perjagadh - 6 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ६


मला जाग आली तेव्हा मी जंगलात नव्हतो.बदामाच्या झाडाखाली एका चारपायी वर लेटलेलं स्वतःला बघितलं. आजूबाजूला बघितलं तर दोन-तीन झोपळ्या होत्या. मोहक फुलांचे बाग सजल्याप्रमाणे जिकडेतिकडे फुलांची झाडे होती.समोर काही अंतरावर पटांगणात कबुतरे दाणे टिपत होती.आणि त्या कबुतरासोबतच इतर पक्षी पण प्रेमाने बागडत होते. किती सुंदर वातावरण होतं तिथलं.इथे भेदभाव नव्हता, गर्दी नव्हती, अहंकार नव्हता आणि मुख्य म्हणजे तिथली वस्तुस्थिती अगम्य होती, प्रेक्षणीय होती.

सूर्य जरा बराच डोक्यावर आला होता. मी किती वेळ झोपून होतो याचे मला भान नव्हते, आणि मघापासून झोपूनच मी इकडे तिकडे बघत होतो.किती वेळ झाला? असे म्हणत मी उठायचा प्रयत्न केला, आणि सहज हात डोक्यावर गेला. डोक्याला पट्टी बांधलेली होती. त्यामुळे मी थोडं कन्हनत त्या चारपाईवर उठून बसलो. समोर बघितलं तर एक वृद्ध साधू माझ्याकडे येतांना दिसले.

भगवा वस्त्र परिधान केलेले. त्यांनी दोन्ही हाताच्या दंडांना रुद्राक्षाच्या माळा लपेटलेल्या होत्या.व्यवस्थित केसांची बांधन केली होती.पांढरीशुभ्र दाढी ऊनाच्या सूर्यप्रकाशात छान चमकून दिसत होती. चेहर्‍यावर एक विलक्षण तेज होतं.ओठावर स्मित पसरले होते. स्नेह,माया,ममता त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होती.सत्य म्हणजे काय? हे त्यांच्याकडे बघून कळत होतं.जवळ येताच काळजीने विचारलेला पहिलाच प्रश्न.
बाळ.... कसा आहेस आता? कशी वाटते प्रकृती तुझी?

मी मानेनेच होकार दिला....

भूक लागली असेल ना.... ही काही फळे आहेत ती खाऊन घे. आणि थोडा आराम कर,त्यानंतर आपण सविस्तर बोलू. आणि ते परत निघायला लागले.

मी कुठे आहे? कुणी आणले मला इथे?

सर्व कळेल बाळ तुला... आधी फराळ घे, आणि मग आराम कर. मग संवाद करूयात आपण.

किती आपुलकी आणि काळजी होती त्यांच्या शब्दांत.खरंतर हे एकूणच मला इतकं समाधान लाभलं होतं. की गेल्या दिवसात काय घडलं आणि माझ्या मागे काय लागलंय? हे सुद्धा क्षणभरासाठी मी विसरूनच गेलो होतो.जाताना परत एकदा त्यांचं प्रसन्न हास्य मनाला एक वेगळीच आठवण देऊन गेलं.

थोडाफार फराळ केल्यावर मला ताजेतवाने झाल्यासारखं वाटत होतं . त्यामुळे मी थोडाफार फिरायचा प्रयत्न करू लागलो होतो.त्या सुंदर अशा वातावरणाचा मला मोह लागल्यासारखा होता.तिथून जायचं आहे हा विचारच मनात येत नव्हता. न जाणे किती वेळ मी, कुठे आहे म्हणून बॅगेत पडलेला मोबाईल काढला.उरलीसुरली चार्जिंग जमा झाली का ती बघू लागलो. पण मोबाईल पण चालू व्हायचा नाव घेत नव्हता. दुपारच्या सूर्यप्रकाशाचे निखर सूर्यास्त बऱ्याच चांगल्या प्रमाणात दिसत होते. आणि त्याच वेळेस चेहर्‍यावर एक स्मितहास्य घेत परत ते साधुमहाराज माझ्या जवळ आले.

क्षणभर मी त्यांच्याकडे बघतच राहिलो.साधुमहाराज आले, आणि बाजूला एक वारुळासारखा दिसणारा मातीचा उंचवटा होता.त्यावर जाऊन बसले.मी त्यांच्या डोळ्यात बघितलं. मला कसलीच मोहमाया त्यांच्या नजरेत दिसली नव्हती.त्यांच्या त्या निर्मळ चेहऱ्यावर, फक्त ते खऱ्या प्रकारचे स्वच्छ स्मित ओघळत होते. त्यांच्याकडे बघितल्यावर मला सगळं विसरून, स्वच्छंद विहार करणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होतं. पण शेवटी घडलेला काळ, आणि झालेले प्रकरण वास्तविकता बदलू शकत नव्हते.

नजरेत अधाशी एक झाक आली,आणि मित्रासोबत असलेल्या त्या भेटी डोळ्यासमोरून तरुन गेल्या.आणि नकळत दोन्ही डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. शेवटी मी खाली मान घातली. अस्वस्थ झालेलं मन महाराजांशी बोलण्याची सलगी करत नव्हतं. रडलेले डोळे त्यांच्याकडे नजर वळवत नव्हते त्यामुळे मी उठून उभा झालो. महाराजांनी मला अचूक ओळखलं आणि म्हणाले...

बस बाळा.... उगाच मनाची घालमेल करू नको... ही तर सुरुवात आहे, आयुष्याची तुझ्या...

शेवट आहे महाराज.... शेवट आहे... आणि जर असे जगणे असेल... भीतभीत.... तर मला मृत्यू केव्हाही बरे...

आयुष्याच्या तिटकारा प्रत्येकाला सहन करावा लागतो. मान्य आहे मृत्यू म्हणजे या जगातला सगळ्यात मोठा सुख आहे. पण नियतीलाही उतारचढाव असणे गरजेचे आहे, तुला मृत्यू नकोय.... हेच ना...

मी असं म्हणणार नाही, कारण प्रत्येकाच्या बाबतीत ते असते. पण इतक्यात काय पाप केलं आम्ही?इतर जगतात तसेच आम्ही पण जगलो... काही आमची चूक आहे असं ठरवलं पण नव्हतं की देवाच्या द्वारी जातानासुद्धा आम्हाला शेवटचे बोलावणे होईल. (आणि मी परत रडायला लागलो)

शांता बाळा शांत.... कारण जे घडत आहे, ते तुझ्या बाबतीत फार भयंकर आहे. तुमच्या बाबतीत म्हणजे, जेव्हा मृत्यु तुमच्या मागे लागला होता, तेव्हाच त्याचे समाधान तुझ्या हातात आलं होतं. पण इतरांनी केलेल्या निष्काळजीपणाने तुही त्यात हरवला आहेस. तुला पण ते सगळं खोटं वाटायला लागलं होतं...

मला झालेल्या गोष्टीबद्दल काही माहिती नाही, पण रात्रीचे जे जंगलात बघितलं ते काय होतं...लाल रंगाचे निखारे घेऊन एक भुजंग शेपटीला काहीतरी बांधून निघालेला होता.आजपर्यंत असली विचित्र गोष्ट, मी ऐकली तर नव्हतीच पण कधी बघितली पण नव्हती...

बाळ...
जगात अशा कित्येक जागी सत्वाच धारण बसलंय.आणि तुमच्या चालू असलेल्या जडणघडण मुळे, आता ते सत्त्व लुप्त पद्धतीने वास करते.काल रात्री ज्याची तुला प्रचिती आली ते त्याचंच एक उदाहरण आहे.

म्हणजे ते नेमकं म्हणजे काय आहे?

कितीतरी वर्षांपूर्वीचा इतिहास आहे तो. तो एक श्राप होता, आणि त्यामुळे सोने चांदीची नाणी, व्यवहारातून डांबण्यात गेली, अधिकाराची अंमल कुणाचीच नसायची.साठवलेला पैसा तो शापित व्हायचा.आजही पैशांसाठी लोकांची काय प्रतिक्रिया असते? हे तुला माझ्यापेक्षा हि फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे.त्या काळात भीषण घनघोर युद्ध व्हायचे. जितकं अफाट द्रव्य असायचं, तितकीच भीती असायची.माणसे संपत आली,युग बदलत आलं,पण तो श्राप आजही जिवंत आहे.जगात कित्येक ठिकाणी तो द्रव्यसाठा असा भूमातेच्या गर्भात सुरक्षित आहे.

कित्येक जादूगर, कित्येक चेटक, त्या पैशाच्या आधारावर श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात,आणि प्राणाला मुकतात. त्यामुळे जसे तुमचे नियम बदलतात, तसेच या सृष्टीचे नियम बदलतात.सत्व अजरामर असायचं ते लुप्त व्हायला लागलं. जसं आधी देव माणसात असायचा आता फक्त विश्वासात असतो.आणि आता तर त्यालाही चमत्कार हवा असतो.स्वतःचं अस्तित्व जपायला.

पण मग इतका द्रव्य साठा... भूमातेच्या गर्भात राहून, त्याचा वास्तविकतेसाठी का उपयोग होत नाही?आणि त्याचं संरक्षण हे कोण करतो? कारण त्या एका साठ्याने अनेकांच्या पिढ्या संपतील तरी तो साठा संपणार नाही.

जसा तुमच्या नियोजनानुसार तुम्हाला जितकी आमदनी मिळते.तसच सृष्टीचा नियम आहे, तिच्या उदरात जितक्या सजीवांचे नियोजन होते.तितकीच ती बहरते,कोपते. तुम्ही कितीही चंद्रावर गेले, किंवा कितीही डोकं लावलं. तरी तुम्ही सृष्टीचेच एक भाग आहात.इथे प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी त्याला दिली आहे.आकाशात पक्षी विहार करतात,झाडे पृथ्वीला सौरक्षण करतात. त्याच प्रकारे या द्रव्यसाठयालाही कोणी जबाबदार असतो.त्याची देखरेख करणे, किंवा त्यापासून सुटका करणे हे सगळं त्याच्याच हाती असते.

म्हणजे काल असलेला तो भुजंग!!!

हो....
त्या साठ्या वरचा तो रक्षक होता.आणि जितके वर्ष,काळ तो त्याच संरक्षण करतो. तितकाच तो मोठा होत जातो, केसाळत जातो.जोपर्यंत त्याला त्या जीवनापासून मुक्ती मिळत नाही, तोपर्यंत त्याचं जीवन असच चालत असतं.

दर अमावश्येला त्याची प्रभात फेरी निघते.अंधाराच्या साम्राज्याला लाल रंग हा निडर असतो.त्या टीकमिक होणाऱ्या प्रकाशावर आलेला जनावर, तोच त्याचा भक्ष असतो. आणि जे काही द्रव्यसाठा आहे त्याचा ध्वनी त्याच्या मागे असतो.पण हा द्रव्य साठा आणि संरक्षक असं प्रत्येकाला दिसत नाही.तो त्यालाच दिसतो ज्याच्या कडून त्याला काही अपेक्षा आहेत, किंवा ज्याला त्याबद्दल कसलाही मोह नाही.

पण जर का त्यांना काही हवे असेल, तर मग ते असं मागू शकतात ना....

तुझे म्हणणे रास्त आहे.पण कसं आहे? जितकी जास्त संपत्ती तितकीच जास्त चिंता, जितकी जास्त शक्ती तितकीच जास्त जबाबदारी.जसे एखाद्या जिन्नला बांधून ठेवले होते, कारण त्याच्यात संपूर्ण सृष्टी पालटुन टाकण्याची शक्ती होती. ज्यामुळे तो चांगला आहे, असं माहीत झालं असलं, तरी त्याची शक्ती अशी नजरेच्या आड घेण्यात आली नसती. त्याचप्रमाणे हा भुजंग आहे.तुमच्या विज्ञानाच्या मध्ये सापाचा आयुष्य शंभर वर्षे म्हणजे खूप होतं. पण अजूनही असे काही साप आहेत, जे कितीतरी वर्ष जगू शकतात. ज्यांना अद्वितीय शक्तीचं वास आहे.

गेली कितीतरी वर्षे हा साप फिरतो आहे.कितीतरी जागा त्याने बघितल्या आहेत, आणि कदाचित मृत्यूचे खरे कारण, तुझ्यासाठी त्याच्याकडूनच मिळेल.ज्याच्याकडे ती थैली आहे. सगळ्यात आधी तू ती थैली मिळव. कारण त्या थैलीशिवाय तुला काहीच करता येणार नाही.

पण ती तर माझ्या मित्राकडे आहे.गेले कित्येक दिवस मी त्याच्या शोधार्थ आहे. पण तो मला भेटतच नाही आहे. या चार वर्षात मी माझ्या मित्रांना हरवले आहे, पण त्याला नाही हरवू शकत, पण तो कुठे गेलाय? मला काहीही माहिती नाही.

तुझ्याकडे वेळ फार कमी आहे, तू जितकं जास्त वेळ घेशील, तितकंच तोही तुझ्यापासून दुरावत जाईल.पण लवकरच त्याची आणि तुझी भेट होईल.

मग मला नेमकं करायचं तरी काय आहे?

तुला काय करायच आहे? हे त्या थैलीत सर्वच दिलं आहे, आणि ज्याने तुला ती थैली दिली, आणि सगळ्यांना आव्हान केलं. तो माझा शिष्य गंगाधर आहे.तो तुला मिळेलच. काल त्यानेच तुला येथे आणले, जेव्हा तू भुजंगाला बघून बेशुद्ध पडला होतास.

महाराजांनी अशा बऱ्याच गोष्टी मला पटवून सांगितले. पण मृत्यु का आमच्या मागे लागला? माझा आणि त्या भुजंगाचा काय संबंध होता?नियती माझ्याकडून आणखी काय घडवु इच्छित होती? प्रश्नांचा भडिमार माझ्यावर होऊ लागला होता. शेवटी त्यांनी सांगितलेलं सगळं लक्षात घेऊन, मी त्यांच्या पाया पडलो. आणि मला निघायला हवा असं म्हणालो.

काही वेळाने मला जाग आली.मी अजुनही दाटलेल्या त्याच जंगलात होतो.बघितलं तर रात्री घडलेल्या त्या प्रसंगाचा, काहीही लवलेश तिथे नव्हता. कुठे सरपटण्याची खून नव्हती, की कुठे पायवाट पण नव्हती. पण कुठेतरी कुबट असा वास मात्र नाकाला येत होता.

जिथून ती दुर्गंधी येत होती.तिकडे जाण्याचा प्रयत्न करत होतो.अचानक लक्षात आलं, डोक्यावरची जखम केव्हाच नाहीशी झाली होती.साधू महाराजांनी सांगितल्यानुसार त्यांनी त्यांचं अस्तित्व कायम केलं होतं.एखाद्या स्वप्नील भासातून जागल्यासारखे त्यांनी मला इथे जंगलात आणून सोडले होते.अगदी त्याच ठिकाणी जिथून माझी नवीन सुरुवात झाली होती.

थोडावेळ समोर जाताना झाडीत एक वाघ बसून असलेला मला आढळला.पण आता त्याला बघून मला भीती वाटत नव्हती.मला पाहून त्याचे गुरगुरणे मात्र वाढलं होतं.कारण सहाजिकच आहे मी त्याच्या घरात होतो. परतीचे पाऊल टाकावे तर त्याने हालचाल करण्यास सुरुवात केली होती.

झाडीतून उतरून तो माझ्या समोर आला, आणि मागच्या दोन पायावर बसून एकटक माझ्याकडे बघू लागला. मला वाटू लागलं होतं, जणू काही तो माझ्या डोळ्यातून काही टिपून घेत असावा.पाच ते दहा मिनिटे तो माझ्याकडे एकटक बघत राहीला, आणि मग कुणीतरी त्याला बोलावत आहे अशा पद्धतीने उडी मारून निघून गेला.मला काहीच कळेनासं झालं होतं त्याच्या वागण्याबद्दल. शेवटी मी हायवे वर आलो, आणि लिफ्ट घेऊन गावाकडे परतलो.