Safar Vijaynagar Samrajyachi - 1 books and stories free download online pdf in Marathi

सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १




आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या रुपात तो सुरुच असल्याची समजूत जनमानसात आहे. एकूणच काय तर माणूस आणि प्रवास हा अविभाज्य घटक आहे.
त्यामुळेच की काय, रोजची न चुकणारी कर्तव्ये पार पाडत असताना माणूस आनंद मिळवण्यासाठी, मनावर आलेला ताण हलका करण्यासाठी प्रवास करत असतो. असं मला वाटतं. माझ्याबाबतीत तरी हे तंतोतंत लागू पडते

अशा आयुष्यरुपी प्रवासात एकदा तरी काही ठिकाणं पाहायला हवीत आणि त्या Must visit places मधील एक ठिकाण म्हणजे हंपी..

हंपी नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतं विजयनगर साम्राज्य !!

आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या देशातील या प्राचीन शहरातील वास्तूवरून लक्षात येते. हंपी येथील ऐतिहासिक ठेवा महत्वाचा आहे. म्हणूनच युनेस्कोने हंपीला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.
इ. स.१४ व्या शतकात निर्माण झालेल्या आणि उत्कर्षाच्या उच्च ठिकाणी पोहचलेल्या एका वैभवशाली हिंदू साम्राज्याचे अवशेष आजही तेवढ्याच दिमाखात हंपी इथे उभे आहेत..
हंपी उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना तर आहेच शिवाय स्थापत्य कलेचा अभ्यास करणाऱ्यांशी ज्या आत्मीयतेने इथल्या मूर्ती संवाद साधतात तेवढ्याच आत्मीयतेने त्या सामान्य पर्यटकांशीही बोलतात.

इतिहास सांगतो त्याप्रमाणे जवळ जवळ अडीचशे ते तीनशे वर्षे या साम्राज्याने कोणत्याही सत्तांध मुघल शत्रूला आपल्या जवळही फिरकू दिलं नाही..
हेच कारण असावं, की आजही दक्षिण भारतात स्थापत्य वैभव बऱ्यापैकी टिकून आहे..

राजा हरिहर आणि बुक्क यांनी इथल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि राजा कृष्णदेवराय याने यावर कळस चढवला..
हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी स्थापलेले विजयनगरचे साम्राज्य म्हणजे `जहॉ डाल डाल पर सोनेकी चिडीया करती है बसेरा’ हे वर्णन सार्थ करणारे साम्राज्य होते.

पर्शियन प्रवाशी अब्दुल रझाक याने विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती. तो आपल्या वर्णनात लिहितो ,” माझ्या डोळ्यांनी हंपी इतके अप्रतिम शहर कुठेही पहिले नाही. किंवा त्याच्या तोडीचे शहर दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही.अनेक टेकड्यांवर वसलेल्या शहराला एकामागे एक अशा सात वर्तुळाकार बांधकाम केलेली मजबूत तटबंदी आहे.समृद्धी एवढी कि, भर बाजारात सोने,चांदी,हिरे – मोती केशर यांचे विक्रीसाठी ढीग लागलेले होते. केवळ देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही व्यापारी तेथे येतात.”

पोर्तुगीज प्रवाशी डॉमीगो प्रेस हा विजयनगरच्या राजधानीला म्हणजे हंपीला आला होता. त्याने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिले आहे कि, हंपी हे शहर सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असून जगातील सर्वात संपन्न शहर अशी त्याची ख्याती इराण-इराक पर्यंत आहे.

हरिहर आणि बुक्क यांचे गुरु विद्यारण्यस्वामी होते. त्यांच्या नावारून या दोन बंधूंनी या नगराला 'विद्यानगर' नाव दिले होते.
कालांतराने विद्यानगरचे विजयनगर झाले. हेच
आजचे हंपी!!

हंपी ह्या नगरास पंपा क्षेत्र,किष्किंधा क्षेत्र वा भास्कर क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. रामायणातील वानरराज सुग्रीव याची राजधानी येथेच होती असे म्हणतात.
हंपी हे पंपाचे कन्नड अपभ्रंश रूप होय. येथील प्रमुख ग्रामदैवतास – विरूपाक्षास – पंपापती म्हणतात

हंपी, बेल्लारी जिल्ह्यात होस्पेटच्या उत्तरेस साधारण १० किमी. वर तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यात वसले आहे.

हंपीला जायचे मुख्य मार्ग दोन. पहिला पुणे-कोल्हापूर-बेळगाव-धारवाड-हुबळी-गदग-होस्पेट-हंपी असा आणि दुसरा पुणे-सोलापूर-विजापूर- बदामी-बागलकोट -होस्पेट - हंपी असा.

जवळचे रेल्वे स्टेशन हॉस्पेट आणि विमानतळ बेल्लारी आहे..

हंपीला भेट देण्याअगोदर इथला इतिहास एकदा तरी नक्कीच वाचावा..

आम्हीही खूप वर्षांपासून हंपी बघण्याचे प्लॅन्स बनवत होतो पण काही ना काही कारणाने ते प्रत्यक्षात उतरत नव्हते..

म्हणतात ना.."किसी चीज को अगर चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है"
हा अनुभव मी हल्ली खूप वेळा घेतला आहे.. बऱ्याच वेळा हुलकावणी दिल्यानंतर हंपी टूरचेही असचं ध्यानीमनी नसताना ठरलं..
"महाराष्ट्र देशा" ट्रेकर्स ग्रुपने हंपी बॅग पॅक टूर जाहीर केली.. अन् आम्हाला वाटलं, आमच्या ट्रेकर्स सोबत्यांसोबत जाता यावं आणि हंपी सफर अविस्मरणीय व्हावी म्हणूनच अजून आम्ही दोघं हंपी गेलो नव्हतो..

क्षणाचाही विलंब न करता मी ही टूर बूक केली..