perjagadh - 20 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - २०

२०)नव्या गोष्टींची माहिती आणि भ्रमंती...

आपण बघतो की मृगाची पहिली सरी जेव्हा भूमीवर ओझरते तेव्हा त्या मृदेचा सुगंध अगदी हवाहवासा वाटतो. असं वाटते की मुठभर माती घेऊन त्याचा बक्का मारावा. तशाचप्रकारे जंगलातील काही वन्यप्राणी पण माती खातात.भर जंगलात बराचसा मैदान पायाखाली आला होता.आणि मधूमामांना विचारल्यावर ते म्हणाले... इथे सांबरांची पलटण असते माती खायला...

यावेळेस चालताना एक आनंद मनात येत होता.जवळपास माझा मॅप बंद होता पण जंगलातील काही आकृत्या मात्र मी बारकाईने टिपल्या होत्या.ज्याचा उलगडा मात्र मला या काही दिवसांतच करायचं होतं.

जाताना जसे आम्ही थांबत थांबत जात होतो.तसेच परतीच्या प्रवासाला आम्ही न थांबता चालत होतो.आम्ही दोघेही त्या चालण्यामूळे थकलो होतो.ज्यामुळे प्रत्येकाच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हते.फक्त थकले नव्हते ते मधू मामाजी.तिच लांब लांब पाऊले, तीच शोधक नजर,आणि तीच कुऱ्हाडीची घट्ट पकड व तो सिगरेटचा उग्र दर्प.

यावेळेस चालताना शेवटचे दोन तास उरले होते आणि आम्ही सारंगडच्या तलावाजवळ येऊन पोहचलो होतो.एक नीलगाय तिथे पाणी पिण्यासाठी थांबली होती.जरा हळूच मी तिचं फोटो काढण्यासाठी सामोरी गेलो आणि ती पळून गेली.

जंगलातील वन्य प्राणी आपल्या सारखेच भित्रे असतात. जसं आपण जंगलात जायला भितो तसेच ते गावात यायला भितात.जरासा सुगावा त्यांच्या पायांची हालचाल चालू करतो.आणि तसं ते विस्तीर्ण तलाव त्या जंगलाला लागून असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात जनावरे तिथे पाणी पिण्यासाठी येत असतात.

शासनाने लावलेल्या बऱ्याच ट्रॅप कॅमेऱ्याच्या मदतीने होणाऱ्या शिकारी जरा विसावल्याच्या स्वरूपात दिसत होत्या.पण माणसासारखे जनावर मात्र अख्खं जंगल शोधून मिळणार नाही.तिथेच तलावाच्या बाजूला एक छोटासा ससा काही शिकाऱ्यांनी मिळून भाजून खाल्लं होतं.

तलावाचा तो विस्तीर्ण भाग पार करत आम्ही सोनापुरच्या दिशेनं निघालो.दिवस आता नुकताच असेल ओसरू लागला होता.मागे वळून बघितलं तर तितक्यात अंधाराची छाया हळूहळू पसरत येताना दिसत होती.पण संध्याकाळ व्हायच्या आत त्या मधू मामाने आम्हाला गावात आणून हजर केलं होतं..

आजचा संपूर्ण दिवस जंगलाच्या त्या सौंदर्याने बहरलेला होता. अलोउकिक टिपलेल्या त्या छायाचित्रांमुळे झालेल्या त्या साक्षात्कारांचा अजूनही विचार मनात घोळतच होता.आणि मी ठरवल्याप्रमाणे असली बरीच विधाने इथे दडलेली आहेत ते कळलं.कारण येताना काही एक दोन दगडे आणली होती.ज्यात अभ्रक आणि लोह यांचा समावेश मला दिसून आला होता.आणि नक्कीच आपण आता काहीतरी गाठणारच आहोत अशा पद्धतीने मी स्वखुशीने घराचा पल्ला गाठला.

रोजच्यासारखंच काकूने आज पण अंगणात शेकोटी पेटवली होती.ज्यामुळे हात पाय धुवून मी त्या शेकोटीच्या उबदार आगेभोवती जाऊन बसलो.सहज झालेल्या गमती जमती काकांना वगैरे सांगू लागलो.

गावखेडयात कसं असतं? आजही रात्रीला शेकोटी पेटवली की घराघरातली माणसे एकत्र येऊन बसतात.त्यामुळे आजूबाजूचे बरेच गृहस्थ येऊन बसायचे.मी त्यांना नवीन दिसलो की कोण? कुठला?चौकशी करायचे.आणि त्यांच्या मनात पेरजागडविषयी काय ख्याती आहे? ते प्रगट करायचे.पण त्या दिवशी जरा वेगळ्याच गप्पा रंगल्या होत्या.इतक्या खोल होत्या की मला काय समजायचे होते ते कळून गेले होते.

चर्चा त्याच रंगल्या होत्या की गडावर सात खोल्या आहेत.आतमध्ये एक विस्तीर्ण तलाव आहे.भरपूर प्रमाणात त्यात खजिना दडला आहे.कित्येकांनी तो खजिना काढण्याचा प्रयत्न केला, पण सगळे जिवानिशी मुकले आहेत.या सगळ्या गोष्टी ऐकून मी केव्हाच मन मोडलं होतं.पण आज एक नवीन गोष्ट माहीती झाली.की त्याच गडाच्या पायथ्याशी हत्त्तीखोयाळ म्हणून मी मागे सांगितले आहे.त्या खाईतून आतमध्ये जाण्याचा एक विस्तीर्ण भाग आहे.ज्यात बावन्न खोल्या आहेत अशी कुजबूज चालू होती.त्यातील एक गृहस्थ म्हणाला...

अरे ते सत्वाचे काम आहे.प्रत्येकाला तो मार्ग मिळत नाही.खजिन्याच्या तर राशी पडल्या आहेत तिथे.पण गुप्ती महादेव आहे ना.. तो असाच जाऊ देणार काय कोणाला?आणि शेवटच्या खोलीत म्हणतात सोनेरी रंगाचा पाळणा आहे.ज्याला एक भयानक भुजंग हलवत असतो.पण ते सत्वाचे काम आहे.तिथे आमच्यासारखा कुणी जायचा नाही कधी.जो निर्मळ आहे,सात्विक आहे,ज्याला दैवावर विश्वास आहे,अनुभूती आहे त्यालाच तो मार्ग सापडतो आणि फक्त तोच त्या बावन्न खोल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो.आमच्यासारखे नाही...

ऐकून जरा ते विचित्र वाटलं पण अजूनही त्यांच्या गप्पा चालूच होत्या.आणि मी फक्त गप्प राहून ते ऐकण्याचा प्रयत्न करत होतो.कारण न विचारता मी बरंच काही गोष्टी जाणून घेऊ शकत होतो.त्यावर पुन्हा एक गृहस्थ म्हणाला...

अरे ते तर काहीच नाही...आमच्या वेळेला पण एक गोष्ट घडली.त्या रात्री आम्ही चौघेही शिकारीला होतो.तरी जवळपास त्या वेळात आम्ही पंधरा पंधरा माणसे शिकारीला जायचो.एक सांबर मारला तरी स्वतःला संपणार नाही इतकं मांस वाटोप व्हायचं.तिथे सगळे जंगलभर वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे.आत्ता एक इथे बसून आहे तर दुसरा किलोमीटरच्या अंतरावर असेल.हत्यार धरून तयारीत असायचं.कुत्रे पण त्यावेळेस साथीला अगदी मजबूत असायचे.

चरण्याने दोन मोठ्या मोठ्या साळया बघितल्या.आणि त्यांच्या मागे धावू लागला.अधून मधून जिवाच्या आकांताने त्या साळया अणकुचीदार काटे एखाद्या सळसळत्या तिराप्रमाणे सोडीत होत्या.ज्यामुळे शिकारीचा एक कुत्रा केव्हाच मरून पडला होता.पुन्हा जाम खवळून मग आम्ही त्यांच्या मागे लागायचो.

प्रत्येकाला हाडहुडीचा आवाज ऐकू आला की समजून जायचे शिकारीचा पाठलाग चालू आहे.आणि त्याप्रमाणे अंतरा अंतरावर असलेले सगळी माणसे त्या आवाजाच्या दिशेने जायचे.मग गोलाकार उभे राहून शिकार करायचे.असा त्यांचा बेत असायचा.पण साळई जंगलात न पळता डोंगराच्या काठाकाठाने पळू लागली.पळत पळत त्यांना अश्या भागाकडे नेले जिथे आम्ही कधी ही शिकारी लोक गेलो नव्हतो.

दमलेले सावज लपण्यासाठी जागा बघणार हे निश्चित होतं.पण कुत्रे त्यांना लपायला जागाच देत नव्हते.आणि वेळही देत नव्हते. घोळपाकची डोंगरी आणि भावाची डोंगरी जिथे संपते तिथे फार मोठी एक खाई आहे.सगळे लोक तिथे जमले पण सावज कुठे लपले आहे? हे कुणाला कळेना?त्या भर उन्हाळ्यात देखील बऱ्यापैकी तिथे पाणी साचलं होतं.ती दोन्ही सावज बाजूला असलेल्या एका गुहेमध्ये जाऊन लपली होती.

शेवटी सगळेजण आसपासचं परिसर बघू लागले.पण त्यांना शेवटी काहीच मिळेना.कुत्र्यांनी पाऊलवाट ओळखली होती आणि म्हणून ते गुहेच्या दाराशी जाऊन भुंकू लागले होते.आम्हाला समजून आले की सावज इथे लपून बसलय.तसा तो परिसर आमच्यासाठी नवीनच होता.त्यामुळे जरा सांभाळून आम्ही पावले उचलायला शुरुवात केली.

जवळपास माणूस माणूस पाणी तिथे साचून होतं.पण तो येतो कुठून हेच आम्हाला माहीत नव्हते.कारण तिथल्या तिथेच ते पाणी असायचे.आणि खालच्या तोंडीचे पाणी असल्यामुळे तिथे कोणताच जनावर पाणी प्यायला जात नव्हता.इतक्या दिवसांतली आमची पण ती पहिलीच वेळ होती, तिथे जायची.काही वेळ चालून झाल्यानंतर मग आम्ही तिथे गेलो तर माहीत झालं, की पाणी त्या गुहेमधून येत आहे.एक एक करत सगळे आम्ही त्या गुहेच्या आत जाऊ लागलो.ती सावजे तर दिसली नाही पण जे दिसलं ते मात्र फार भयानक होतं.

गुहेच्या वरच्या भागातून ती पाण्याची धारा कोसळत होती आणि खाली एक हनुमानाची मूर्ती होती.त्यावर त्या पाण्याचा अभिषेक होत होता.ते आमचं बघणं झालं पण इतरांनी काही आमच्यापेक्षा विलक्षण असं बघितलं.एक पंचमुखी भुजंग छत्रछायेप्रमाणे त्या मूर्तीवर डोलताना ते बघत होते.फार अद्भुत आणि अविश्वसनीय होतं ते.ते बघितल्यावर मग आम्ही वापस आलो पण तेव्हापासून जंगलात जाणेच बंद केलं...

माझ्यासाठी ह्या गोष्टी जशा नवीन आणि अद्भुत वाटत होत्या.तशा त्यांना फक्त त्या गप्पा वाटत होत्या.कारण इतक्या दिवसांच्या त्या अनुभवात त्यांनी बऱ्याच प्रमाणात असे प्रसंग पाहिले होते.रात्र बरीच झाली आहे असे समजून मग प्रत्येकजण आपापल्या घरी रवाना झाले.आणि मी पण आतमध्ये जाऊन हलकेच अंथरुणावर पडलो.बाहेरच्या गप्पा जरा जास्तच रंगल्यामुळे घर केव्हा सूनसान पडलं काही कळलंच नाही.पण प्रवासाच्या थकव्यामुळे मी पण लवकरच गाढ झोपी गेलो.

सकाळी ठरल्याप्रमाणे बेत हा आज जरा आगळा वेगळा होता.आज परत एक नवीन स्थळ गाठायचा होता.त्यासाठी त्या धनगराला फोन करून सांगून घेतले आणि आजचा प्रवास चालू केला.रात्रभर निद्रा घेतल्यानंतरही पाय जरा आज ठणकतच होते.पण पायमोजे घातले, बुट घातला आणि निघालो प्रवासाला... बरंच काही बघायच्या तयारीत.

ठरल्या प्रमाणे आज गावातूनच निघालो होतो.अगदी शेवटच्या वळणावर समोर उभे असलेले जंगल माझं छान स्वागत करत होतं.खरतर त्या जंगलातून आम्हाला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावापाशी जायचं होतं.कारण तो धनगर मुळी त्याच गावचा असल्यामुळे तो तिथेच आम्हाला भेटणार होता.आणि असं मुख्य रस्त्याने गेलो असतो तर बराच अंतर लांबणार होतं.

पण मनात एक विचार आला की भावाचं डोंगर तर बऱ्याच ठिकाणी कोसळलेले आहे.ज्यामुळे त्या डोंगरावर असं चढता येत नाही.पण आता ज्या ठिकाणावर आम्ही जाणार होतो ते भावाच्या डोंगराचेच एक भाग होते.ज्यामुळे मधूमामाजीला मी विचारू लागलो..तर ते म्हणाले की गावकरी बरोबरच बोलतात.

प्रत्येक बाजूने तो डोंगर कोसळलेला आहे.पण त्याला चढण्यासाठी तीन असे रस्ते आहेत.ज्यांना आम्ही "घाट" म्हणतो.पहिला आहे "पाकळीचा घाट".जो शुरुवातीला पेरजागडापासून अर्ध्या एक किलोमीटरवर असेल.दुसरा आहे "बिवल्याचा घाट". तो मध्यंतर आणि खोल जंगलात आहे.आणि तिसरा आहे "ढोर घाट".जिथून आपण आता जाणार आहोत...

"पण मामाजी.. यांना अशी विचित्र नावे का देण्यात आली."

अरे पहिल्या घाटावर पाकळीचे झाडे आहेत,खचलेल्या गडावर त्यांनी स्वतःची अशी मजबूत पकड केली आहे, ज्यांच्या आधाराने गडावर जाता येते.दुसऱ्या घाटावर बिवल्याची झाडे आहेत.ज्यांच्या आधाराने काही खचलेले दगड अडकून आहेत, आणि त्या झाडांमुळे दगडे घरंगळत नाहीत..त्यामुळे आपण तिथूनच येणार आहोत.आणि ते तिसरे आहे ढोर घाट..त्या घाटावरून गुरे ढोरे जवळपास चराईसाठी नेतात.त्यामुळे त्याला "ढोर घाट" असे म्हणतात.

चालताना बाहेरून जे झुडूपी जंगल दिसत होते.आतमध्ये तेच उठावदार असे झाले होते.हळूच एखादा ससा पायापासून निघून धूम पळत सुटायचा.जंगल दाटीने असल्यामुळे वर असलेला सूर्य नारायण जरा कमीच दिसायचा.त्याची किरणे सहसा जमिनीपर्यंत पोहचत नव्हती.त्यामुळे सांबर,नीलगाय वगैरे असे जनावरे फार प्रमाणात तिथे विहार करत.ज्यांचे मल असे जागोजागी दिसून यायचे.

दोन अडीच किलोमीटर चालून झाल्यावर शेवटी आम्ही ढोर घाटाच्या उतरणीवर काही अंतरावर येऊन पोहचलो.जिथे त्या धनगराला मी फोन करून बोलावले होते.जिथून समोरचा रस्ता आता त्याला दाखवायचा होता.कारण हा भाग तो जास्त प्रमाणात फिरून होता.नेहमी ढोर घाटावर त्याची गुरे जायची.आणि कालच्या प्रवासादरम्यान मी त्याला ओळखून टाकलं होतं, की बढाई मारण्यात तो तरबेज आहे.बाकी त्याला कसलंही ज्ञान नाही.कारण धनगराला एखादं हिरा मिळावा, आणि त्याने ते शेळीच्या गळ्याला बांधावा अशी त्याचीही सवय होती.

सागवानाचे उंचच उंच वृक्ष रस्त्यात येत होते.त्याच्या वाळलेल्या पानावरून चालताना चर्र चर्र असा कर्कश ध्वनी यायचा.आणि या वेळेस नेमकं जागेवरूनच डोंगराची चढाई लागल्यामुळे जरा चालताना दम यायचाच.आणि त्याप्रमाणे जरा थांबत,बसत,पाणी पीत आम्ही चालत होतो.कारण चढाई ही एकसारखी उंच आणि आडीमोडी होती.काही अंतर गेल्यावर मग कळलं की याला ढोर घाट का म्हणतात?

कारण आधार घ्यायला अध्यंतर मध्यंतर झाडे तर होतीच.पण पूर्ण वाट ही उखडलेल्या दगडांची होती.आणि त्यात असलेला प्रत्येक दगड हा गोल अंगाचा होता.त्यामुळे चालताना बऱ्याच प्रमाणात घसरगुंडी व्हायची.आणि चालताना त्या दगडांचा आवाज पण बराच लांब जायचा.ती पायवाट जवळपास अर्ध्या किलोमीटरची असावी.पण जायला एक तास लागतो. घसरगुंडीची ती उंच वाट आज पहिल्यांदाच चढताना थोडीफार मजा यायला लागली होती.चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून निघणाऱ्या त्या घामाच्या धारा अगदी अबोलपणे सांगत होत्या.दोन मिनिटं विश्राम घेण्यासाठी थांबलो तर सगळे अगदी उंचावर जाऊन पोहचले होते.

अगदी पायथ्याशी वडाचं झाड वसलं होतं.थोड्या आरामासाठी आम्ही तिथे जाऊन बसलो.त्या झाडाची रचना अशी होती की ते मातीवर उगवले नव्हते. अडगडींच्या दगडांवर कप्प्याकप्प्यत त्या झाडाची मुळे अगदी अलगद डोळ्यांना दिसत होती.पण ते उंचावून वाटेवर अशा प्रमाणे उभे होते, की ढोर घाट चढणाऱ्या प्रत्येकास ते, सावलीची मुभा देऊन, विश्रांती देण्यासाठी शीतल छायेचे, अहम कार्य करत होते.

काही वेळाची विश्रांती घेऊन गप्पा गोष्टी करत आम्ही परत प्रवासाला निघालो.पाखरांची कुजबूज आज कानावर येत होती.कारण आता जसजसे आम्ही समोर जात होतो.तसतसे वाट अगदी निर्मनुष्य होत चालली होती.आणि ज्या स्थळावर आम्ही चाललो होतो.वर्षातून एक दिवस फक्त तिथे यात्रा भरते.किंवा इतर गावकरी श्रद्धेने तिथे स्वयंपाक करायला आणतात.