Geet Ramayana Varil Vivechan - 12 books and stories free download online pdf in Marathi

गीत रामायणा वरील विवेचन - 12 - स्वयंवर झाले सीतेचे

मिथिलेत जनक राजाच्या दरबारी आल्यावर जनक राजा विश्वामित्र ऋषींना वंदन करतात व श्रीराम व लक्ष्मणाचे स्वागत करतात. त्यांचे आदरातिथ्य झाल्यावर त्यांना स्वयंवरात आमंत्रित करतात.

दरबाराच्या मध्यभागी एका चौरंगावर एक मोठा महाकाय धनुष्य ठेवला असतो. त्या धनुष्याला उचलून जो त्याला प्रत्यंचा लावेल तो पुरुष स्वयंवरात विजेता ठरेल आणि त्याच्याच गळ्यात सीता देवी वरमाला घालतील असा स्वयंवराचा नियम जनक राजाने ठरवला असतो. राजाने असा पण का ठेवला असतो त्यामागे एक कथा आहे जी खाली नमूद केली आहे:

(********************************************महादेवाची आराधना केल्यावर स्वयं शंकरच परशुरामांना स्वतः चा धनुष्य प्रसन्न होऊन देतात. तो धनुष्य परशुराम सदैव आपल्या जवळ बाळगतात. एकदा असेच परशुराम जनक राजाकडे गेले असता. जनक राजाशी त्यांचा वार्तालाप सुरू असताना. बाल जानकी परशुरामांचे लक्ष नसताना त्यांचा बाजूलाच ठेवलेला शिवधनुष्य खेळावयास घेऊन जाते. परशुराम व राजा जनक काही वेळाने जेव्हा छोट्या सीतेला धनुष्य घेऊन खेळताना बघतात तेव्हा अत्यंत विस्मित होतात. तेव्हा जनक राजा सीतेच्या अश्या वागण्याची परशु रामांना क्षमा मागतात. तेव्हा परशुराम त्यांना म्हणतात हे राजा मला क्षमा मागण्याची गरज नाही. तुझी कन्या असामान्य आहे कारण हा शिवधनुष्य उचलण्याची कोणातही क्षमता नसताना तुझी कन्या त्या धनुष्याशी खेळतेय. ही जेव्हा उपवर होईल तेव्हा हिला हिच्या तोडीसतोड वर मिळणे आवश्यक आहे. जो कोणी हा धनुष्य त्यावेळी उचलेल व त्याला प्रत्यंचा लावेल तोच हिच्यासाठी योग्य वर आहे हे तू समज. परशु रामांनी असे सांगितल्यामुळे राजा जनकाने सीतेच्या स्वयंवरासाठी असा पण ठेवला होता.
*******************************************)
दरबारात देशोदेशीचे राजे स्वयंवरासाठी आमंत्रित असतात. प्रत्येक जण धनुष्य उचलण्याचे प्रयत्न करतात पण उचलणं तर दूर कोणीही त्या शिवधनुष्याला तसुभरही हलवू शकत नाही.

त्या स्वयंवरात रावण सुद्धा आमंत्रित असतो. तो सुद्धा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो आणि उचलतो ही पण धनुष्याचे वजन न पेलवल्याने ते त्याच्या छातीवर पडते आणि रावण जमिनीवर कोसळतो. सगळे इतर राजे त्याला हसतात. त्याचे चांगलेच हसे होते. मग कसेतरी सात आठ जण मिळून तो धनुष्य पुन्हा त्याच्या जागी ठेवून रावणाला उठवले जाते.

त्यानंतर राजा जनक फार निराश होतो. तो सगळ्यांना उद्देशून म्हणतो,
"एवढ्या सगळ्या बलाढ्य राजांच्या समुदायामध्ये एकही असा वीर राजा नाही जो स्वयंवराचा पण पूर्ण करू शकेल! काय माझी कन्या आजन्म कुमारिका च राहणार का?"

त्यावर विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेने श्रीराम हा पण पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारतात.
ते ऋषींना वंदन करून धनुष्य ठेवलेल्या चौरंगाजवळ जातात. सगळ्यांचे उत्सुकतेने श्वास रोखलेले असतात.

क्षणात श्रीराम त्या धनुष्यास उचलतात व प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करताच तो धनुष्य काडकन मोडून पडतो. आकाशात जोरात विजेचा कडकडाट होतो.
सगळेजण त्या आवाजाने भयभीत होतात.

तेवढ्यात भार्गव परशुराम तिथे अचानक प्रकट होतात व गर्जना करतात
"कोणाचे दु:साहस आहे हे ज्याने आम्ही जनकास दिलेला शिवधनुष्य मोडला."

जनक राजा भयभीत होऊन परशुरामांची क्षमा मागतात. धनुष्य हा हेतुपुरस्सर नसून चुकून मोडला गेला आहे असे सांगतात.
"राजा माझा तुझ्यावर यकश्चित राग नाही परंतु ज्याने शिव धनुष्यास तोडले त्याला आमच्यासमोर उभं कर"

परशुरामांनी असे म्हणताच श्रीराम त्यांच्यासमोर उभे राहिले.
श्रीरामांनी परशुरामांना नम्रपणे वंदन करून म्हंटले,

"हे मुनिवर ते पातक माझ्या हातून घडले आहे. तो धनुष्य मोडण्याचा माझा मानस नव्हता परंतु त्याला प्रत्यंचा लावताना तो अचानक मोडून पडला. त्याबद्दल क्षमा असावी."

श्रीरामांचा नम्र स्वभाव बघताच परशुरामांचा क्रोध क्षणात मावळतो. त्यांना बघताच परशुरामांना श्रीरामांचे खरे स्वरूप कळून चुकते. श्रीराम हे कोणी सामान्य नसून आपल्याप्रमाणेच श्रीविष्णूंचा अंश आहे हे त्यांना आकळते व ते श्रीरामचंद्र आणि देवीसीतेला भरभरून आशीर्वाद देऊन अंतर्धान पावतात.

सगळेजण हे अद्भुत दृश्य बघून जागीच थिजून जातात. काहीजण आश्चर्याने आपापल्या जागेवरून उठून उभे राहतात.

आपल्या असामान्य कन्येला योग्य वर मिळाला हे जाणून राजा जनकाच्या चेहऱ्यावरून आश्चर्य आणि आनंद ओसंडून वाहतो. इकडे स्त्रीकक्षात देवी सीतेच्या आनंदाला पारावर राहत नाही. देवी सीतेची माता आनंदाने समाधानाने भरून पावते.
देवी सीता व श्रीराम एकमेकांना वरमाला घालतात. सगळीकडे मंगल वातावरण असते. सगळीकडे मंगल वाद्य वाजत असतात.

राजा जनक विश्वामित्रांना वंदन करून
"आज पासून माझी कन्या सीता हिला मी श्रीरामांना अर्पण केली आहे.", असे सांगतात.

श्रीराम व सीता विश्वामित्रांचा आशीर्वाद घेतात. सगळ्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतात.

आणि अश्या तर्हेने सीता स्वयंवराचा सोहळा सुफळ संपूर्ण होतो.

(रामकथेत पुढे काय होईल ते बघू उद्याच्या भागात. जय श्रीराम🙏)

*****************************
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे
स्वयंवर झाले सीतेचे

श्रीरामांनी सहज उचलिले धनू शंकराचे
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरीचे
उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे

मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागले फूल हळु हळू गाली लज्जेचे

उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई
श्रीरामांनी केले तुकडे दोन धनुष्याचे

अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनी लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणात जनकाचे

हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

पित्राज्ञाने उठे हळु ती मंत्रमुग्ध बाला
अधीर चाल ती, अधीर तीहुनी हातीची माला
गौरवर्ण ते चरण गाठती मंदिर सौख्याचे

नीलाकाशी जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रह्माचे

झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गाता
आकाशाशीं जडले नाते ऐसे धरणीचे
★★★★★★★★★★★★★★★★