Puranatil Goshti - 3 books and stories free download online pdf in Marathi

पुराणातील गोष्टी - 3

श्वेतमाधव मंदिर - Girish
सत्ययुगात श्वेत नावाचा राजा होता. तो इतका पुण्यवान होता की , त्याच्या राज्यात लोक दहा हजार वर्षे जगत. बाल मृत्यू होत नसत. त्याच्या राज्यात कपालगौतम नावाचे ऋषी राहत होते. त्यांचा मुलगा लहान असतानाच मृत्यू पावला. ऋषी राजाकडे शव आणले. राजा म्हणाला, मी मुलाला एका सप्ताहात जिवंत करू शकलो नाही तर अग्नीप्रवेश करीन. त्याने महादेवांची अकराशे कमळांनी पूजा केली.
महादेव प्रसन्न झाले व त्या मुलाला जिवंत केले.
श्वेत राजाने खूप वर्षे राज्य केले. पुरुषोत्तम क्षेत्रात त्याने विष्णुंचे मंदिर बांधले. ही मूर्ती चंद्रासारखी शुभ्र होती. हे मंदिर
" श्री श्वेतमाधव मंदिर " म्हणून प्रसिद्ध झाले. इंद्रद्युम्नाने या क्षेत्रात जे मंदिर बांधले
ते " जगन्नाथ " मंदिर.
ब्रह्म पुराण
नैमिष्यारण्य नांवाचें अरण्य (जंगल) होते. महर्षिंनी या ठिकाणी एक यज्ञ आयोजित केला होता. हा यज्ञ बारा वर्षे चालला. नैमिषारण्य यज्ञासाठी अत्यंत योग्य होते. हवामान चांगले होते. जंगलातील झाडे फुले, फळे यांनी बहरलेली होती, आणि सर्व प्राणी, पक्षी व ऋषी आनंदाने राहत होते.
अनेक ऋषी या यज्ञासाठी अरण्यात आले होते. त्यापैकी एक होते रोमहर्षण उर्फ लोमहर्षण जे वेद व्यासांचे शिष्य होते. वेदव्यासांनी आपल्या या शिष्याना पुराणांचे ज्ञान दिले होते. सर्व ऋषी-मुनी एकत्र येऊन रोमहर्षणांना नमस्कार करून म्हणाले, आम्हाला पुराणातील कथा सांगा. हे जग कोणी निर्माण केले, त्यांचे संरक्षण कोण करतो आणि नाश कोण करणार या सर्व गोष्टी आम्हाला सांगा.
रोमहर्षण म्हणाले, फार वर्षापुर्वी दक्ष आणि इतर ऋषीमुनींनी ब्रह्मदेवाला हाच प्रश्न विचारला होता. ब्रह्मदेवाने काय उत्तर दिले होते ते मला माझे गुरू वेदव्यासां कडून कळले आहे. मला माहीत असलेले सर्व तुम्हाला सांगतो.
सुरुवातीला सगळीकडे पाणी होते आणि विष्णू त्या पाण्यावर राहत होते. त्या काळापासून पाण्याला नार म्हटले जाते आणि आयन म्हणजे निवास म्हणून त्यांना नारायण असे पण म्हणतात. या पाण्यातून एक सुंदर अंडे निर्माण झाले. ब्रह्माचा जन्म या अंड्यामध्ये झाला. ब्रह्मानी स्वत: जन्म घेतल्यामुळे त्यांना स्वयंभू म्हणतात. या अंड्यामध्ये ते वर्षभर राहिले. नंतर त्यांनी या अंड्याचे दोन भाग केले आणि स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. आकाश, दिशा, वेळ (काळ) भाषा आणि ज्ञानेंद्रियांची दोन्ही ठिकाणी निर्मिती केली. नंतर ब्रह्मानी त्यांच्या मन:शक्तीने सात ऋषींना जन्म दिला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे - मरीचीे, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वशिष्ठ. ब्रह्माने रुद्र देवाची व सनत्कुमार यांची निर्मिती केली.
या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी पुरुष व स्त्रीची निर्मिती केली. पुरुषाचे नाव स्वयंभूवा मनु आणि स्त्री चे नाव शतरूपा असे ठेवले. मनुष्याचा वंश मनुपासून झाल्यामुळे त्यांना मानव म्हणतात.
मुद्ग़ल पुराण-
श्री गणेशाय नमः
मुद्गल पुराणाचे नऊ खंड आहेत. पहिल्या खंडामध्ये वक्रतुंडाची स्तुति आहे. जी भक्तांना सुख शांती प्रदान करते. प्रथम खंडात चौपन्न अध्याय आहेत.
सूत म्हणाले , आता अशी कथा ऐका जी तापत्रयीचे हरण करेल, व मोक्षप्राप्ती करून देईल.
दक्षराजाकडे भगवान मुद्गल नावांचे महामुनी आले. राजाने त्यांचा आदरसत्कार करून पंचोपचारे पूजा केली व म्हणाले माझ्या मनात युद्ध विध्वंसामुळे शोक निर्माण झाला आहे. माझा उद्धार करा. माझ्यावर कृपा करा. मुद्गल मुनी म्हणाले, हे राजा । , चिंता करू नकोस. तूं विघ्नराजाचे स्मरण कर, विघ्नराजाचे जो पूजन करतो त्यांस जीवनात कांहीं कमी पडत नाही. अति दुर्लभ पण सुलभ होऊन सर्व सुखे प्राप्त होतात. या मुद्गल पुराणातील प्रथम खंड गोड असून त्यात वक्रतुण्डाचे चरित सांगितले आहे.
विश्व देव, दानव, गंधर्व
दक्षाला साठ मुली होत्या. त्यापैकी वसूचा मुलगा प्रभास. प्रभासचा मुलगा विश्वकर्मा. विश्वकर्मा हा स्थापत्य शास्त्रज्ञ होता तसेच तो दागिने बनवत असे. विश्व़ा नावाच्या मुलीच्या मुलांना 'विश्व़देव' म्हणत. दक्षाच्या २७ मुलींचे लग्न चंद्र (सोम) बरोबर झाले होते त्यांना "नक्षत्र" म्हणत असत. कश्यपाशी लग्न झालेल्या मुलींपैकी आदितीची १२ मुले आदित्य म्हणून ओळखले जाणारे देव होते. दितीची मुले "दैत्य" . दानुची मुले 'दानव'. अरिष्टाची मुले 'गंधर्व'. सुरसाची मुले 'सर्प.' खासाची मुले 'यक्ष.' सुरभीची मुले अरुण व गरूड. ताम्राला सहा मुली होत्या त्यांच्यापासून घुबड, गिधाडे, कावळे, घोडे ,उंट, पाण्यातील पक्षी जसे बदक हंस यांचा जन्म झाला. क्रोधावशाची मुले नाग. इलाने झाडे झुडपे व वेली, गवत याना जन्म दिला. कद्रुची मुले पण सर्प व नाग त्यातील महत्त्वाचे म्हणजे अनंत वासुकि, तक्षक. मुनीने अप्सरांना जन्म दिला.