो. यांच्यातील प्रत्येक कॅरेक्टर मी जगतो यांना वाचताना! वाय सेटल फॉर लिटल, इफ यू आर गेटिंग टू मच?! हं! याच आयुष्यात मी इतकी आयुष्य जगलो आहे, जगत आहे, की मला अमर होण्याची इच्छा नाही! मी जर एकाच आयुष्यात अनेक व्यक्ती होऊ शकत असेन, तर एकच रटाळ आयुष्य अनंतासाठी मी का जगावं?!"
"पण मरून रिवाईव्ह झाल्यानंतरही तुम्ही तुमचं वाचन चालूच ठेऊ शकता. तरीही तुम्ही नाही का म्हणताय...?"
"तू समजून नाही घेत आहेस! पण समजशील एक दिवस...?

.
.
.

"मला आता समजतंय बाबा... तुम्हाला काय म्हणायचं होतं..." विक्टर त्या अंधाऱ्या जेलमध्ये स्वतःशीच पुटपुटला...
"हे दुःख सहन नाही होत... काही भावना या असह्य असतात. काही घटना या न विसरणाऱ्या असतात... आणि या मरण यातनांपेक्षा प्रत्यक्ष मरण बरं असं वाटतंय... पण रोबोट्सना मृत्यू नाही... मला मरण नाही बाबा..."

.
.
.

जनार्दन सारंग यांनी विक्टरला बसण्यास सांगितले. त्या प्रचंड पुस्तकांच्या गराड्यात जनार्दन व विक्टर समोरासमोर बसले.
"हे डीएनए प्रिसर्वेशनचं काम माणूस काही आताच करत नाहीए. हे अगदी मानवजातीच्या जन्मापासून सुरू आहे."
"ते कसं?"
"मुलं जन्माला घालून! माणसाला आपलं अस्तित्व या पृथ्वीवर कायम करायचं होतं. आहे! आणि म्हणूनच तर प्रत्येकाला मुलं हवं असतं. आपण नाही जगलो, तरी आपल्या मुलांच्या मार्फत आपला 'अंश' म्हणजेच 'डीएनए' पृथ्वीवर कायम स्वरूपी राहील हा त्या मागचा विचार. याला वंश म्हणतात. म्हणूनच तर पूर्वी मुलगाच झाला पाहिजे असा लोकांचा गैर अट्टहास असायचा. त्याच्यामुळेच आपला वंश वाढेल असं लोकांना वाटायचं. डीएनए प्रिसर्व करण्याची ही जुनी पद्धत होती, जेव्हा टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती किंवा आज इतकी प्रगत नव्हती."
"मग अजूनही लोक मुलांना जन्म का देतात? आता तर डीएनए प्रिसर्वेशनची सोय आहे ना?"
"कारण एकटं जगायला कोणालाही आवडत नाही. माणूस एकटं रहायला घाबरतो. आपलं कोणी तरी या जगात असावं, म्हणून!"
"म्हणजे तुम्ही तुमची कोणतीच गोष्ट मागे सोडणार नाही?" विक्टरची चिंता कमी झाली नव्हती.
जनार्दन सारंग पुन्हा हसले,
"मी प्रिसर्वेशन केलंय. पण डीएनएचं नाही. मेमरीचंही नाही. मी माझ्या विचारांचं प्रिसर्वेशन केलंय. पुस्तकांच्या रुपात. मी लेखकच यासाठी झालो आणि लेखन हे माझ्या उपजीविकेचे साधन बनवलं. माझ्या विचारांच्या माध्यमातून मी लोकांमध्ये जिवंत राहीन. हा... पण हा देखील अमरत्वाचा शाश्वत मार्ग नाहीच. कारण मी लिहिलेली ही पुस्तके पण कधी तरी नष्ट होतीलच...! आपण हे समजलं पाहिजे, की अंत हेच शाश्वत सत्य आहे. याने अपेक्षा नष्ट होतील. त्यामुळे संघर्ष नष्ट होईल आणि पर्यायी शांती लाभेल... पुढच्या पिढीला संपत्ती द्यायचीच, तर ती मी झाडांच्या स्वरूपात देतोच आहे! काय?"
विक्टर काहीच प्रतिक्रिया देऊ शकला नाही.
"असो, आता या पुस्तकांची धरोहर तुझी. सगळी वाचून काढ. मला खात्री आहे, तू देखील ती सारी आयुष्यं जगशील, जी मी अनुभवली!"
जनार्दन सारंग मग पुढं काही न बोलता विक्टरला विचारांच्या गर्देत सोडून निघून गेले.
.
.
.