34. Maharashtratil kille - 9 books and stories free download online pdf in Marathi

३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९

३४. महाराष्ट्रातील किल्ले- ९

९. पन्हाळा-

पन्हाळा महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध किल्ला आहे. हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, त्याचबरोबर, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान आहे. कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी च्या रस्त्याच्या दक्षिण दिसेह्ला सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. त्यामुळे इथे ट्रेकर्स ची गर्दी असते. महाराष्ट्राच्या इतिहासात ह्या किल्ल्याला अनन्य साधारण महत्व आहे. वेगवेगळ्या काळात दोन वेळा राजधानीचा मान मिळालेला हा किल्ला आजही मानाने नांदता आहे. कोकण आणि घाटमाथा यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.

पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळा गडाला पर्णालदुर्ग देखील म्हणाले जाते. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचा किल्ला होता. आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. पन्हाळा किल्ल्याच्या दोन स्वतंत्र भाग आहेत. एक भाग म्हणजे पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आहे आणि दुसरा भाग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर ह्या पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे. कोल्हापुरजवळील पन्हाळा गड परिसर हा एक प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणून ओळखीचे आहे. या शहराचा इतिहास शिवाजी महाराजांशी जोडला गेला आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील बराचसा काळ या पन्हाळा गडावर गेल्याचे सांगितले जाते. ह्या किल्ल्याचा विस्तार झिग झॅक आकाराचा आहे त्यामुळे हा किल्ला सापासारखा दिसतो त्यामुळेच पन्हाळा किल्ल्याला सापांचा किल्ला सुद्धा म्हणले जाते. या किल्ल्यात २२ किमीचा भुयार आहे. हे भुयार किल्ल्यापासून सुरु होतो ते एका देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन थांबते. पण आत्ताच्या घडीला, सुरक्षेच्या कारणास्तव हे भुयार बंद आहे. असे सांगितले जाते की, शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर ५०० पेक्षा अधिक दिवस घालवले होते. पुढे १८२७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पण शिवाजी महाराजांच्या आधी या किल्ल्याची निर्मिती राजा भोज यांनी केली होती. मात्र बदलणाऱ्या सत्तेच्या काळात या किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केले. सिध्दी जोहारने शिवाजी महाराजांच्या पन्हाळ गडाला चार महिने वेढा दिला होता. एका पावसाळ्या रात्री ह्या वेढ्यातुन सुटुन शिवाजी महाराज विशाळगडला गेले. सिध्दी जोहारने त्यांचा पाठलाग केला पण त्यावेळी बाजीप्रभु देशपांडे ह्यांनी पावनखिंड येथे त्याला आडवले. यामुळेच शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहचु शकले. परंतु बाजीप्रभु देशपांडे लढा देत असतांना येथे धारातिर्थ पडले आणि मरण पावले. ह्याच इमारती मध्ये अशाच प्रकारची आणखी एक इमारत आहे तिला सज्जाकोटी म्हणतात. १५०० ए. डी. मध्ये ही इमारत इब्राहिम अदिलशाह यांनी बांधली आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी महाराज यांना ह्या कैदेत ठेवले होते योग्य संधीचा फायदा घेऊन ते येथुन फरार झाले. येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते. शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड, रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपल लहानपण घालवले. आणि पन्हाळा हा असा किल्ला आहे की जेथे शिवाजी महाराजांनी ५०० दिवस मुक्काम केला होता. ब्रिटीशांच्या काळात १७८२ ते १८२७ पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य आहे. ह्या गडाच्या आत मध्ये संभाजी मंदीर, सोमेश्वर मंदीर, तीन दरवाजा, राज दिंडी ई. आहेत.

आदिलशाहीच्या काळात पन्हाळा गडाची डागडुजी करण्यात आली होती आणि तटबंदी, त्याचबरोबर दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात थोड्या सुधारणा सुद्धा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कब्जा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही काळ दिला होता. पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता. इतिहासात सांगितले जाते की ११७८ ते १२०९ या काळात या गडाचे बांधकाम शिलाहार भोज दुसरा यांनी केले. नंतर हा किल्ला यादवांकडे आला. १६ व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. शिवाजीराजांनी १६५९ मध्ये या गडावर हल्ला केला आणि त्यावर १६७३ पर्यंत आपला हक्क कायम ठेवला होता.

* गडावरील काय पाहता येईल-

१. राजवाडा- राजवाडा म्हणजे ताराबाईचा वाडा. वाडा अतिशय प्रेक्षणीय आहे आणि ह्या वाड्यातले देवघर बघण्यासारखे आहे. आजच्या घडीला, ह्या हा ठिकाणी नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

२. सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत पाहता येते. याच इमारतीस शिवाजी महाराजांनी यांनी संभाजी राजांना या प्रांताचा कारभार पाहण्यास नेमले होते. शिवाजी महाराजांची गुप्त खलबते याच ठिकाणी चालत.

३. राजदिंडी- ही वाट दुर्गम आहे. ही वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले होते. हीच वाट विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. आणि याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहचले.

४. अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला होय. याच्या आजूबाजूला खंदक आहे. येथेच गंगा, यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे पाहायला मिळतात. यात वरी, नागली आणि भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेऱ्या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ सुद्धा होते.

५. चार दरवाजा- हा दरवाजा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा आणि महत्त्वाचा दरवाजा आहे. परंतु, इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. ह्या दरवाज्याचे थोडे भग्नावशेष आज पाहता येतात. इथेच "शिवा काशीद" यांचा पुतळा सुद्धा पाहायला मिळतो.

६. सोमाळे तलाव - गडाच्या पेठेला लागुनच हे एक मोठा तलाव आहे. तलावाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी आणि त्यांच्या सहस्र मावळ्यांनी १ लाख चाफ्याची फुले वाहिली होती.

७. रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या पाहायला मिळतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य आणि बाजूची त्यांच्या पत्नीची समाधी आहे.

८. रेडे महाल- ह्या रामचंद्रपंत अमात्य समाधीच्याच बाजूला एक आडवी इमारत पाहायला मिळते. ह्या इमारतीला रेडे महाल असे म्हणले जाते. वस्तुतः ही पागा आहे. परंतु, त्यात नंतर जनावरे बांधली जायला लागली म्हणून ह्याला रेडे महाल म्हणले जात असे.

९. संभाजी मंदिर- रेडे महालाच्या पुढे संभाजी मंदिर पाहायला मिळते. हे एक छोटी गढी वजा मंदिर आहे. मंदिरात शिलालेख पाहायला मिळतो आणि मंदिराच्या आवारात विहीर पाहता येते. याचबरोबर, घोड्याच्या पागा सुद्धा पाहायला मिळतात.

१०. धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर एक झोकदार इमारत पाहायला मिळते. ह्यालाच धर्माकोठी असे म्हणले जाते. धान्य आणून याच ठिकाणी दानधर्म होत असे.

११. अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची आणि काळ्या दगडांची वास्तू पाहायला मिळते. ही वास्तू अंदरबाव. ही वस्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे. आणि मधला मजला हा ऐसपेस आहे. त्यातूनच तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी सारखा चोर दरवाजा पाहायला मिळतो. या इमारतीत शिलालेख सुद्धा पाहता येतो.

१२. महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूला महालक्ष्मी मंदिर पाहायला मिळते. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज बांधला जातो. आणि राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होते.

१२. तीन दरवाजा- हा पश्‍चिम दिशेला असणारा सर्वात महत्त्वाचा दरवाजा मनाला जातो. दरवाज्यावरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी हा किल्ला जिंकला.

१२. बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका मोठ्या चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा पाहायला मिळतो.

१३. पुसाटी बुरुज- पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिम टोकावर हा पुसाटी किंवा पिछाडी बुरुज आहे. येथे २ बुरुज असून त्यामध्ये एक खंदक आहे. बुरुज काळ्य़ा घडीव दगडात बांधलेला आहे आणि त्याची उंची २० फूट आहे.

१४. नागझरी- गडावर बारा महिने पाणी मिळावे म्हणून दगडात बांधलेले पाण्याचे एक कुंड आहे. याला नागझरी असे म्हणाले जाते. या कुन्दामधील पाणी लोहयुक्त आहे. याच्या जवळच हरिहरेश्वर आणि विठ्ठल मंदिर पाहता येते.

१५. पराशर गुहा- पन्हाळगडावर लता मंगेशकर यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्याजवळ एकामागोमाग खोदलेल्या ५ गुहा आहेत. आत मध्ये दगडात खोदलेल्या बैठकी आहेत. याच गुहेत पराशर ॠषींनी तपश्चर्या केली होती.

१६. दुतोंडी बुरुज- पन्हाळगडावरील न्यायालयाजवळ दोनही बाजूंनी पायर्‍या असलेला बुरुज पाहायला मिळतो. त्याला दुतोंडी बुरुज असे म्हणाले जाते. या बुरुजापासून काही अंतरावर असलेल्या बुरुजाला दौलत बुरुज असे म्हणतात.

याशिवाय गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा, मोरोपंत ग्रंथालय इत्यादी ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.

* पन्हाळ गडावर कसे पोचता येईल-

पन्हाळा गडावर पोचण्यासाठी २ मार्ग आहेत-

१ चार दरवाजा मार्गे :-
कोल्हापूर शहरातून एस टी बसने किंवा खाजगी वाहनाने थेट किल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते.

२ तीन दरवाजा मार्गे :-
गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्य साधारण महत्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळागड. २ वेळा राजधानीचा मन मिळालेला. या किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. आणि थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पर्यटनाखेरीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खाणा खुणा आजही इथे अनुभवता येतात. कोल्हापूरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेला हा गड आजही भक्कमपणे उभा आहे.

Share

NEW REALESED