Vilkha books and stories free download online pdf in Marathi

विळखा-सवुबाई - विळखा

     'पांडुरंग महादेव पवार 'हा गावातील एक पंचविशीतला तरुण .तो नेहमीच चाकरमनी लोकांची वाट पाहणारा. गावात  गणेशोत्सव, शिमगा अशा वेळी येणाऱ्या चाकरमान्यांचा शोध घेणारा. प्रत्येकाच्या दारात जाऊन दादा तुमचा अंगण साफ करुन देऊ काय?  तुमची पायवाट सरळ करून देऊ काय ? असे विचारुन फक्त पंचवीस -तीस रुपयाची अपेक्षा करणारा आणि चाकरमान्यांच्या पाठी लागणारा. गावात कुणाचं बारसंअसो  वा लग्न त्याठिकाणी पांडया हजरच. त्या ठिकाणी जाऊन काहीतरी काम द्या पण, संध्याकाळी पन्नास-शंभर द्या म्हणणारा  हा पांडू .त्याच संसाराकड़   अजिबात लक्ष नव्हतं. बाळंतपणात बायको देवाघरी गेलेली.त्याच्या दोन मुलींही मुलींच्या मामाने   शिक्षणासाठी आपल्याकडे  नेलेल्या होत्या. घरी म्हातारी  आई-सवूबाई एकटीच .तीही शेजारची धुणीभांडी करून स्वतःचे पोट भरत होती. पांड्या मात्र दिवसभर भटकायचाआणि वीस- तीस रुपये आणून  त्याची दारू संध्याकाळी ढोसायचा. घरात म्हाता-या आईची जरासुद्धा त्याला काळजी नव्हती पण, आई मात्र त्याला असेल ते शिजवलेली भाजी -भाकरी द्यायची .शेवटी मातेचेच प्रेम ते . जेवण नसलं तर कधीकधी पांड्या दारुच्या नशेत आई बरोबर भांडत बसायचा. आई त्याचं तोंड बघायला नको म्हणून शेजारी निघून जायची. आई बाहेर गेलेली पाहून पांड्या घरात जे काही खायला सापडेल ते घेऊन खाऊन गावात भटकायचा.

    मे महिन्यातले दिवस होते .मुंबईला कामधंदा सुटल्यामुळे पांडयाचा भाऊ 'सख्या' पण गावाकडं   सगळा संसाराचा बिस्तरा घेऊन आला होता.

सख्या घरी आला. म्हातारीनं विचारलं,   "अरे सख्या, तू  मुंबई का सोडलीस?"

"अगं काय काम नव्हतं चांगलं. महिनाभर काम केल्यावर चार -पाच हजार मालक हातावर टेकवायचा. यात मुलांचा खर्च आणि संसाराचा खर्च कसा भागणार? बघू इथेच काम."

"अरे,गावाकडं  कुठं काम बघतोस .इथल्याच लोकांना काम मिळणं मुश्किल  झालयं."

" अगं बरोबर आहे ग .पण इतर खर्चपण इथं कमी येतो आणि पोरांना गावच्या सरकारी शाळेत घालतो. इथं सगळ मोफत शिक्षण मिळतय."

    सख्याने पांड्याला घेऊन कुठे  काम मिळते का याचा शोधाशोध सुरू केला .  कधी काम मिळायचं तर कधी नाय. दिवसाची मजुरी जेमतेम शंभर दोनशे रुपये जमू लागली होती. त्यांनी आपली रोजनदारी   सुरूच ठेवली. पण पांडूच्या संगतीने सख्यानेही दारुची वाट पकडली.
कधी काम नसेल तेव्हा ही भावांची जोडी असेल ते पाच- पन्नास रुपये घेऊन देशी दारुच्या अड्डयावर जाऊ लागली .  म्हातारीचा जीव  काळजीत पडला. घरा मधील आणलेल्या सर्व वस्तूही म्हातारी बाहेर गेलेली पाहून सख्या आणि पांडयाची जोडी चोरी करु लागली. दारूच्या पूर्ण विळख्यात ही भावंडं  सापडली.

     सवुबाई  त्या दोघाना  सांगून सांगून जिवाला कंटाळली होती. दोन्ही मुल दारुच्या व्यसनात वाहून गेली होती. 
दोघांचेही संसार  उघड्यावर पडले होते.

     एक दिवस रात्रीचे तीन वाजता गावातील धरमा पवारांच्या विहिरीत म्हातारीने उडी घेतली. सकाळ झाली. सकाळी सकाळी  फिरायला जाणारी मंडळी असतात. राजाबाबू हे गल्लीतील पन्नाशीतली नेते.ते दररोज फिरायला  जात असत धरमा पवारांच्या विहीरीच्या बाजूला त्यांना सकाळी पहाटे सहाच्या सुमारास चपला दिसल्या.

"एवढ्या सकाळी कोण बरे इथ आल आहे तरी पाहू ."असे मनाशीच म्हणून राजाबाबूनी  विहीरीत डोकावून पाहिले तर काय? सवुबाई  विहीरीच्या एका पायरीवर थंडीने कुडकुडत बसली होती. तिच सुरकुत्या पडलेले शरीर पूर्ण भिजून रात्रभर थंडीने  गार झाल होतं.  अंगावर काटे उभे राहिले. 

राजाने जोराचा आवाज केला,"अरे कोणीतरी धावा रे,सवुबाई धरमुच्या विहिरीत पडली."
राजाचा भारदस्त आवाज ऐकून शेजारी असणारा धरमा धापा टाकतचआला.
रस्त्याने फिरणारी सर्व माणसं  बघता बघता गोळा झाली. पवाराचं बबन्या मोठा दोरं घेऊन धावत आलं .  दोर घेऊन तो विहीरीत शिरला . एका खोलगट डालग्यात बसवून सवूबाईला  वर खेचून  काढल.
सगळी माणसं  म्हातारीवर ओरडू लागली.
धरमाची बायको बायाक्का म्हणाली,"अगं  कशाला मरतेस?"
म्हातारी कुडकुडतच म्हणाली, "या सख्या आणि  पांडूनं दारू पिऊन सगळ्या संसाराची वाट लावली. घरात काय एक वस्तू  ठेवली नाय."
इतक्यात सवुबाईचा बारा -तेरा  वर्षाचा नातू -अजय आला आणि म्हणाला,"अग आजी, तू काय सैराट मधील आर्ची झालीस काय ? विहीरीत उडी मारायला. मी हाय खंबीर तुला बाळगायला".

     अरं माझ्या नातवा,माझ्या बाबांन मला  लहानपणातच गावच्या नदीत पोहायला शिकवलं होत. मरायला म्हणून उडी मारली पण पाण्यात गेल्यावर काय हात पाय हलवायच थांबतात व्हय.मग आली पोहत दगडाजवळ".
म्हातारीच बोलणं ऐकून सर्व विहीरीवर जमलेल्या मंडळीत एकच हशा पिकला अन अजय म्हातारीला हाताशी धरुन घरी घेऊन गेला.