Ye g gourabaai - 2 books and stories free download online pdf in Marathi

ये ग गौराबाई - २

काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात.
काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळे मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात.
सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात.
काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात.नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.

गौरी आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते
प्रथम जेथे गौरी बसवायच्या असतील त्या चौकोनी जागेवर एक कोरे कापड अथवा खण अंथरला जातो .
प्रत्येक घराच्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून गौर आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या सुवासिनीचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत याआधीच रांगोळीने गौरीची पाउले काढुन त्यवर हळदकुंकू वाहिलेले असते .
त्या पावलावर ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी सुवासिनीच्या मागून ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत नाद केला जातो.
गौरी आणतेवेळी "गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली" असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पध्दत आहे. उंबरठयावरती धान्य भरून माप ठेवतात.
दोन्ही सवाष्णींनी उंबरठयाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

असे केल्याने त्यांची सर्व घरावर कृपादृष्टी राहते असा समज आहे .
त्या सर्व ठिकाणी त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.
नंतर धान्याने भरलेले डबे एकमेकावर ठेऊन त्याभोवती धान्याची आरास रांगोळी रुपात केली जाते त्याला चौक मांडणे असे म्हणतात . गौरीची स्थापना धान्याने भरलेल्या डब्यात केली जाते .

तिला साडी नेसवली जाते व सोबत खण ठेवला जातो .

दरवर्षी नवीन साड्या त्यांना नेसवून त्या साड्या प्रसाद म्हणून नंतर घरच्या बायका नेसतात .
यानंतर तिला विविध प्रकारच्या दागिन्यांनी सजवले जाते जसे की मंगळसूत्र ,पुतळ्याची माळ, लफ्फा ,हार ,चिताक त्यावर कापसाची गेजवस्त्रे घातली जातात .डोक्यावर शेवंती अथवा मोगरा अबोली असे गजरे घातले जातात .
ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोघीजणी एकमेकींच्या बहिणी असतात .
या दोन्ही गौरी जिथे आणल्या जातात तिथे त्याना साड्या दागिने हे पण एकसारखे आणले जातात .
अशी गौर सजवून झाल्यावर त्यांची यथासांग पूजा केली जाते .
त्यांना फुले ,हार अर्पण केले जातात .

त्यांची खणा नारळाने ओटी भरली जाते .
व गणेशाची आणि गौरीची आरती केली जाते .
यानंतर प्रार्थना म्हणून अक्षता वाहिल्या जातात .
या दिवसानंतर रोज संध्याकाळी गणपतीच्या आरतीमध्ये गौरीची आरती ही म्हटली जाते .
यानंतर त्यांना त्या दिवशी कोरड्या फराळाचा नेवेद्य ,जसे की रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू, करंजी ,पेढे ,बर्फी तसेच सफरचंद केळे ही फळे दाखवतात .

पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला शेपूची भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे.
जिथे अशी पद्धत आहे तिथे कोरडा फराळ नैवेद्य गौरीला दुसर्या दिवशी सकाळी दाखवला जातो
गौरी सोबत शंकरोबा आणला जातो वल्कले नेसलेला .गळ्यात नाग घातलेला असा हा शंकरोबा असतो
दुसर्‍या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. त्या दिवशी गौरी साठी अनेक पदार्थांनी भरलेले जेवण असते .
सकाळी गौरींची पूजा-आरती करून तिला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद् दाखवला जातो .
शिवाय नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी असते .

हे केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर गौरीसमोर वाढले जातात.
पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात
यानंतर गौरीची कहाणी वाचली जाते

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात होता.
भाद्रपद महिना आला. घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या, रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिले.
मुले घरी आली. आईला म्हणाली , आई, आई, आपल्या घरी गौर आण आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करूं ? तिची पूजापत्री केली पाहिजे, तिला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर काही नाही. तुम्ही बाबांजवळ जा, बाजारातुन सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौर आणीन.
मुले तिथून उठली, बाबांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा,सामान आणा, म्हणजे आई गौर आणील !

मुलांचा हट्ट ऐकुन ब्राम्हणाला फार दुःख झाले. सोन्यासारखी मुले आहेत, पण गरिबीमुळे त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. या गरिबीपेक्षा मरण बरं म्हणून उठला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला.
इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण आहे म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितली.
म्हातारीने त्याला शांत केले. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले.

बायको घरात गेली आणि आंबिलीकरिता कण्या पाहू लागली. तो घरातले रिकामे मडके कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले.
तिला मोठे नवले वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला.
पुढे तिने भरपूर पेज शिजवली .सगळ्यांनी पोटभर खाल्ली व सगळे जण आनंदाने झोपी गेले .

क्रमशः