Puranatil Goshti - 2 books and stories free download online pdf in Marathi

पुराणातील गोष्टी - 2

पुराणातील गोष्टी २

प्रिथु राजा.
ब्रह्मांनी स्वतः प्रिथुला राजाचा मुकुट घातला. याचवेळी इतर भागांचे पण राजेपद दिले.
सोम हा वनस्पती, झुडुपे,नक्षत्रे, ग्रह. तर वरुण सुर्यांचा, आदित्यांचा, अग्नी वसुंचा, यम पितर व वंशजांचा, शिव हा यक्ष,राक्षस, पिशाच्चांचा, तर हिमालय पर्वतांचा. समुद्र सर्व नद्यांचा, चित्ररथ हा गंधर्वांचा, वासुकी नागांचा, तक्षक सर्पांचा, गरुड पक्षांचा, वाघ हरिणांचा, ऐरावत हत्तींचा, उच्चश्रवा घोडे गायी बैल यांचा, अश्वथ्थ झाडांचा राजा झाला.
ब्रह्मांनी चार दिशांचे दिक्पाल पण नेमले. पुर्वैचा सूधन्वा, पश्चिमेचा केतुमान, दक्षिणेचा शंखपाद, उत्तरेला हिरण्यरोम.
प्रिथु राजाने त्याच्या बाणाने जमीन समांतर केली. ही मैदाने गावांना शेती, गुरांना सांभाळण्यासाठी वापरता येऊ लागली.
पर्वत इतस्ततः पसरले होते ते निवडक ठिकाणी ठेवले. राजाने गाईचे दुध काढून धान्यासाठी बी मिळवले.
या प्रिथु राजाच्या कामामुळे तीला पृथ्वी नाव मिळाले.
सुदर्शन चक्र -
एकदा राक्षसांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव, देवता श्री विष्णूंकडे गेले व त्यांना विनंती केली की राक्षसांचा संहार करा. विष्णूंनी त्याना तसे आश्र्वासन दिले व ते कैलास पर्वतावर तपश्र्चर्या करण्यासाठी गेले.
पण या तपश्र्चर्येने महादेव प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा विष्णुंनी शिवसहस्रनाम म्हणण्यास सुरुवात केली. तसेच त्या वेळी एक हजार कमळे महादेवाना अर्पण केली .
महादेवानी परिक्षा घेण्यासाठी त्यातील एक कमळ बाजूला ठेवले. एक कमळ कमी आहे असे विष्णुना कळल्यावर त्यांनी आपल्या कमळासमान असणाऱ्या डोळ्यांपैकी एक डोळा काढून तेथे वाहिला.
महादेव या भक्तिने प्रसन्न झाले व विष्णू ना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा विष्णुंनी राक्षसांचा संहार करण्यासाठी एक शक्तिशाली अस्त्र मागितले. तेव्हा महादेवांनी त्याना सुदर्शन चक्र दिले. विष्णू नी महादेवांना सांगितले की तुम्ही या ठिकाणी हरिश्वर शिवलिंग या रुपात राहा.
विष्णूनी सुदर्शन चक्राच्या सहाय्याने राक्षसांचा संहार केला. सुत म्हणाले विष्णुनी ज्या सहस्र नामानी महादेवांची पुजा केली होती त्यापैकी काही नावे शिव, हर, मृद, रुद्र, पुष्कर, पुष्पलोचन, शर्व, शंभू, महेश्वर अशी आहेत. शिव सहस्र नामाचे पठण भक्तांना तारक आहे.
श्रीकृष्ण व मुचकुंद
जरासंधाने मथुरेवर हल्ला करण्यासाठी कालयवनला पाठवले.
कालयवनबरोबर एक कोटी सैनिक होते. यावेळी श्रीकृष्णांनी प्रतिहल्ला करणेऐवजी मथुरा सोडून जाणेंचे ठरवले.
श्रीकृष्णांनी विश्वकर्माला सांगून द्वारकापुरी नांवाचे नगर वसविले व तिथे सर्व मथुरावासींना राहण्याची व्यवस्था केली. आणि श्रीकृष्ण कालयवनच्या दिशने गेले त्यांच्या कडे हत्यार नव्हते.
ते कालयवनच्या बाजूने गेले. नारदाने कालयवनला सांगितले की ते श्रीकृष्ण आहेत. तेव्हा कालयवन त्यांच्या मागे गेला व श्रीकृष्णाना आवाहन देऊ लागला.
पण श्रीकृष्ण त्याच्या कडे लक्ष न देता पुढे जात राहिले, कालयवन त्याना पकडू शकला नाही. श्रीकृष्ण एका गुहेत शिरले.
तेथे एक माणूस झोपलेला होता. श्रीकृष्णांनी आपल्या अंगावरील वस्र त्याच्या अंगावर टाकले व लपून बसले. कालयवन तेथे पोहोचला व झोपलेल्या माणसाला बघितले व श्रीकृष्ण आहे असे समजून म्हणाला,
"कृष्णा तुला माहित आहे शूर लोक झोपलेल्या माणसावर हल्ला करित नाहीत, मी तुला आधी उठवतो व नंतर मारीन".
त्याने त्या माणसाला लाथ मारली . तो माणूस जागा झाला व त्याने कालयवनकडे नजर टाकली नजर पडताच कालयवन जळून भस्म झाला.
तो झोपलेला माणूस राजा मंधाताचा पुत्र मुचकुंद होता. देवांनी सत्ययुगात राक्षसांशी युद्ध करतांना त्याची मदत घेतली होती व त्यामुळे देव विजयी झाले होते. देवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला मला विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे. देव म्हणाले द्वापार युगात दर्शन होइल. तो म्हणाला मी इतकी वर्षं काय करू. तेव्हा देव म्हणाले तू गुहेत झोपून रहा व त्याला सांगितले की तुला कोणी झोपेतून उठवले तर तो तुझ्या नजरेने भस्म होईल.
कालयवनला भस्म करणेसाठी व मुचकुंद ला दर्शन देणेसाठी श्रीकृष्ण गुहेत गेले होते. मुचकुंद ला चतुर्भुज रूपाने दर्शन दिले.
नंतर श्रीकृष्णांनी कालयवनच्या सेनेचा पराभव केला.