Suvarnamati - 1 books and stories free download online pdf in Marathi

सुवर्णमती - 1

उपोद्घात / पूर्वपीठिका

1

गंगानगरीच्या राजदरबारात अस्वस्थ शांतता पसरली होती.

काही दिवसांपूर्वी हेर खबर घेऊन आला होता. शेजारच्या पंचमनगरी राज्याने गंगानगरीवर आक्रमण करण्याची तयारी सुरू केली होती. गंगानगरीचे सैनिक प्राण पणाला लावून झुंजले असते पण पंचमनगरीच्या सैन्याकडे परकीयांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या तोफा, बंदुका आणि दारूगोळा होता. त्यांचा मुकाबला करण्यासाठी तितकीच चांगली शस्त्रास्त्रे हवी होती. परकीयांची शस्त्रास्त्रे घेऊन आपसात लढू नये असे गंगानगरीचे राजे सुरजप्रतापसिंहांचे मत. त्यामुळे परकीय व्यापारी शस्त्रास्त्रे घेऊन आले तेव्हा त्यांनी एकच लांब पल्ल्याची बंदूक केवळ आवड म्हणून ठेवून घेतली, पण बाकी माल परत पाठवला होता.

आता या आक्रमणाचा मुकाबला कसा करायचा, ही मात्र चिंताजनक बाब बनली होती. राजाजींनी, मंत्रीजींना एक खलिता तयार करायला सांगितला, ज्यात पंचमनगरीच्या राजाला संदेश पाठवला की ‘आपसात लढण्याने काहीच हासील होणार नाही. दोन्ही राज्यांची सेना हकनाक मारली जाईल. प्रजा होरपळून निघेल. फायदा फक्त परकीयांचा होईल.’

त्यावर पंचमनगरीतून उत्तराचा खलिता आला होता आणि म्हणूनच आजची राजसभा भरली होती. परंतु खलित्यातील मजकूर वाचून चिंता अधिकच वाढली होती. पंचमनगरीच्या राजाने, खलित्यात, राजाजींच्या सामोपचाराच्या भाषेस घाबरटपणा असे संबोधून लढण्याची कुवत नसेल तर सरळ शरणागती पत्करावी व तहास तयार व्हावे असे सुचवले होते.

तहाच्या अटीही अत्यंत अपमानकारक होत्या. गंगानगरीची सर्वात सुपीक जमीन ज्या प्रदेशात होती तो प्रदेश, धनसंपत्ती, हेही मान्य केले असते एक वेळ, पण राजकन्या सुवर्णमतीचा हात पंचमनगरीचा राजकुंवर रणराज बरोबर विवाहासाठी मागण्यात आला होता. ही बाब प्रचंड संतापजनक होती.

तहात जमीन, धनसंपत्ती मागणे हे सर्वमान्य होते.पण तहात राजकुवारीचा हात मागणे हे राज्यासाठी प्रचंड अपमानास्पद होते.

हे सर्व गोषात बसलेली सुवर्णमतीही ऐकत होती. गोषामध्ये हालचाल झाली. सुवर्णमतीचा चेहरा संतापाने लालेलाल झाला होता. याक्षणी उठावे आणि पंचमनगरीचा राजा व कुंवरास सरळ सरळ युद्धाचे आव्हान द्यावे हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. ती उठून येरझाऱ्या घालू लागली.

राजदरबारात खलबते सुरूच होती. कोणाला काहीच सुचत नव्हते. काही वेळाने दरबार बरखास्त करण्यात आला. दूत शेजारच्या राज्यात खलिते घेऊन पाठवण्यात आले. मदतीचे आणि पंचमनगरीवर दबाव आणण्याचे आवाहन करण्यात आले. पण खात्री कशाचीच नव्हती. केवळ एकच राज्य होते जे पंचमनगरीस जरब देऊ शकत होते ते म्हणजे शेषनगरीचे राज्य. परंतु त्यांच्याकडे मदत मागावी तरी कशी? ना नात्याने त्या घराण्याशी जोडलेले, ना परिचयाने.

राजाजींच्या त्यांच्या महालात येरझाऱ्या सुरूच होत्या.सुवर्णमतीही तिथेच होती. आपल्या रूपाच्या लोभानेच पंचमनगरीचा राजकुंवर या थराला गेला असल्याचे तिला कळले होते. तिच्या अंगाचा तिळपापड होत होता.

तेवढ्यात एक गुप्त दूत राजमोहोर दाखवून आत आला. आल्याआल्याच त्याने एक खलिता महाराजांच्या हाती दिला. महाराजानी तो खलिता वाचला. पाहता पाहता त्यांची काळजीयुक्त चर्या पालटली. एक बारीक स्मितरेषा त्यांच्या ओठी सुवर्णमतीस दिसली आणि ती काहीशी आश्चर्यचकित झाली. दूतास आराम करण्यास सांगून मग राजानी खलिता सुवर्णमतीच्या हाती दिला.

खलिता शेषनगरीचे राजकुंवर सूर्यनागाकडून आला होता. ती वाचू लागली.

“आपल्या राज्यावर पंचमनगरीचे राज्य आक्रमणाच्या तयारीत आहे, ही खबर आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल. त्यांच्याकडे परकीय बनावटीची आयुधे आहेत हेही आपल्यास ज्ञात असेलच. प्रसंग बाणा आहेच. हे नेहमीचे दोन राज्यातील आपसी युद्ध असते, तर कदाचित मदत मागितल्याशिवाय आम्ही मध्ये पडलो नसतो. परंतु पंचमनगरीच्या राजाने मर्यादा ओलांडली आहे. युद्धसंधीत जमीन, धन, यांची देवाणघेवाण शास्त्रमान्य आहे. परंतु जुलुमाने राजकन्येचा हात मागून राजघराण्यांच्या परंपरेला काळिमा फासण्याचे कृत्य पंचमनगरीच्या राजाने केले आहे.

आपला, सर्वानी एकत्र येऊन परकीयांना काबूत ठेवण्याचा मानस आम्हाला अत्यंत आवडला. सद्यपरिस्थितीत हेच योग्य पाऊल आहे. परंतु पंचमनगरीच्या आततायी राजास हे समजलेले दिसत नाही. त्यांना योग्य ती समाज आम्ही देऊच. वेळ पडल्यास शेषनगरीचे सैन्य पंचमनगरीच्या सैन्यास योग्य तो धडा शिकवेल. याची गरज पडेल असे वाटत नाही. खलिता एव्हाना त्यांनाही मिळाला असेलच. आम्ही लक्ष ठेवून आहोत. चिंता नसावी.

स्त्रीचा असा अपमान ना शेषनगरीचे राज्य सहन करेल ना आम्ही स्वतः. या संकटकाळी शेषनगरी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभी असेल याची खात्री बाळगा.

यापुढे मिळून राहणे अधिकाधिक गरजेचे ठरणार आहे. आपले राज्य आमच्या राज्यापेक्षा लहान असले तरी मोक्याच्या सीमेवर आहे. दोन्ही राज्यांनी मिळून आपले सैन्य अधिक बळकट करावे असे वाटते.”

सुवर्णमतीने परत परत खलिता वाचला. राजाजी तिच्याकडेच पाहत होते.

“पिताजी, यांच्या रूपाने परमेश्वरच धावून आला आपल्या मदतीला. यांच्याबद्दल सगळा इलाखा आदराने बोलतो.”

“खरंय कुंवारी. मी लगेच खलित्याचे उत्तर पाठवतो.ही समस्या सुटल्यावर सदिच्छा भेटीचे निमंत्रणही पाठवतो.”

लगबगीने राजाजींनी मंत्रिगणांस पाचारण केले. हेरांना सर्व बित्तमबातमी काढण्यास सांगितले.

काहीच दिवसात पंचमनगरीचे सैन्य सीमेवरून मागे हटवले गेल्याची बातमी आली.

इतर सर्व राज्यांनीही पंचमनगरीस असे कृत्य केल्याबद्दल निषेधाचे खलिते पाठवले आणि परत असे काही विपरीत केल्यास गय केली जाणार नाही हेही कळवण्यात आले.

Share

NEW REALESED