My Own Writing... books and stories free download online pdf in Marathi

माझे लिखाण... - मला बहीण होती...

हो मला एक बहिण होती, पण ती कशी दिसते, तिला माझी आठवण येत होती का, हे काही मला माहिती नाही, पण हो मला एक बहीण होतीच....

             कदाचित ती माझ्यासारखीच दिसत असावी, मी आईला म्हणायचो एखादा तरी फोटो पाठव ना ग, मला बघू दे ती कशी दिसते..पण आईनेही कधी माझी गोष्ट मनावर घेतलीच नाही. कारण कदाचित त्या फोटोची किंमत परवडली नसावी तिला..

        कधी कधी ती माझ्या स्वप्नांत यायची. माझे डोळे मिटवून "दादा मला आज भुर्र नेशील ना रे"..अशी गोड, केविलवाणी मागणी घालायची...

          मग मी हो म्हंटल्याशिवाय ती डोळेच उघडू द्यायची नाही...आणि हो म्हंटल्यावर अलगद कुशीत येऊन बसायची...जणू  माझ्या हातात कुणी बाहुली दिली तर नाही, ना असेच वाटायचे.......खूप गोड होती ती...खूप......

         तिला फिरवताना, तिला कडेवर मिरवताना मी जणू जगाला, माझा सोबती बनवलय अस वाटायचं... हो खूप खेळकर होती आणि तिने विचारलेल्या असंख्य प्रश्नांवर  मला नवीन उत्तरे तयार करण्याची संधीही मिळायची..

        घरात मी बाबा आई आणि ती, बस्स एवढेच त्यातही मला दूरच ठेवलेले..वडिलांच्या त्या लहानश्या पगारावर माझ्या बाहुलीचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून किती धडपडायचे माझे बाबा...

       अधून मधून त्यांची पत्र यायची. पण पत्र सहा सात ओळींच्या वर कधी जाताना मी बघितलेच नव्हते... सर्व खुशाल, सर्व मजेत, तू कसा आहेस, बरा आहेस ना, आमची काळजी करू नकोस आम्ही सर्वजेट आहोत...बस्स एवढचं आणि पत्र संपून जायचं, बहिणी बद्दल एक अवाक्षरही नाही.... रक्षाबंधांलाही फक्त रखीच यायची...बाकी काहीच नाही
       खरंच, पत्र वाचून झाल्यावर खाली वडिलांचे नाव मी कित्येकदा परत परत वाचायचो.. त्यांनी बहिणी बद्दल का काही लिहिले नाही ... या प्रश्नाचे उत्तरच मिळायचे नाही...

बाबांनी आजवर पाठवलेले शेकडो पत्रं मी जमवली होती...बाहुलीची आठवण आली म्हणजे वडिलांनी कुठल्या तरी एका पत्रात तिच्या बद्दल लिहिले असावे .. या आशेने मी सारे पत्रं पिंजून काढायचो..पण काहीच मिळत नसायचे...

का असे बाबा कठोर वागत असतील का मला तिच्यापासून दूर ठेवत असतील....ह्या प्रशांची उत्तर मला मिळता मिळत नसे....

मी जेमतेम १३, १४ वर्षाचा होतो आणि ती  ४, ५ वर्षाची, बाबांनी मला काकांसोबत परदेशी पाठवून दिले आणि जणू वर वर संबंधच तुटून जातील एवढे अंतर निर्माण झाले...

आज मी २८व वर्ष जगतोय, मला बाहुलीची खूप आठवण यायची, आताचा चेहरा तो तेंव्हासारखाच दिसत असेल का असे नेहमी वाटायचे पण.... कुठूनच उत्तर मिळत नसायचे,
आपल्याला भिन असून पण आपण बहिणीपासून दूर आहोत ह्याचे अपार दुःख व्हायचे.

शेवटी एक दिवस मी ऑफिसातून बाहेर पडलो....नेहमी सारख मला उशीर झालाच...दिवभराच्या कामामुळे अंग चांगलेच क्षीणले होते...त्यात ट्राफिक मुळे ३ तासांनी घरी पोहचलो... आणि पोहचताच हाती पत्र पडले ...पत्र चांगलेच जाड होते..त्याहून पत्र मोठे असेल म्हणून वाटत होते...

पत्रावर बाबांचं नाव होत...मला आश्चर्य वाटलं बाबांकडून आज एवढ्या मोठ्या पत्र लिखाणाची तयारी कशी काय झाला...त्यांना कसा काय वेळ मिळाला असेल...

मी पत्र वाचायला सुरुवात..

"प्रिय मयूरेश

             कसा आहे, बरा आहेस ना. खूप दिवसंपासून तुला काही सांगायचं होत ते आज सांगतोय...काय करू खूप उशीर झालाय तुला सांगताना.....सांगतानाही मन घट्ट करून सांगतोय तुला.

              तू म्हणायचास ना माझ्या बहिणीचा फोटो पाठवा म्हणून, अरे आमचीही खूप इच्छा असायची तुला फोटो पाठवायची, काय कठीण होत त्यात, पण एक जरी फोटो पाठवला असता तर तू तिला ओळखलही नसतंस, कारण तीचा फोटो काढता येईल अश्या परिस्थितीत ती नव्हती. तीन वर्षांची होती ती फक्त आणि तिच्या आयुष्याला निर्जीव खेळणं बनवून टाकणाऱ्या एका दुर्धर आजाराची ती शिकार झाली. लहानपणी तिला सणानिमित्त आम्ही गावी घेऊन गेलो, आमचाही कामात असताना तिच्याकडे दुर्लक्ष झालं. ती ही तिच्या खेळण्यात गुंतून गेली. खेळता खेळता तिला एका किड्याने दंश केला आणि तीच आयुष्य चार भिंतीच्या आड कोंडल्या गेलं.
              चार भिंतींमधल्या त्या एका खाटीवरून ती कधी उठुही शकली नाही, दिवसेंदिवस तिच्या खालावत जाणाऱ्या तब्बेतीने आमचीही धावपळ सुरू झाली, तिच्यावर आलेली ही परिस्थिती बघवत नव्हती आणि अधून मधून येणारे पत्र त्यांना काय उत्तर द्यायचं म्हणून हे ही कळत नव्हतं, तुझ मन लगणार नाही म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही, म्हंटल हिची तब्बेत सुधारली तेव्हा सांगू. त्यामुळं आम्ही तुला सर्व खुशाल आहे म्हणून कळवत राहिलो, तू तुझं सर्वच सोडून इकडे आला असतास आणि तिकडचा सार काही अस्थिर केलं असतंस. म्हणून आम्ही तुला पत्रात कधी खर सांगू शकलो नाही.
             तिच्या आजारपणानं तिचं बालपण हिरावून घेतलं, उरलं सुरलं आयुष्य आता तिला चार भिंतींतच काढायचे होतं, सुरुवातीचं तिला दवाखान्यात नेणं हेच तीच शेवटचं बाहेरच जग पाहणं झालं. आईनेही रडून रडून तुझी आठवण काढत घर डोक्यावर घेतलं. त्या आजाराची लागण होऊ नये म्हणून दुसरं कुणी लहान मुलं त्या खोलीत येतही नव्हतं..
             डॉक्टरांनी तिला 2 दिवस दवाखान्यात ठेवलं, आणि आजार खुप गंभीर आहे त्यावर इलाज उपलब्ध नाही अस कारण देऊन तीला घरी न्यायला सांगितलं.. एक जिवंत शरीर आम्ही त्या दिवशी घरी आणलं होत. तिच्या शरीरात खूप बदल झाले, हळू हळू तिने जागेवरून हलण सुद्धा बंद केलं, तिचा फक्त श्वाशोश्वास आम्हाला ऐकू येत होता.. तिच्या शरीराने साथ सोडली होती, आधी थोडं जेवण जात होत, तेही काही दिवसांत बंद झालं आई तिला कशी बशी रोज भरवते.. थोडं जात होतं पण शरीरात आतून झालेले फोड तिला जिवंतपणी मारत जात होते..खूप विचित्र आयुष्य जगतीये रे ती..सांग ना कस सांगू शकलो असतो मी तुला...तिला पाहून आम्हाला ही रडायला येत रे..पण आम्ही काहीच करू शकत...खूप दवाखान्यांमध्ये तिला दाखवलं पण कुणीच निदान करायला तयार होत नव्हत... तोंडातून तिच्या कधी कधी तुला हाक मारता येईल एवढंच ती बोलते रे....खूप आठवण येते तिला तुझी
             तूझ जमत असेल तर येशील का...?"
   
तुझे वडील


       पत्र संपलं, नी डोळे नदी सारखे वाहत होते, एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून त्यांनी लपवून ठेवली होती, मला त्यांचा राग येत होता आणि छकुलीची काळजी वाटत होती...इथून निघून जाऊन तिला मिठीत घ्यावं, आणि दूर कुठेतरी फिरायला घेऊन जावसं वाटत होतं.
        मी समान पॅक केलं आणि घरा कडे निघालो.. दुसऱ्या दिवशी घरी पोहचलो तर समोर दिसणार चित्र मला हेलावून टाकणार होत...
        तिच्या मृतदेहाची तिरडी बांधल्या जात होती. आई धाय मोकलून रडत होती, काही शेजारच्या स्त्रिया आईला संभाळत होत्या.. तीच रडणं थांबत नव्हतं.. बाबा रडत रडत तिरडी बांधण्यात मदत करत होते.
        जाता जाता मला तिचा चेहरा सुद्धा पहायला मिळाला नाही. तिरडी जाणार म्हणून मी समान टाकलं आणि तिरडी उचलून पुढे जाऊ लागलो..बाबांच्या आणि माझ्या डोळ्यांत फक्त पाणीच उरलं होतं...

माझी छकुली