Mala Kahi Sangachany - Part - 5 - 6 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय.... - Part - 5 - 6

५. वास्तव अवास्तव


असं घाई घाईत बोलून लगेच फोन ठेवल्यामुळे प्रशांत आणि त्याच्या आईला अनेक प्रश्न पडायला लागले होते......


कुमार कुठे आहे ?अजून घरी का आला नाही ?त्याचा मोबाईल कुणाला आणि कुठे सापडला? नेमकं काय झालं असेल ? तो ठीक तर आहे ना ? वेळेचे भान ठेवून प्रशांत म्हणाला..

" आई तू काळजी करू नकोस ... मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला, तू घरीच थांब. बाबा पण लग्नाला गेले , परत यायचे आहेत अजून..."


त्यावर आई त्याला म्हणाली ...

"अरे शहराला आले असतील पण वाहन नसेल गावी यायला , नाहीतर थांबले असतील मित्राकडे उशीर झाला म्हणून."


एवढं बोलून ती थांबली.


प्रशांत - " आई येतो मी " म्हणत जायला लागला..


"बाळा सोबत ने कुणाला अंधार झाला आहे खूप "


यावर नुसतं हो म्हणून तो पटकन घरातून बाहेर पडला आणि मित्राला सोबत घेऊन दोघे दुचाकीने शहराच्या दिशेने जायला लागले तर त्याची आई पुन्हा देवापुढं जावून दिव्यात तेल घालून

पाया पडली आणि कुमारची वाट पाहायला लागली...


इकडे रुग्णालयात कुमार बेशुद्ध होऊन निपचित पडून होता . पायाला जखम झाली होती तर गुडघ्याला मार लागला होता , हाताला खरचटलं होतं ..

डोक्याला खूप लागलं होतं , शर्ट रक्तानं माखलं होतं, डॉक्टरांनी मलमपट्टी करून सलाईन लावले ...


प्रशांत मित्राला घेऊन शहराकडे जात होता, दिवसभर तापलेल्या उन्हाच्या झळा अजूनहि जाणवत होत्या, निरभ्र आभाळ असल्यानं चटक चांदणं दिसत होतं त्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत होता म्हणून ते वेगाने जात असल्याने अवघ्या 15 मिनिटांत गाव आणि शहराला जोडणाऱ्या मूळ रस्त्यावर पोहोचले तोच वळण घेतांनी कुणीतरी पायी गावात येत असल्याचे दिसले. दुचाकी चा वेग कमी करत त्यांनी जवळून पाहता ती व्यक्ती प्रशांतचे वडील असल्याचे त्यांना समजले ...


दुचाकी थांबवून प्रशांत त्यांच्या जवळ गेला. त्यावर त्याचे वडील त्याला विचारत होते ....


"प्रशांत तू आहेस का? अरे आता या वेळेला कुठं जात आहात?"


त्यावर प्रशांत म्हणाला ...

"बाबा आधी तुम्ही बसा गाडीवर मी वाटेत सांगतो सर्व "


"अरे हो पण काय झालं ? कशाची गडबड आहे? सगळं ठीक आहे ना ?"


असं बोलत ते दुचाकीवर बसले आणि तिघेही शहाराकडे जायला लागले. प्रशांतने घडला प्रकार वडिलांना सांगितला ....


इकडे रुग्णालयात कुमार जवळ अद्याप पाटील आणि वानखडे अतिदक्षता विभागाबाहेर बाकावर बसून होते....


" एक विचारू सर? "

वानखडे पाटील यांना म्हणाले...


त्यावर" हं "एवढंच पाटील बोलले ....


"तुम्ही या तरुणाच्या कुटुंबियांना अपघातचं का नाही सांगितलं..?

का अपघात झाल्याचं न सांगता मोबाईल सापडला असं अवास्तव बोललात ? "


वानखडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत पाटील म्हणाले ...

"याच असं आहे वानखडे कि ,मी जेव्हा फोनवर बोलत होतो तेव्हा मला समजले की दुसऱ्या बाजुला या तरुणाचा लहान भाऊ आणि आई बोलत होते म्हणून

वास्तव लपवून मला अवास्तव सांगावं लागलं नाहीतर त्याच्या आईने अनावर होऊन तेव्हाच शोकारंभ केला असता "


असं बोलणं सुरु असतांना डॉक्टर कुमारला तपासण्यासाठी आत गेले आणि तो अजून शुद्धीवर न आल्याने लगेच बाहेर आले ....


पाटील डॉक्टर बाहेर येताच -


"हॅलो डॉक्टर ,कसा आहे तो? काही सुधारणा आहे का ?"


त्यावर डॉक्टर म्हणाले ..

"नाही ,अजून त्याला शुद्ध आलेली नाही. काही रिपोर्ट यायचे आहेत तेव्हा रिपोर्ट आल्यावर परिस्थिती कळेल .बरं त्याच्या कुटुंबियापैकी कुणी आलं नाही अजून?"


त्यावर " हो येत आहे ." पाटील म्हणाले..


ठीक आहे म्हणत डॉक्टर निघून गेले ...


इकडे प्रशांत त्याच्या वडील आणि मित्रांसोबत शहराला आला होता तोच त्याचा फोन वाजायला लागला...


दुचाकी बाजूला घ्यायला सांगत त्याने फोन उचलला ...


"हॅलो कोण ?"


"मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय "


"हॅलो सर, आम्ही पोहचलो शहरात 10 मिनिटात स्टेशनला येतो."


" कुठे आहे तू सध्या?" पाटील म्हणाले

"बस स्टॉप जवळ आहे सर." प्रशांत म्हणाला .....


"बरं, तुला जिल्हा रुग्णालय माहित आहे काय ? मी तिथंच आहे आता. कामानिमित्त आलो आहे तू ये इथंच, शिवाय पोलीस स्टेशनपेक्षा जवळ आहे बस स्टॉपवरून." पाटील म्हणाले ...


त्यावर "ठीक आहे सर" प्रशांत म्हणाला आणि ते रुग्णालयाकडे निघाले....


वानखडे तेवढ्यात दोघांसाठी चहा घेऊन आले, दोघांनी चहा घेतला. पाटील म्हणाले...


"वानखडे मी त्या अपघात झालेल्या तरुणाच्या भावाला आणि सोबत जे कुणी असेल त्यांना इथंच बोलावून घेतलं आहे तर तू त्यांना गेटपासून आत घेऊन ये ,बस येतीलच ते इतक्यात."


त्यावर हो सर म्हणत वानखडे गेटच्या दिशेने जायला लागले, आता अपघात होऊन जवळपास दीड ते दोन तास लोटून गेले होते ...


आजूबाजूला बरेच लोक आपल्या रुग्णाजवळ डोळ्यात थोडी आस अन थोडी आसवं घेऊन भिंतीचा आधार घेत बसलेली .... पाटील त्यांना पाहत होते

आणि त्यांच्या मनात आले की इतक्या वेळेपासून या तरुणाचा अपघात झाला त्यात जवळ नात्याचं कुणीच नाही, बेशुद्ध अवस्थेत तो पडून आहे काही बरं वाईट होऊ नये म्हणजे झालं .....

अनेक विचार मनात येत असल्यानं अस्वस्थ होऊन पाटील अतिदक्षता विभागाच्या काचेतून कुमारला पाहू लागले....

६. परिचय


काय वेळ आली या तरुणावर , चांगला 23-24 वर्षाचा तरुण, घरची जबाबदारी त्याने घेतली असावी... असे विचार मनात येत असता पाटील कुमार काही हालचाल करतो काय ते पाहत होते

पण अजून तो तसाच बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडून होता.... इतक्यात वानखडे यांनी हाक दिली 'सर' ...


मागे वळून पाहिले तर दोन तरुण आणि पन्नाशीच्या जवळ वय असणारा गृहस्थ तिथं आलेले त्यांना दिसले. तेव्हा वानखडे परिचय करून देत-


'हे इन्स्पेक्टर पाटील'


त्यावर प्रशांत म्हणाला ...

"नमस्कार सर ,मी प्रशांत हे माझे वडील आणि हा माझा मित्र आकाश "


वानखडे ला -

"जरा चहा बोलवा" म्हणत पाटील यांनी त्या तिघांना समोरच्या बाकावर बसायला सांगितले आणि झालेल्या अपघाताची बातमी दिली. ...


अपघात झाला कळताच कुमारचे वडील वास्तवाचं भान हरवून ...

कसा झाला अपघात ?कुठे झाला ?कसा आहे तो ?फार लागलं तर नाही ?असे प्रश्न डोळ्यातील आसवं रोखून विचारू लागले ...


न राहवून प्रशांत-

"सर, तुम्ही तर फोनवर काही वेगळंच सांगतिल होतं ,की दादाचा मोबाईल सापडला म्हणून कुणालातरी"


त्यावर पाटील म्हणाले "तुम्ही आधी शांत व्हा. मला तुम्हाला फोनवर असं सांगणं ठीक न वाटल्याने मी इथं आल्यावर अपघात झाल्याचं सांगितलं .बरं , चला डॉक्टरला भेटू"


असा संवाद करत ते डॉक्टरला भेटायला गेले. "आम्ही आत येऊ शकतो ?"असं दार जरा लोटून पाटील यांनी विचारले.


"हो, या पाटील साहेब" म्हणून डॉक्टरांनी आत यायला परवानगी दिली. आत येताच पाटील यांनी डॉक्टरला त्यांचा परिचय करून दिला .


त्यावर डॉक्टर म्हणाले तुम्ही प्लिज बसा तुमच्या मुलाचं नाव काय?


'कुमार' ... ,कुमारचे वडील बोलले .


"कसा आहे माझा मुलगा ?काय झालं त्याला?"


कुमारला जास्त कुठे लागलं नाही. त्याच्या डोक्याला जखम झाल्याने रक्त खूप गेलं कि काय, त्यामुळे त्याला अजून शुद्ध नाही , शिवाय त्याच्या पायाला आणि हाताला मार लागला ...


आम्ही त्याचं आणखी थोडा वेळ निरीक्षण करणार आहोत जर लवकर त्याला शुद्ध आली नाही तर त्याच्या मेंदूचे x-ray आणि सिटी स्कॅन करावे लागेल ...


एवढं बोलून डॉक्टर थांबले..


" आम्ही त्याला पाहू शकतो का? डॉक्टर साहेब "

त्याचे वडील म्हणाले ...


त्यावर होकार देत त्याच्या खांद्यावर हात ठेवून काळजी करू नका असे म्हणत डॉक्टर अतिदक्षता विभागाकडे त्यांना घेऊन गेले . कुमार मात्र अजूनही तसाच पडून होता...

त्याचा भाऊ जवळ जाऊन ....

" दादा काय झालं हे? उठ ना दादा, "


तर त्याचे वडील त्याचा हात हाती घेऊन

" बाळा , बोल रे काही , असं कस झालं? "

म्हणत आतापर्यत रोखलेले आसवं ढाळायला लागले . ....

प्रशांत आणि त्याचे वडील यांची ती अवस्था पाहून ... आकाश आणि पाटील यांनी आधार देत त्यांना तेथुन बाहेर आणले...


पाटील त्यांना सांभाळत -


"शोक आवरा, जरा सांभाळा स्वतःला. असं खचून कस चालेल ? बसा इथे" म्हणत त्यांना बाकावर बसविले ,त्यांना पाणी दिले.


आता ते दोघेही थोडे सावरले होते. आकाश प्रशांतजवळ बसून त्याला धीर देत म्हणाला "आपण काकुला सांगायला पाहिजे त्या काळजी करत असतील" तेव्हा त्याला घरून बाहेर येतेवेळी आईचा केविलवाणा चेहरा आठवला आणि तो रडतच म्हणाला.

"आईला कस सांगायचं कि दादाला अपघात झाला म्हणून, तिची काय अवस्था होईल असं ऐकून, मला तर कल्पनाही करता येत नाही. "


"तू काळजी करू नकोस मी आहे ना. तू बस इथेच मी आलोच" असं म्हणून आकाश समोरच्या गॅलरीत आला आणि त्याने एक नंबर डायल केला. ....


काही क्षणातच दुसऱ्या बाजूने -


"हॅलो बोल आकाश कसा आहेस?"


त्यावर आकाश बोलू लागला, "मी ठीक आहे पण एक वाईट बातमी आहे सुजित तुझ्यासाठी...."


"काय मस्करी करतोस, कोणती वाईट बातमी ?जरा नीट सांगतोस का" सुजित म्हणाला.


"अरे कुमारला अपघात झाला आहे " आकाश अडखळत बोलत होता


"काय! कुमारला अपघात झाला? कधी? कुठे ?आणि कसा? तूला कुणी सांगितलं ? " सुजित बेचैन झाला होता.


आता आकाश अस्वस्थ होऊन बोलू लागला "अरे तू काकुला म्हणजे कुमारच्या आईला काही कारण सांगून जिल्हा रुग्णालयाला घेऊन ये लवकर, मी तुला नंतर सर्व सांगतो, बर ठेवतो मी फोन."

असं म्हणून त्याने फोन ठेवला.


पण आता विचारांचे वादळ सुजितच्या मनात उठले होते, अचानक आकाशचा फोन आणि कुमारचा अपघात यामूळे तो सुन्न झाला होता. मग लगेच भानावर येत त्याने "मी येतो आई." म्हणत तो दुचाकी घेऊन कुमारच्या घरी आला आणि बाहेरूनच आवाज देऊ लागला...


"काकू, अहो काकू ,काय करत आहात?"


आतापर्यंत देवघरात बसून देवाला गाऱ्हाणं सांगणारी ती माउली बाहेर येऊन म्हणाली ...

"कोण? अरे सुजित तू आहेस, पण कुमार नाही घरी, अजून आला नाही तो, काय माहित कुठे आहे?"


तेव्हा सुजित जास्त वेळ न घालवता म्हणाला "काकू ,चला मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. मला प्रशांतचा फोन आला होता, तुम्हाला घेऊन शहराला बोलावलं आहे, काम आहे म्हणाला."


" पण तो गेला आहे ना माझं काय काम आहे तिथं आणि तुझे काका पण नाही आले अजून ... काही सांगितलं का प्रशांतनं ? "


त्यावर सुजित "नाही, काकू तुम्ही चला सोबत लवकर बोलावलं आपल्याला" कसंबसं सावरून तो बोलला मग वाद न घालता दोघेही शहराच्या दिशेने जायला लागले......