Katha collegechya divsaanchi books and stories free download online pdf in Marathi

कॉलेजच्या दिवसांची

कथा - कॉलेजदिवसांची

----------------------------------------------------------

मित्र हो -

माझ्या कॉलेजची वर्षे - १९६८ ते १९७२ या शैक्षणिक वर्षातील आहेत .

या अवधीत वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे .माझे पदवी पर्यंतचे शिक्षण

दोन महाविद्यालयात झाले .

अगोदर पहिल्या कॉलेजातील आठवणी सांगतो

१.योगेश्वरी महाविद्यालय - अंबाजोगाई -

१९६८ ते १९७१

-----------------------------------------------------------------------------------

या कॉलेजात ..पीयूसी -कॉमर्स ते ,फर्स्ट इयर आणि सेकंड इयर कॉमर्स

पर्यंत शिकलो .

एक गोष्ट अगोदरच सांगितलेली बरी ..ती ही की ..माझे शिक्षण ,माझी कॉलेज-जीवन "हे मुळीच चित्तथरारक , रोमांचकारक ,

अविस्मरणीय , व "प्रकरणे " वगेरे यांनी पूर्णपणे विरहित असे आहे ,त्यामुळे हे असे कसले जगणे ? असा प्रश्न पडू देऊ नका .

माझे साधे-सुधे कॉलेज जीवन आणि ती वर्षे .आज पुन्हा आठवणे ,हे खूपच भावनावश करून

टाकणारे आहे.

माझे वडील (स्व)ती.विठ्ठलराव हनुमंतराव देशपांडे उर्फ व्ही.एच .देशपांडे -बाप्पा , हे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते .

हैद्राबाद या मोठ्या शहरातून वडिलांची बदली -पहिल्यांदा " स्वतंत्र .शाखाधिकारी या पदावर झाली ती थेट मराठवाड्यात .

बीड जिल्ह्यातील -आष्टी "या तालुकावजा छोट्याश्या खेडे-गावी .

हैदराबादच्या मोठ्या शहराची सवय झालेले आम्ही, आष्टी गाव पाहून आमचा फारच हिरमोड झाला होता .

.मी हैदराबादहून एच एस सी -परीक्षा पास होऊन मराठवाड्यात आलो होतो आणि आता कॉलेजमध्ये अडमिशन घेणार होतो

पण आष्टीला कोलेज नव्हते , त्यामुळे मी कॉलेज-एडमिशन चौकशीसाठी अम्बाजोगाईला गेलो .

तिथे एडमिशनसाठी विचारणा करतांना मार्कमेमो दाखवला ..माझे मार्क

हायर सेकंड क्लासचे "आहेत आणि त्यामुळे होस्टेल एडमिशन सुद्धा मिळू शकेल "असे सांगण्यात आले , मात्र यासाठी लोकल परिचित सोबत घेऊन या ,

मग आम्ही सांगू ..

त्या वेळी अंबाजोगाई इथे स्थायीक असलेले,माझे नातेवाईक (स्व)-भिकाभाऊ राखे ,माझे मामा ..,यांनी माझ्यासाठी त्यांचा शब्द त्यांचे -वजन वापरले .,

..त्यावेळचे प्राचार्य ..म.द.नाडकर्णी सर (ठाणे ) - यांना आम्ही भेटलो .भिकाभाऊ राखेमामांनी प्राचार्य नाडकर्णी सरांना सांगितले की -

- हा विद्यार्थी .मराठवाडा विद्यापीठातील वनस्पती -शास्त्र विभागाचे प्रमुख -डॉ.के.बी.देशपांडे -यांचा पुतण्या आहे . आपल्या कॉलेजमध्ये याला एडमिशन हवी आहे .

या संदर्भाने माझे काम खूप सोपे झाले .. प्राचार्य सरांनी - एडमिशन कमिटीला एक पत्र दिले -ज्यात सूचना होती -की या विद्यार्थ्याला कोलेज मध्ये प्रवेश

देण्यात यावा ,आणि होस्टेल मध्ये देखील प्रवेश देण्यात यावा .

मी कॉलेजमध्ये जाऊन पीयूसी- कॉमर्सला एडमिशन घेतली ,मग, होस्टेल एडमिशनसाठी - प्रा.सिंधुताई परांजपेबाई ,यांना आम्ही भेटलो ..,

भिकाभाऊ राखेमामांनी -परांजपेबाईंना -माझ्याबद्दल सांगितले .

.हा माझा भाचा आहे, तुम्ही याला माझ्या शब्दावर होस्टेल प्रवेश द्यावा दुसर्याच मिनिटाला

परांजपेबाईंनी होस्टेल -कर्मचारीला बोलावून घेत सांगितले - या मुलाला - आपल्या बाजूला विद्यार्थ्यांसाठी ज्या दोन रूम आहेत ए- १ आणि ए -२ ,

यातली ए-२ मध्ये जागा द्या ,सध्या या रूम मध्ये असलेल्या मुलांना तसे सांगा ..

आदेशाची अंमलबजावणी झाली ..

आणि मी योगेश्वरी महाविद्यालय "या नामांकित संस्थेचा विद्यार्थी झालो.

होस्टेलमध्ये मला जी रूम मिळाली ,त्याच्या अगदी बाजूला रेक्टर यांचा बंगला होता.

याच बंगल्यात मला पहिल्यांदा

एका थोर महनीय अशा व्यक्तीचे दर्शन घडले -

ती विभूती होती -हैद्राबाद मुक्ती संग्रामातील लढवय्ये - आदरणीय बाबासाहेब परांजपे ",

आमच्या होस्टेलवर -बीड-उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील ., कळंब , केज, माजलगाव , धारूर , आणि आजूबाजूच्या गावातून आलेली हे विद्यार्थी होते .

सायन्स ,आर्ट्स , आणि कॉमर्स अशा तीनही विभागाचे होस्टेलवर असायचे.

सुरुवातीला होस्टेल मेस -चालवायचे रावसाहेब गुरुजी ..मेसमध्ये जेवणाऱ्या सगळ्या मुलांवर त्यांचे

बारीक लक्ष असायचे ..मुलांवर त्यांची माया होती तितकाच धाक होता . वयपरत्वे त्यांनी ही जबाबदारी अन्य मंडळीवर सोपवली ,

नंतर गावातच त्याव्लाच्या नव्या बस-stand जवळ रावसाहेब गुरुजींची .."रिगल -हॉटेल "

सुरु झाली .

होस्टेलच्या रेक्टर म्हणून परांजपेबाई अगदी कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यकठोर असत , मदतीच्या वेळी मुलांच्या पाठीशी त्या आईचा आधार होऊन उभ्या राहायच्या

रविवार सोडून इतर दिवशी रोज -

. रात्री साडेआठ नंतर त्यांचा चेकिंग राउंड असायचा , रूम मध्ये गैरहजर असलेला विद्यार्थी कोण ? हे त्यांच्या नजरेतून सुटत नसे .

हे विद्यार्थी कोण होते ? हे सगळे सकाळी कळायचे ..कारण -

दुसरे दिवशी सकाळीच रेक्टर -परांजपेबाईंच्या बंगल्यासमोर उलट-तपासणी परेड " व्हायची ..त्या लाईनीत दिसलेले म्हणजेच ते "कालचे बेपत्ता ",

याचा पत्ता सगळ्या होस्टेलला लागायचा .

त्यावेळी या डिसिप्लीनचा त्रास वाटत असे ..पण ते किती मोलाचे संस्कार होते,त्याचे मोल आज जाणवले की, परांजपेबाईंची आठवण येऊन मन आदराने भरून येते .

कॉमर्स कॉलेज सकाळी 8 ते 12.30 पर्यंत असायचे,

कॉलेज संपले की पळत जाऊन हॉस्टेल गाठायचे ,कारण मेस दुपारी 1 वाजता बंद, त्यामुळे - आम्ही भुकेले विद्यार्थी जेवणा साठी मेस महत्वाची.

जेवण झाले की , मग दुपारी भर उन्हात बाहेर पडणे नकोसे वाटायचे, थोडक्यात ,दुपारच्या वेळी कॉलेज कॅरिडॉर, कँटीन अशा

विद्यार्थी प्रिय ठिकाणी आम्ही कायम गैरहजर असायचो.

ज्या दिवशी कमी पिरियड असायचे त्यास दिवशी वाचनालयात जाऊन साप्ताहिक- मार्मिक - मधले चित्रपट परीक्षण शुद्धनिषाद,

साप्ताहिक- मनोहर, व ईतर मासिके आवडीने वाचीत असे.

कॉलेजच्या या वाचनालयात दोन ग्रंथपाल होते -

प्रमोद देशपांडेसर मोठ्या जाड भिंगाचा चष्मा आणि मोठया उदार दृष्टीचे, तसेच दुसरे ग्रंथपाल प्रमोद जोशी सर,

या दोन्ही सरांनी कायम निवडक पुस्तके देत वाचन गोडी लावली,

माझ्यातला आजचा वाचक-साहित्यिक या दोन सरांनी आणि

योगेश्वरी महाविद्यालयातील वाचनालयाने घडवला आहे.

या दोन्ही ग्रंथगुरूंचे या लेखाच्या निमित्ताने स्मरण करतो .

मला ज्यांनी कॉमर्स शिकवले ते आदरणीय गुरुजन असे-

प्रा.रावसर ,प्रा प्रभाकर माहुरकरसर , प्रा.आठवलेसर, प्रा.देशकरसर ,प्रा.देशपांडेसर ..हे गुरुवर्य कॉमर्सचे विषय शिकवत .

माझ्या आठवणी प्रमाणे आमची १९६८ ची ही पीयूसी ची batch मराठी-आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषातून शिकलेली केवळ दुसरी batch असावी .

इंग्लिश भाषा शिवणारे ए.मा.कुलकर्णी सर, आणि सिंधुताई परांजपे बाई ,

मराठी शिकवणारे प्रा.रा.द.आरगडे सर , आणि त्यावेळी अध्यापन जीवन सुरु करणाऱ्या प्रा.शैलाताई लोहिया ,

अशा श्रेष्ठ आणि जेष्ठ गुरुजनांचा सहवास या कोलेज दिवसात लाभला . .

होस्टेलवर स्थिरस्थावर झाल्यावर .. मी गावातील माझ्या मावशीच्या घरी जात असे -

(स्व)राजाभाऊ पत्की हे माझे मावसे ..(स्व)-सिंधुताई ..माझ्या आईची चुलत बहिण

त्यावेळी माझा मावसभाऊ सतीश खूप लहान होता .आताच्या वर्तमानातला प्रा.सतीश पत्की -

जो सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक वलयांकित व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहे....

भिकाभाऊ राखेमामा आणि त्यांचा परिवार .. माझ्यावर माया करणारा परिवार , त्यातील जेष्ठ -अरविंद राखे ..आज ही फेसबुकवर .माझ्या संपर्कात आहेत,

माझ्या लेखनास त्यांची मिळणारी दाद माझ्यासाठी प्रेरक शाबासकी असते. अंबाजोगाई -बस-standच्या मागे राखे यांचा बंगला आहे,

कोलेजच्या दिवसात अगणित वेळा राखे -परिवारात

मी रमलो आहे .

जुन्या काळात आजच्या सारखे चमचमीत पदार्थ भले ही रोज रोज नसायचे ..पण..ताटातली -चटणी-भाकरी " सुद्धा सगळ्या सोबत खातांना होणारा आनंद,

मिळणारे समाधान हे खरोखर - "अमृततुल्य " होते .

मला तर राहून राहून वाटते ..ती पिढी ..ती माणसे उपजतच माया करणारी होती ,त्यांच्या मनात प्रेमाचे झरे कधी न आटणारे होते .

होस्टेलवर त्या काळात दर -रविवारी मेस मधले जेवण एक वेळ असे ..त्याचे कारण ..सकाळी -फिस्ट.असायची .

अगदी पंचपक्वान्न असल्यासारखे जेवण असायचे , मात्र संध्याकाळी जेवणास सुट्टी असे.

फिस्ट मध्ये सगळ्यात प्रिय पदार्थ - गुलाबजामून , आणि सोबत भज्जे..बाकीच्या पदार्थांना डिमांड नसे . त्यावेळी आकड्यात आता मोजता येणार नाहीत

इतके गुलाबजामून खाल्लेत .मन आणि पोट दोन्ही भरून गेलाय .त्यामुळे आज कितीही छान क्वालिटीचेगुलाबजामून असोत ..फारसा मोह होत नाही .

कॉलेजचा - होस्टेलचा महिन्या खर्च ..वडिलांची मनी-ऑर्डर यायची ती ८० रुपये . फारच झाले तर शंभर रुपये .

यात मेसचे बील ४२ रुपये असे, त्यात ३ खाडे अलाउड होते ,

मी गुरुवारचा उपवास -करयचो ,हे ३ गुरुवार वजा केले की ..मेस बील अजून कमी व्हायचे . बाकीच्या ५० रुपयात महिना आरामात काढायचा.

तेव्हापासून -उधळपट्टी तरी केलीच नाही ,आहे त्यात भागवायचे हे शिकण्यास या कॉलेजच्या दिवसांनी शिकवले .

आणि थोडी का होईना काटकसरीने राहायची सवय लागली.

आई- योगेश्वरी - माता -योगेश्वरी देवी ..ही तर ग्राम-देवता .देवी -दर्शन .घेण्यासाठी गावात जाण्याची उत्सुकता असे .

ती दर मंगळवारी आणि शुक्रवारी .हे दोन दिवस त्या काळातील कोलेज-कुमारांचे आवडते भक्ती-वार असायचे .

कारण या दिवशी होणारे "योगेश्वरी देवीचे -दर्शन " आणि तिथे आलेल्या अनेक देवीचे -दर्शन " घेणे अगदी सगळ्या अर्थांने साध्य होत असे.

सिनेमा हीच एकमेव करमणूक . त्यामुळे - मोहन टाकिज आणि सागर टाकीज .हेच आमचे आवडते ठिकाण .

या दोन टाकीज मध्ये शनिवार आणि रविवार .हमखास पिक्चर बघायचो .

होस्टेलवर ८.३० ला हजर पाहिजे हा नियम हे दोन दिवस नसे .

१९६८ ते १९७१ या वर्षातले सगळे पिक्चर- फिल्मी संगीतातल्या सुवर्ण -युगातले आहेत.त्यामुळे गाण्यासाठी पिक्चर बघितले जायचे .खूप मजा येत असे.

तिकीट दर - जमीन -३५ पैसे , बेंच - ७० पैसे आणि खुर्ची - एक रुपया पाच पैसे . जमिनीचे तिकीट नको वाटायचे मग सत्तर पैसे तिकीट आणि बेंच हे बरे वाटे.

बी.काम सेकंड इयर पर्यंत ..मी श्री योगेश्वरी महाविद्यालयाचा आणि होस्टेलचा विदार्थी होतो . या पावन नगरीचे ..पावन वास्तूचे संस्कार माझ्यावर नक्कीच झाले आहेत .

२.

म.गांधी महाविद्यालय - अहमदपूर .

शैक्षणिक - वर्ष - १९७१ - १९७२

-------------------------------------------------------------

वडिलांची बदली .बीड जिल्ह्यातील -आष्टी येथून , त्यावेळच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या - अहमदपूर या गावी झाली .

मार्च १९७१ ते एप्रिल -१९७२ .या शैक्षणिक वर्षात अहमदपूरच्या म.गांधी महाविद्यालयात मी बी.काम -फायनल यिअला अडमिशन घेतली.

त्यावेळी म.गांधी महाविद्यालय .गावात .एका कॉलनीतील चार -बंगल्यात भरत असे .

सुरुवातीला- १९७० पर्यंत म.गांधी महाविद्यालयात

आर्ट्स ,सायन्स आणि कॉमर्स "या तीनही -शाखांचे फक्त पीयूसी ,आणि प्रथम वर्ष "चालत होते .

१९७१ साली ..सेकंड आणि फायनल ईयर असे दोन वर्ग एकदम सुरु होणार असे कळाले .आणि सहज चौकशी करण्यासाठी

कॉलेजात गेलो .आणि बी.काम फायनल इयरसाठी अडमिशन घेऊनच बाहेर पडलो .

शेवटच्या वर्षाला ..योगेश्वरी महाविद्यालय सारखे .प्रसिध्द कॉलेज सोडून .

अगदी नवख्या अशा म.गांधी महाविद्यालय .अहमदपूर ,या कॉलेज मध्ये

माझे अडमिशन घेणे " आम्ही सोडून ..कुणालाच पटलेले नव्हते ",

पण बाहेरगावी राहण्या ऐवजी .घरी राहण्यास मिळणार "या आनंदात ,

सगळ्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष न देता , मी म.गांधी महाविद्यालयाचा बी.कॉम फायनल ईयर चा विद्यार्थी झालो. हेच खरे.

इतक्या वर्षानंतर .सगळ्या सरांची नावे पटकन आठवणार नाहीत ..पण ,

जी आठवतात ..त्यांची आठवण कृतज्ञतापूर्वक करतो..

प्राचार्य - पी.बी. सावंत , प्रा.उगीलेसर , प्रा.संकायेसर , प्रा.ढोबळेसर ,प्रा.माने सर ,प्रा. भूषण जोरगुलवार , प्रा. नरगीलकर सर ,

प्रा. शिवाजीराव - तथा एस.एम-कुलकर्णीसर, प्रा.शिंदे सर , प्रा.बख्तुल सर ,हे त्यावेळी कॉलेजात इतर शाखेचे प्राध्यापक होते ,

पण सगळ्यांशी छान परिचय होता.त्यामुळे या सर्वांना कसे विसरणार ? तुम्हीच सांगा .

बी.कॉम-फायनल ईयरला ज्यांनी मला शिकवले -ते सर -

प्रा.पानपट्टेसर , प्रा.मुंडेसर , प्रा.हेरकरसर .

आणखी एक अनोखी आणि अभिमानास्पद अशी कॉलेज जीवनातील आठवण -या म.गांधी महाविद्यालाशी निगडीत आहे ..ती म्हणजे ..

मार्च -एप्रिल -१९७२ साली .या महाविद्यालाय्च्या बी.ए- आर्ट्स ,

बी.एसी -सायन्स ,आणि बी.कॉम या तीनही शाखांची पहिली batch..पास झाली ..

म्हणजे ..म.गांधी महाविद्यालयाचे ..आम्ही .(यात मी पण आहे)पहिले -वाहिले डिग्री - होल्डर "झालोत.

याची आठवण विचार विकास संस्थेने ठेवली आणि म.गांधी महाविद्यालयाच्या "सिल्वर -ज्युबिली वर्षात ..झालेल्या भव्य समारंभात

कॉलेजच्या पहिल्या डिग्री होल्डर्स -विद्यार्थ्यांना प्रमुख -पाहुणे "म्हणूननिमंत्रित केले आणि आमचा गौरव केला .

या समारंभात .माझा एक माजी विद्यार्थी आणि एक साहित्यिक "असा दुहेरी गौरव झाला , हा माझ्यासाठी बहुमान क्षण आहे .

त्याहून अधिक सुखद अनुभव घेतला - कॉलेजमधील त्यावेळच्या सगळ्या

प्राध्यापक सरांनी अगदी नावासहित मला लक्षात ठेवले होते .

दोन्ही महाविद्यालयातील त्या काळातील मित्रांच्या समक्ष भेटी का कुणास

ठाऊक जवळपास नाहीच झाल्या , आता लेख वाचून तरी नक्की

कुणाच्या फोन- भेटीचा योग यावा .

मी तर वाट पहातोय मित्रांनो तुमच्या कॉलची.

मित्रांनी -अशा आहेत बघा या आठवणी , भले ही किस्से नसतील ..

पण .

कायम भारावून टाकणारे ते दिवस आहेत , ती मोठ्या मनाची माणसे ..ज्यांच्या सहवासाने मला घडवले ,

त्यांचे संदर्भ देणे सुद्धा खूप आनंद देणारे असते.

या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद लाभले म्हणून - मी जो आज आहे ,याचे श्रेय या सर्वांचे आहे.

सर्वांना मनापासून भाव-वंदना .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा कॉलेजच्या दिवसांची ..

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .

मो- 9850177342

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------