Ashtavinayak - 2 books and stories free download online pdf in Marathi

अष्टविनायक - भाग २

अष्टविनायक भाग २

श्रींच्या मूर्तीची आख्यायिका अशी सांगितली जाते ..

फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता.

त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू.

सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला.

त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला.

अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली.

इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली.

इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले.

पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना.

सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली.

मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही स्वारी करण्याचे ठरवले.

सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले.

तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरु केली.

प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले.

मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन.

सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते.

पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, ''आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे.' याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, 'सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे.''

गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला.
त्याने कमलासुराचा वध केला.
कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले.
कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र.

मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली.

तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले.

भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरून ब्रम्हा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून गणेश पिठाची स्थापना केली.

येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली होती.

पुढे पांडव तीर्थयात्रा करीत करीत येथे आले असताना त्यांनी मूळ मूर्तीला कुणाचा धक्का लागू नये म्हणून तिला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त करून ठेवली.

आणि हल्लीची मूती नित्यपूजेसाठी स्थापन करण्यात आली. असे म्हणतात की, सध्याची मोरेश्वराची मूर्ती मूळची नव्हे. खरी मूर्ती रत्नांचा चुरा, लोह आणि माती यांनी बनलेली असून ती दृश्य मूर्तीच्या मागच्या बाजूला ठेवण्यात आलेली आहे.

चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्म स्थान असुन त्यांना येथे क-हा नदीच्या पात्रात गणेश मूर्ती सापडली होती त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली.

मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे.

वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून येथे येते.

चारशे वर्ष पूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली व संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला.

गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे.

त्यांना २२८ वर्षाचे आयुष्य लाभले असे म्हणतात .

येथील त्यांची समाधी व ध्यान मंदिर दर्शनीय आहे.

मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे.

मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी ’सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती उत्स्फुर्तपणे रचली.

येथील विजया दशमीचा उत्सव रात्रभर चालतो.

मंदिरातील देवकार्य अशा पद्धतीने चालते .

सकाळी ५ वाजता प्रक्षाल पूजा (गणपतीचे स्नान) होते .

सकाळी ७ वाजता शोडपचार पूजा, दुपारी १२ वाजता दुसरी शोडपचार पूजा, रात्री ८ वाजता पंचोपचार पूजा आणि रात्री १० वाजता शेजारती केली जाते.

माघ शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी या दोन दिवशी भक्त मोठ्या प्रमाणावर मयुरेश्वराचे दर्शन घेण्यास गर्दी करतात.
या दोन्ही दिवशी चिंचवड येथे संत मोरया गोसावी यांनी स्थापिलेल्या मंगलमुर्ती मंदिरातून भक्तगण पालखी घेऊन येतात. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात मयूरेश्वराच्या मंदिरात जत्रा भरते. विजयादशमी आणि सोमवती अमावस्या हे दिवससुद्धा साजरे केले जातात.


दुसरा गणपती ..

यानंतर केला गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक . श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे..

भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे.
दौंड रेल्वे स्टेशनपासून जलालपूर एस टी फाटा आहे . त्या फाटयाजवळ सिद्धटेक नावाचे लहानसे गाव आहे . भीमा नदीतून नावेने सिद्धटेक येथे जाता येते . मात्र जिल्हा बदल असल्यामुळे नावेची वाहतूक एकेरी आहे

या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते.
हे मंदिर उत्तराभिमुख आहे.
मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे.
महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे.
या मंदिराचा गाभारा 15 फूट उंच आहे .
मंदिरातील सिद्धिविनायकाची शेंदूर लावलेली मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे.

सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो.

गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत.
प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

गाभा-यातील मखर आणि महिरप पितळेची असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत. गणपतीचे सिंहासन पाषाणाचे आहे.

क्रमशः