perjagadh - 21 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य... - २१

२१)तास आणि गुप्ती महादेव....

घोळपाकच्या डोंगरावर चढताना अंगाला चिकटणाऱ्या वनस्पती इथे नव्हत्या पण कुसराचे गवत असल्या कारणाने पायांच्या संपर्कात येताच कापडातून अलगद आत जायचे.आणि त्याचे निमुळते टोक असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्वचेला खुपायचे.त्यामुळे इथे चालताना त्या गवताचा मात्र खूप त्रास व्हायचा.जुत्यांवर असला कुसरांचा जमाव जमा व्हायचा आणि दर दहा पावलांवर मला पाय झटकत राहावे लागायचे.

शेवटी कसंतरी करत आम्ही तो मार्गक्रमण केला आणि निघालो.इकडे पाहिजे तेव्हढे दाट जंगल नव्हतं.पण जिथे तिथे असलेले मोकळे मैदान होते. दुरून बघावं तर जंगलामुळे दिसत नव्हते.चालताना जवळच एक मोहफुलाचं वृक्ष दिसलं.ज्याला बघुन "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे "....ही ओळ आठवली.कारण अगदी त्या ओळी प्रमाणेच त्या झाडावर एक पाकळीचा झाड उगवला होता.एकच झाडाच्या खोडावर दुसरे झाड. खरंतर ते निसर्गाचीच एक देण असते.एखाद्या पाखराच्या विष्ठेहून किंवा चोचीतून बी बियाणे झाडावर असतात.आणि त्याच झाडाच्या ओलाव्याला पकडून ते स्वतःचा अस्तित्व प्रगट करतात.हे असं का असते?हा प्रश्न मी मधूमामाजीला केला...त्यावर ते म्हणाले...

"ते पूर्वजन्मीचे पाप असते.जे या जन्मात फेडणे असते.मागच्या जन्मात काहीतरी कर्ज असेल त्या झाडरुपी जीवांवर.त्यामुळे या जन्मात हे दुसरं झाड त्याचं घेणं करत आहे."

"म्हणजे पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे..मामाजी"

त्यात काय आहे... न असण्यासारखा.प्रत्येक सजीव सजीव आहे.जर प्रत्येकालाच वेशभूषा बदलावासी वाटतेच आहे.मग जन्म तर बदलणारच.आणि राहिली गोष्ट विश्वासाची. तर विश्र्वासच नसेल तर आपण जगायचं कोणाच्या आधारे.

खरंच जगण्याची फार मोठी गोष्ट आज मामाजीने मला सांगितली.आकाशात देव असतो की चंद्र तारकांचा समूह हे कुणालाच माहीत नाही.पण बघणाऱ्याला देवही दिसतो आणि चंद्र तारकांचा समूहही.शेवटी एक विश्र्वासच असते.कारण श्रद्धा,कल्पना,भावना ही सगळी तिथूनच जन्म घेतात.अर्थात जरी सांगायचे असले तरी अख्खं आयुष्य आपलं विश्वासावर टिकून असते.आणि ते विश्र्वासच असते जे आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपणांस जगण्यास भाग पाडते.कारण आशा ही विश्वासावर अवलंबून असते.

जर बघायला गेलं तर प्रत्येक गोष्ट एखाद्या कल्पनेसारखं असते.आपण काय आहोत? जर एखाद्या मुंगीकडे आपण बघितले, तर आपल्या नजरेत ती एक क्षुद्र कीटक आहे.मग जगाच्या दृष्टीने बघावे तर काय?आपणही त्या मुंगी सारखेच एक क्षुद्र बनून जातो.त्याहून अवघड म्हणजे जगणं आणि मरणं.माणूस मेल्यानंतरही कल्पना त्याला सोडत नाही.कधी कोणत्या रूपाने परततो.मग स्वर्गात गेला की नरकात गेला.परतला तर कुण्यावंशी गेला.जर एकप्रकारे वैयक्तिक विचार करावं तर सत्य दिसूनच येत नाही.फक्त कॅमेऱ्याच्या समोर असलेला पुतळा असतो आपण.

दर चाळीस मैलांवर भाषा बदलते.विचार बदलतात,प्रथा बदलतात.पण नियम असतातच जगण्यासाठी.आणि तेच आपण करतो.कसे जगलो तर माहीत नाही? आणि कसे मरतोय तर ते कधी कळणारच नाही...असो...

निसर्गाची किमया खरोखरच अगदी निराळी आहे.त्याचा आस्वाद जणू वेगळाच आनंद भासवत होता.इथे असलेला एकांत, जगण्याविषयी तसेच जगवण्याविषयीच्या भावना,सृष्टीच्या लहरत आलेल्या भावना बरंच काही अप्रूप असते.पूर्वीचे साधू संत याच आश्रयाने इथे असतात.हे या दिवसांत मला कळत होतं.आणि मी पण शेवटच्या क्षणी हेच निसर्ग अनुभवत होतो.

काही वेळातच आम्ही तिथे पोहचलो.तशी दुरूनच ती हिरवळ मला दिसली होती.जी मला सातधाराच्या आसपास दिसली होती.पावसाळी दिवसांत तिथून बऱ्याच प्रमाणात पाण्याचा ओघळ वाहत असतो.ज्यामुळे पावसाची ती सरी कोरडी होऊन खुललेली होती.आणि मृदेची कमतरता असल्यामुळे फक्त दगडेच दिसायची.

मधूमामाने सांगितल्यानुसार पूर्वी येथे एक ऋषी असायचे.बाजूलाच काही मुर्त्यांची स्थापना केली होती.जी त्या ऋषीने केली होती असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.आणि त्यांची पण मूर्ती बैठक घालून तिथे तयार केली होती.मला वाटते, जवळपास आत्तापर्यंतचे तिसरे किंवा चौथे असे ठिकाण होते.जे पाण्याच्या बाबतीत एक नैसर्गिक चमत्कार होते.एक छोटंसं बीड असल्याप्रमाणे दगडांच्या मध्यातून ते पाणी उगम होत होतं. शिखरावरून ते पाणी कुठून निघत असेल? हे एक आश्चर्यच होतं.पण ते आश्चर्य आता पहिलं राहिलं नव्हतं.त्यामुळे मी आजूबाजूचा परिसर न्याहाळून बघत होतो.गावकरी या स्थळाला "तास" म्हणतात.

उन्हाळी दिवसांतसुद्धा ते पाणी तसेच संथपणे वाहत असते.आणि अवघ्या दहा ते पंधरा पावलांवरच जमिनीत मुरत असते.पाण्याच्या शोधात सगळी जनावरे तिथे पाणी प्यायला येतात.दगडांच्या सरीमधून वाहणारे पाणी हे एक अद्भुत जलकुंभ म्हणून डोळ्याच्या समोर येत होतं.

ठरल्याप्रमाणे काही वेळ आम्ही तिथेच थांबलो.आणि तिथलं पाणी पिण्यासाठी बॉटलमध्ये पकडलं.स्वच्छ आणि साफ असलेलं ते पाणी चवीलासुद्धा अगदी तितकंच गोड होतं.सगळ्यांनी पाण्याचा आस्वाद घेतला आणि आम्ही पुढच्या तयारीला लागलो.

आजूबाजूला दाट असलेले जंगल काही जागेत विरळ होऊन जायचे, तर काही काही जागेवर अगदी मोकळे मैदान असायचे.हल्ली आम्ही तासावर जाणाऱ्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने जात होतो.पाण्याची वेगवान धारा अगदी लोखंडाला सुद्धा कापू शकते हे आपण ऐकलंच असेल.पण ती वाहिनी जेव्हा सपाट मैदानावरून वाहते.तेव्हा दगडांनाही खरचटते असं दिसत होतं.खरचटलेले दगड अगदी स्पष्टपणे दिसत होते.आणि दगडांची किमया सांगायचीच असली तर इथलं दगड फार प्रमाणात वजनी आहे.कारण त्यांच्यात लोखंडाची क्षमता आहे ज्यामुळे त्याचं वजन इतर दगडांपेक्षा थोडं जास्त प्रमाणात भरते.

तासापासून अवघ्या एक सव्वा किलोमीटरवर "गंगारगोटी" नावाचे एक स्थळ बघायला मिळते.नावाप्रमाणेच वाहत्या पाण्याच्या ओहोळीने दगडांमध्ये अशा पद्धतीने घळई तयार केली आहे,की जणू बघणाऱ्याला वाटते की इथे गंगार ( विदर्भात पाणी वापरण्यासाठी असलेला मातीचा भांडा.जो आज बऱ्याच प्रमाणात लुप्त होतो आहे.) पाण्याने भरून ठेवलाय.पण आम्ही कोरडे गंगार बघण्यात मजा घेतली.ज्याची मजा पावसाळी दिवसात घ्यायची असते.पावसाच्या सनातन प्रवाहात त्या दोन्ही गंगाराची किमया बघणाऱ्यास एक आश्चर्यचकित झाल्याची प्रेरणा मिळते.

गंगारगोटीपासून अवघ्या पाचशे ते आठशे मीटर वर एक दगडांचा शिखर रचला होता.नुकतेच आम्ही पायदळी त्या भागावर पोहचलो होतो.सपाट मैदानावर चालल्यामुळे सूर्याच्या किरणांनी आमच्यातला द्रव्य चांगल्याच प्रकारे शोषण केलं होतं.ज्यामुळे बाजूलाच असलेल्या झाडाच्या खाली मी विसावत पडलो.अचानक त्या दगडांचा ढिगारा माझ्या मनात रुचू लागला.त्यामुळे मी मधूमामाला त्याविषयी विचारले...हे काय आहे मामाजी?

"हे आहे गुप्ती महादेव..."

( अचानक रात्री ऐकलेले नाव आठवलं.) "अच्छा ..म्हणजे इथला सुरक्षा दैवत म्हणजे हेच काय?"

"हो ....अर्थातच... जमिनितला द्रव्यासाठा काढण्यासाठी जी लोकं इथे येतात.त्यांची दशा करतो हा..महादेव.."

"पण मग त्यांची मूर्ती वगैरे दिसत नाही ना इथे
..त्यांची कोणी पूजा वगैरे करत नाही काय?"

"तसं काही नाही..पण त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलाय...गुप्ती महादेव.म्हणजे गुप्तपणे संचार करणारा.आणि तो आतमध्येच असतो जमिनीच्या. इथलं एक जागृत दैवत्व आहेत हे."

"अच्छा...म्हणजे यासाठी हे इतक्या दूर वसले आहे..."

"तसं नाही...जागृत असल्यामुळे वाईट तितक्याच चांगल्या माणसांना त्याचा त्रास व्हायचा.त्यामुळे त्याला इकडे मांडण्यात आले आहे..."

"अच्छा..."

आजचा प्रवास तसा फार काही मोठा नव्हता.पण नकळत गुप्ती महादेवाची सर मला अजुन लाभणार होती आणि तीही अगदी लवकरच.त्यामुळे फारसं विचार न करता आता जायचं कुणाकडून आहे.म्हणून दोन्ही जाणकारांकडे बघू लागलो.आणि उलट जाणे म्हणजे त्याच कुसरांच्या गवतातून पाय झटकत जाणे.म्हणून जरा नवीन रस्त्याने चला असं मी मधूमामाला म्हटलं.

त्यांनी जंगलातून वाट काढत भावाच्या डोंगराच्या दुसऱ्या घाटावर आणले.ज्याला बिवल्याचा घाट असे म्हणतात.उतरताना झिलबुली ( गावखेड्यात असलेल्या एका झुडूपाचे नाव.ते इतर कोणत्याही जंगलात आढळते.)फार प्रमाणात अडकवण्याचा प्रयत्न करत होती.कसलीतरी हालचाल पायथ्याशी जाणवत होती.त्यामुळे वारंवार मधू मामाजी तिकडे बघू लागले.

खाली उतरल्यावर कळलं की नीलगायींचा एक झुंड त्या पायथ्याशी असलेल्या झाडाखाली विश्राम करत बसल्या होत्या.पण आमच्या चालण्याने त्यांना थोडाफार संशय आला आणि त्या पळून गेल्या.थोडाफार निरीक्षण करत मामाजी म्हणाले...

इथे तर यांचा ठीय्याच आहे.सगळे प्राणी याच परिसरात असतात.आणि इथे न यायचं कारण म्हणजे मागील वर्षी(हाताने इशारा दाखवत.) त्या तिथे गावातील एका तरुणाला वाघाने ठार मारले होते.ज्यामुळे सहसा इथे कुणी येत नाही.

काही कालांतराने समोर आल्यावर मग सरपण गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलांची पायवाट लागली.त्यात आम्ही मग अलग झालो.धनगर स्वतःच्या गावाकडे गेला आणि आम्ही परत आपल्या गावाकडे वळलो.

तसं हा प्रवास संपला तर नव्हताच.पण मला वेळ मिळाली ती इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी.परतताना ठरलं तर नव्हतंच की उद्या कुठे जायचं म्हणून.पण इतक्यात मी कुठे कुठे गेलोय? हे मला मात्र बघायचं होतं.त्यामुळे वेळ न दवडता मी घरी एकांत गाठला.आणि सगळ्या वस्तुंवरून एक नजर फिरवू लागलो.पण त्या नक्षात आज मला काहीच उमगत नव्हते.कारण जिथे जिथे त्या लाल रेषा मागे दाखवत होत्या.त्या मिटलेल्या होत्या.पण पेरजागडाभोवती तेच रेषाखंड रेखाटलेले दिसून येत होते.आणि त्याप्रमाणे मी मोबाईल काढून मॅप वर बघू लागलो.

आज जे बघत होतो खरं तर एक प्रकारची अनुभूती अंगावर संचार करत होती.कारण अगदी त्या आकृत्या मधून मी प्रवास केला होता तरी पण मला काहीच असं आढळलं नाही.पण इतक्यात जे चुकलं होतं ते म्हणजे "हत्तीखोयाळ".लोकांच्या मते सांगायचं राहिलं तर बावन्न खोल्यांचं प्रवेश द्वार.जिथे जाण्यासाठी खालच्या बाजूने फक्त जंगलातूनच जायला मार्ग होता.कारण पेरजागडावरून उतरून जाणे हे कधीच शक्य नव्हते. वरच्या दिशेने सपाट असणारं, खाली असलेल्या बाजूला विशाल होत चाललं होतं.ज्यामुळे गडावरून फक्त खोल भाग दाखवत होते.

मी जेव्हा पाच पांडव गुहेचे दर्शन घेतले होते.तर दगडांमध्ये कोरलेल्या त्या पाच खोल्या अगदी उंचावर होत्या.ज्यात आक्सिजन घ्यायला वगैरे भरपूर मोठा द्वार आहे.पण गडाच्या या पायथ्याशी कुण्या बाजूला त्या खोल्या असतील?कारण गडाच्या वर सात खोल्या आणि खाली परत ह्या बावन्न खोल्या.

आणि वर ह्या गडाची गाथा काही वेगळेच सांगत होती.सात बहिणींचं अस्तित्व प्रगट करत होती.शिवाय ही सात बहिणींची पण कहाणी मला जाणून घ्यायची होती.काय रहस्य होते जे माझ्या डोक्यात येत नव्हते?आता फक्त हत्तीखोयाळ होते बघायचे.सहसा त्या दरीत कुणी जात नसत.कारण त्या घनदाट जंगलातून रस्ता काढत यावं लागायचं.आणि पायथ्याशी सदोदित वाघांचं वास्तव्य असायचं. एकट्याचा निभाव लागणे खरंच कठीण होतं.

मधू मामाजीला कुठे जायचं असेल तर सायंकाळी किंवा सकाळीच त्यांना सांगावं लागायचं.अन्यथा ते भेटायचे नाही.मी कितीतरी वेळ त्या नक्षाचा विचार करत होतो की काय आहे मी? ज्यांचं अनुसरण करत मी इथपर्यंत आलो होतो.इतकी भ्रमंती केल्यावरही काहीच कसं वास्तव्य गवसत नाही.मला जगायचं आहे. मरायचं नाही आहे.मला अजुन आयुष्य बघायचं आहे.जे माझं स्वातंत्र्याचे आहे.ज्यावर कुणाचाही हक्क नाही.

चेहऱ्यावर थोडीशी नाराजीची छटा बघुन माझी लहान बहीण प्राजक्ता, त्याचे कारण विचारू लागली.मी काही नाही असं म्हणून टाळून दिलं.पण कुठेतरी काहीतरी चुकतंय अशी हृदयाला फार चेतना येत होती.त्यामुळे निश्चितच मला गेलं पाहिजे असं वाटत होतं.रात्रभर विवंचनेत असताना मला शेवटचा उपाय तोच वाटला की आपण जाऊन यावं.बघुन घ्यावं की बावन्न खोल्यांचं काय रहस्य आहे ते...

सकाळीच मधूमामाजीकडे जाणे झाले.अंगणात बरीचशी वर्दळ दिसली.नंतर कळले की वनौषधी घेण्यासाठी बरीच माणसे त्यांच्याकडे येत असतात.मला बघताच ते म्हणाले..अरे पवन.. येना....मी बाजूच्याच चारपाईवर बसून त्यांची जडीबुटी बघू लागलो.काही वेळानंतर त्यांचं जेव्हा देवाणघेवाण झालं.तेव्हा मामीला चहाचं सांगून माझ्यापाशी येऊन बसले.हातात कशाची तरी भुकटी होती.

"हे काय आहे?"

"रात्रीला पाय दुखत असतील ना...दिवसभर चालून चालून..हे खावून घे...पाय त्रास देणार नाही.मी येणारच होतो घराकडे.पण बरं झालं तुच इकडे आलास. बरं बोल काय काम काढलास...?"

"मामाजी मला हत्तीखोयाळ बघायचं आहे..."

"बस इतकेच ना...मग काल का नाही सांगितलेस?"

"ते माहीत नव्हतं ना मला?अलगद चर्चेमधून माझ्या कानावर आलं.गावकरी म्हणतात तिथे बावन्न खोल्या आहेत."

"गावकरी काहीही म्हणतील? कारण ती श्रद्धेची गोष्ट आहे.पण तो प्रवेशद्वार तर सापडायला हवा ना..ते असेच कुणाला दिसत नाही."

"अच्छा...पण जे आहे ते तर दिसणार ना..."

"अर्थातच..."

"मग केव्हा निघायचं...?"

"तू म्हणशील तेव्हा.."

"ठीक आहे मग जेवण झाल्यावर निघुया..."

माझं कसं आहे.जोपर्यंत हा प्रवास होता.बोलायला बरीच लोक होती.तोपर्यंत निदान त्यांच्यासाठी तरी उसने अवसान चेहऱ्यावर आणावे लागायचे.पण एकांत मिळाला की परत त्याच प्रश्नांनी माझं विचारचक्र चालू व्हायचं.जिथं माझी वाट फक्त मृत्यू बघत होता. त्याचं साधं कारणसुद्धा मला माहित नव्हतं.आणि मी फक्त वाहवत होतो.एका अज्ञात लेकरासारखे.