Aala Shravan manbhavna - 8 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

आला श्रावण मन्भावान भाग ८ - अंतिम भाग

आला श्रावण मनभावन भाग ८

श्रावणातला रविवार या दिवशी सूर्यपूजा केली जाते
श्रावणाच्या केवळ पहिल्या रविवारी हे व्रत करण्याची प्रथा आहे.
हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. स्नानानंतर विड्याच्या पानावर सूर्याचे चित्र रक्तचंदनाने काढावे. बाजूला एका वर्तुळात षट्‌कोण काढावा. नंतर सहापदरी दोऱ्याला सहा गाठी मारून मग (सूर्यचित्र, षइकोन आणि सहा गाठी मारलेला सहापदरी दोरा) ह्या सर्वांची एकत्रित पूजा करावी. एका सवाष्णीला जेवावयास घालावे.
ह्या व्रताच्या देखील दोन कथा आहेत.

राणूबाई ही सूर्याची पत्नी, तिची पूजा ह्या व्रतात केली जाते. तिची कथा न ऐकल्याने एका राणीला दारिद्र्यावस्था प्राप्त झाली. तिने पश्चात्तापदग्ध होऊन आदित्य राणूबाईची पूजा केल्यावर तिला पुन्हा गतवैभव लाभले. अशा आशयाच्या ह्या कथा आहेत.

आजही खानदेशात हे व्रत विशेष प्रचलित आहे. खानदेशातील बऱ्याच घरांमध्ये कुठल्याही मंगलकार्याच्या आधी राणूबाई आणि सूर्याचे लग्न लावण्याची रीत आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सूर्यपूजा करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे. त्यापैकीच ही एक प्रथा म्हणावी लागेल.
आपण तुळशीचे, अश्र्वत्थाचे लग्न लावतो. तसे हे आदित्य- राणूबाईंचे लग्न म्हणावे लागेल.
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, "काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा."
" तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं."
तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं उठावं, स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गाठी द्याव्या. पानफूल वहाव, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळाखोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण कराव.
संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहूण जेवू सांगाव. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाच उद्यापन कराव." असा वसा ब्राह्मणान केला.
त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावण धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीन सांगितलं, " भिऊ नका, कापू नका, तुमच्या मुली आमचे येथे द्या" "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या?
दासी कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, " दासी करीत नाही, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू."

ब्राह्मणानं लग्न करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीने बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाब बाबा, गूळ खा पाणी प्या." गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक." तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा शिकारीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल.
हे ऐकुन त्याला राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या." " गूळ खात नाही पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. " तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू?" घरांत गेली, उतरडीची सहा मोत्ये आणली. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला.
बायकोनं विचारलं, " मुलींचा समाचार कसा आहे?" जिनं कहाणी ऐकली नाहीं, ती दारिद्रयाने पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे." इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. "मावशी तिकडे सुखात आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये."

पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला." अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" " आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे." "कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे." ‘परसदाराने घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. "वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला.
हातीचा कोहोळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माच फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्‍या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अग अग दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. " बाबा, ठेवू नको. विसरू नको. जतन करून घरी घेऊन जा, " म्हणून सांगितल. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. "दैवे दिलं, ते सर्व कर्मानं नेलं."

पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊं माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनी भरून दिला. " ठेवू नको, विसरू नको." म्हणून सांगितलं, घरी जाताना विहिरीत उतरला. तिथे हातात्तला नारळ विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं. " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं."

चवथ्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊ माखू घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपान आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "आई मावसशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं."

पाचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घातलं माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. " काय वसा करतेस तो मला सांग."
बहीण म्हणाली, "तु बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं."
राजाच्या राणीनं विचारलं,
कसे करायचे हे व्रत ?तिने समजावून सांगितले .
मग श्रावणामास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली.
इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. "मावशी मावशी, तुला राजाचे बोलावणे आले आहे .
बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो खरेच राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली.

राजाच्या राणीला जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
अशी ही श्रावण मास महती !!!

समाप्त