Azab lagnachi gazab kahaani - 13 books and stories free download online pdf in Marathi

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग१३)


वरमाला घालून झाल्यावर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.नवरदेव नवरी सजवलेल्या खुर्चीवर बसले.सगळ्यात पहिले अण्णा माई आणि जिजी,आप्पांनी सुलग्न लावले आणि वधूवराला शुभाशीर्वाद दिले.एक एक करू
न दोन्ही कुटूंबाकडल्या व्यक्तींनी वधूवराला आशीर्वाद दिले.रागिणी स्टेज वर त्या दोघांना शुभेच्छा द्यायला गेली..

" अभिनंदन रघुवीर, अभिनंदन जानकी" रागिणीचा चेहरा कोमेजला होता..

"थँक्स रागिणी..तू आलीस मला खूप आनंद झाला थांब एक सोबत फोटो घेऊ" रघुवीर म्हणाला.

फोटोग्राफर ने त्या तिघांचा फोटो काढला ,मग रागिणी तिथून निघून गेली. रघुवीरला मनातून वाईट वाटलं होतं.त्याच्या मनात अजूनही रागिणी बद्दल प्रेम होतं.हे सगळं तो तिला मिळवण्याकरिता करत होता.रागिणी तिथे आल्याच रघुवीरच्या घरच्यांना फारस रुचल नव्हतं.फोटोशूट वगैरे झाल्यावर गुरुजींनी दोघांना सप्तपदीसाठी तयार राह्यला सांगितले..थोडयावेळाने दोघेही तयार होऊन आले. रघुवीर ने लाल रंगाचे सोवळं नेसल होत. जानकी ने लाल रंगाचे सोनेरी काठ असलेली नऊवारी साडी नेसली होती,गळ्यात मोत्यांची ज्वेलरी घातली होती.प्रत्येक साडीत जानकीच रूप खुलून येत होतं आणि रघुवीर तीच आरस्पानी सौंदर्य बघून थक्क होत होता. सप्तपदीचा विधी सुरु झाला.

रघुवीर ने विधिवत पूजा करून जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले.पायात जोडवे घातले आणि भांगेत कुंकू भरलं.ह्यावेळी दोघांच्याही ह्रदयाची धडधड वाढली होती.

" जानकी,रघुवीर तुम्ही हे सातफेरे घेतांना जी वचन घेणार आहात ती तितक्याच शर्थीने पाळायची आहेत.गृहस्थश्रमाची सुरुवात तुम्ही करणार आहात.तुमच्या नात्यात निरंतर विश्वास, प्रेम,जिव्हाळा असणे गरजेचे आहे.चांगल्या वाईट परिस्थितीत तुम्हाला कायम एकमेकांची साथ द्यायची आहे.तसेच जानकी तुला कुटूंबासाठी म्हणजे सासर प्रति असलेलं कर्तव्य निष्ठतेने निभावायच आहे.थोऱ्या मोठ्यांचा मान सन्मान ,त्यांची आपलं मानून सेवा करणं हे तुझं कर्तव्य असणार आहे.रघुवीर तुला जानकीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे.पती म्हणून तुला ती सन्मान देईल तोच सन्मान तुलाही तिला द्यावा लागेल.तीच रक्षण करणं, तिला चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं, ती तिच्या मायेचे माणस सोडून तुझ्यासाठी येणार आहे त्यामुळे तिला खूप प्रेमाने जपायला हवं.तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन प्रेमाने,आनंदाने आणि विश्वासाने व्यतीत करावं.कुठलेही निर्णय घेतांना एकमेकांचा विचार घ्यायचा.कुठलीही गोष्ट एकमेकांपासून लपवू नये नात्यात पारदर्शकता असणे गरजेचेआहे.
देवा ,ब्राम्हणांच्या आणि पवित्र होम कुंडासमोर तुम्हाला वचन घ्यायचे आहे की तुमची दैवाने बांधलेली ही जन्मगाठ तुम्ही आणखीन घट्ट बांधून ठेवणार आहात" गुरुजी म्हणाले.

सप्तपदीचे वचन घेतांना जानकीच्या मनात सारख येत होतं की आज आपण देवाला साक्षी ठेवून हे वचन तर देत आहे पण ते खरच पूर्ण निभावणार आहोत का? सगळ्यांना तर फसवत आहोत पण स्वतःच्या मनाला कस फसवणार?

त्यानंतर कन्यादानाचा विधी झाला.ठरल्याप्रमाणे माई-अण्णा,अरुताई-अनंतराव,जयश्रीताई- जयंतराव आणि चैतन्य-मनु ह्या सगळ्यांनी मिळून जानकीचे कन्यादान केले.त्यावेळी सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. ओंकार आणि मंदार ने रघुवीरची कानपिळणी केली. जोडे लपवले त्याचे बक्कळ पैसे त्यांनी रघुवीर कडून घेतले.
हे सगळे विधी आटोपल्यानंतर विहिण पंगत झाली.जानकी आणि रघुवीर लग्नाच्या विधीत इतके मग्न होऊन गेले होते की काही वेळासाठी विसरून गेले की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे .जेवण्याच्या वेळी सगळ्यांनी या दोघांना उखाणा घ्यायला सांगितला.

" सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
रघुवीररावांचे नाव घेते जिलेबीचा घास भरूवुन करते तोंड गोड" जानकी ने उखाणा घेतला.

रघुवीर उखाणा घ्यायला आढेवेढे घेऊ लागला पण मग शेवटी त्याने एक उखाणा जुळला..

" अमरावती नगरीला अंबादेवीचा वास
जानकीला भरवतो श्रीखंडाचा घास" रघुवीर.

जेवणे आटोपली.मग त्यानंतर सूनमुख , मानपान झाले आणि शेवटी वेळ आली पाठवणीची.जानकी तिच्या माहेरच्या एक एक माणसाचा जवळ जात होती .सगळ्यात पहिले ती अण्णा माईजवळ गेली.त्यांना बिलगून रडू लागली.रघुवीरही तिच्या सोबत होता त्याला ही याक्षणी भरून आलं होतं.

" जावईबापू सांभाळा आमच्या लेकीला .तळहाताच्या फोडासारखं जपलं आम्ही जानूला.तुम्हीही तिला जपा.. खूप शहाणी आहे आमची जानू पण थोडीशी अल्लड आहे सांभाळून घ्या तिला" अण्णा अक्षरशः हात जोडुन रघुवीरला म्हणाले.

" अण्णा अहो हात नका जोडू..तुम्ही जानकीची अजिबात काळजी करू नका ,मी आहे न" रघुवीरने आश्वासन दिले.जानकी आईबाबा, काका काकू,आत्या,दादा,वहिनी,लहान भाऊ आणि तिच्या दोन लाडक्या भाच्यांजवळ हमसून हमसून रडली. जिजी-आप्पांबरोबर बाकी सगळ्यांनी अग्निहोत्रीं कुटूंबातील सदस्यांना जानकीचे काळजी न करण्याचे,आम्ही सगळे तिला सांभाळून घेऊ असे आश्वासन दिले..अग्निहोत्रीकडल्याना खात्री होती की जानकी योग्य घरी पडली आहे.

जानकीला घेऊन देव कुटूंबीय अमरावती कडे रवाना झाले. तिच्या स्वागताची जोरदार तयारी केलेली होती. रमताईंनी दोघांच औक्षवण केलं.पुन्हा जानकीला उखाणा घ्यायला सांगितला.

" अग्निहोत्रींची लेक झाली देवांची सून
रघुवीररावांचं नाव घेते गृहप्रवेश करून" जानकीने छानसा उखाणा घेतला.. जानकी आणि रघुवीर ने एकत्रपणे गृहप्रवेश केला .ती आज पहिल्यांदा आपल्या सासरी आली होती देव घरात जाऊन दोघांनी देवाचे दर्शन घेतले. लक्ष्मी घरात आली म्हणून लक्ष्मी पूजनाचा विधीही झाला.नवीन घर ,नवीन लोक.जानकी सगळ्यांसोबत जुळवून घेईल की तिची तारांबळ उडेल??रघुवीर च यानंतरच काय पाऊल असेल? मांडलेला संसार मोडण्यासाठी तो काय काय नवीन युक्त्या लढवतो हे लवकरच कळेल..