Baji - A blood war - 1 books and stories free download online pdf in Marathi

वेढ्यातून सुटका - भाग-१

भाग १ : वेढ्यातून सुटका

(प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.)

धो-धो बरसणारा पाऊस अन घोंघावणारा वारा आपल्याच तालात झाडाझुडपांना नाचवत होता. विजांचा कडकडाट अन ढगांच्या गडगडाटांसह बरसणाऱ्या शंभूरूपी निसर्गाने रौद्र रूप धारण करून जणू तांडवनृत्यच चालवले होते. डोंगर दऱ्यांतून अन कड्या-कपारीतून खळखळ वाहणारे पाणी पांढऱ्याशुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. सकाळचा प्रहर अन मध्यरात्रीचा काही घटकांचा वेळ सोडला तर पावसाची रिपरिप अखंड चालू होती. गडावरून वेगाने वाहत येणारे पाणी आणि धो धो कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त केला गेला होता. पावसाळी छपऱ्या, डेरे, जनावरे अन सामान यांचे नुकसान होऊ नये म्हणून ठीक ठिकाणी चर खोदून पाण्याला वाट करून दिली होती. तसेच मोठमोठाले दगड, शिळा यांचा वापर छपऱ्या अन डेरे यांच्या खाली व्यवस्थित केला होता, त्यामुळे पाण्याने होणारी ओलही आटोक्यात आली होती.

स्वराज्याची दक्षिण राजधानी म्हणून ओळख असलेल्या पन्हाळागडाला आदिलशाही फौजेच्या तीस हजारांच्या आसपास सैनिकांचा वेढा पडून अंदाजे चार महिन्यांचा काळ उलटून गेला असेल. पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले होते. पण आदिलशाही फौज तसूभरही मागे हटायला वा वेढा ढिला सोडायला तयार नव्हती. तशी सक्त ताकीदच या मोहिमेचे नेतृत्व असलेल्या आदिशहाच्या मातब्बर सरदाराने सगळ्यांना दिली होती. कामात चुकराई करणाऱ्यांची गर्दन कैक वेळा मारली होती. त्यामुळे हर एक हशम जिवाच्या भीतीने आपलं काम चोख बजावत होता. स्वराज्याचे सरसेनापती असलेल्या नेताजी पालकरांनी सुद्धा कैक वेळा वेढा फोडण्याचं काम केलं होतं. पण आदिलशहाच्या कडव्या फौजेने त्यांचा काही निकाल लागू दिला नव्हता. गनिमी काव्याने छुपे हल्ले होत होते, शिवाय गडावर रसद पोहोचवण्याचे प्रयत्नही केले गेले पण त्यांनाही यश मिळत नव्हते. आता जेमतेम अजून दोन तीन महिने गड तग धरू शकेल एवढी रसद शिल्लक होती.

अफजल खानाप्रमाणेच आदिशाही दरबारामधे शिवाजीराजाला जिवंत पकडून आणण्याची शप्पथ घेऊन आलेला सिद्दी जौहर, "शिवाजी राजांची पूर्ण शरणागती बस्स." एवढाच हट्ट धरून बसला होता. राजांच्या वकीलांमार्फत चालवलेल्या तहाच्या बोलणीतील एकाही मुद्द्यावर बोलायला वा तह करायला सिद्दी तयार होत नव्हता. अगोदरच एवढे दिवस एकाच ठिकाणी अडकून पडल्यामुळे आणि स्वराज्यावर उत्तरेकडून मुघलांनी उघडलेल्या मोहिमेने राजे चिंताक्रांत झाले होते. प्रतिऔरंगजेब म्हणून ओळखला जाणारा औरंजेबचा सख्खा मामा शास्ताखान पुण्याजवळ चार महिन्यांपासून तळ ठोकून होता. त्याचाही बंदोबस्त करणे आवश्यक होते. आता लवकरात लवकर पन्हाळा सोडणे गरजेचे होते. राजांनी वकीलामार्फत सिद्दी जौहर ला शरण जात असल्याचे अन एक दोन दिवसात भेट घेणार असल्याचे कळवले होते. नाईकांच्या हेरखात्यातील लोकांनी सुद्धा सिद्दीच्या फौजेत, राजे आता लवकरच भेटणार, सगळे गडकोट आदिलशाहीच्या हवाली करून स्वतः शरण जाणार म्हणून अफवा पसरवल्या होत्या. चार महिन्यांच्या अविश्रांत वेढ्याच्या कामामुळे फौजेमध्ये सुद्धा आता निर्धास्तपणा आला होता. उद्याच शिवाजी राजा जौहरला भेटायला येणार, अन आपण दोन तीन दिवसांत आदिलशाही मुलखात पुन्हा जाणार या विचारानेच जौहरची फौज वेढा सैल सोडून निवांत नाचगाने अन मद्य घेण्यामध्ये मश्गुल झाली. शिवाय, नाईकांची माणसं सुद्धा फौजेत मिसळून गेली होती. गुप्तहेरांनी आणलेल्या नव्या खबरीप्रमाणे, गडाच्या मागच्या बाजूने आता वेढा पातळ झाला होता, तसेच त्या बाजूला आपलीच माणसं नाईकांनी आधीच पेरून ठेवली होती. दिवस आणि वक्त निश्चित झाला होता.

दिनांक १२ जुलै १६६०, रात्रीचा प्रहर, घटका दोन घटकांचा वेळ झाला होता. काळाकुट्ट अंधार अन वरून धो धो पाऊस कोसळत होता. योजनेप्रमाणे बाजी अन फुलाजी या बांदल बंधूंनी राजांना खेळणा गडावर सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. त्याच बरोबर संभाजी जाधव, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह हे शूरवीरही साथीला होते. जीव गेला तरी बेहत्तर पण राजांना मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं एकच ध्येय आज उराशी बाळगून राजांच्या पालखी पासून काही अंतरावर फुलाजी शंभर दिडशे कडवे बांदल घेऊन समोर धावत होता. राजांसोबत खुद्द बाजी त्याचे पाच सहाशे मावळे, जंगलातून वाट काढत गड उतार होत होते. पावसाच्या जलधारांनी सारे मावळे ओलेचिंब झालेले होते. अनवाणी पायाने काटेकुटे, खाचखळगे, पावसाच्या पाण्याने भरलेली डबकी अन चिखल तुडवत ते पाच सहाशे वीर आपल्या राजाला सिद्दी जौहरचा वेढा फोडून सहीसलामत घेऊन जात होते. पन्हाळा गडाच्या मागच्या बाजूने वेढा ज्या ठिकाणी सैल झाला होता, त्या दिशेने सगळे धावत होते. बहिर्जीच्या नजरबाजांनी चोख कामगिरी बजावली होती. ज्या ठिकाणाहून राजे मार्गक्रमण करणार तिथेच आज बहिर्जीची माणसं पहाऱ्यावर असणार होती. जर काही दगा फटका झालाच तर फुलाजी अन ते येणाऱ्या शत्रूला सामोरे जाणार होते. तुटक तुटक ठिकाणी असलेल्या राहुट्या अन डेरे दिसू लागले, तसं फुलाजीने एक वेगळ्या प्रकारची शीळ वाजवली. समोरूनही तशाच प्रकारचा काहीसा प्रतिसाद ऐकू आला. परिस्थिती अनुकूल असल्याची ती खूण होती. बाजीही तोवर राजांच्या पालखी सोबत जवळ आलाच होता.

फुलाजी, "बाजी, तु राजांना घिऊन फुडं व्हय. तवर म्या थांबतो हितं. आन थांबू नगा कुटं बी. म्या हाय मागं."

बाजी, "आरं दादा पर.."

बाजीचं वाक्य अर्धवट तोडत फुलाजी म्हणाला, "पर न्हाय ना बिर न्हाय. गपगुमान निघा. राजांना सहीसलामत खेळण्याव न्या. निघा sssssss."

क्रमशः

"जय जिजाऊ"
"जय शिवराय"