Parvad - 8 books and stories free download online pdf in Marathi

परवड भाग ८.

भाग ८.
रात्रभर अरविंदा जागाच होता.
नक्की काय चाललय घरात?
सुनबाईला नक्की कसला त्रास आहे?
गुणवंताही गप्प गप्प का आहे ?
विचार करून करून त्याच्या डोक्याला मुंग्या आल्या.रात्रभर जागरण झाल्यामुळे त्याचं डोकं चांगलंच ठणकायला लागलं होत!
आज या दोघांना सकाळी सकाळीच नक्की काय झालय ते विचारायचं!
अरविंदाने निश्चय केला आणि सकाळी आन्हिके उरकून तो त्या दोघांची वाट पहात बसला.
प्रथम सुनबाई आली आणि अरविंदाला चहा दिला.
अरविंदाने सुनबाईला हाक मारून समोर बसवलं. गुणवंतालाही बाजूला बसायला सांगितले.दोघेही मान खाली घालून त्याच्या समोर बसले.अत्यंत हळू शांत आवाजात तो बोलायला लागला.....
गुणवंता व सुनबाई मी दोन तीन दिवस बघतोय की तुमच्या दोघांच काहीतरी बिनसलंय.सुनबाईला बर नाही का? काही त्रास आहे का?”
त्याने सुनबाईकडे उत्तराच्या अपेक्षेने बघितले पण ती काहीच बोलली नाही.
सुनबाई,मला सांग, तुला गुणवंताकडून काही त्रास आहे का? आमच्यापैकी कुणाचं काही चुकत असलं तरी सांग पण अशी रडत राहू नकोस बाई!
अरविंदा बोलत होता आणि हे दोघे नुसते घुम्यासारखे समोर बसून राहिले होते.
अरे पोरानो, मनात जे असेल ते मोकळेपणाने बोला. मुळात आपलं इन मिन चार जणांचे कुटूंब, कुणाचं काही दुखतखुपत असलं तर, कुणाला काही त्रास होत असला तर आपणच एकमेकांची काळजी घ्यायला हवी!
अरविंदा त्याची सुनबाई व् गुणवंताकड़े पाहून सावकाश बोलत होता.
सुनबाईने आता वर पाहिले आणि गुणवंताकडे पाहून खूण केली.
तुम्हीच बोलाअशा अर्थांची ती खूण अरविंदाच्या नजरेतून सुटली नव्हती!
गुणवंताने आता काही तरी निर्धार केल्यासारखं वर पाहिलं. पुन्हा पुन्हा घसा खाकरला.पुन्हा जमिनीकडे बघत तो एकदाचं धीर एकवटून बोलला.
शालूला आणि मला वेगळ राहायचंय!
क्काय....?”
अरविंदा जवळ जवळ किंचाळलाच!
गुणवंताने आपल्या बापाच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करत पुढे बोलायला सुरुवात केली....
हे बघा बाबा,आजपर्यंत आम्ही तुम्हा दोघांची व्यवस्थित काळजी घेत आलोय,दोघाना सांभाळत आलोय; पण यापुढे हे जमणार नाही! या आंधळ्या वसंताला तर आम्ही अजिबात नाही सांभाळू शकणार!
आम्ही उदयाच हे घर सोडून जाणार आहोत, यापुढे आम्ही शहरात रहायला जाणार आहोत. तुमच्यासाठी आणि या आंधळ्यासाठी आम्ही आमचं जीवन बरबाद का करायचं? आज ना उद्या मी हे तुम्हाला सांगणारच होतो,बर झाल तुम्हीच हा विषय काढला.तुम्हाला काय करायचे ते करा त्या वसंताच, आम्हाला आता तुम्हा दोघांशी काही देणघेण नाही!
शालू आणि गुणवंताच हे एकदम टोकाला जावून बोलण अरविंदावर चांगलाच आघात करत होत.
खर तर घरात असं काहीच घडलेलं नव्हत की दोघांनी घर सोडायचा निर्णय घ्यावा.
अरे; पण मला कळेल का, तुम्ही असं का ठरवलंय.....?”
बाबा, असं म्हणतात की झाकली मूठ लाख मोलाची असती, हे मी हे तुम्हाला बोलणारच नव्हतो तुम्हाला; पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो....
वसंता हल्ली शालूच्या अंगचटीला येतो, माझ्या प्रिय बायकोला त्या आंधळ्याकडून धोका आहे!
अरविंदाला हे सगळ ऐकवत नव्हत, त्याला खात्री होती की अंध वसंता असं काही वागण शक्यच नव्हत!
पलिकडे उभा असलेल्या वसंताला हे सगळ ऐकू गेल होत.तो हे ऐकून घाबरला, मटकन खाली बसला आणि धाय मोकलून रडायला लागला! आपण काही केलं नाही हे ओरडून ओरडून सांगू लागला.अरविंदाने त्याला जवळ घेतलं.
आता मात्र अरविंदा चिडला.....
बस्स्स, काहीतरी बोलू नका,अरे सरळ सांगा ना की तुम्हाला वेगळ व्हायचंय! त्यासाठी या बिचाऱ्या वसंताला कशाला बदनाम करताय? जाSS ताबडतोब चालते व्हा,परत या घरात पाउल टाकायचं नाही, व्हा बाहेर!
अरविंदाला राग अनावर झाला होता.
शालू जणू या क्षणाची वाटच पहात होती. तिने आधीच आपलं सामान आवरून ठेवलं होत!
अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून त्या दोघांनी घेतलेला निर्णय अमलात आणला!
दोघांनी घर सोडलं ते कधीही परत न येण्यासाठी....
वसंता आणि अरविंदा दिवसभर रडत राहिले....
सुखाच्या एका स्वप्नाने अरविंदाला पुन्हा हुलकावणी दिली होती.
त्या दिवशी घरात अन्न शिजले नाही!
( क्रमश:)
© प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020