Yeva konkan aaploch asa - 1 books and stories free download online pdf in Marathi

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १



हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील आतिथ्यशील वातावरण !!
"येवा कोंकण आपलोच असा" असं मनापासून स्वागत करणारी कोंकणी माणसं..
यामुळे मालवण "पर्यटकांची पंढरी" झालं आहे.

पर्यटकांच्या मौखिक प्रसिद्धीमुळे गोव्याच्या मद्य संस्कृतीला कंटाळलेल्या पर्यटकांचे लक्ष सिंधुदुर्गाकडे वळले..

कोकण रेल्वे सुरु झाल्यामुळे मुंबई आणि इतर राज्यातील पर्यटकांना कोंकणाने आकर्षित केलं. शिवाय रस्त्यांची कामेही शासनाने पुढाकार घेऊन वेळीच केल्याने चारचाकीचा प्रवासही ब-यापैकी सुसह्य झाला.
त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकणात येणे सोपे झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ऊस, कापूस अशा नगदी पिकांमुळे पैसा खेळू लागला होता. आर्थिक स्थिरता प्राप्त झाल्याने काहींना कोकण खुणावू लागले होते.

वाचलेल्या माहितीनुसार कोकणातील पर्यटनाचा पाया साधारण ९० च्या दशकात रचला गेला असावा.

अर्थात शिवछत्रपतींनी निर्माण केलेला जलदुर्ग हा या पर्यटनाचा केंद्रबिंदू होता. त्यातच एमटीडीसीने निर्माण केलेले 'तंबू निवास' इकडे पर्यटक आकर्षित होऊ लागले..

हा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन आणि त्याचाच लाभ उठवत मालवण, तारकर्लीच्या परिसरात स्थानिकांनी छोटे, छोटे होम स्टे आणि खानावळींची मालिका उभी झाली असावी.

त्याकाळी एमटीडीसीच्या "निवास न्याहरी" योजनेचा फायदा उचलत अनेकांनी आपल्या घरातील दोन-तीन खोल्या पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यास सुरवात केली. त्यातून परिसरातील कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आणि आपोआप पर्यटकांच्या स्वागताची मनोवृत्ती वाढीस लागली. इथे आलेला पर्यटक मालवणी जेवणासाठी आतूर होता अन् आजही आहे.

हा बदल नुसतं मालवण पुरता मर्यादित न राहता बघता बघता साऱ्या कोकणने कात टाकली..
मालवणला अनुसरण करत आजूबाजूची अनेक गावं बदलत गेली. मुळातच सुंदर असलेले कोकण आपल्या अगत्यशील आदरतिथ्यामुळे आणखीनच सर्वाना भारून टाकणारे ठरले.

कोकणी संस्कृती,इथल्या परंपरा, सणवार याचे तर सर्वानाच नेहमी अप्रूप वाटत आले आहे..
कोकणच्या बदललेल्या रुपामुळे सागर ते सह्याद्री पर्यटनाची नवी गुंज झळाळून उठली.

सुरवातीस, कोकणातील मुंबईस पोटापाण्यासाठी गेलेला कोकणकर आणि त्यांची मित्रमंडळी उन्हाळी दिवाळी सुट्टीत ,गणपती किंवा होळी अशा कालावधीत इकडे उतरत असत. नंतरच्या काळात पुणेकरही सुट्टीत कोकणात येऊ लागले; पण जसजसा काळ बदलू लागला, तसतसे पार विदर्भ ते अगदी राज्याबाहेरील पर्यटक इथे येऊ लागले.
आज इथे येणारा पर्यटक हा कोकणाकडे एक पर्यटनस्थळ या नजरेने पाहतो. त्याच्यादृष्टिने ज्याप्रमाणे काश्मिर ,केरळ, कन्याकुमारी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग.

अशा ह्या नितांत सुंदर मालवणला आम्ही सहा वर्षांपूर्वी भेट दिली होती.. मालवणच्या आदरतिथ्याचा
पुनश्च अनुभव घेण्यासाठी या दिवाळीत मालवणाक रवाना झालो..

"कोकणकन्येची" तिकिटे न मिळाल्याने आम्ही 'दादर सावंतवाडी' या ट्रेनने रात्री बारा वाजता दादरवरून निघून दुपारी बाराच्या आसपास कुडाळ स्टेशनवर उतरलो..

कुडाळ स्टेशन ते मालवण हे अंतर साधारण तीस किलोमीटर आहे.
आपण रिक्षा किंवा प्रायव्हेट कार करून जाऊ शकतो.. तसेच अजून एक पर्याय म्हणजे कुडाळ रेल्वे स्टेशन पासून कुडाळ एस टी स्टँड एक किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथून एस टी महामंडळाच्या लाल परीने तुम्ही मालवण गाठू शकता.

आम्ही रात्रभर प्रवास करून थकलो असल्याने रिक्षाने जायचे ठरवले.. थोडी घासाघीस करून सातशे रुपये एवढे एका रिक्षाचे भाडे ठरले.
सामान रिक्षात टाकून आम्ही मालवण भेटीसाठी निघालो.

कुडाळ ते मालवण हा प्रवासात दिसणारा नयनरम्य निसर्ग, वळणा वळणाचे रस्ते, माडा पोफळीच्या बागा, कौलारू घरं प्रवासाचा शीण कुठच्या कुठं पळवून नेत होती.
कुडाळ सोडल्यानंतर थोड्याच वेळात कर्ली नदीवरील पुलाने आमचे भरभरून स्वागत केले . इथं एक फोटो स्टॉप नक्कीच घ्या. इतका सुंदर स्पॉट आहे हा!!
हिचं कर्ली नदी पुढे समुद्राला मिळते.याला कर्ली बॅक वॉटर असंही म्हणतात.

थंड हवेची झुळूक डोळ्यावर झापड आणत होती.आर्या तर अनिलच्या खांद्यावर डोकं ठेवून गुडूप झाली.

मी मात्र निसर्ग बघण्यात मग्न झाले होते.. कुडाळ ते मालवण रस्ता अतिशय सुस्थितीत आहे.. मला वाटतं, पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन या सर्व सुधारणा केल्या असाव्यात..
रस्त्याच्या दुतर्फा झाडं तर होतीच पण सोनेरी, हिरवट मध्येच लालसर रंगाच्या गवताने आच्छादलेले विस्तृत माळरानही जागोजागी नजरेस पडतं होतं..