Ti Ek Shaapita - 22 books and stories free download online pdf in Marathi

ती एक शापिता! - 22

ती एक शापिता!

(२२)

पीयूष लगबगीने अशोकच्या घराकडे निघाला. तो अतिशय आनंदात होता. स्वतःच्या आनंदात माधवीला सहभागी करून घेण्यासाठी तो धावपळ करत निघाला होता. रस्त्यावर एक्कादुक्का माणसे होती. त्याने पीयूषचे घर असलेल्या गल्लीत प्रवेश केला. तितक्यात त्याला एक मुंगुस आडवं गेलं. तो मनाशीच म्हणाला,

'व्वा! योगयोग चांगला दिसतोय. अलभ्य लाभ होणार असे दिसतेय. लाभ होईल तो कोणता? माधवीकडून आलिंगन की हवहवसं चुंबन! अशोकने जाणीवपूर्वक दिलेली मूक संमती असतानाही आम्ही 'ती' पायरी ओलांडली नाही. आताही घरी अशोक असणारच..." अशा विचारात पीयूष अशोकच्या घरात शिरला. दिवाणखान्यातील पलंगावर अशोक नसल्याचे पाहून पीयूष सरळ बेडरूममध्ये शिरला. नेहमीप्रमाणे माधवी पलंगावर पहुडली होती. तिला पाहताच पीयूष ओरडला,

"माधवी... अभिनंदन!"

"कुणाचे? माझे?" माधवीने असमंजसपणे विचारले.

"होय! तुझेच अभिनंदन!अग, तुला आठवते, स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळावे या विषयावर तू एक लेख लिहिला होता..."

"होय! लिहिला होता. परंतु आमच्या संपादकांनी तो अजूनही प्रकाशित केला नाही."

"अग, त्याच संपादकाने तो लेख वाचत असताना एका राज्यस्तरीय लेख स्पर्धेची बातमी वाचली आणि तो लेख त्या स्पर्धेसाठी पाठवून दिला होता आणि माधवी आनंदाची बातमी म्हणजे तो लेख प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आहेस कुठे? अभिनंदन!" असे म्हणत प्रचंड झालेल्या पीयूषने हात पसरले आणि माधवीही अत्यंत आनंदाने त्याच्या मिठीत शिरली. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली असताना हात आणि ओठ यांनी आपापली कामे करायला सुरुवात केली. नंतरच्या काही क्षणात तेच घडलं ज्याची वाट अशोक पाहत होता, त्या दोघांना तशी संधी देत होता. जे सुख मीता गेल्यापासून पीयूषला मिळालं नव्हतं आणि ज्या सुखासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आहेत... त्यानंतरही माधवीला जे सुख मिळाले नव्हते तेच सुख तिला पीयूषकडून काही क्षणासाठीच मिळाले, परंतु ते क्षणाचे सुखही तिच्यासाठी आनंदाचे ठरले. लग्नानंतर हरवलेले सुख तिला त्या दुपारी अचानकपणे गवसले. शारीरिक तृप्ती झाल्यानंतर दोघे एकमेकांच्या मिठीत पहुडलेले असताना बाहेर अशोकची चाहूल लागली आणि दोघेही दचकले, भीतीची एक लहर अंगात शिरली. गडबडीत कपडे सावरताना माधवी म्हणाली,

"बाजारात गेला होता, अशोक. आला वाटते..."

कपडे सावरत पीयूष खोलीबाहेर पडला परंतु बैठकीत पलंगावर बसलेल्या अशोककडे बघण्याचं धाडस त्याला झाले नाही. त्याने अशोककडे पाहिले असते तर अशोकच्या चेहऱ्यावर पसरलेल्या समाधानाने त्याचे स्वागत केले असते. काही क्षणातच माधवीही बाहेर आली. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असलेली लाली, तृप्ती, समाधान पाहताच अशोक मनोमन आनंदला. त्याच्याकडे पाहायचे टाळून माधवी म्हणाली,

"माझ्या लेखाला पारितोषिक मिळाल्याचे सांगायला पीयूष आला होता..."

"व्वा! व्वा! तुझी अशीच प्रगती होवो..." अशोक म्हणाला पण त्याच्या बोलण्याचे भाव माधवीच्या लक्षात आला.

'अशोकने आम्हाला 'त्या' स्थितीत पाहिले की काय?' असा प्रश्न स्वतःलाच विचारत ती आत गेली परंतु तिच्या चालण्यातली चंचलता, चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले समाधान अशोकपासून लपले नाही. माधवी आत जाताच अशोक मनात पुटपुटला,

'शेवटी माझ्या मनासारखे झाले. जे सुख मी तिला लग्नानंतर देऊ शकलो नव्हतो तेच सुख पीयूषने काही क्षणापूर्वी तिला भरभरून दिलेले दिसतंय. तिची देहबोली तेच सांगत होती. पीयूषने जाताना बोलायचे सोडा पण माझ्याकडे पाहण्याचेही टाळले. त्याचेही बरोबर होते कारण माझी मनःस्थिती त्याला काय माहिती? त्या दोघांना एकत्र पाहून मी रागाने बेभान झालो असेल असेच त्याला वाटले असणार. पीयूष नेहमी येतो परंतु त्याच्या येण्याचे कारण माधवीने आजच का सांगितले? काही

तरी बोलावे, माझी मनःस्थिती जाणून घेण्यासाठी तिने तसे स्पष्टीकरण दिले असावे. तिला तिचा मार्ग सापडला, तो मार्ग मी मोकळा करून दिला. लोक एका दगडात दोन पाखरं मारतात म्हणे पण मी मात्र एका तीन पाखरांना मारले. माझ्या एका निर्णयामुळे मी स्वतः, माधवी आणि पीयूष तिघेही सुखी, समाधानी, आनंदी झालो आहोत. लग्नानंतर तळमळणारी माधवी, मीताने धोका दिल्यामुळे तडफडणारा पीयूष आणि माधवीला सुखी करू शकत नाही ही अपराधीपणाची बोचणी, सलणारी जखम घेऊन जगणारा मी असे आम्ही सारे आज आनंदी आहोत. माझ्या बायकोला माझ्याच मित्राच्या आलिंगनात पाहिल्यानंतर माझे डोळे रागाने आग ओकत नव्हते तर तर आनंदाची, समाधानाची एक शीत लहर शरीरात पसरली होती. त्यांना सापडलेल्या तृप्तीच्या झऱ्याचे पाणी त्यांना खूप खूप प्यायला मिळणार आहे. त्यात मलाही आनंद आहे, समाधान आहे..' असे पुटपुटत अशोकने डोळे लावले पण का कोण जाणे त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले...

तिकडे स्वयंपाक घरात बसलेल्या माधवीच्या मनाची अवस्था का वेगळी होती. तिच्याही मनात विचारांचे असंख्य ढग जमा झाले होते, 'मला आनंद कशाचा झाला? पारितोषिक मिळाल्याचा? नाही! मुळीच नाही. ज्या सुखासाठी मी रात्रंदिवस तळमळत होते, जे सुख मिळविण्याची मी मनोमन तयारी केली होती परंतु त्यासाठी मुहूर्त साधल्या जात नव्हता. ते सुख आज अवचितपणे मिळाले. जे अचानक घडले त्याला म्हटलं तर कुणीच जबाबदार नाही, म्हटलंच तर आम्ही तिघेही जबाबदार आहोत. काही असले तरीही आज लग्नानंतर प्रथमच मी ते सुख मनसोक्त लुटले. जणू आज मला अमृताचा झरा सापडला. आमचे संबंध चालू असताना अशोक बाजारातून निश्चितच परत आला होता. त्याने आम्हाला त्या अवस्थेत पाहिलेच असणार. परंतु तो चूप बसला, शांतपणे त्याने सारे सहन केले कारण त्यालाही तेच हवं होतं. आमचे संबध घडून यावेत म्हणून तो दररोज पीयूष यायच्या वेळी झोपेचे सोंग करायचा. आम्हाला एकांत मिळवून द्यायचा. यापुढे आमचे संबंध वाढत जाणार. अशोकचा भावनावेग उतरल्यावर तो उघड्या डोळ्यांनी आमचे संबंध पाहू शकेल? त्याला उपरती, पश्चाताप होणार नाही कशावरुन? नाही. नाही. तो सहन करुच शकणार नाही. त्यावेळी त्याने आमचे संबंध संपवायचे असे ठरवले तर? आमच्या दोघांपैकी एकाचा खून त्याने.. नाही. अशोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊच शकणार नाही. त्याची वृत्ती तशी नीच असती तर त्याने आम्हाला तशी संधी, एकांत दिलाच नसता. परंतु उद्या त्याच्या मनात कुणी आमच्या विरोधात काही भरविले तर? आमचे संबंध माझ्या सासू-सासऱ्यांच्या लक्षात आले तर? ते चूप बसतील? अशोकला ते आमचे संबंध संपविण्यासाठी उद्युक्त करणार नाहीत कशावरून? मग मला पुन्हा आजीवन तळमळावे लागेल का? आमचे संबंध सुरू राहिलेच पाहिजेत. देवा, खूप प्रतिक्षेनंतर मार्ग दाखवलास, आता त्या मार्गावरून मागे परतवू नकोस. मार्ग बदलायचाच असेल तर अशोकला तुझ्याकडे बोलावून घे. माझ्या कपाळावर अशोकपेक्षा पीयूषची टिकली जास्त शोभून दिसेल. पीयूषच्या संबंधात अशोकची अडचण नसावी एवढीच एक इच्छा आहे. काही दिवसांसाठी मी वैधव्य पत्करायला तयार आहे. नंतर पीयूषच्या नावाचे घट्ट कुंकू मी आनंदाने लावेल...' माधवी अशा विचारात बुडालेली असताना तिकडे पीयूष त्याच्या वर्तमानपत्रच्या कार्यालयात बसला होता. जिव्हाळा दैनिक सुरु होऊन सहा महिने झाले होते. वैविध्यपूर्ण विषयांमुळे पाहता पाहता जिव्हाळा वर्तमानपत्राबाबत वाचकांच्या मनात जिव्हाळा उत्पन्न झाला होता. इतर अनेक वर्तमानपत्रांना मागे टाकत जिव्हाळा पुढे जात होता. काही दिवसांपूर्वी जिव्हाळ्याचे मालक डॉ. पाटील अमेरिकेतून मुद्दाम भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी जिव्हाळाविषयीची सारी पाहणी करून माहिती घेतली होती. नंतर एकूण कार्याबाबत समाधान व्यक्त करत सारी जबाबदारी पीयूषवर सोपवली होती. त्यामुळे पीयूषची जबाबदारी वाढली असली तरीही तो उत्साहाने कामाला लागला होता.

त्यादिवशीही तो बातमीदारांनी पाठवलेल्या बातम्यांची निवड करत होता परंतु त्याचे लक्ष कामात लागत नव्हते. राहून राहून त्याच्या मनात विचार येत होता, 'मी केलं ते बरोबर केलं का? माधवीला आनंद मिळाला असेल, मीतानंतर प्रथमच ते सुख मिळालं पण अशोकचे काय? त्याची काय स्थिती झाली असेल? आम्हाला त्याने नको त्या अवस्थेत पाहूनही तो शांत राहिला. त्याच्या भावना काय झाल्या असतील? मी विश्वासघात केला, मित्राने धोका दिला असे तर त्याला वाटले नसेल? आमच्यामध्ये जो एक मैत्रीचा अतुट धागा होता त्याला निश्चितच तडा गेला आहे. 'ते' कृत्य बाहेर येताना बैठकीत खोलीत बसलेल्या अशोककडे पाहण्याचे धैर्यही मला झाले नाही. उद्या माधवीसोबतचे माझे तसे संबंध वाढले तर मला त्याच्यासमोर जायचे धाडस होईल? त्याच्या डोळ्यांचा सामना करता येईल? पण..पण.. हे सारे त्याच्या मनाप्रमाणे झाले ना? अशोक दररोज झोपायचे नाटक का करीत होता? मी माधवीजवळ जावे, तिच्याशी बोलावे आणि अशोक देऊ शकत नाही ते सुख मी तिला द्यावे हीच त्याची इच्छा होती ना! त्याला ते संबंध नको असते तर त्याने आम्हाला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आकांडतांडव केले असते. आम्हाला शिव्यांची लाखोली वाहिली असती, कॉलर धरून मला बाहेर काढलं असतं. कोण असा पती असेल जो पत्नीला इतरांच्या मिठीत पाहिल्यावर शांत बसला असता?..'

रात्रीचे आठ वाजले. पीयूष आणि माधवी कार्यालयातून बाहेर पडले. दुपारच्या त्या प्रसंगानंतर ते दोघे प्रथमच समोर येत होते. माधवी बरीच खुश, समाधानी, आनंदी दिसत होती. ती काहीच न बोलता पीयूषच्या पाठीमागे बसली. नेहमीप्रमाणे पीयूषच्या खांद्यावर हात न ठेवता तिने स्वतःचा हात पीयूषच्या कमेरवर टेकवला. त्याला अधिकच खेटून बसली. माधवीच्या घरी पोहचेपर्यंत दोघेही निःशब्द होते. पीयूषच्या स्कुटीने माधवीच्या गल्लीत प्रवेश केला. त्यावेळी त्या परिसरातील लाईट गेले होते. माधवी उतरेपर्यंत पीयूषची स्कुटीही बंद पडली. त्यामुळे गाडीचा हेडलाईट बंद झाल्यामुळे खूप अंधार झाला. त्या परिस्थितीचा फायदा घेत माधवीने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याचे प्रदीर्घ चुंबन घेतले आणि हरणाच्या चपळाईने घरात गेली. तिच्या त्या अवस्थेतेने हक्काबक्का झालेला, आश्चर्यात, गोंधळात पडलेला, भांबावलेला पीयूष मनात म्हणाला,

'हा काय मुर्खपणा म्हणावा? माधवी तशी गळ्यात पडलेली असताना लाईट आले असते तर? परंतु स्त्रिया जेव्हा आनंदात, समाधानात असतात तेव्हा कशाचाही विचार करीत नाहीत...'

माधवीने घरात प्रवेश केला तेव्हा सुबोध आणि अशोकचे जेवणे झालेली दिसत होती. सुहासिनी तिच्यासाठी जेवायचे थांबली असली तरीही दोघींमध्ये संवाद नव्हता, अबोला होता. दोघींमधून विस्तव आडवा जात नसे. शब्दा-शब्दांवर, पावला-पावलांवर त्यांच्यामध्ये वाद होत असे. माधवी हातपाय धुऊन येईपर्यंत सुहासिनीने दोघींची ताटं वाढून घेतली असली तरीही तिचं तोंड चालू होते,

'लोकांच्या सुना पहा, सासूच्या कशा पुढे पुढे करतात पण आमच्याकडे सारे उलटेच. दिवसभर ऑफिसात राब-राब राबावे. घरी तरी काय? ऑफिसला जाण्यापूर्वी काम आणि आल्यावरही घटकाभर पाठ टेकवायला मिळत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत क्षणभरही विश्रांती मिळत नाही. समोर आयतं ताट वाढून ठेवायचे तर सोडा पण सुनेचे ताट वाढून तिच्यापुढे ठेवावे लागते...'

"कुणी वाट पाहायला किंवा ताट वाढायला सांगत नाही. आपलं आपलं जेऊन झोपत जा."

"झोप? तेवढं कुठं असणार आहे नशिबात? आल्यानंतर स्वयंपाक करावा लागतो त्याचे काय? मलाही वाटते घरी आल्यावर गरमागरम चहा, आयतं जेवण मिळावं पण कसचं काय?"

"मलाही दुपारनंतर कार्यालयात जावेच लागते."

"कशाला जायचे? काय कमी आहे तुला? तू नोकरी केली नाही तर काय उपाशी ठेवणार आहोत?"

"घरात बसून सर्वांची रडकी तोंडं पाहण्यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं. जेव्हा पाहावे तेव्हा... हास्याची साधी लकेर कुणाच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. जसं काही घरातून दररोज मडं जातंय..."

"माधवी, तोंड सांभाळून बोल..."

"आता आणखी काय सांभाळू? मलाही भावना आहेत. दिवसभर कोंडवाड्यात कोंडलेल्या जनावाराप्रमाणे राहावं लागतं."

"तू एकटी नाही राहत. अनेक स्त्रिया घरीच असतात."

"राहतात ना? पण त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. आपल्यासारखे वातावरण इतर कोणत्याही घरात शोधून सापडणार नाही. आज मला एवढं मोठं पारितोषिक मिळालं पण आहे का कुणाला त्याचे कोडकौतुक?"

"तू आपण होऊन सांगितले का? ज्याला सांगितले असेल त्याने आणले असेल की स्कुटीवर फिरवून?"

"आ..ई.."

"ओरडू नको. टाइमपाससाठी ही एकच नोकरी होती का? दुसरी नोकरी मिळाली नसती? अरे, हो! दुसरीकडे पीयूषची मदत मिळाली नसती ना?"

"आई, काय चाललंय हे?" अशोकने विचारले.

"तू मलाच विचार. हिला नोकरी करण्याची काही गरज होती का?..."

"आई, प्रश्न पैशाचा नाही. अग, ती दिवसभर घरात बसून..."

"त्यासाठी रात्रीची नोकरी.."

"प्रश्न नोकरी केव्हाची आहे हा नाही. माधवीला जी गोष्ट आवडते... तिला वर्तमानपत्रात लेख लिहायला, बातम्या तयार करायला आवडते. त्यात तिचा चांगला जम बसतोय..."

"लेख, बातम्या घरीच बसून..."

"आई, लेख लिहिणं वाटतं तेवढं सोपं नाही. त्याला एकांत हवा, तसं वातावरण मिळायला हवं. तिथं का कुणी परके आहे? पीयूषमुळे तिथलं वातावरण मोकळं आहे. आज तिच्या लेखाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. किती आनंदी बातमी आहे. मी खुश आहे. आई, मी आनंदात आहे."

"तुमचे सारे खरे आहे रे. पण आता मला किती दिवस..."

"होईल. आई, सारे ठीक होईल. तुझ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. उद्यापासून माधवी कामाला जाण्यापूर्वी स्वयंपाक करून जात जाईल..." अशोकचे तसे बोलणे माधवीला पटले नाही परंतु विषय पुढे वाढवणे नको म्हणून ती शांत बसली.

जेवणे झाली. माधवी खोलीत गेली. तिच्या मनात वेगळेच वादळ उठले होते, 'दुपारी पीयूषसोबत झालेल्या संबंधानंतर अशोकशी प्रथमच एकांतात यावे लागते. त्याने त्याबद्दल विचारले तर मी काय उत्तर देऊ? मी कबुली दिली तर तो रागावला, त्याने आकांडतांडव केले तर? संतापून अद्वातव्दा बोलला तर? संतापाच्या भरात त्याचं बी. पी. लो झाले तर? तो धक्का त्याला सहन होईल? त्याची तशी इच्छा होतीच की. तरीही मी त्याच्याशी एकनिष्ठ राहावे ही आशा त्याला नक्कीच असणार. त्याचा अपेक्षाभंग झाला असला तर? जे व्हायचे ते होईल. एकदाच काय तो सोक्षमोक्ष होऊन मोकळे व्हावे. होऊन होऊन काय होईल तर अशोक संतापेल. रागाच्या भरात मारहाण करील किंवा त्याला सहन झाले नाही तर त्याला झटका येईल त्यात त्याचा मृत्यू होईल. झाला तर झाला. त्याच्या पाशातून मी मोकळी होईल. पीयूषसोबत मोकळेपणाने राहता येईल. पीयूषसोबत भरभरून सुख मिळविण्याचा परवाना म्हणजे अशोकचे मरण!' अशा विचारात असताना तिचे लक्ष पलंगावर गेलं. अशोक चक्क घोरत असल्याचे पाहून तिचा जीव भांड्यात पडला.. आजचे मरण उद्यावर गेले या भावनेने सुखावलेली माधवी पलंगावर पडली..

*****