Aala Shravan manbhavna - 3 books and stories free download online pdf in Marathi

आला श्रावण मनभावन भाग ३

आला श्रावण मनभावन भाग ३

मंगळागौरीची कथा अशी सांगतात .

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता.

त्याला कांहीं मुलगा नव्हता.

त्याच्या घरीं एक गोसावी येई. ‘अल्लख’ म्हणून पुकार करी.

वाण्याची बायको भिक्षा आणी. पण “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,

असें म्हणून तो निघून जाई .

ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, ‘अल्लख’ म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” तिने अशी भिक्षा झोळींत घातली.

गोसावीबुवाचा नेम मोडला. तो बाईवर फार रागावला.

‘मूलबाळ होणार नाहीं’ असा शाप दिला.

तिनं त्याचे पाय धरले. गोसावीबुवांनी उःशाप दिला.

ते म्हणालें, “आपल्या नवर्‍याला सांग. निळ्या घोड्यावर बस.निळी वस्त्रं परिधान कर.

रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण.

देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून गोसावीबुवा निघून गेले .

तिने आपल्या पतीला हे सर्व सांगितलं.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं.

सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे.

मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली,

“वर माग” म्हणाली. तो म्हणाला“घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली,

“तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झालें आहे तर ते मी तुला देतें.

अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.”

त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला.

देवीने “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपती आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊं घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले.

खालीं उतरून पाहूं लागला, तों आपल्या मोटेंत आंबा एकच आहे.

असं चार पांच वेळां झालं. गणपतीला त्रास झाला.

त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरीं आला, बायकोला खाऊं घातलं, ती गरोदर राहिली.

दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला.

मुलगा दिवसामासांने वाढूं लागला.

आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली.

‘काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं’ असा माझा नवस आहे. असा जबाब वाण्याच्या बायकोने दिला.

कांहीं दिवसांनीं मामाबरोबा यात्रेस पाठविलं.

मामाभाचे काशीला जाऊं लागले.

जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं.

तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं होते.

एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली,

“काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे!

तेव्हां ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाहीं. मग मी तर तिची मुलगी आहे.”

हें बोलणे मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हीच्याशीं भाच्याचं लग्न करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल.

परंतु हें कसे घडेल ?

त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला.

इकडे काय झालं? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं.

लग्नाचे वेळेस नवरा मुलगा अचानक आजारी झाला .

मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली.

पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले मामाला विचारून भाच्याला नेलं.

गोरज मुहूर्तावर लग्न लावलं.

उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं.

मुलीला देवीनं स्वप्नात दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्‍याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कर्‍यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.”

तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले.

फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशीं काय झालं? हीने सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं.

आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला.

आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला.

पुढं पहीला वर मांडवात आला.

मुलीला तिथे खेळायला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.”

रात्रींची लाडवांची व अंगठीची खूण कांहीं पटेना.

आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडेल?

नंतर त्यांनीं त्यासाठी अन्नछत्र चालू केलं.

जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला.

शेंकडों लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले.

एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली.

यमदूत त्याचे प्राण न्यायला आले.

मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं.

यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली.

भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.”

मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं.

उद्यां आपण घरीं जाऊं.” परत येऊं लागले.

लग्नाच्या गांवीं आले. तळ्यावर स्वयंपाक करूं लागले.

दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.”

ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.”

दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनीं पालखी पाठवली.

आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्‍याला ओळखलं. नवर्‍यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?”

त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला.

भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले.

सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वांचला” असं म्हणाली.

तिनं सांगितलं..आमच्याकडे मंगळागौर व्रत करतात , ही सगळी मंगळागौरीचीच कृपा आहे .”

मग सासर माहेरचीं घरचीं दारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो,इतकीच देवाची प्रार्थना करा.

ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

क्रमशः