Struggle - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्ट्रगल - भाग-1

स्ट्रगल - (भाग एक)
ही एक काल्पनिक कथा आहे हिचा वास्तविक जीवनाशी काही ही संबंध नाही तरी काही संबंध
आलाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा.

मनोगत :

कोकणातल चिपळूण गाव. त्या गावात राहणारा मी. 'विक्रम सरदेसाई' माझ्यावर संस्कार जरी
कोकणाकडचे असले तरी आम्ही सगळ्यांनी भाषेची अजिबात सवय लावून घेतली न्हवती. घरात
आम्ही सगळे साधीच भाषा बोलायचो. रोज सकाळी कोंबडा आरवला की वसुदेवच्या आवाजाने आमची
सकाळ व्हायची त्यानंतर आपल आवरून झालं की आम्ही चार ही भावंड आईच्या मागे तुळशी
वृंदावनला प्रदक्षिणा मारायचो खऱ्या. पण लक्ष मात्र बाबांची पूजा झाल्या नंतर
प्रसाद मिळण्या आधी हळूच चोरून खाण्याकडे असायचं.

मला आजही आठवतय दादाला बेसनाचे लाडू खूप आवडायचे म्हणून हळूच दादासाठी आधी लाडू कोण
आणणार यावर आमची शर्यत लागायची आणि मग ते लाडू इतके व्हायचे की प्रेमाने आम्हा
तिघांना आधी दादू भरवायचा मग आम्ही त्याला भरवायचो.

त्यावेळेसच प्रेम आपुलकी काही औरच होती. पूर्वी कस माणस एकमेकांना धरून होती
त्यामुळे त्यांच्यातला जिव्हाळा ही टिकून होता. नंतर माणस बदलली आयुष्य बदलल कामा
निमित्त प्रत्येक जण बाहेर पडू लागले त्यामुळे एकमेकांमधला जिव्हाळा देखील कमी
झाला. पण कुठेतरी आजही नात्यातला गोडवा मात्र तसाच टिकून आहे.

मला आठवतय त्यावेळी आमची शाळा गावा बाहेर होती आणि आमची घरची इतकी परिस्थिती देखील
नव्हती की आम्ही शाळा ते घर अस येऊन जाऊन करू शकुत म्हणून आम्ही हॉस्टेलचा पर्याय
निवडला आणि चौघे भावंड हॉस्टेलवर राहू लागलो.

एक दिवस गॅदरिंग च्या दिवशी मनात नसताना दादानी माझ्याकडून नाटकाचा उतारा वाचण्याची
तयारी करून घेतली. त्यातून माझा आणि स्टेजचा पहिलेच छत्तीसचा आकडा होता. अश्यात पाठ
केलेला उतारा स्टेजवर म्हणायचा म्हणजे सगळच संपल. पण त्यावेळी दादानी माझी हिंमत
वाढवली. खर तर त्या दिवशी माझ्या आयुष्यात खरा संघर्ष सुरू झाला होता आणि आपली एक
नवीन ओळख बनवायचा प्रवास देखील सुरू झाला होता.

'स्ट्रगल' ही कथा त्याच प्रवासाची आणि संघर्षाची आहे. ही कथा माझी आहे. 'विक्रम
सरदेसाईची' आहे.

मुंबई शहर...

एक माया नगरी जिथे प्रत्येक व्यक्ती आपल्या कामाने नुसता झपाटलेला असतो. हेच अस एक
शहर आहे जीथे गरिबीत उघडयावर रहात असलेल्या इवल्याशा हातांना ही काम मिळत. मुंबई
शहराला माया नगरी म्हणतात ते उगीच नाही. या शहरात पाय ठेवताच हे शहर प्रत्येकाला
आपलसं करून घेत.

आज या शहरात माझा पहिला दिवस. बघू काय होत ते.

"शी... काय चिख्खल आहे." आपल्या बॅगा आणि ती खांद्यावरची झोळी सावरत सावरत विक्रम
जुनाटश्या दुमजली पडक्याश्या घरा समोर येऊन उभा राहिला. बघताना ते घर तस खूपच
जुन्या काळातल वाटत होत भिंतीचे पोपडे निघालेले कुठे मधेच भिंतीतून पाणी झिरपत होत
काही दारावरच्या कड्या ही निघालेल्या होत्या. वरकरणी अस वाटत होत की बऱ्याच
वर्षांपासून घराची डागडुजी केली नसावी.

विक्रमनी स्वतः ला सावरत आणि आपल्या बॅगा पकडत दाराची कडी वाजवली आणि दार उघडण्याची
वाट बघत उभा राहिला. साधारणतः अर्ध्या तासाने एक जख्खड साठ सत्तरीतली म्हातारी दार
उघडायला आली. दुपार असल्याने बहुदा सगळे घरा बाहेर गेलेले होते म्हातारी घरात एकटीच
होती.

तिने दरवाजा उघडत विचारलं.

"(मनाशीच) "कोण आलय मेल तरफडायला एवढ्या दुपारी" कोण तु कोण पाहिजे तुला?"

तिचा तो चिडका आवाज ऐकून विक्रम जरासा दचकलाच आणि त्याच स्वरात त्यानी विचारलं.

"आजी मी विक्रम सरदेसाई तुमच्या घरा संदर्भात एक जाहिरात वाचली पेपरमध्ये तुम्हाला
भाडेकरू हवा होता न."

हे ऐकताच म्हातारी अशी काही चिडली आणि हातात दांडू घेऊनच बाहेर आली व विक्रमच्या
मागे लागली.

"अरे, चोरा माझं घर बळकावयाला निघालास काय थांब बघतेच तुला अजून ही दुर्गाबाई खमकी
आहे हं. अस सोडायची नाय हे घर."

'दुर्गाबाई' त्या घरातली महत्वाची व्यक्ती तिचा तो रुद्रावतार बघून होत नव्हत सार
अवसान एकवटून विक्रम काही ही न बोलता पार टोका पर्यंत असा काही पळत सुटला की त्याला
दुर्गाबाई शिवाय त्याच्या डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हत दिसत होता तो फक्त
दुर्गाबाईंचा चेहरा.

तो नेमक कुठे जातोय त्याला काय करायचं आहे हे काहीच समजत नसत. आणि आपलं समान तिथेच
टाकून तो जिकडे रस्ता सापडेल तिकडे नुसता पळत सुटतो.

साधारणतः पंधरा वीस मिनिटां नंतर थकल्यामुळे तो जवळच असलेल्या एका चहाच्या टपरीवर
येऊन बसतो थोडा दम खातो न खातो तोच तिथे दोन व्यक्ती येऊन बसतात आणि आपापसात बोलू
लागतात.

"झिरप्या, दोन चहा सांग."

चहाची ओर्डर देऊन गणपत बोलू लागतो.

"तुला सांगतो, मंग्या ही म्हातारी न आजकाल जरा जास्तच करायली बघ. इथे पैशाची एवढी
चणचण आहे आणि हीने चक्क आलेल्या भाडेकरूलाच हाकलून दिल राव आता कुठे शोधायचं त्याला
त्याच समान सुद्धा तिथेच पडलय. बर दिलीच गरिबाला एखादी खोली रहायला काय फरक पडणार
आहे मदतच होईल न घरात आम्ही बाहेर असतो दिवसभर उद्या काही घडल तर कोण असेल सोबतीला
मी असा सारखा फिरतीवरचा माणूस कधी घरी असतो कधी नसतो पोरांच ही आपलं आयुष्य आहे
हिला कोण पुरणार पण नाही बोलायची सुद्धा सोय नाही इथे आता तो सापडला म्हणजे पाय
पकडेन मी त्याचे आणि लगेच घरी घेऊन जाईन बघ."

"पण गण्या तुझ्या आईच ते रूप बघून तो येईल का घरी राहायला"

"तस चांगली आहे रे आई माझी पण एकटे पणा सलतो न जीवाला म्हणून वाटते भीती साहजिकच तर
आहे (थोडं थांबून) बघुत काय होत ते."

एव्हाना विक्रमला लक्षात आलं होतं हे दोघ आपल्याच बद्दल बोलत आहेत. पण मनात विचार
ही सुरू होता "सांगायचं कस ज्याची चर्चा सुरू आहे तो मीच आहे आपल्याला जबरदस्तीने
घेऊन गेले तर रोज म्हातारीचा सामना करावा लागेल नको नाही घर मिळाल तरी चालेल
रस्त्यावर राहीन पण तिथे नको." विक्रम त्यांच बोलण ऐकत होता. शेवटी धारिष्ट करून तो
त्यांचं बोलणं मधेच तोडत बोलला.

"नमस्कार दादा, बहुदा तुम्ही माझ्याच बद्दल बोलत आहात. मी विक्रम सरदेसाई काही वेळा
पूर्वी तुमच्या कडे आलो होतो. ज्या सामाना बद्दल तुम्ही बोलत आहात ते सामान माझच
आहे. खर तर तुमच्या आईला बघितल्या वर मी परत त्या घरात येणार नाही असाच विचार केला
होता अगदी तुमचं बोलण सुरू होत तेव्हा पर्यंत पण शेवटी माझी सुद्धा गरज आहेच की आणि
आजीचं काय हो प्रत्येकाच्या घरात अशी एक आजी आजोबांची जोडी असतेच की घेईन मी
सांभाळून इथे नवीन आहे न त्यामुळे अस स्वागत बघून जरा घाबरलो बस."

हे ऐकताच दोघ एकमेकांकडे बघू लागतात आणि काही क्षणानंतर. गणपत एका मागोमाग एक
त्यावर प्रशांची सरबत्तीच करू लागतो.

"या न बसा की कुठले म्हणायचे तुम्ही? आणि काय करता? डॉक्टर आहात की इंजिनीयर? लग्न
झालय न तुमच कुणी मैत्रीण वगैरे ते काय न घरात आई एकटीच असते तीला मदत होईल कुणाची
तरी सोबत मिळेल म्हणून हा सगळा खटाटोप हो आजकालच जग कस आहे तुम्हाला तर माहीतच आहे
म्हणून थोडी सावधगिरी इतकच."

गणपतचे एकामागून एक येणारे प्रश्न बघून विक्रम विचारातच पडतो पण त्याने एक ठरवलेलं
ही असत काही झाल तरी जागा सोडायची नाही आणि त्यासाठी खोट ही वागायचं किंवा बोलायच
नाही तो शांतपणे उत्तर देतो.

"मी विक्रम अनंतराव सरदेसाई, मी चिपळूण चा आणि मुंबईत चित्रपट क्षेत्रात काम करायला
आलोय माझ ही मोठं कुटुंब आहे घरी आई बाबा तीन भावंड आणि आजी आजोबा देखील आणि हो
महत्वाच म्हणजे माझं अजून लग्न झालेल नाही आणि मला कुणी मैत्रीण किंवा कुठलीही सवय
देखील नाही आता सगळं खरं तुम्हाला सांगितलंय यावर तुमचा निर्णय."

विक्रम चित्रपट क्षेत्रात काम करायला आला आहे हे ऐकून पाहिले तर दोघ हसूच लागतात
कारण त्यांना माहीत असत इथे येणारे प्रत्येक जण या एकाच स्वप्नासाठी आलेले असतात पण
पुढे होत वेगळच पण गणपत ला त्याचा खरेपणा खूप आवडतो तो त्याला म्हणतो.

"बेटा लहान आहेस आमच्या पेक्षा तुझ्यावर हसलो मनाला लावून घेऊ नकोस आम्हाला माहीत
आहे इथे येणारा प्रत्येक जण हे एक च स्वप्न घेऊन इथे येत असतो पण पुढे त्यांचं
भविष्य काही वेगळच निघत असो तुझा खरेपणा आवडला मला मी खर तर विवाहितांना खोली देणार
होतो पण का कुणास ठाऊक तु माझं मन जिंकलस दिली तुला जागा ये तु राहायला."

हे ऐकून विक्रमला खूप आनंद होतो. आणि त्याची मुंबईच्या आयुष्याची एक नवी सुरवात
होते.

क्रमशः

पुढे: आता पुढे काय? ही मुंबई नव्हे स्वप्नांची मुंबई विक्रमला काय काय दाखवेल बघुत
पुढील भागात