Jatra - Ek bhaykatha - 3 books and stories free download online pdf in Marathi

जत्रा - एक भयकथा - भाग ३

तो एका झोपडीत होता . झोपडी यासाठीच म्हणायचं कारण ती लाकडाची होती पण एकदम आलिशान होती . तो एका लाकडी पलंगावर खोलीच्या एका बाजूला होता . त्याला लागूनच एक लाकडी कपाट होतं, त्याच्यावर अतिसुंदर वर्तुळाकार आरसा होता. त्यावरून खोलीतील दिव्याचा प्रकाश परावर्तित होऊन खोलीभर पसरला होता . खोली सुंदर सजवली होती .

“ आयला रम्या आपल्या काटेवाडीच्या जंगलात असला बंगला हाय ते आपल्याला कसे माहीत नव्हते रे “ गण्या शुद्धीवर येत म्हणाला. आम्हाला तर कुठे माहीत होतं तेवढ्यात समोरचं दार कुरकुरीत उघडू लागलं . तिघेही प्रतिक्षिप्त क्रिये मुळे भलतेच जास्त सावध होत आक्रमक पवित्र्यात आले.
“ अरे घाबरू नका मीच आहे “ एक इसम आत येत बोलला. राम्या व मान्या त्याच्याकडे बघत परिचयाचे हसले . “ तुम्ही आहात होय आम्हाला वाटलं ते पाद्र्याचं भूत आहे ” गणाच्या तोंडावर प्रश्नचिन्ह बघून राम्या म्हणाला त्यांनीच आपल्या सर्वांना वाचवलं आहे नाही तर आपलं राम नाम सत्य झालं असतं ..
गण्या उठून बसत म्हणाला “ कोण आपण ? “ क्षणभर विचार करून शांतपणे तो इसम म्हणाला ” मीच तो पाद्री “ तेव्हा तिघांचीही भीतीने गाळण उडाली. तिघेही भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागले . इतकावेळ मराठमोळा वाटणारा त्याचा वेश हळूहळू पालटू , लागला त्याच्याभोवती त्याला झाकून टाकणारे छोटे-छोटे काळसर ढग जमू लागले. मग दोन-तीन सेकंद तो पूर्ण अंधारात गडप झाला .

त्याच्यांंपुढील खुर्चीत बसत तो म्हणाला “ I am the Priest of this Church “ त्याचा पोषाख पुर्ण बदलला होता . पाद्री लोकं घालतात तसा पायघोळ झगा घातला होता . गळ्यात क्रूस होता आता तो एक इंग्रजी पादरी वाटत होता. त्याचं इंग्रजी तर यांची खात्रीच झाली की हेच त्याचं भूत . पुन्हा एकदा ते मृत्युच्या दाढेत अडकले होते . अशा गंभीर परिस्थितीतही राम्या त्याला म्हणाला की “ मग तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं काय बोलू शकता ? “ हा प्रश्न ऐकून पादरी जो हसत सुटला तो थांबेचना . “ अरे मी भुत आहे आणि तसंही मला मरण या अगोदरच मराठी येत होतं “

मग गण्या म्हणाला “ आम्हाला मारलं कसं नाही “
“अरे काय रे भुतांना माणसाला त्रास देण्याशिवाय दुसरी कामे नसतात असं तुम्हाला वाटतं काय ”
“ नाही तसं नाही तुम्ही लई जणांना मारलं म्हणून म्हटलं “
“ मी फक्त पाटलाला मारलं कारण त्यान मला शेवंताशी लग्न करून दिले नाही म्हणून “
“ मग तिथंन पुढं. माणसं मरायला चालू झाली त्यांना कोणी मारले “
“ जंगलात चालते ती सारी पाटलाच्या भुताटकीची करामत आहे “
“ काय “ ते तिघेही चाटच पडले.
“ आतातर तुम्ही एक नमुना बघितला राम्याला झाडांनी व वेलींनी धरून स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला तरं मन्या जमीनी गिळण्याचा प्रयत्न केला आणि गण्याला आगीने आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला “
“ मग तुम्ही आम्हाला का वाचवलं ? “
“ मग काय मरू द्यायचं होतं की काय ? “
“ पण पाटील तर मेला आहे ना आणि त्याच भूत कुणी बघितलंय “
मी सगळं सुरुवातीपासून सांगतो काय झालं ते त्या पाद्रीने सांगायला सुरुवात केली ……

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी भल्याभल्यांना वेड करते . प्रेमासाठी माणूस काहीही करायला तयार होतो . माझेही शेवंता वरती प्रेम होतं . तिच्यासाठी मी काहीही करायला तयार होतो . अगदी काहीही म्हणून तर मुंबईमधील चांगली प्रोफेसरची नोकरी सोडून मी इथे आलो असतो . हो मी मूळचा पाद्री नाही आणि मी शेवंताच्या प्रेमात गावात आल्यावरती पडलेलो नाही . मी मुंबईत त्याच कॉलेजमध्ये शिकवायला होतो जिथे शेवंता शिकायला होती. तिथेच आमची ओळख झाली , ओळख मैत्रीत,आणि मैत्री प्रेमात बदलली . आम्ही दोघे एकमेकांवर खुप प्रेम करायचो .