Ha khel ki khelkhandola books and stories free download online pdf in Marathi

हा खेळ की खेळखंडोबा

1. हा खेळ की खेळखंडोबा

आम्ही जीवन जगत असताना आताही पाहतो की आजही काही स्रिया जर सोडल्या तर बहुतःश महिला गुलामगीरीतच वागतात. कोणी पतीच्या गुलामगीरीत वागतात. कोणी पुत्राच्या तर कोणी मायबापाच्या. आजही तिची संपत्ती ही तिची राहात नाही. ती त्या तीन घटकाची होते. ज्याप्रमाणे मनुस्मृती मध्ये लिहिलेले आहे. अगदी तशीच अवस्था स्रियांची आजही सुरु आहे. अगदी अनादीकाळापासून. या देशातील स्री कितीही सुशिक्षित झाली तरी तिला स्वतंत्रपणे मत मांडण्याचा जणू अधिकारच नाही असं वाटतं. कारण आमची मानसिकता........ आमची मानसिकता आजही पुरुषांच्या शब्दाबाहेर जात नाही.

आमची स्री आरक्षणाच्या शृखलेत पतीनं म्हटलं तर निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात. मग निवडून आल्यावर आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार वागत असतात. नव्हे तर काही गोष्टी पार्टीतील पुरुषांच्या म्हणण्यानुसार. सर्व निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना. कारण ती स्री आहे तिला बोलण्याचा अधिकार नाही आणि तिला काही समजतही नाही. ही पुरुषी भावना...... नव्हे तर अत्याचारच. म्हणूनच आजही तिला स्वातंत्र्य दिलं जात नाही. ते स्वातंत्र्य हिरावलं जातं जबरदस्तीनं. केवळ खेळ आणि खेळखंडोबा असतो तिच्या जीवनाचा. जे मनुस्मृतीत सांगितलं आहे, अगदी तसंच वागवलं जातं स्रियांना आजही.

प्राचीन काळातील ग्रंथाचा विचार केल्यास रामायणात रामानं सीतेची अग्निपरीक्षा घेतली. त्यावेळी लक्ष्मणानं त्याला जाब विचारला, तेव्हा रामानं सांगितलं की तिला सुरक्षीत अग्निदेवापाशी ठेवले होते. ते त्याला आधी माहित असल्यामुळे व रावणाने तिला हात लावू नये यामुळे तिला अग्निदेवाजवळ ठेवलं. ही रामाची सावरासावर. खरंच ही अग्निपरीक्षा घेण्याची काही गरज होती काय?

रामानं दोन वेळा अशी सीतामाईची अग्निपरीक्षा घेतली. तसेच लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला परत वनवासातही पाठवले. हा सीतामाईच्या जीवनाचा खेळ आणि खेळखंडोबाच होता. पहिली अग्निपरीक्षा व दुसरा वनवास सीतेनं सहन केला. पण ती सहन केव्हापर्यंत करणार. सहनशिलतेला मर्यादा असतात. अगदी तेच झालं सीतेच्याही बाबतीत. दुस-या वेळी अग्निपरीक्षा घेताच सीतेनं अग्निपरीक्षा तर दिली. पण रामावर शंका घेवून स्वतःला भुमीमध्ये गाडून टाकलं. फक्त डोक्यावरचे केसं तेवढे लक्ष्मणाच्या हाती आले. हेच घडलं महाभारतातही. महाभारतात द्रोपदीला न विचारता, ज्याला धर्मराज म्हणतात, त्या धर्मराजानं काय केलं, त्यानं तर आपली पत्नी द्रोपदीला डावावर मांडलं. स्वतःच्या भावाला डावावर लावून दास बनवलं आणि त्या हस्तिनापूरातील पुरुषांनी...... एक विदूर सोडला तर बाकीच्यांनी मजाच पाहिली. स्री जातीची अब्रू लुटली जात असतांना त्यांनी माना खाली घालण्याखेरीज काहीच केलं नाही. यावेळी द्रोपदीला डावावर लावणे योग्य होते काय?ती काय त्यांची मालमत्ता होती?

त्याच महाभारतात द्रोणानं एकलव्याला न शिकवता त्याचा अंगठा घेतला. सावरासावर करतांना द्रोण म्हणतो अश्वत्थामाला की त्याने ज्ञान चोरुन घेतले. अर्थात ज्ञानाची चोरी केली. मग ज्ञानाची चोरी करणे जर पाप असेल तर त्याची शिक्षा म्हणजे अंगठा घेणे उचीत होते काय? हो चोरी करणे जर दुष्कर्म आहे तर जेव्हा एकलव्य शिक्षा शिकायला द्रोणाकडं गेला, तेव्हा त्यानं शिकवायला का नकार दिला?अन् ज्ञानाची चोरी होवू शकते काय?कळत नकळत प्रत्येक मनुष्य प्राणी परीसरातून ज्ञान हे चोरुनच मिळवीत असतो. झाडाची फळं गोड असतात हे आपल्याला कळते ते, ते फळ खाल्ल्यानंतर. त्यावेळी त्या झाडाला आपण विचारत नाही की हे वृक्षा, तुझे फळ खावू की नको. गुरु द्रोणही फळ खाताना प्रत्येकवेळी विचारत नसेल. मग या झाडांनी त्याचा का प्राण मागितला? याचा विचार द्रोणानं करण्याची गरज होती. त्या द्रोणापेक्षा बाबासाहेबाचे गुरु आंबेडकर खरंच महान आहेत की ज्यांनी वर्गाच्या बाहेर बसून ज्ञान ग्रहण करणा-या बाबासाहेबाला आपले स्वतःचे नाव दिले. शिक्षा केली नाही वा अंगठा मागितला नाही.

सुतपुत्र म्हणून कर्णाचा पदोपदी होणारा अपमान, त्याला द्रोणानं शिक्षण तर दिलं नाही. परंतू त्याला योग्य धनुर्धरही मानलं नाही आणि ज्या कर्णानं तिच्या स्वयंवराला हजेरी लावत शिवधनुष्य उचलला आणि त्याला प्रत्यंचा चढवायला लागला तोच द्रोपदी म्हणाली, "मला सुतपुत्राशी विवाह करायचा नाही. मग असे असतांना त्या ब्राम्हण रुपात आलेल्या अर्जूनाचा तिनं स्विकार का केला?त्यातच तिला पाच पतीची पत्नी बनावे लागले, तेव्हा तरी तिनं विरोध का केला नाही. याला सर्व कारणीभूत आहे भेदभाव त्याही वेळी स्रियाची अवहेलना होत होती आणि अस्पृश्य स्पृश्य भेदभाव होता. निव्वळ भेदभाव आणि स्री जातीची अवहेलना. या दोन्ही महाकाव्यात. परंतू आजही असे महाकाव्य आमच्या जगण्याचे आधार आहेत. कारण त्यातून धर्माचं शिक्षण मिळतं. वचन पालवण्याचं शिक्षण मिळतं. नव्हे तर वचनं पेलविण्याचं. धीर मिळतं मोठमोठी आव्हाने झेलण्यासाठी. तसेच मोठमोठी संकटं झेलण्यासाठी बळंही मिळतं. संभाव्य शत्रूंना ओळखता येतं.

महाभारत रामायण तर इतिहास झाला. पण आजही आजुबाजुला तशी पात्र आहेत. जशी त्या महाकाव्यातील पात्र वागली. आजही मंथरा आहेत. आजही द्रोणाचार्य आहेत. कौरवं आहेत. जे आजही पदोपदी द्रोपद्यांची इज्जत लुटतात. ज्या मंथरा चुगल्या लावून तुमचं घर तोडतात. पण गुरु मात्र तसे नाही. त्यामिळं तुम्ही सावध व्हायला हवं. कारण अंगठा तोडून देणारे आज अंगठा दाखवायला लागलेत. त्यामुळं तुम्ही आता रामासारखं वागून स्वतःचा संसार तोडू नका. सीतेला वनवास देवू नका. कारण हे कलियुग आहे. सीतामाईही वारंवार वनवास घेवू घेवू त्रासली. द्रोपदीही त्रासली. हं मात्र त्यावर नक्की विचार करा. कोणीही द्रोपदीची अब्रू लुटू नका. नाहीतर आज ह्या सीता द्रोपदी यल्गार करतील आणि मग पुरुषांच्याच अग्निपरीक्षा सुरु होतील. म्हणून जरा सावधान! कारण आता तो काळ राहिला नाही.. अन् तो खेळ अन् खेळखंडोबा उरला नाही.