Devayani Development and Key - Part 24 books and stories free download online pdf in Marathi

देवयानी विकास आणि किल्ली - भाग २४

      देवयानी विकास आणि किल्ली.

पात्र परिचय

 

विकास                          नायक

देवयानी                         नायिका  

सुप्रिया                         देवयानीची मैत्रीण

लक्ष्मी                          सुप्रियाची रूम पार्टनर.

राजू                           सुप्रियाचा मित्र

शीतोळे                         पोलिस इंस्पेक्टर

भय्या                          विकासचा मोठा भाऊ.

अश्विनी                         विकासची वाहिनी, भैय्याची बायको

भगवानराव                       विकासचे बाबा

यमुना बाई                      विकासची  आई

गोविंद राव                      देवयानीचे बाबा

कावेरी बाई                      देवयानीची आई.

मावशी आणि काका               देवयानीची मावशी आणि तिचे मिस्टर

मनीषा                         विकासची बहिण

अंकुश                          मनीषाचा नवरा.

सुरेश                           देवयानीचा भाऊ.

विश्राम                         देवयानीचा चुलत भाऊ.

विनोद                          विकास चा चुलत भाऊ

प्रिया                           विकासची चुलत बहीण.

सेजल                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

पूर्णिमा                          देवयानीची अमेरिकेतली रूम मेट.

राजेश                          विकासचा मित्र.

 

 

 

 

  भाग   २४

भाग  २३    वरून  पुढे  वाचा ................

 

“हो, पण बाबा, आता पुढची तारीख म्हणजे जवळ जवळ मे उजाडणार तो पर्यन्त बाबा ठीक होतील आणि माझी परीक्षा होऊन रिजल्ट पण लागलेला असेल. तेंव्हा टेंशन घेण्याचे काहीच कारण उरणार नाही. आता फक्त हॉल आणि caterer ला विचारून बघू, काय म्हणतोय ते. मी आणि विकास दोघंही जातो बेळगाव ला आणि बघतो काय करायचं ते.” सुरेशनी त्याची भूमिका मांडली.

“ठीक आहे तुम्ही म्हणता तसं करून बघू. आधी तुम्ही जाऊन या. उशीर करू नका.” – भगवानराव. 

“हो, उद्याच रात्री निघतो.” – सुरेश.

ठीक.

चालू असलेल्या घडामोडींवर देवयानी आणि विकासला दोघांनाही एकमेकांशी बोलायला वेळच मिळाला नव्हता. म्हणून त्या दिवशी देवयानी आणि विकास थोडं फेर फटका मारायला निघाले.

रात्र झाली होती म्हणून भगवानराव म्हणाले की “लवकर या. जास्त दूर जाऊ नका.” त्यावर विकास म्हणाला की “पायीच जातो आहे जरा पाय मोकळे करून येतो.”

थोडं बोलणं झाल्यावर देवयानी म्हणाली की

“विकास आपण जरा पत्रिका दाखवायची का कोणाला तरी?”

“का ग? असं अचानक काय झालं? अग रस्त्यावर अपघात कोणालाही होऊ शकतो. त्यातही आपलीच चूक असली पाहिजे असं काही नाहीये.” – विकास 

“नाही, मी अपघाताबद्दल बोलत नाहीये. मी म्हणते आहे की आपल्या लग्नात सारखी विघ्न येताहेत म्हणून. आधी डिसेंबर आणि आता मे. अजून पुढे काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे. मध्येच ते राजूचं प्रकरण झालं. काय चाललं काय आहे हे? आणि आपल्याच बाबतीत का?” – देवयानी म्हणाली.

“तू म्हणते आहेस ते बरोबर आहे.” विकास म्हणाला. “पण या बाबतीत आपला कुठलाच रोल नव्हता. हां, त्याचा परिणाम आपल्यावर झाला पण त्याला आपण काय करू शकतो?”

“म्हणूनच म्हणते आहे की एखाद्या चांगल्या ज्योतिष्याला पत्रिका दाखवू. कळेल तरी आपल्याला की काय उपाय करायचा  आहे तो.” – देवयानी

“हूं, तू म्हणतेस त्यात तथ्य आहे खरं. ठीक आहे आम्ही बेळगाव वरून आल्यावर आपण यावर विचार करू.”- विकास.

“मला नं आज काल खूप भीती वाटायला लागली आहे की काही तरी विपरीत घडेल, आणि आपली जन्माची ताटा तूट तर होणार नाही ना, अशी सतत भीती वाटत असते. अरे सतत काही ना काही घडतच आहे. काय करावं तेच उमगत नाहीये. विकास मी कशी राहू, तुझ्या शिवाय? तू मला जर सोडून गेलास तर माझं काय होईल?” देवयानी एकदम भावविवंश झाली.

“देवयानी असं काहीही घडलेलं नाहीये की ज्याच्या मुळे तू असा निराशेचा सुर लावावा. बी पॉजिटिव.” विकासनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“हो रे मी आपल्या मनाला खूप समजावते नेहमी पण तरी काळजी वाटतेच.”

“नको काळजी करू. सब ठीक हो जाएगा. मी आहे ना. मग. माझ्यावर सोड सगळं.”

“ओके प्रयत्न करते. जमेल की नाही माहीत नाही.” देवयानी म्हणाली.

दुसऱ्या दिवशी रात्रीच्या बस ने विकास आणि सुरेश दोघेही बेळगाव ला निघाले.

तिथे पोचल्यावर आंघोळी आणि ब्रेक फास्ट करून दोघेही हॉल वर गेले. सगळी कामं संपे पर्यन्त अख्खा दिवस मोडला पण काम झालं होतं. त्यामुळे समाधान वाटलं. रात्री विकासने भगवानरावांना फोन केला.

“हॅलो, बाबा विकास बोलतो आहे.”

“हं. बोल विकास काम झालं का ?” – भगवानराव.

“हो बाबा, बाबा स्पीकर वर टाका म्हणजे सगळ्यांना ऐकता येईल.” – विकास. 

भगवान राव गोविंदरावांच्या खोलीत गेले. तिथेच कावेरी बाई आणि देवयानी पण बसल्या होत्या. पाठोपाठ यमुनाबाई पण आल्याच. त्यांनाही उत्सुकता होतीच.

“हं. सांग आता. सगळेच आहेत इथे आता.” - भगवानराव.

“आम्ही हॉल च्या ऑफिस मधे गेलो त्या वेळेला तिथे कोणीच नव्हते, मग आम्ही फोन करून त्यांना बोलावून घेतलं. साधारण तासाभराने  दोघंही आले. आम्ही त्यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि पुढची तारीख मिळू शकते का असं विचारलं, तर ते म्हणाले की ‘तुम्ही लकी आहात कालच एक पार्टी आली होती त्यांना  तुम्ही ज्या तारखेला बूकिंग केलं होतं  तीच तारीख हवी होती. काल तर आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलं पण थोडं थांबा त्यांना फोन करतो, जर कुठे बूक केला नसेल तर तुम्हाला chances आहेत.’ मग त्यांनी फोन केला आणि ती पार्टी  लगेच हो म्हणाली. एक प्रश्न सुटला.” विकासनी अपडेट दिलं.

तो पुढे म्हणाला “एवढं झाल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं की कोणच्या तारखा हव्यात म्हणून. मे महिन्यातल्या दोन तारखा available होत्या. सुरेश ने मग गुरुजींना फोन लावला आणि विचारलं की यापैकी कोणची तारीख चालेल म्हणून. तर त्यांनी सांगितलं की दोन्ही तारखा लाभताहेत. पण हॉल चे मॅनेजर  म्हणाले की घरी विचारा की कोणची तारीख चालेल म्हणून. आणि उद्या सांगा मग बूक करून टाकू. आम्ही दोन्ही तारखा उद्या पर्यन्त मोकळ्या ठेवतो. तर आता तुम्ही आपसात विचार करून सांगा. मी ठेवतो आता.”

मग देवयानी आणि तिच्या आईचं थोडं बोलणं झालं आणि देवयानी म्हणाली की दोन्ही तारखांना कुठलीच अडचण नाहीये. कोणचीही तारीख चालेल. मग तसं विकास ला फोन करून कळवलं.

दुसऱ्या दिवशी विकासने तारखा फायनल केल्या आणि रात्रीच्या बस मधे बसला.

सुरेश बेळगावलाच थांबला. सगळं कसं सुरळीत झालं होतं. देवयानीच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाची छटा आली होती. मळभ निघून गेलं होतं.

विकासच्या ऑफिस मधे त्यांच्या एका सहकाऱ्याला एका ज्योतिष्याचा चांगला अनुभव आला होता, त्याचं नाव,पत्ता आणि फोन नंबर घेऊन विकास घरी आला.

सगळ्यांची समोर त्यांनी हा प्रस्ताव ठेवला. भगवानरावांना काही आवडलं नाही पण त्यांनी विरोध केला नाही.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता, दुपारी पांच वाजता देवयानी आणि विकास दोघेही दिलेल्या पत्त्यावर पोचले.

गृहस्थ जरा धार्मिक, आध्यात्मिक वळणाचे वाटत होते. देवयानीने त्यांना प्रॉब्लेम सांगीतला. त्यांनी दोघांच्या पत्रिका तयार केल्या आणि त्याचा अभ्यास केला. देवयानी आणि विकास हे सर्व होई पर्यन्त अर्धा तास चूप चाप बसून होते. गुरुजी काय सांगतील ह्याचा मनावर ताण होता.

 

“कुंडलीचे डिटेल्स सांगू की सरळ अनुमान सांगू?” गुरुजींनी विचारलं.

“म्हणजे  काय?”- देवयानी.

“म्हणजे असं की कुठला ग्रह कोणच्या घरात आहे आणि त्याची  दृष्टी कुठे आहे, कोणचा वक्री आहे आणि कोणच्या ग्रहांची दशा, महा दशा चालू  आहे वगैरे. तसंही या  सगळ्या बाबी तुम्हा कळणार  नाहीत. पण तुमची इच्छा  असेल तर  सांगतो.” गुरुजी असं म्हणाल्यावर, विकास ने देवयानी कडे पाहीलं आणि म्हणाला

“न, नको. ज्या गोष्टी कळणार नाहीत त्या ऐकून  काय करणार ? आम्हाला  जे कळेल तेवढंच सांगा.”

“ठीक आहे. पत्रिके वरून जे दिसतंय त्यावरून पुढची दीड ते दोन वर्ष तरी लग्नाचा योग दिसत  नाहीये. अडचणी काय येतील हे सांगता येणार  नाही पण लग्नाचा योग नाही.” – गुरुजी.

देवयानीच बोलली –

“माझ्या लग्नाचा योग नाही की आमच्या  लग्नाचा योग नाही?” – देवयानी.

“तुमचं लग्न हे होणारच. पण कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे दीड दोन वर्ष लांबणीवर पडणार  अशी चिन्ह आहेत. दोघांचही बाशिंग बळ जरा जडच दिसतंय. पण दोन वर्षांनंतर लग्न झाल्यावर विकासचा भाग्योदय आहे. तुम्हाला कल्पना  येणार नाही एवढी तुमची भरभराट  होणार आहे.” – गुरुजी म्हणाले.

“अजून किती धक्के बसणार आहेत?” विकासने विचारले. “कारण या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा होकार आहे. त्या फ्रंट वर काहीच प्रॉब्लेम्स नाहीयेत.”

नाही, नाही धक्का म्हणू, असं काही दिसत नाहीये पण लग्न लांबणार एवढं पक्कं.” गुरुजींनी फायनल सांगून टाकलं.

देवयानी विकासला म्हणाली की “बघ विकास माझी भीती सार्थ होती. आता लग्न लांबणार म्हणजे ते काही तरी संकट असणार म्हणूनच. उगाच काही घडत नसतं.”

गुरुजी यावर काहीच बोलले नाहीत.,

“गुरुजी,” देवयानी बोलली – “गुरुजी, काही विघ्न येऊ नये या साठी काही उपाय आहे का ?”

“हे बघा, मला जाणवलं असतं तर नक्कीच सांगीतलं असतं. पण एक गोष्ट आहे ती ही की नशीबात असेल ते चुकत नाही. पण त्यांची तीव्रता कमी होऊ शकते. तुमची तयारी आणि विश्वास असेल तर सांगतो.” – गुरुजी.

“सांगा न, आम्ही करू.” – देवयानी.

विकास कडे पाहून गुरुजी म्हणाले की “तुमच्या कुलदेवतेतचं  दर महिन्यात जाऊन दर्शन घ्या आणि सर्व ठीक होऊ दे म्हणून प्रार्थना करा. बस. तीव्रता थोडी कमी होईल.”

“बस, एवढंच?” विकास बोलला. “हे मी करेन. पण गुरुजी आमचं कुलदैवत तिरूपतीचा  बालाजी आहे आणि आम्ही साधारण वर्षातून एकदा दर्शनाला जात असतो”

“आता दर महिन्यात जा. संकट निवारणासाठी थोडे कष्ट तर घ्यावेच लागतील. पण फळ नक्कीच मिळेल. या आता.” – गुरुजी.

“गुरुजी” देवयानी म्हणाली  “एका महिन्यात विकास आणि दुसऱ्या महिन्यात मी गेले तर चालेल का ?”

“तुमचं कुलदैवत बालाजी आहे का?” – गुरुजी.

“नाही.” – देवयानी.

“मग? आणि तसंही देवा कडे याचना विकासरावांना करायची आहे. तुम्हाला त्याचं फळ आपोआप मिळणार आहे.” – गुरुजी.

“गुरुजी, प्रत्येक वेळेला तिरूपतीला जाऊन यायला किमान तीन दिवस तरी लागतील. जर माझा भाऊ किंवा वडील अधून मधून जाऊन आले तर चालेल का?” -विकास

“हे पहा, अडचणी तुमच्या लग्नात येताहेत, त्यांच्या नव्हे. पेपर कोण सोडवतो? विद्यार्थी की आई वडील?” – गुरुजींच फायनल उत्तर.

गुरुजींनी असं म्हंटल्यांवर, मग पुढे काही न बोलता देवयानी आणि विकास बाहेर पडले.

 

 क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.