Don Laghuttam katha books and stories free download online pdf in Marathi

दोन लघुत्तम कथा -

दोन -लघुत्तम कथा ..!

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

१- "डाव "

घरात आल्यापासूनच तिला जाणवत होते , आपण इथे नकोशा आहोत ",काही महिनेच झाले असतील तिच्या लग्नाला . अगदी रीतसर लग्न करून ती या घरात "सुनबाई "म्हणून आलेली , तरीपण "तो क्षण आठवला की. भीतीने थरकाप होतो नुसता .. ",उंबरठा ओलांडून घरात प्रवेशाचे पहिले पाउल टाकत असतांना तिच्या मनाला एका अनामिक भीतीने घेरून घेतले आहे असे सारखे जाणवत होते. पहिले पाउल टाकून तिने या घरात प्रवेश केला .जरा वेळाने स्थिरावल्यावर तिची नजर घरभर फिरून आली, नव्या माणसांच्या चेहेर्यावर तिची नजर जाताच , त्या नजरेत आपुलकी आणि आपलेपणा नाहीये " उत्सुकता तर अजिबातच नाहीये हे जाणवले " पण , ही वेळ त्याबद्दल विचार करण्याची नव्हतीच ,

"नवलाईचे दिवस " तिच्या वाट्याला आलेच नाही - जणू सारेजण "नव्याचे नऊ-दिवस" कधी सरतात याचीच वाट पहात होते की काय असे तिला राहून राहून वाटत होते.

मुलगी-पाहून -लग्नाच्या बैठका आणि देण्याघेण्याचे प्रदीर्घ चर्चा -गुऱ्हाळ ",हे सगळं पार पाडून तिचे लग्न -त्याच्याशी "-थाटामाटात -वाजत-गाजत पार पडले . असे असून ही आपण या घरात "नकोशा का आहोत ? हे कोडे काही केल्या उलगडत नव्हते .

एक दिवशी तिने प्रत्याक्ष्य नवऱ्याला विचारले - का हो -तुमच्या घरातल्या सर्वांना माझा इतकाच तिटकारा होता तर मग लग्नच ते ही माझ्याशी का आणि कशामुळे ?,आपला प्रेम-विवाह नाही की बळजबरी मी मागे लागले नव्हते . मी लग्नानंतर सुखी नाही, सासरच्या घरात मी नकोशी आहे , हे धक्के माझ्या घरातील लोकांनी का आणि कसे सहन करायचे ? माझ्या आई-बाबांना दुखच्या वेदना देणारे हे अपयशी लग्न का जुळवले तुम्ही लोकांनी ?.

समजावणीच्या स्वरात तो सांगू लागला - हा प्रश्न तू विचारणार हे माहिती आहे मला , उलट ,मी वाटच पहात होतो तुझ्या या प्रश्नाची . हे बघ - या घरात आल्या पासून तुझ्या मनाला काय काय प्रश्न पडलेले आहेत हे चांगलेच ठाऊक आहे मला . याबद्दल ऐकण्या अगोदर -मी काय सांगतो तो ते ..नीट समजून घे , म्हणजे तुझ्या मनात माझ्या बद्दल तरी गैरसमज रहाणार नाही.

त्याचे " हे प्रास्तविक तिच्यासाठी नक्कीच दिलासा देणारे होते . कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी "आपला म्हणवणारा -हा एकटातरी " आपल्या बाजूने , आपल्या पाठीशी असणार आहे", अब कोई डरने की बात नाही ".

मनातल्या मनात तिने आशेचा नि:स्वास नक्कीच सोडला होता.

आता मी काय सांगतो ते ऐक -तो पुढे सांगू लागला -

लग्नासाठी इतक्या लवकर मी फारसा उत्सुक नव्हतो , पण, आई -बाबा आणि इतर मंडळी माझ्यामागे सतत भुणभुणत असायची - आईच्या श्रीमंत मैत्रिणीच्या मुलीशीच मी लग्न करावे ,घरजावई झालास तर आम्हाला चालेल , पण, त्यांचा तसा सध्यातरी आग्रह नाही ,म्हणून,आम्ही तुला अजिबात फोर्स करणार नाही " पण, ही मुलगी तुझ्या आयुष्याला आणि आमच्या सर्वांच्या आयुष्याला "अर्थपूर्ण " बनवणार आहे.तिचा हा गुण तू पहावास, बाकी -गोष्टी तशा "म्यानेज "करता येऊ शकतात . ती -तिची स्वतंत्र - तू तुझा स्वतन्त्र ".."आजकाल म्हणतात "ती स्पेस " ज्याची -त्याची .-ती ज्याने -त्याने सांभाळीत रहायचे .मग प्रोब्लेम येणारच नाही.

आईच्या मैत्रिणीच्या या प्रपोजल ला मी सरळ नकार दिला . त्या मुलीच्या फ्यामिलीला हिचे "लग्न " झालेले आहे, हे सुरक्षा -कवच " घालून "मुक्त-स्वातंत्र्य " उपभोगायचे होते",त्यांच्या पैशाच्या जोरावर हे सहज घडून येईल "हा त्यांच्या अपेक्षेला निदान मी तरी भुललो नाही .

आई प्रचंड नाराज झाली, माझ्याशी अबोला धरला तिने, इतकी सोन्यासारखी संधी मी घालवली "याचा तिला प्रचंड धक्का बसला . तिच्या मनांतलली "लक्ष्मी-रूपातली " सुनबाई .माझ्या दरिद्री विचारामुळे येऊ शकली नाही"या गोष्टीचा तिला संताप आलेला होता , त्यात भर म्हणजे - आई वाक्यं -प्रमाणं" मानून वागणार्या बाबांना ..आई सारखेच वागवे लागत होते ", एक दिवस ते मला म्हणाले- तुझ्यात एव्हढे धाडस कसे आणि कुठून आले रे ? कम्माल केलीस गड्या तू तर ",. अंदर की बात ऐकून घे - मी वरवरून तुझ्या विरुध्द असणार आहे, मनातून मात्र -तुझ्या बाजूने असेल नेहमीच.".

मध्येच एक मोठी मानसिक अशी दुर्घटना आमच्या घरात घडली- माझ्या आजीला -आईच्या आईला ", (बाबांच्या आईला नव्हे",) जीवघेणा आजार झालाय याचे निदान झाले , आज्जी थोड्या दिवसांची सोबती आहे" हे समजून आल्या मुळे- घरावर दुखाचे सावट पसरले ..पण, तसे कुणी दाखवायचे नाही "हे ही ठरवले गेले .

आजीच्या डोळ्या देखत "घरात नात-सुनबाई यावी " ही आजीची इच्छा पूर्ण करणे भावनिक कर्तव्य ठरले ,आणि रीतसर "वधु -शोध "मोहीम सुरु झाली . या कार्यात माझी आई पूर्णपणे माझ्या सोबत असेल" असे आज्जीने तिच्या लेकीकडून कबूल करवून घेतल्यामुळे- सर्वांच्या पसंदीच्या मुलीशी-आणि मला आवडलेल्या मुलीशी- माझे लग्न झाले.

आज्जी असे पर्यंत तरी ..तुला तसा काही त्रास होणार नाही , पण, पुढे -पुढे हे आताचे "शीत-युध्द ", तुझ्या साठी "एक -लढाई होऊ शकेल ", जी तुला लढायची आहे.." एक मात्र नक्की - तू एकटी नाहीस -मी तुझ्या सोबत कायमच असेल.

सध्या आई शांत दिसते आहे "आत कायकाय डावपेच चालू असतील ?- अंदाज नाहीये.

त्याचे सांगणे थांबले -- तिच्या चेहेर्यावर काय प्रतिक्रिया दिसते ?याची त्याला उत्सुकता होती..

त्याचा हात हातात घेत ती म्हणाली- मी एकटी नाहीये ",ही जाणीव मला जगण्याचे बळ देणारी आहे. तू काळजी करू नकोस. तुझ्या सोबतीच्या बळावर ही लढाई लढेल. कोणतेही डावं असुदेत, ते उलटवून लावील .

***

- "सेंड ऑफ "

कार्यालयीन कामकाज संपले आणि चाळीस -पन्नास जणांचा स्टाफ असलेल्या आफिसच्या मिटिंग -हॉल मध्ये सगळेजण जमले , बडे-बाबू म्हणून कार्यरत असलेले मनोहर नांदेडकर ३८ वर्षांच्या नोकरीनंतर आज निवृत्त होत होते. एक मोठा कालखंड आज कार्यपूर्ती करून विश्रांती घेणार होता. मनोहर ज्याकाळात नोकरीस लागले .त्या काळातील सिनियर्सच्या सहवासाचा परिणाम त्यांचेवर होणे सहाजिकच होते..तेच संस्कार मनोहर आयुष्यभर पाळीत आले, आफिस-नोकरी आणि या साठी दिवस-रात्र ऑफिस एके ऑफिस .हे त्यांचे जीवन -सूत्र झालेले होते.

तिन्ही -त्रिकाळ फक्त माझे काम -माझे ऑफिस , साहेब ,साहेबांचे काम, ऑफिसचे काम "याशिवाय इतर विषय त्यांना जणू काय वर्ज्य होते .याचा परिणाम .मनोहर त्यांच्या पारिवारात कधीच मिसळून जाऊ शकले नव्हते

.परिणामी.. आपली लहान मुले -मोठी झालीत हे त्यांनी पाहिले ..त्यांच्या मनाला हे कधीच जाणवले नव्हते.

याचा अर्थ असा नव्हता की त्यांचे घरातील आपल्या माणसांवर प्रेम नव्हते , त्यांच्या विषयी माया वाटत नव्हती ,

हे सगळ असून ही त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून घरातील कुणालाच न ओलावा जाणवला, ना जिव्हाळा.एकूणच ",सगळे कर्तव्य पार पाडणे इतकीच मर्यादित भूमिका नसते माणसाची ", साथ-देणारा प्रेमळ नवरा , काळजी करणारा पिता ,, कुटुंबवत्सल प्रमुख "..यापैकी काहीही होणे मनोहर यांना जमले नव्हते

परिस्थितीने मनोहर खूप शिकून मोठी नोकरी मिळू शकले नव्हते .महत्वाकांक्षी मनोहर यांनी साध्या कारकुनाच्या खुर्ची पासून सुरुवात केली इतक्या वर्षातला बडे-बाबू होण्या पर्यंतचा त्यांचा प्रवास स्वतःच्या स्वार्थ साठीची एक लढाईच होती..जी त्यांनी सतत गनिमी काव्याने लढली.

स्वताचा वरचष्मा रहावा या इच्छेपोटी .त्यांनी ..कायम दुहीचे अस्त्र वापरले .."स्वतःची प्रतिमा उजळ ठेवीत .इतरांना "पुढे जाता येणार नाही " असे अडथळे निर्माण करून ठेवणे यातच त्यांची शक्ती आणि बुद्धी खर्च होत गेली.कुणाला कधी नाही म्हणयचे नाही .आणि होकार तर कधीच नाही. शब्दाने कुणी दुखावणार नाही याची ते सतत काळजी घेत

.

ऑफिसात त्यांना मिठ्ठी छुरी " असेही म्हणत मनोहरबाबू म्हणजे साहेबांचा माणूस ", हीच ओळख दुसर्या शब्दात "साहेबांचा चमचा " अशीच होती . "व्यक्ती पेक्षा खुर्ची श्रेष्ठ ",या कटू-सत्याला नाकारून चालणार नव्हते . साहेबंनी नाराज होऊ नये म्हणून .मग मनोहरबाबूंना खुश ठेवणे सोपे" हे सगळ्या स्टाफच्या अंगवळणी पडत गेले .स्टाफच्या मनात आपल्याबद्दल काय सद्भावना आहेत " याची चांगलीच कल्पना मनोह बाबूंना होती.

आणि आज हा स्टाफ त्यांच्या निरोप-समारंभास जमला होता. उद्यापासून मनोह्र्बाबू नसणार ,वातावरण नक्कीच वेगळे असणार होते .इतकी वर्षे आपण या सहकार्यंना सुखाने काम करू दिले नाही, जे वागलो ते त्रासदायक वाटावे असेच होते . आजच्या या कार्यक्रमात आपल्या विषयी हे वाईट नाक्कीच बोलणार नाहीत .कारण सेंड ऑफ ..निरोप समारंभ प्रसंगी जाणर्या -व्यक्ती विषयी चांगलेच बोलावे "असा सभ्य संकेत सगळेच पाळत असतात .

सरता काळ डोळ्यापासून सर्रकन सरकून गेला ..एकाएकी मनोहरबाबूंच्या मनाला विषादाच्या भावनेने ग्रासून टाकले , एका विलक्षण अपराधाच्या भावनेने मनास वेधून टाकले असल्याची तीव्र जाणीव त्यांना होऊ लागली .

निरोप-समारंभ सुरु झाला .प्रास्तविक झाले.आणि मनोहरबाबू मध्येच उठून उभे राहिले ..

आज माझ्या बद्दल सारेजण छानच बोलणार ,कारण तुम्ही चांगली माणसे आहात , पण मी तसा नाही.."हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून प्लीज .तुम्ही काही बोलू नका ..जो मी नाहीच आहे,तो आहे" हे ऐकणे आता नको.

मीच तुम्हा सर्वांचा अपराधी आहे, जे काही वागली .त्याबद्दल माफी मागतो .झाले गेले विसरून जाणे सोपे नसते ",पण मोठ्या मनाने तुम्ही आज या कोत्या -मनाच्या तुमच्या सहकार्याला निरोप द्या.इतकेच मागणे मागीन.

आणि इथेच सेंड-ऑफ "पार पडला

***