Udhyog Ratna Dhirubhai Ambani books and stories free download online pdf in Marathi

उद्योग पद्म - धीरूभाई अंबानी

धीरूभाई अंबानी

संपूर्ण जगभरातील व्यावसायिक क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने प्रसिद्ध पावलेली भारतीय व्यक्ती म्हणजे धीरूभाई अंबानी. आशियातील सर्वोत्तम म्हणजे ५० व्यावसायिकात त्यांची गणना केली जाते. त्यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी धीरभाई यांचा भारत सरकारने मरणोत्तर ‘पद्म विभूषण’ हा सन्मान बहाल करून गौरव केला आहे.


धीरूभाई यांच्या मनात लहानपणापासूनच आपल्या देशाविषयी आस्था आणि प्रेम होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य याबद्दल त्यांच्या मनात विशेष आदर होता. त्यांच्या कार्याबद्दल आपल्या मुलांनादेखील धीरूभाई आवर्जून गोष्टी सांगत असत असे त्यांचे पुत्र मुकेश अंबानी यांनी ‘ Dhirubhai Ambani Against All Odds’ या पुस्तकात नोंदविले आहे.

त्यांच्याकडे सल्ला किंवा मदत मागायला आलेली कोणतीही व्यक्ती विन्मुख परत गेलेली नाही यात धीरूभाई यांचे माणूसपण सामावले आहे. आपण लहानपणी आणि तरुण वयात अनुभवलेला संघर्ष त्यांना इतरांना मदत करण्यास प्रेरणा देत असावा. आपल्या स्मितहासयातून त्यांनी शेकडो माणसे जोडली आहेत. लक्षावधी सर्वसामान्य स्त्री - पुरुषांच्या आयुष्यात आनंद आणणारे धीरूभाई त्यामुळेच प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान मिळवून आहेत. नेतृत्व हा धीरूभाईंच्या व्यक्तिमत्वातील महत्वाचा पैलू केवळ देशातीलच नाही तर जगातील तरुण तरुणांनी शिकण्यासारखा महत्वाचा गुण आहे.

देशातील युवकांच्याविषयी धीरूभाई यांच्या मनात आदर होता आणि युवकांच्या क्षमतांविषयी त्यांना खात्री होती. तरुणांना उद्योजकतेच्या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी त्यांच्या ,मुलांनी केलेले प्रयत्न हे धीरूभाईंच्या या विश्वासाचे फळ आहेत असे म्हणायला हरकत नाही.

धीरूभाई आणि एकूणातच अंबानी कुटुंबीय यांच्या भौतिक समृद्धीकडे पाहून समाजाला असे वाटत असेल की हा रस्ता सोपा आहे पण धीरूभाई यांना संघर्षाला तोंड देत या काट्याकुत्यांच्या रस्त्याने जाऊनच नंदनवन फुलविण्याचे बळ मिळाले आहे हे विसरून चालणार नाही.

साठ-सत्तरच्या दशकात उद्योग क्षेत्रात पाऊल टाकणे यासाठी आव्हानात्मक परिस्थिती असताना धीरूभाई यांनी सुरु केलेला व्यवसाय आणि त्याची यशस्विता उल्लेखनीय आहे


बालपण-

धीरूभाईंचा जन्म २८ डिसेंबर १९३२ रोजी जुनागढ येथे गुजराती कुटुंबात झाला. हिराचंद आणि जमनाबेन अंबानी यांचे हे अपत्य. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. कालांतराने ते शाळेचे ख्याध्यापक झाले. लहानपणापासून कुटुंबातील बेताची आर्थिक स्थिती पाहूनच कदाचित मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा धीरूभाई यांच्या मनात जागी झाली असावी!

किशोरवयात ज्यावेळी धीरूभाई यांना पैशाची गरज भासत असे त्यावेळी ते आणि तयांचे मित्र गुजरातेतील प्रसिद्ध अशा गिरनार पर्वत यात्रेत आणि उत्सवात भजी विकण्याचा व्यवसाय करून स्वतःच्या क्षताने पैसे मिळवीत असत. उद्योगाचा श्रीगणेशा अशाप्रकारे बालवयातच झाला आणि कष्ट करण्याची त्यांची जिद्द, कोणतेही काम कमी न समजणे हा विचारही रुजला गेला. बालपणात आईला लांबून पाणी भरून आणून देणे असो किंवा कुटुंबासाठी पायी उन्हात चालत जाऊन ताक आणणे असो, कष्ट करण्याची सवय त्यांना लहानपणीच लागली. शालेय वयात कपड्याचे केवळ दोन जोड त्याने वापरले आहेत.... ज्याने नंतर जगामध्ये वस्त्र उदयोग नावारूपाला आणला....

तरुणपानातील आव्हाने-

तरुणपणात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी एडन मधील एका शेल नावाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यात काम केले आणि एका पेट्रोल पंपावरही काम केले. पेट्रोल पंपावर काम करणारे-या या युवकाच्या मनात भविष्यात आपणही तेल शुद्धीकरण कारखाना सुरु करावा असा विचार येऊन गेला ज्याला रिलायन्सच्या रूपाने त्यानेच मूर्तरूप दिले!

एडनला जाण्यापूर्वी झालेल्या मुलाखतीनंतर आपला पासपोर्ट मिळविणे, प्रवासी बोटीच्या तिकिटाचे नियोजन करणे या गोष्टी त्यांनी दहावीच्या परीक्षेच्यानंतर लगेचच स्वतःच्या स्वतः केलेल्या आहेत.या कामात आलेले अडथळे पार करून नोकरी करून आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणे यामध्ये धीरूभाई यांचा आत्मविश्वासच दिसून येतो. येमेनमध्येच त्यांनी उद्योगाच्या हिशोबाचे काम पाहणे, आवश्यक सरकारी कागद तयार करणे अशी कामे शिकून घेतली. रात्र शाळेत प्रवेश घेऊन त्यांनी या गोष्टी शिकून घेतल्या आहेत. शाळेत शिक्षण गुजराती माध्यमात झालेले असल्याने या काळात त्यांनी इंगजी व्याकरण शिकून घेतले कारण ग्राहकांशी बोलताना इंगजी भाषा येणे आवश्यक आहे याचे महत्व त्यांनी ओळखले होते. या उद्योगासारखा स्वतःचा उद्योग सुरु करणे हे धीरूभाई यांनी पाहिलेले स्वप्न त्यांनी प्रचंड मेहनत आणि कष्टातून साकार केले, जगभरात यशस्वी करून दाखविले. येमेनमधील आंदोलनात भारतीय व्यावसायिकांवर बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे १९५८ मध्ये अंबानी भारतात परतले.

भारतीय उद्योगाची मुहूर्तमेढ-

रिलायंस कमर्शियल कारपोरेशन या नावाने त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. मुंबईतील मस्जिद बंदर या भागात चंपकलाल दमाणी यांच्यासह भागीदारीत सुरु केलेल्या या उद्योगातून येमेन येथे पॉलिस्टर कापड आणि मसाल्याचे पदार्थ निर्यात केले जात असत. केली. आपल्यासह मदतीला दोन सहाय्यक घेऊन या व्यवसायाची सुरुवात झाली. त्यावेळी धीरूभाई आणि त्यांच्या पत्नी कोकिळाबेन भुलेशवर येथे परिवारासहित राहत होते.


या काळात अधिक नफा मिळविण्यापेक्षा उत्पादनाची गुणवत्ता कायम टिकवून ठेवण्यावर धीरूभाई यांनी लक्ष केंद्रित केले. कापड उयोगातील नफा लक्षात घेता धीरूभाई यांनी अहमदाबादजवळील नरोडा येथे स्वतःची पहिली कापड गिरणी सुरु केली. रिलायंस टेक्स्टाईल या नावाने! चांगल्या प्रतीचे सूत निर्यात होण्याच्या गुणवत्तेच्या आग्रहाच्या जोडीनेच त्यांच्या गिरणीत काम करीत असलेल्या कर्मचारी सदस्यांना मिळणा-या सुविधा, त्यांच्या अपेक्षा याकडेही ते जातीने लक्ष देत असत. या व्यवसायातेल यशस्विता दिसून आल्यावर गिरणी व्यावसायिक संघटनेचे ते अध्यक्षही झाले!

या व्यवसायात त्यांना संघर्षाला तोंड द्यावे लागले. बाजारपेठेतील दुकानदार अन्य गिरण्यांच्याकडून कापड विकत घेत पण रिलायन्स कडून कापड घेण्यास ते उत्सुक नसत. आपल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी धीरूभाई यांनी प्रसंगी रस्त्यावरही कापड विक्री केली आहे! ओन्ली विमल च्या जाहिराती आणि त्यात झलकणारी नवनव्या नक्षी आणि चित्रांची कापड दुनिया याने समाजमनाला वेड लावले, आकर्षित केले. १९७५ साली जागतिक बँकेच्या सदस्य समितीची भेट रिलायन्स कापड उद्योगाला झाली होती यातच धीरूभाईंच्या कार्याला लाभलेला जागतिक आदर दिसून येतो.

मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आणि विश्वास- एक नवे पाऊल


आपल्या उद्योगाला लागणार-या भल्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी उभी करावी लागणारी रक्कम बँक किंवा वित्तसंस्था यांच्यकडे न मागता सर्वसामान्य व्यक्तीकडून शेअर्सच्या रूपात निर्माण करून धीरूभाई यांनी मोठी आर्थिक क्रांतीच केली. फायदा मिळवून देणारी शेअरची संकल्पना मध्यमवर्गीय माणसालाही आपलीशी वाटू लागण्यामागे धीरूभाई यांचा द्रष्टेपणा आणि सर्वसमावेशकता दिसून येते. संपूर्णपणे जनतेच्या भांडवलावर उभा राहिलेला यशस्वी व्यवसाय म्हणून आज रिलायन्सची ओळख जगाला आहे ती यामुळेच केवळ. आपल्या व्यवासायात रक्कम गुंतविलेल्या भागीदाराला उत्तम परतावा मिळालाच पाहिजे यावर धीरूभाई यांचा कटाक्ष असे. मुंबईत जाहीरपणे झालेल्या भांडवलदारांच्या सभेला एकूण साडेतीन लाखाच्या आसपास भागीदार उपस्थित होते ! धीरूभाई यांच्या व्यक्तिमत्वाचा हा प्रभाव होता. यामुळेच आज खाजगी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी व्यवसाय म्हणून रिलायन्सची मान्यता आहे. फॉर्च्युन ५oo कंपन्यांमधे सर्वात प्रथम स्थान मिळविलेली भारतीय कंपनी म्हणुन रिलायन्सने मान मिळविला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातही रिलायन्सच्या आर्थिक व्यवहारात कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नव्हता यावरून धीरूभाई यांच्या आर्थिक नियोजनाची आणि हातोटीची कल्पना येते.

पेट्रो केमिकल्स, दूरसंचार, कापड उद्योग, ऊर्जाक्षेत्र अशा विविध क्षेत्रातील रिलायन्सच्या उद्योग भरारीने धीरूभाईंच्या कारकीर्दीचा समृद्ध पटच समोर उभा राहतो यात काही शंका नाहीच.

धीरूभाई एडनहून भारतात परत येताना अवघे ५०,००० रुपये बरोबर घेऊन आले आणि पंचवीस वर्षाच्या काळात रिलायन्सच्या प्रगतीत ७० कोटीपासून ६० हजार कोटी इतकी प्रगती झाली . ही संख्याही धीरूभाई यांच्या चिकाटी आणि प्रयत्नांचे प्रतिबिंबच आहे!


स्वतः दहावीपर्यंत शिकलेल्या धीरूभाई यांनी आपली मुले अनिल आणि मुकेश यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठविले. भारतात परत आल्यावर या दोन्ही मुलांनी घरच्या व्यवसायात लक्ष घातले. दोन्ही मुलांकडे व्यवसाय सुपूर्द करून धीरूभाई निवृत्त झाले.

२४ जून २००२ मध्ये धीरूभाई यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तत्कालीन पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते की सामान्य कुटुंबातील मुलगा आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकतो याचे धीरूभाई हे प्रतीक होते. व्यवसायातील मतभेदांमुळे दोन्ही मुलगे अनिल आणि मुकेश यांनी व्यवसायाची विभागणी केला आणि Reliance Industries Limited ही मुकेश यांची कंपनी and Reliance Anil Dhirubhai Ambani Groupही अनिल यांची कंपनी नावारूपाला आली. २०१७ साली या उद्योगसमूहात २५००० कर्मचारी कार्यरत असणे हे धीरूभाईंच्या अपार कष्टाचे फळ आहे हे नक्की.

रिलायन्स समूहाने कालांतराने दूरभाष, दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरविणारी लहान दुकाने या क्षेत्रातही आपले पाय रोवून उभा आहे.


सन्मान-

व्यवसायिक जगातील संघर्षात्मक कारकीर्दीतून देशाला उद्योगक्षेत्रात नावारूपाला आणण-या धीरूभाईंचा भारत सरकारने २०१६ मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान देऊन गौरव केला.


ABLF Global Asian Award,
"Dean's Medal" by The Wharton School, University of Pennsylvania
Economic Times Awards for Corporate Excellence for Lifetime Achievement
Man of 20th Century" by the Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)
अशा विविध पुरस्कारांनी धीरूभाई यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव केलेला आहे.


धीरूभाई यांनी मनात बालगलेला चिरंतन आशावाद, धैर्य आणि चिकाटी यांचा आदर्श उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्तीना मार्गदर्शक ठरली आहे. स्वतःवर ठेवलेला दृढ विश्वास ही अनेकदा माणसांमध्ये अभावानेच आढळणारी जीवनवृत्ती धीरूभाई यांच्या कारकीर्दीची “गुरुकिल्ली” च आहे.

सामाजिक दायित्व


धीरूभाई अंबानी फौंडेशन (DAF) ची स्थापना १९९५ साली झाली. मुंबई पुणे रस्त्यावरील धीरूभाई अंबानी रुग्णालय सुरु झाले. गुजरातमध्ये जामनगर कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना वैद्यकीय सुविधा विनामूल्य दिल्या जातात. २००३ साली अंध व्यक्तींना मदत करण्यासाठी “दृष्टी उपक्रमाची सुरुवात झाली.

Dhirubhai Ambani Institute of Information and Communication Technology (DA-IICT) ही शिक्षणसंस्था, तसेच धीरूभाई अंबानी शाळा यामध्ये रिलायन्स उद्योगाच्या कर्मचारी वर्गातील तसेच अन्य मुलांनाही उच्च प्रतीचे शिक्षण दिले जाते. हाजरा येथील शाळांमध्ये रिलायन्सने संगणक उपलब्ध करून दिले आहेत.

रिलायन्स रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून सार्वजनिक सभागृह, लहान मुलांसाठी अंगणवाडी, रस्ते बांधणी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. २००१ च्या भूकंपात झालेले हानी भरून काढण्यासाठी रिलायन्स मोठे आर्थिक योगदान केले आहे.

त्यांच्या सुना, नीता आणि टीना याही व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची तिसरी पिढीही आता व्यवसायाची जबाबदारी स्वीकारत आहे. धीरूभाई यांना नीना आणि दीप्ती अशा दोन कन्याही आहेत.


, शाळा, रुग्णालय अशा विविध क्षेत्रात रिलायन्स उद्योगसमूह कार्यरत आहे. क्रीडाक्षेत्रातील प्रसिद्ध खेळ क्रिकेट यामध्येही रिलायन्स ची भागीदारी आहे. मुंबई इंडियन्स यांची मालकी नीता अंबानी यांच्याकडे आहे.


माध्यमांवर दखल-

धीरूभाई यांचा जीवनपट आणि कारकीर्द मांडणारी कादंबरी १९९८ साली हमीश मॅकडोनाल्ड यांनी The Polyester Prince या नावाने प्रसिद्ध केली.

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक मनिरत्नम यांनी धीरूभाईंच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन २००७ साली “गुरु हा हिंदी चित्रपट तयार केला आहे.


चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, नवे करून पाहण्याची ऊर्मि, हार न पत्करण्याचा स्वभाव, द्रष्टेपणा, व्यवसायातील नवनवे प्रयोग करून पाहण्याची कल्पक हातोटी ,आर्थिक नियोजन आणि व्यवसायात त्याची सांगद घालण्याचे कौशल्य आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवत झालेला धीरूभाई यांचा हा व्यवसाय प्रवास केवळ भारतातीलच नव्हेतर जगातील तरुण तरुणींसाठी आदर्शवत असाच आहे, प्रेरक आहे, जीवनाला नवी दिशा देणारा आहे. आपल्या आयुष्यातील यशस्वी अनुभवातून धीरूभाई आपली जीवनमूल्ये आणि विचार मांडताना म्हणत असत की “मोठी स्वप्ने पहा. जर तुम्ही ती पाहिली नाहीत तर दुसरेच कुणीतरी त्यांची स्वप्ने पूर्ण करायला तुमचा वापर करतील. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तरी गरीब म्हणूनच मृत्यू न पावणे तुमच्या हातात आहे. जीवनात मोठे ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी चपळाईने काम करा.

संकटाच्या परिस्थितीतही न डगमगता खंबीरपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत रहा”

संदर्भ पुस्तके आणि संकेतस्थळे-

.https://www.mapsofindia.com/who-is-who/business-economy/dhirubhai-ambani-biography.html

https://en.wikipedia.org/wiki/Dhirubhai_Ambani


https://www.thefamouspeople.com/profiles/dhirubhai-ambani-3748.php

Dhirubhai Ambani: Against All Odds: A Story of Courage, Perseverance and Hope - A. G. krushnamurti, Farward by Mukesh Ambani


धीरूभाई अंबानी-अवरोधों के आर पार- ए. जी. कृष्णमूर्ती

सही सोच और सफलता-प्रमोद बात्रा

महानायक- अरविंद यादव

Great personalities of India- Dhirubhai Ambani : Reamnu Saran

Citizen at Work Volume 3