Mothya manacha manus - 2 books and stories free download online pdf in Marathi

मोठया मनाचा माणूस - भाग दोन

(६)

बरेच दिवस सब इन्स्पेक्टर सावंत राम्या आणि रखमाच्या झोपडीकडे फिरकले नव्हते. बाळाला चंदाकडे ठेवून एक महिना पूर्ण होत आला होता. आज सकाळीच रखमा बाळाला पाहण्यासाठी चंदाकडे जाण्यासाठी निघणार होती. तेवढ्यात चंदाच दारात उभी होती. रखमा चंदाकडे आश्चर्याने पाहत तिला म्हणाली, “आज येवढ्या सकाळी माझ्याकडे कशी काय आलीस?” “अगं सांगते की सगळं, पन मी येवढ्या लांबन आले, पैलं चहा तर पाज.” चंदा म्हणाली.

चहा पिऊन झाल्यावर चंदा बोलु लागली, “आमचा मालक देशी दारू बनवन्याचा धंदा चालू करतोय. त्याला कामगार पायजेत म्हनून तुला सांगायला आले. तू आणि भाओजी आता आमच्या इथच राहयला या. पैसेबी बरं भेटतील. आणि भीक मागन्यापेक्षा हे काम बरं नाई का?”

भीक मागायचं काम खरतर रखमाला आवडलं नव्हतं. आणि बाळाला इथे परत आणणं धोक्याचं होतं. त्यामुळे चंदाने सांगितलेलं तिला पटत होतं. ती चंदाला म्हणाली, “चंदे खरतर मला बी हे भिकाऱ्याचं आयुष्य नकोय. आनी बाळाला इथं आणणं बी लई धोक्याच हाय. पोलिसांना कळालं तर आम्हाला दोघांनाबी आत टाकतील. पन मी येकदा राम्याशी बोलते.”

चंदा गेल्यावर रखमाने राम्याला उठवलं आणि त्याला सर्व काही सांगितल. तो पण लगेच तयार झाला. दोनच दिवसात दोघांनी आपलं बाड बिस्तर गुंडाळलं, आणि आपला संसार चंदा जिथे रहात होती त्या शिंगणापूर जवळच्या झोपडपटटीत हालवला.

आता राम्या आणि रखमा रोज देशी दारूच्या कारखान्यात जाऊ लागले. सुरूवातीचे काही दिवस रखमाला दारूच्या उग्र वासाचा खूप त्रास व्हायचा. पण हळूहळू तिला सवय झाली. संध्याकाळी घरी परत आल्यावर ती पूर्ण वेळ बाळाबरोबरच घालवायची. त्यांच्या शेजारीच एक आज्जी रहायची. तिला लहान बाळं फार आवडायची. बाळाचे आई वडील कामावर गेले की ही आज्जीच बाळाला सांभाळायची. ती एकटीच राहायची. तिला कोणीच वारीस नव्हता. झोपडपटटीतली तीन चार बाळं तीच सांभाळायची. या बाळांचे पालक रोज तिची जेवणाची सोय करायचे. त्या झोपडपट्टीतील किती तरी मुलं तीनं वाढवली होती. तिच्यामुळे रखमासारख्या बायका कामाला जाऊ शकत होत्या. त्या आज्जीनेच बाळाचं नाव राजू ठेवलं होतं. राम्या आणि रखमालाही हे नाव खूप आवडलं.

झोपडपट्टीत राहणारी मुलं सुटी्च्या दिवशी या आज्जीच्या झोपडीत जमायची. ती त्यांना गोष्टी सांगायची.

राजु हळूहळू मोठा होत होता. रखमा आणि राम्याचाही आता कामात चांगला जम बसला होता. त्यांची परिस्थिती आता आधीपेक्षा बरी होती. मालक राम्याच्या कामावर जामच खुश होता. त्यामुळे राम्याच्या कामावर खुश होऊन त्याच प्रमोशन होऊन चार वर्ष केलेल्या कष्टाचं हे फळ होतं. तो आता सुपरवायजर झाला होता. रखमाच्या आयुष्यात पहिल्यांदाच चांगले दिवस आले होते. राजू सुद्धा आता सगळी अक्षर व्यवस्थित बोलू शकत होता. आख्या झोपडपट्टीत तो सगळ्यांचा लाडका होता. इतकं सुंदर मुल या रखमेच कसं असा सर्वांना प्रश्न पडे. पण तसं तिला कोणी कधी विचारल नाही.

एक दिवस राम्या, रखमा, चंदा आणि चंदाचा नवरा आणि त्यांचा मुलगा हनमंत आणि राजू कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. गर्दी कमी असल्यामुळे त्यांना थोडाच वेळ रांगेत उभ राहून अगदी आत देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेता आले. पण रखमाला हे माहित नव्हतं की एक दिवस याच मंदीराच्या बाहेर बसुन भिक मागायची वेळ आपल्यावर येणार आहे.

राम्या आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करत होता. काही वर्षापूर्वी चोऱ्या करणारा राम्या आणि आत्ताचा राम्या यात जमीन आसमानाचा फरक होता. कदाचित राजू त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्यात हा बदल झाला असावा. एखादा कामगार जर नीट काम करत नसेल तर राम्या त्याला चांगलाच खडसावत असे आणि तरी देखील त्या कामगाराने कामचुकारपणा केला तर राम्या मालकाकडे त्या कामगाराविषयी तक्रार करत असे. राम्या सुपरवायजर झाल्यापासून कामगारांची उत्पादकता देखील वाढली होती. पण त्याच्या अशा वागण्यामुळे त्याचे अनेक शत्रू झाले होते. त्याच्या सांगण्यावरून मालकाने काही कामचुकार कामगारांना कामावरून काढले होते. जग्गुही त्यापैकी एक होता. जेव्हा मालकाने नवीन कारखाना चालु केला होता, तेव्हा जग्गुला सुपरवायजर पदी नियुक्त केलं होत. पण जग्गु मुळातच गुंड प्रवॄत्तीचा माणूस होता. त्यामुळे काही कामगारांनी जग्गुच्या त्रासाला कंटाळून मालकाकडे तक्रार देखील केली. मालकाने सर्व कामगारांचे हित लक्षात घेऊन जग्गुला सुपरवायजर पदावरून हटवून राम्याला सुपरवायजर केलं होतं. त्यामुळे जग्गुचा पहिल्यापासूनच राम्यावर राग होता. आतातर जग्गु काहीच काम करत नव्हता. इतर कामगारांची टींगल करणे, त्यांच्यावर दादागिरी करणे, महिला कामगारांवरती अश्लील टीप्पणी करणे ही कामं जग्गु आणि त्याचे साथीदार करत असत. पण त्याला बोलुन काहीही उपयोग होणार नाही हे राम्याला माहीत होतं. त्यामुळे तो जग्गु आणि त्याच्या गँगकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस जग्गुने रखमाबद्दल अश्लील टीप्पणी केली आणि राम्याने ते ऐकलं. आता मात्रा त्याचा संयम सुटला आणि तो जग्गुवर धावून गेला. राम्या जरी सर्व शक्ती वापरून जग्गुवर हमला करत होता तरी अडदांड शरीराच्या जग्गुवर त्याचा परिणाम होत नव्हता. आता जग्गुही चवताळला आणि त्याने एक गुद्दा राम्याच्या थोबाडावर मारला. राम्याचे दोन दात तुटुन पडले आणि राम्याच्या जबड्यातुन रक्त वाहू लागले. त्यावेळी जर मालक तिथे आले नसते तर जग्गुने राम्याचा जीवच घेतला असता. मालकांनी स्वत: जमीनीवर पडलेल्या राम्याला हात देऊन उभ केलं. जग्गुलाही दोन कामगारांनी धरून ठेवल होतं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही संताप दिसत होता. वातावरण थोड शांत झाल्यावर मालकाने जग्गुच्या हातावर शेवटच्या महिन्याचा पगार ठेवला आणि तू उद्यापासुन येवू नकोस असे सांगितले. जग्गुने मालकाकडे आणि राम्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो तेथून निघून गेला. आता सगळे कामगार परत आपआपल्या कामला लागले.

जग्गु गेल्यापासुन सगळे कामगार अगदी मनापासून काम करत होते. त्यांना त्रास देणारा माणूस आता तिथे नव्हता. महिला कामगारांनाही आता सुरक्षित वाटत होतं. जग्गुबरोबर दंगा मस्ती करणारी, त्याच्या दु:श्कर्माना साथ देणारी चार टाळकीही आपला म्होरक्या गेल्यामुळे नाईलाजाने कामाला लागली होती.

एक दिवस राम्याला फॅक्टरीतून निघायला उशीर लागला. कामच जास्त होतं. रखमा मात्र नेहमीच्या वेळीच घरी आली होती. नेमके त्याच दिवशी राम्याचे एक काका त्याच्याकडे आले होते. म्हणून रखमा राम्याला बोलवण्यासाठी फॅक्टरीच्या दिशेने निघाली. थोडं अंतर चालल्यावर तिला राम्या लांबून येतांना दिसला. आता आपल्याला जास्त चालायला लागणार नाही या विचाराने ती थोडी सुखावली व तिथेच एका झाडापाशी थांबली. इतक्यात एक मोटारसायकल राम्या जवळ येऊन थांबली. त्यावरून दोन माणसं उतरली. त्यातला एक चांगलाच दांडगा, धिप्पाड होता. काही कळायच्या आतच त्या माणसाने चाकू काढला आणि तो राम्यावर सपासप वार करू लागला. काही वेळातच तो माणूस परत गाडीवर बसून निघून गेला. राम्या जखमी होवून खाली कोसळला. हे पाहून रखमा पळतच राम्यापाशी आली. राम्याला अशा जखमी अवस्थेत पाहून तिला एकदम भोवळचं आली. पण तिने कसंबसं स्वत:ला सावरलं आणि रडवेल्या आवाजात ती राम्याला म्हणाली, “तुमाला कायबी होनार नाही. म्या लगीच डाक्टरास्नी बोलावते.” पण एक शब्द बोलायचाही राम्यात आता प्राण उरला नव्हता. “जग्गु” हा एकच शब्द कसाबसा उच्चारून रखमाच्या मांडीवर डोक टेकवून त्याने प्राण सोडले. कानाचे पडदे फाडणारी रखमाची किंचाळी ऐकून अख्खी झोपडपट्टी तिथे जमा झाली.

खेळण्या बागडण्याच्या कोवळया वयात पाच वर्षाच्या राजूवर स्वत:च्या वडीलांच्या पार्थीव देहाला अग्नी द्यायची वेळ आली. राजूचं नशीब पण पाहा. श्रीमंत घरात जन्माला येऊन देखील अगदी लहान वयात मातॄछत्रं, पितॄछत्रं हरवल, आणि तो एका भिकारणीच्या झोपडीत वाढला. आणि ज्याला तो आपले बाबा समजत होता तोही जग सोडून गेला.

राम्याला भेटायला आलेले काका राम्याचे दिवस कार्य अटोपून परत गावी गेले. या काळात रखमा आणि राजूची चंदाने खूप काळजी घेतली. राम्या जाऊन आता पंधरा दिवस होऊन गेले. रखमाला परत कामावर जाणं भाग होतं. नवरा मेला म्हणून तिला घरी बसून दु:ख करत बसणं परवडणारं नव्हतं. ती परत फॅक्टरीवर कामाला जाऊ लागली. पण आता पहिल्यासारखं तिचं कामात लक्ष लागेना. सारखी राम्याची आठवण येत होती. राम्या आणि जग्गु मध्ये झालेलं भांडण सारखं आठवायचं आणि अश्लील टीप्पणी करणाऱ्या जग्गुचा राक्षसासारखा क्रुर चेहरा डोळयासमोर आला की तिला कसतरीच व्हायचं. अशावेळी ती तिच्या आयुष्यात घडलेल्या ज्या काही चांगल्या घटना घडल्या होत्या त्या आठवायची. राम्या तिला ज्या दिवशी पहिल्यांदा भेटला तो दिवस, ज्या दिवशी राम्याने तिला लग्नासाठी मागणी घातली, ज्या दिवशी राम्या आनंदात घरी आला आणि आपण उद्यापासुन देवळाबाहेर भीक मागायची असे सांगितले, ज्या दिवशी राजू बाळ पहिल्यांदा दिसलं, त्याला पाहिल्यावर झालेला आनंद हे सारं आठवल्यावर तिला खूप बरं वाटत होतं.

आता त्या फॅक्टरीत तिचा जीव गुदमरत होता. त्यात एक नवरा नसलेली बाई, एक विधवा म्हणून काही पुरूष कामगारांच्या घाणेरड्या नजरांचा होणारा त्रास वेगळाच. शेवटी तिने फॅक्टरीचं काम सोडून परत भिक मागण्याचा निर्णय घेतला. मालकांनी आणि चंदानी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मालक तर तिला तुझा पगार वाढवतो असेही म्हणाले. पण रखमा आपल्या निर्णयावर ठाम होती. भिक मागायचं ठीकाणही तिनं ठरवलं होतं. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात गेली होती. तेव्हा तिने पाहीलं होतं की इथे खूप लांबून, देशभरातून भाविक येतात. त्यामुळे इथल्या भिकाऱ्यांनाही चांगले पैसे मिळत असणार. आता ती रोज सकाळी अंबाबाईच्या देवळासमोर भिक मागायला बसायची. राजूही तिच्या सोबत असायचा. फॅक्टरीत काम करून तिला जेवढे पैसे मिळायचे त्यापेक्षा भिक कमीच मिळायची. पण दोन वेळचं जेवण त्यातून निघायचं.

दिवस पटापट पळत होते. राजूही दिवसागणीक वाढत होता. त्याचे आता बरेच नवीन मित्र झाले होते. दिवसभर भिक मागून राजू संध्याकाळी त्याच्या मित्रांबरोबर वेगवेगळे खेळ खेळायचा. कधी क्रिकेट, कधी खो खो, कधी पतंग उडवणे. रखमाला राजूचं खूप कौतुक वाटायचं. जर आपण राजूला पळवून आणलं नसतं तर आज तो किती चांगलं, श्रीमंतीचं आयुष्य जगत असता. आपल्यामुळे आज राजूवर भिक मागायची वेळ आली, असं तिला वाटायचं पण बरेच लोग राजूच्या तोंडाकडे पाहूनच भिक द्यायचे.

तिनं ठरवलं होतं की आपल्याकडे थोडे पैसे जमले की राजूला शाळेत घालयचे. राजू सुद्धा खरच खूप समजुतदार मुलगा होता. तो रोज त्याच्याच वयाची कितीतरी मुलं पाहायचा. पण स्वत:च्या परिस्थीतीचं चांगलच भान त्याला असल्यामुळे त्याने रखमाकडे कधीही “मला हे पाहिजे मला ते पाहिजे” असा हट्ट केला नाही. उलट या परिस्थीतीवर मात करून आपल्या आईसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, जेणेकरून तिला अशी रस्त्यावर भिक मागायला लागणार नाही असे त्याला वाटे.

***

(७)

आज राजूचा शाळेचा पहिला दिवस होता. आपल्या आठ वर्षाच्या आयुष्यात आज राजू पहील्यांदा शाळेत गेला होता. राजू इतर मुलांपेक्षा वयाने मोठा असल्यामुळे वर्गात उठून दिसत होता. रखमाही खुप खुश होती. त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिका चंदाच्या ओळखीच्या होत्या. त्यांच्या ओळखीमुळेच राजूला शाळेत प्रवेश मिळाला होता. राजू रोज न चुकता शाळेत जात होता. बाईंनी दिलेला गॄहपाठ देखील तो रोज करायचा. राजूला अभ्यास करतांना पाहून रखमाही सुखावून जायची. तिच्या आख्या घराण्यात कोणी कधी अभ्यास केला नव्हता. रखमा आणि चंदाला तर तशी संधीच मिळाली नव्हती. जे आपल्या बाबतीत घडलं ते राजूच्या बाबतीत घडू नये असे तिला वाटायचे. राजू मोठा ऑफिसर बनावा अशी तिची इच्छा होती. आजकाल रखमाला पैसे बरेच मिळत होते. जेवढं मिळतय तेवढ्यात ती समाधानी होती. पण रखमाचं भिक मागणं चंदाला काही आवडलं नव्हतं. ती अनेकदा रखमाला म्हणायची की आपणं तुझ्यासाठी एखादं काम बघू, हवंतर मी मालकांशी बोलते, पण रखमा काय तिचं ऐकायची नाही. रोज जे पैसे मिळायचे त्यातले थोडे ती राजूच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवायची.

राजूची परीक्षा आता जवळ आली होती. त्याचा आभ्यास चांगला झाला होता. आपल्याला चांगले मार्क मिळणार याची त्याला खात्री होती. पटापट दिवस पळत होते, आणि एकदाचा परीक्षेचा दिवस उजाडला. रखमाच्या पाया पडून राजू परीक्षेसाठी निघाला. त्याला पेपर खूप सोपा गेला. काही दिवसातच परीक्षा संपली. राजूला सगळेच पेपर चांगले गेले होते. महिनाभरात निकाल आला. राजू वर्गात पहिला आला होता. बाईही राजूवर खूप खुश होत्या. रखमाला तर प्रमाणाबाहेर आनंद झाला होता. इतका, की तिने तिच्याजवळ साठलेल्या पैशातून राजूसाठी स्वत: दुकानात जाऊन भारीतला शर्ट आणला होता. एक दिवस राजू झोपला असतांना तिने हळूच तो शर्ट बॉक्स सकट राजूच्या दप्तरात टाकला. सकाळी उठल्यावर वह्या ठेवण्यासाठी राजूने दप्तर उघडलं तर आत एक बॉक्स. त्या बॉक्सवर लिहीलं होतं, “माझ्या पोरा तुला जेवडे मार्क पडले तेवढे आपल्या खांदानात कदी कुनाला मिळाले न्हाइत तुज्या यशाबद्दल तुज्या या अडानी आईकडून तुला हा शर्ट गीप्ट. असाच अभ्यास करत रहा.”

हे वाचून राजूच्या डोळयात पाणी तरळलं, आपण रडतोय हे आईला कळू नये म्हणून त्याने दप्तर पाठीला लावलं आणि तो तिथून निघाला. रखमा आतून सगळं पाहात होती. तिचे ही डोळे पाणावले होते. तिला खात्री होती राजू मोठा झाल्यावर मोठा ऑफीसर बनेल आणि आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल. तिने ठरवलं काहीही झालं तरी राजूला काही पण कमी पडून द्यायच नाही. त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येता कामा नये.

राजू केवळ आभ्यासात हुशार नव्हता तर, त्याला खेळायलाही आवडायचं. दर रविवारी तो झोपडपट्टीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळायला कोल्हापुरात जायचा. आधी लहान म्हनूण त्याला ती मुलं खेळायला नेत नव्हती. पण वयाच्या मानानं तो खरच खूप चांगला खेळायचा. त्यामुळे त्याचा खेळ पाहून हळूहळू त्यालाही खेळायला घेऊन जायचे. वयाने जरी तो सर्वात लहान असला तरी त्याच्या टीममध्ये सर्वात चांगली बॅटींग राजूच करायचा.

शाळेत सुद्धा राजूचे बरेच मित्र झाले होते. राजूची शाळा उशीरा सुरू झाल्यामुळे वर्गातील इतर मुलं राजूपेक्षा वयान लहान होती. पण मोठा म्हणून राजूने कधीच दादागिरी केली नाही. प्रमोद हा राजूचा एकदम खास मित्र. पण प्रमोदची परिस्थिती राजूच्या एकदम विरूद्ध होती. त्याचे वडील गावचे सावकार होते. तशी प्रमोदला शिकण्याची काहीच गरज नव्हती. पुढच्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा प्रमोदच्या वडीलांनी कमावला होता. गावातला एक पेट्रोलपंपही त्यांच्याच मालकीचा होता. पण मुळात प्रमोदला अभ्यासाची आवड होती. राजू आणि प्रमोद मध्ये पहिल्या नंबरसाठी स्पर्धा असायची. पण चौथी पर्यंत राजूने पहिला नंबर सोडला नाही. त्यामुळे प्रमोदला दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले.

पाचवीत गेल्यावर राजूने कोल्हापुरच्या प्रायवेट हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. प्रमोदने पण तिथेच ऍडमिशन घेतली. प्रमोदच्या वडीलांनी राजूला एक जुनी सायकल दिली होती. राजू रोज सायकलने शाळेत जायचा. प्रमोद मात्र रिक्षाने यायचा. शनिवारी शाळा सकाळी लवकर चालू व्हायची. रस्त्यावरून राजूला बरेच लोक चालतांना दिसायचे. अशावेळी वेगवेगळया प्रकारचे लोक त्याला पहायला मिळायचे. काही स्थुल पुरूष आणि बायका वजन कमी करण्यासाठी रस्त्यावरून पळायचे, काही म्हातारी माणसं व्यायामाच्या नावाखाली घरातून बाहेर पडायचे आणि कट्यावर गप्पा मारत बसायचे हे पाहून राजूला गंमत वाटायची. काही माणसं कुत्र्याला घेऊन फिरायचे. त्या कुत्र्यांकडे बघून राजूला कधीकधी हेवा वाटायचा आणि रागही यायचा. लोक या कुत्र्यांचे किती लाड करतात. त्यांना कपडे काय घालतात. रोज फिरायला काय नेतात. त्यांना थंडी वारा लागू नये म्हणून त्यांच्यासाठी घर काय बांधतात. त्याला रोज न्हाऊ काय घालतात. कुत्र्याचा जन्म घेऊनही ही पाळलेली कुत्री किती ऐशआरामात राहतात, आयुष्य जगतात. आणि मनुष्याच्या जन्माला येऊनही आपण गरीबीत जगतो, असं त्याला वाटायचं.

पाचवीची सहामाही परीक्षा जवळ आली होती. राजूचा अभ्यास जोरात चालू होता. पण आता शाळेत पहिलं येणं आधी इतक सोप नव्हतं. कारण आधीची शाळा छोटी होती. आणि तिथ केवळ गावातलीच मुलं होती. पण आता संपूर्ण कोल्हापूर आणि जवळपासच्या खेड्यांमधली मुलं होती. त्यामुळे पहिला नंबर टीकवणं तितकं सोपं नव्हतं. प्रमोद सुद्धा खूप अभ्यास करत होता. शेवटी परीक्षेचा पहिला दिवस उजाडला. पहाटे उठूनच राजूने एक उजळणी केली. रखमाच्या पाया पडून तो घराबाहेर पडला.

थोड्याच दिवसांत परीक्षा संपली. नेहमीप्रमाणे यावेळीही राजूला सगळेच पेपर सोपे गेले होते. बाहेर फिरणे, प्रमोदच्या घरी कॅरम खेळणे आणि क्रिकेट यामुळे सुट्टी पण चांगली गेली आणि एकदाचा रिझल्टचा दिवस उजाडला. यावेळीही राजूने पहिला नंबर सोडला नाही. रखमालाही आता राजूच्या पहिल्या नंबरची सवय झाली होती. तिनं खास राजूसाठी तुपातला शिरा केला होता. गेली तीन वर्ष ती राजूच्या रिझल्टच्या दिवशी शिरा करत होती. राजूला केवळ रिझल्टच्या दिवशीच शिरा खायला मिळायचा. प्रमोदच्या आईने राजूला जेवायला बोलावलं होतं. प्रमोद सुद्धा शाळेत पाचवा आला होता. इतक्या गरीब परिस्थीतीत देखील हा मुलगा एवढा चांगला अभ्यास करून शाळेत पहिला येतो, याचं प्रमोदच्या आई वडीलांना फार कौतुक वाटायचं. राजूने त्यातल्या त्यात चांगला शर्ट घातला आणि तो प्रमोदकडे जेवायला गेला. तिथे आत्तापर्यंत न पाहिलेले वेगवेगळे पदार्थ तो पाहात होता. अर्थात हे सगळे पदार्थ प्रमोदच्या आईने बनवले नव्हते. त्यांच्याकडे स्वयंपाकासाठी गडी माणसं होती. जाताजाता प्रमोदची आई राजूला म्हणाली, “तू आणि प्रमोद असाच अभ्यास करत रहा, आणि पुढच्यावेळी येतांना बरोबर आईलाही आणं.” राजूने नुसतीच मान डोलावली आणि तिथून निघाला. त्याच्या मनात विचार चालू होते. प्रमोदची आई किती भारी साड्या घालते. तिच्या हाताखाली किती नोकर चाकर आहेत. आणि आपल्या आईने नवीन साडी घेऊन किती वर्ष झाले. त्याने आपली आई काय करते हे अजून प्रमोदला सुद्धा सांगितलं नव्हतं. आणि प्रमोदने सुद्धा आपणहून राजूला तसं कधी विचारलं नाही.

रिझल्ट नंतर शाळा आता परत सुरू झाली होती. एक हुशार विद्यार्थी अशी राजूची शाळेत ओळख झाली होती. शिक्षकांनी कोणताही प्रश्न विचारला की राजूचा हात पहिला वर जायचा. बहुतेक सर्व शिक्षक राजूवर खुश असायचे. गणित विषय शिकवणाऱ्या फडके सरांचा तर तो फारच लाडका होता. सरांनी एखादं गणित फळयावर सोडवण्याच्या आधी राजूच्या वहीत ते सोडवलेल असायच. मुळातच गणित हा राजूचा आवडता विषय होता.

वर्गात जशी हुशार मुल होती, तशीच काही टारगट, मवाली मुलही होती. पण राजू मात्र फारसा त्या मुलांमध्ये मिसळत नसे. कारण रखमाने आधीच राजूला सांगितलं होत, चांगल्या मुलांबरोबरच मैत्री कर. मवाली, गुंड मुलांपासून दूरच राहात जा असे तिने राजूला सांगितले होते. राजू जरी अशा मुलांबरोबर राहत नसायचा तरी प्रमोद मात्र सर्व मुलांमध्ये मिसळत असे. बबन रोकडे हा प्रमोदचा चांगला मित्र झाला होता. बबनच्या वडलांचे दोन बार होते आणि गावाकडे मजबूत शेती होती. बबनचे वडील आणि प्रमोदचे वडील लहानपणापासूनचे मित्र होते. बबनच्या वडीलांना प्रमोदच्या वडीलांनी अडचणीच्या काळात आर्थीक मदत देखील केली होती. बबन आणि प्रमोदचं एकमेकांच्या घरी कायम येणं जाणं असे. पण बबन आणि प्रमोदच्या घरची श्रीमंती हे केवळ एकच साम्य होत. प्रमोद जेवढा अभ्यासू होता बबन तेवढाच उनाडक्या करणारा आणि मवाली होता. गावातल्या मुलांबरोबर दादागीरी करणं, दमदाटी करणं, मागच्या बेंचवर बसून टींगल करणं आणि अभ्यासू शांत मुलांना त्रास देणं हे सारे उद्योग तो शाळेत करायचा. गावातील इतरही काही श्रीमंत बापाची मुलं या सगळ्यात सामील असायची. बऱ्याच वेळेस बबन शाळा चुकवून सायबर कॅफेत गेम खेळायला जायचा. शाळा चुकवून गेम खेळणे हा त्याचा छंद होता. बबन एकुलता एक असल्यामुळे घरच्यांनी त्याला फारच लाडावलं होतं. तो जे मागेल ते वडील त्याला आणून देत असत. बबन जेव्हा जेव्हा बाबांकडे पैसे मागायचा तेव्हा ते लगेच पाकिटातून पैसे काढून बबनच्या हातावर ठेवायचे. एवढे पैसे तुला कशासाठी लागतात असे एकदाही त्यांनी बबनला विचारलं नाही, त्यामुळे बबनलाही पैश्याची किंमत नव्हती. मनात आलं की तो मित्रांना घेऊन हॉटेलात जायचा आणि स्वतःच्या पैश्यानी त्यांना जेऊ घालायचा.

प्रमोदला खरतर बबनचं हे वागणं आवडत नव्हतं पण बबनचा स्वभाव त्याला चांगलाच माहित असल्यामुळे तो बबनला काहीच बोलायचा नाही. बबनमध्ये एक चांगला गुण पण होता. एखाद्या गरीब मित्राने मदत मागितली तर एक क्षण ही विचार न करता त्या मित्राला मदत करत असे. त्याच्या या गुणाचा बरेच मित्र गैरफायदा घ्यायचे. केवळ पैश्यासाठी सुद्धा बबनसमोर त्याचे कौतुक करायचे आणि पाठीमागून त्याला नावं ठेवायचे.

बबन गावतल्या हुशार मुलांना जरी त्रास देत असला तरी, राजू प्रमोदचा मित्र असल्यामुळे बबनने राजूला कधीच त्रास दिला नाही. उलट “तुझ्या मित्राला सुद्धा माझ्या घरी घेऊन ये” असं तो प्रमोदला बऱ्याच वेळा म्हणायचा, पण राजू काही यायचा नाही. खरतर राजूला आपल्या परिस्थितीची लाज वाटायची. जास्तीत जास्त अभ्यास करून नोकरी करायची आणि आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं असा निश्चय राजूने केला होता.

आता पाचवीच्या वार्षीक परीक्षेला थोडेच दिवस उरले होते. राजूचा अभ्यास जोरात सुरु होता. काहीही करून त्याला पहिला नंबर पटकवायचा होता. प्रमोद्चाही अभ्यास छान चालला होता. परीक्षा काही दिवसावर येऊन ठेपली असून देखील बबनच्या दिनचर्येत काहीच फरक नव्हता. मित्रांसोबत फिरणे, सायबर कॅफेमध्ये जाऊन दिवसभर गेम खेळणं, एखाद्या हुशार मुलाच्या घराजवळ जाऊन त्याला हाक मारून हैराण करणे हे सगळं त्याचं चालू होतं. परीक्षेला त्याचा नंबर प्रमोद मागेच असल्यामुळे तो जमेल तेवढं प्रमोदच्या पेपर मध्ये पाहूनच पेपर लिहित असे आणि कसाबसा पास होत असे. प्रमोद सुद्धा मित्र म्हणून शिक्षकांचं लक्ष नसतांना त्याला पेपर दाखवत असे.

वार्षिक परीक्षेत देखील अपेक्षेप्रमाणे राजू गावात पहिला आला. आता रखमालाही याची सवय झाली होती. तिला आता फारसं काही वाटलं नाही. मात्र तिला आपल्या मुलाबद्दल अभिमान आणि कौतुक वाटायचं. एखाद्या भिकाऱ्याला महिनाभर भिक मिळाली नाही आणि एक दिवस त्याच्या वाडक्यात सोन्याच नाणं पडावं तसं देवाने हे पोरगं आपल्या पदरात टाकलय असं तिला वाटायचं आणि तिचं उर भरून यायचं. तिच्या अंधारमय जीवनात एक कोपरा उजळून टाकणारा तोच एक दिवा होता.

***

(८)

सुट्टी संपून शाळा परत सुरु झाली. इतके दिवस मुलांशिवाय रिकामा पडलेला, भकास वाटणारा शाळेचा आवार मुलांच्या कलकलाटाने पुन्हा एकदा भरून गेला. पानझड झालेल्या वृक्षाला नवी पालवी फुटावी तशी शाळा चिरतरुण दिसू लागली. सहावी ब च्या वर्गात मुलं एक एक करून येत होती. काही मुलांचे चेहरे मरगळलेले होते. तर काहींच्या चेहऱ्यावर उत्साह साफ दिसत होता. राजू आणि प्रमोद नेहमीप्रमाणे पहिल्या बेंचवर बसले होते. बबन सुद्धा त्याच्या चांडाळ चौकडी बरोबर आत आला. त्याच्या कपाळावर कूंकू होतं तर केसात तांदळाचे दाणे दिसत होते. आज बबनचा वाढदिवस होता. त्याच्या आईने सकाळीच त्याला ओवाळलं होतं. बबनने जाड भिंगाचा चष्मा घातलेल्या एका मुलाच्या गालाचा चिमटा काढला आणि हळूच मागे निघून गेला. त्याच्या मागची चांडाळ चौकडी त्या मुलाकडे बघून हसली आणि मागच्या बेंचवर जाऊन बसली. तो ढापण्या मुलगा कळवळला. चिमटा बबननेच काढला आहे हे त्याला कळलं. पण तो काहीच बोलू शकला नाही. आज बबनने लाल रांगाचा झगमगीत शर्ट घातला होता. त्याच्या वडिलांनी तो खास त्याच्या वाढदिवसासाठी आणला होता. शाळा सुटल्यावर बबनने बसची वाट पाहत असलेल्या प्रमोदला हाक मारली. प्रमोद बबानपाशी आला आणि त्याने बबनला विचारले, “काय रे बबन आज नविन शर्ट? आज काय वाढदिवस आहे का तुझा?” बबन त्याला म्हणाला, “अरे म्हणून तर तुला हाक मारली. आज माझ्या घरी पार्टी आहे. तेव्हा तुझ्या त्या हुशार मित्राला काय बरं नाव त्याचं? हा, राजूला पण नक्की आण. बर जातो मी.” एवढे बोलून तो समोरच उभ्या असलेल्या कारमध्ये जाऊन बसला.

प्रमोदची बसही थोड्या वेळाने आली. प्रमोदने ठरवलं आज काहीही करून राजूला बबनच्या पार्टीला न्यायचं. बबन काही वाईट मुलगा नाही. तो फक्त अभ्यास करत नाही एवढचं.

नविन शर्ट आणि त्याच्या आत्यानी गिफ्ट दिलेली जीन्स घालून प्रमोद राजूच्या झोपडीच्या दिशेने निघाला. माझ्याकडे नवीन कपडे नाहीत हे कारण राजू सांगणार हे प्रमोदला माहित होतं म्हणूनच त्याने राजूसाठीही त्याचा एक चांगला शर्ट आणि जीन्स बरोबर घेतली होती. तो आज काहीही करून राजूला बरोबर नेणार होता. प्रमोद राजूच्या झोपडीपाशी आला आणि त्याने राजूला हाक मारली तशी रखमा बाहेर आली आणि तिने प्रमोदला विचारलं, “काय र प्रमोद काय झालं?” तेव्हा प्रमोद म्हणाला, “काही झालं नाही हो काकू. आमच्या एका मित्राचा आज वाढदिवस आहे. त्याने आम्हाला पार्टीसाठी त्याच्या घरी बोलावलं आहे. त्यासाठी मी राजूला घेऊन जायला आलो आहे.”

“तू ये ना आत. मी छानपैकी चा करते. चा प्या अन तुमी जा.” प्रमोद आत गेला आणि त्याने राजूला बबनच्या पार्टीबद्दल सांगितलं. राजू म्हणाला, “अरे तू जा मी नाही येत. असही माझ्याकडे घालायला चांगले कपडे नाहीत.” लगेच प्रमोद उत्साहात म्हणाला, “मित्रा मला माहित होतं तू हेच कारण देणार. म्हणूनच मी तुझ्यासाठी माझे शर्ट आणि जीन्स आणले आहेत. ते घाल आणि गपगुमान चाल.” राजूचा नाईलाज झाला आणि त्याने प्रमोदने आणलेले कपडे घातले. दोघांनीही चहा घेतला आणि ते निघाले. थोडा वेळ चालल्यावर त्यांना रिक्षा मिळाली आणि ते रिक्षाने बबनच्या घरापाशी आले. खरतर बबनचं घर एखाद्या महालापेक्षा कमी नव्हतं. समोर भव्य प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वारातून आत जाताच मधोमधच सिमेंटचा रस्ता होता व त्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी बाग होती. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूना असलेल्या दिव्यांच्या प्रकाशात रात्रीदेखील बागेतील झाडांचा व गवताचा हिरवा रंग चमकत होता. बंगल्याच्या बाहेरच्या दगडी भिंतींवरील कोरीव काम अतिशय सुंदर होतं. समोरच बबन रोज ज्या गाडीने येत असे ती मर्सीडीज दारात उभी होती. प्रमोद आणि राजू आत आले. सगळीकडे मोठी झुंबर लटकत होती आणि त्यांच्या प्रकाशाने तो संपूर्ण हॉल उजळून निघाला होता. एका बाजूला डॉलबी स्पीकर ठेवले होते. मोठ्या आवाजात गाणी लागली होती. त्या गाण्यांच्या तालावर सगळी मुलं नाचत होती. बबनही त्यांच्यात नाचत होता. राजू आणि प्रमोद एका कोपऱ्यात उभे होते. थोड्यावेळाने बबनचं लक्ष प्रमोद आणि राजूकडे गेलं. तसा तो नाचायचा थांबला आमण प्रमोदपाशी आला. त्याने प्रमोदचा हात पकडला आणि त्याला ओढतच आत मध्ये नेलं. प्रमोदही जमेल तसा नाचू लागला. राजू मात्र अजूनही त्या कोपऱ्यातच उभा होता. प्रमोदने राजूला नाचायसाठी बोलावलं पण तो गेला नाही. तो आजूबाजूला पाहत होता. त्या भव्य हॉलच्या भिंतींवर अडकवलेली महागडी पेंटीग्ज, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी उंच लाकडापासून बनवलेल्या पायऱ्या आणि त्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूांना ठेवलेली वेगवेगळ्या आकाराची शिल्पे, मूर्ती त्यांचे लक्ष वेधून घेत होती. हा सगळा डोळे दिपवणारा झगमगाट आणि थाटमाट तो पहिल्यांदाच पहात होता.

थोड्या वेळाने आतल्या खोलीतून शेरवानी घातलेले भव्य शरीरयष्टीचे एक गृहस्थ आणि त्यांच्यापाठोपाठ एक स्त्री हॉलमध्ये आले. ते दोघे बबनचे आईवडील होते. बबनच्या बाबांनी मिशी आणि लांब दाढी ठेवली होती. त्यांच्या हातात सोन्याचं मोठ कडं होत व गळ्यात सोन्याचीच साखळी होती. त्याचां व्यक्तिमत्व भारदस्त होतं. बबनची आई मात्र बबनच्या बाबांपुढे थोडी वयस्कर वाटत होती. तिने तरूण दिसण्यासाठी भरपूर मेकअप केला होता. पण तरीही ती वयस्कर वाटत होती. तिने काळ्या रांगाची साडी नेसली होती. साडीच्या कडावर सोन्याची जर होती. पण तिचा चेहरा मात्र आनंदी होता. तिने गाणे चालू असलेल्या सीडी प्लेयरचं बटण बंद केलं. सगळी मुलं नाचायची थांबली आणि काय झालं म्हणून इकडे तिकडे बघू लागली. तेव्हा बबनची आई म्हणाली, “मुलांनो जेवण तयार आहे. आधी गरम गरम जेऊन घ्या. आणि मग काय घालायचा तो गोंधळ घाला. चला बसा पटापट खाली.” मुलं खालीच जेवायला बसली. आतून दोन-तीन नोकर येऊन पटापट वाढू लागले. जेवणं झाली. बबन प्रमोद आणि राजूला त्याच्या वडिलांपाशी घेऊन आला. त्याने राजूकडे बोट केलं आणि तो त्याच्या बाबांना म्हणाला, “बाबा, हा राजू. हा आमच्या शाळेतला सर्वात हुशार मुलगा. हा शाळेत कायम पहिला येतो.” बबनच्या बाबांनी राजूकडे कौतुकाने पाहिलं आणि ते म्हणाले, “अरे वा फारच छान. जरा आमच्या पोराला पण शिकव अभ्यास. जरा बी अभ्यास करत नाही आमचा बबन. बघावं तेव्हा इकडे तिकडे फिरत असतो.” तसा बबन ओशाळला आणि म्हणाला, “काय हो बाबा, तुम्ही सारखां अभ्यास अभ्यास करता. आज माझ्या वाढदिवशी तरी जरा मजा करू द्या.” “कर बाबा मजा कर” बबनचे बाबा त्याला म्हणाले. राजू आणि प्रमोद परत हॉलमध्ये आले. बबनही बाहेर आला आणि त्याने परत गाणी सुरु केली. पण नुकतीच जेवलेली मुलं जागची हलेनात. जेवण अतिशय रुचकर झाल होतं. त्यामुळेच सगळे सुस्तावले होते. बबन एकेकाला नाचण्यासाठी उठवत होता. प्रमोदही आता कांटाळला होता. राजूच्या मनात वेगळेच विचार चालले होते. फाटक्या साडीतल्या त्याच्या आईबद्दल तो विचार करत होता. थोड्याच दिवसात त्याच्या आईचा वाढदिवस होता. कितीतरी महिने झाले रखामाने नवीन साडी घेतली नव्हती. काहीही करून आईला या वाढदिवसाला नविन साडी घ्यायची असं राजूने ठररवलं. पण कशी घेणार साडी, पैसे कुठून आणायचे? राजू विचार करू लागला. गावात राजू पहिला आला म्हणून त्याला सरांनी शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले होते. पण शंभर रुपयात साडी कशी घेणार? तसे जर त्याने प्रमोदला किंवा बबनला मागितले असते तर लगेच त्यानी त्याला पैसे दिले असते. पण राजूला असं कुणाकडे पैसे मागण्यात कमीपणा वाटायचा. त्याचा स्वभाव मानी होता. त्याच्या डोक्यात एक विचार आला. दुसऱ्याच दिवशी शाळेत गेल्यावर त्याने तो विचार प्रमोदला बोलून दाखवला. प्रमोद त्याला म्हणाला, “खरतर मी आत्तापण तुला पैसे देऊ शकतो. पण तू घेणार नाहीस हे मला माहित आहे. तुझ्यामुळे जर बबन अभ्यासाला लागला तर चांगलच आहे.”

संध्याकाळी प्रमोद बबनच्या घरी गेला. सुदैवानं बबन घरी नव्हता. त्याने सेक्युरीटी गार्डला काकांना भेटायचां आहे असं सांगितलं. गार्डने आत फोन केला व राजूचं नाव सांगितल. फोन ठेवला आणि गार्डने राजूला आत सोडले. राजू आत आला बबनचे बाबा हॉलमध्येच टीव्ही बघत बसले होते. राजूला पहाताच ते म्हणाले, “अरे राजू बबन घरी नाही आहे. माझ्याकडे काय काम काढलस?” “काका मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काल तुम्ही म्हणालात बबनला जरा अभ्यास करायला शिकव. त्यावर मी काल विचार केला आणि बबनची हरकत नसेल तर सुट्टीच्या दिवशी मी बबनची शिकवणी घेत जाईल. तुम्हाला जर वाटलच तर मला पैसे द्या.” बबनचे बाबा राजूकडे पाहून हसले. त्यांना राजूच फार कौतुक वाटलं.

किती प्रगल्भ विचार होते राजूचे. पण ही प्रगल्भता परिस्थितीमुळे आली होती. ते म्हणाले, “पोरा खरंतर मला तुझं कौतुक वाटतं. माझं पोरगं पण तुझ्याच वयाचं आहे. पण तो तुझ्यासारखा समजूतदार कधी होणार देवच जाणे. तू ये पुढच्या आठवड्यापासून शिकवणीसाठी. बबन काय सहजासहजी तयार नाही होणार पण त्याला मी तयार करेन.” राजू तिथून निघून गेला.

रात्री बबन घरी आला. बाबांनी त्याला आत बोलावलं. ते बबनला म्हणाले, “बबन, तुला कॉम्प्युटर हवा होता ना?” कॉम्प्युटरचे नाव ऐकताच बबन खुश झाला होता व बबनने मान डोलावली. “पण जर तुला कॉम्प्युटर हवा असेल तर माझं ऐकायला लागेल.” “काय?” बबनने विचारलं. “मी तुमच्या वर्गातल्या राजूला दर रविवारी तुझी शिकवणी घ्यायला सांगितलं आहे. तेव्हा तो पुढच्या आठवड्यात रविवार पासून घरी येऊन तुझी शिकवणी घेईल. जर तू त्याने सांगितल्या प्रमाणे अभ्यास केलास तरच तुला मी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटर घेऊन देईन.” जर घरी कॉम्प्युटर आला तर बबनला गेम खेळण्यासाठी सारखं कॅफेत जावं लागणार नव्हतं. त्याने थोडा वेळ विचार केला व तो वडीलांना म्हणाला, “मी तयार आहे पण तुम्ही मला आधी कॉम्प्युटर घेऊन द्या.” बबनच्या बाबांना तो एवढ्या लवकर तयार होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी बबनसाठी नवा कॉम्प्युटर खरेदी केला. पण बबनचा प्लॅन वेगळाच होता. खरंतर हा प्रमोदचा प्लॅन होता. त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं. काहीही करून राजूला बिघडवायचं म्हणजे त्याचं अभ्यासातलं लक्ष उडेल व प्रमोदला शाळेत पहिलं येण्याची संधी मिळेल.

रविवारी राजू ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर बबनच्या घरी आला. बबन अजूनही झोपला होता. त्याच्या आईने त्याला उठवलं व राजू आल्याचं सांगितलं. बबन उठून आवरायला लागला. थोड्याच वेळात बबन व राजू बबनच्या खोलीत गेले. बबनचा कॉम्प्युटर ही तिथेच ठेवला होता. त्यात बबनने बऱ्याच गेम्स टाकल्या होत्या. राजूने दप्तरातून मराठीचं पुस्तक काढलं व तो बबनला म्हणाला , “बबन आता मी पहिला धडा वाचेन, तू लक्ष देऊन ऐक. आणि मग तू तोच धडा वाच. मग मी तुला प्रश्न विचारीन त्या प्रश्नांची उत्तर तू द्यायचीस.” बबन त्याला म्हणाला, “अरे आत्ता माझा मूड नाहीये. मी थोडा वेळ गेम खेळतो मग तू वाच.” राजू त्याला म्हणाला, “ठीक आहे पण थोडाच वेळ.” राजूचे शब्द बबनच्या कानापर्यंत पोहोचायच्या आत त्याने कॉम्पुटर चालू केला सुद्धा. तो रोडरॅश गेम खेळायला लागला. गेममध्ये मोटारसायकलची रेस चालू होती. बबनच्या खेळावरुन त्याला चांगलीच प्रॅक्टीस आहे असं दिसत होत. राजू सुद्धा पाहत होता. तो पहिल्यांदाच कॉम्प्युटर गेम पाहत होता. बबनने पहिली रेस अगदी सहज जिंकली, आता दुसरी रेस चालू झाली. बबन अगदी सराईतासारखा गाडी चालवत होता. राजूला पण गेम खेळावी वाटत होती. बघता बघता अर्धा तास झाला होता. आपण इथे कशासाठी आलो आहोत हे विसरून राजूही गेममध्ये बुडून गेला होता. अचानक त्याच लक्ष घड्याळाकडे गेलं आणि तो भानावर आला. राजू बबनला म्हणाला, “बबन आता खूप वेळ झाला आता आपण शिकवणी सुरु करूयात.” बबनने कॉम्प्युटर बंद केला आणि राजूने पहिला धडा वाचायला सुरुवात केली. बबनला नीट समजलं पाहिजे म्हणून तो मुद्दाम हळूहळू वाचत होता. राजूचा धडा वाचून झाला. त्याने बबनकडे पाहिले तर तो खुर्चीत गाढ झोपला होता. राजूने बबनचा खांदा पकडून त्याला हलवला पण बबन गाढ झोपला होता. नाईलाजाने राजूने पुस्तक दप्तरात ठेवलं आणि तो तिथून निघाला. बबनला शिकवणी व अभ्यासाची सवय लागणं हे काही वाटत तितकं सोप नाही हे राजूला आता कळल होतं.

घरी आल्यावर राजूला पण गाढ झोप आली व झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात तो त्या गेममधल्या गाड्यांसारख्याच एका गाडीवर बसून जात होता. रेस मधल्या इतर गाड्यांना त्याने मागे टाकले आणि शेवटी तो रेस जिंकला. तो गाडीवरुन उतरला. समोर त्याची आई नवीकोरी साडी घालून उभी होती. त्याने हेल्मेट काढून गाडीच्या हॅण्डलला लावले व पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वाद दिला.

इतक्यात त्याला जाग आली. रखामाने त्याला उठवलं होतं. ती राजूला म्हणाली, “अर पोरा किती येळ झोपलाव्तास. चल मी तुझ्यासाठी चा केलाय तो चा पेऊन घे पटकन.”

राजूने घडाळ्यात पाहिले तो तब्बल चार तास झोपला होता. राजूने चहा प्यायला व तो अभ्यासाला बसला.

आता राजू आणि बबन मध्ये चांगलीच मैत्री झाली होती. बबनची आई राजूला बऱ्याच वेळा सकाळी नाष्ट्याला बोलवायची. तिथे त्याला यापूर्वी कधी न खाल्लेले वेगवेगळे पदार्थ खायला मिळायचे.

बघता बघता परत रविवार उजाडला. राजू सकाळी लवकर आवरुन बबनच्या घरी पोहोचला नेहमी प्रमाणेच बबन आताही अजून झोपला होता. बबनच्या आईने त्याला उठवलं व तो थोड्यावेळात आवरुन बाहेर हॉलमध्ये आला. दोघेही बबनच्या रुममध्ये गेले. राजू बबनला म्हणाला, “मागच्यावेळी प्रमाणे या वेळी झोपायच नाही आणि जो पर्यंत तू प्रश्नांची उत्तर बरोबर देत नाहीस तो पर्यंत मी तुला गेम पण खेळू देणार नाही. मी जरी तुझा मित्र असलो तरी आता मी तुझा शिक्षक आहे त्यामुळे तू माझं ऐकलच पाहिजेस.” आश्चर्य म्हणजे बबनही लगेच तयार झाला. राजूने पहिला धडा परत वाचून दाखवला. बबनने ही तो एकदा वाचला. राजूने धड्यामागे दिलेले काही प्रश्न बबनला विचारले. बबनने एक दोन प्रश्नांची अचूक उत्तर दिली. राजूसाठी हे सर्व खरचं अविश्वसनीय होतं. आजची शिकवणी संपली होती. राजूने दप्तर भरलं व तो तिथून निघणार तेवढ्यात बबन त्याला म्हणाला, “अरे एवढ्यात कुठे निघालास? तू गेम खेळणार नाहीस का?” राजू त्याला म्हणाला, “अरे नको, मला नाही आवडत गेम वगैरे. मी जातो. घरात काम पण आहे.” “खेळून तर बघ तुलापण आवडेल. मी आज तुझं एवढं ऐकलं. माझं ऐकणार नाहीस का? असही मला एकटयाला गेम खेळायला कंटाळा येतो.” बबन म्हणाला. राजूची इच्छा तर नव्हती पण तरीपण तो थांबला. बबन आज खरच शहाण्या मुलासारखा वागला होता.

बबनने गेम चालू केला. कुठली बटणं दाबायची ते राजूला सांगितल. राजू गेम खेळायला लागला. सुरुवातीला त्याची गाडी सारखी आदळत होती. पण थोड्यावेळ खेळल्यावर त्याला चांगलं जमायला लागलं. बऱ्याच वेळानांतर तो एक रेस जिंकला. त्याला तो गेम फारच आवडला होता. तो सलग एक तास गेम खेळला होता. शेवटी बबनच त्याला म्हणाला, “बघ आख्खा एक तास तू गेम खेळलास आणि म्हणे मला गेम वगैरे काही आवडत नाही.” राजू नुसता हसला आणि दप्तर घेऊन तेथून निघाला. सायकल चालवतानाही आपण आता गाडीच चालवत आहोत असं राजूला वाटलं. आपण दर रविवारी बबनकडे शिकवणीला जातो हे राजूने आईला सांगितलं नव्हतं. तिने विचारलं तर तो फक्त मित्राकडे जातो आहे एवढचं सांगायचा. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं.

क्रमशः