Back to Love - Part - 4 books and stories free download online pdf in Marathi

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 4

क्रमशः

सांग ना काय झाले आहे आई..?" प्रीतीचे आईचे डोळे तिचे हे सगळे प्रश्न ऐकून पुन्हा पाणावतात.. "अगं प्रीती.. मला सांग.. तुला खरचं काही नाही माहित आहे की, तू मुद्दाम लपवतेस आमच्यापासून हे सगळं?.. प्रीती अगं काय करून बसलीस हे तू ??. सांग ना असे का केलीस तू??.. बोल ना.."प्रीतीची आई रडत रडत प्रीतीला विचारते. "आई काय झालंय.. तू मला असे प्रश्न का विचारात आहेस गं.. सांग ना मला.. तुम्ही दोघेही नीट बोलत नाही आहेत माझ्याशी कालपासून.." प्रीती पुन्हा पुन्हा तिचे आईला विचारात असते. "अगं प्रीती.. डॉक्टर आम्हाला काय म्हणाले माहित आहे का तुला??.. डॉक्टर आम्हाला त्या दिवशी त्यांचे केबिनमध्ये बोलावून म्हणाले होते.. अभिनंदन!! तुम्ही दोघेही लवकरच आजी-आजोबा होणार आहात.. तुमची मुलगी दोन महिन्यांची प्रेग्नेंट आहे.. आता पुढील सहा-सात महिने नीट काळजी घ्या तिची.. बाकी घाबरण्याचं काही कारण नाही.. या स्थितीत जास्त उपवास, जागरण यामुळे कदाचित चक्कर आली असेल तिला पण आता पूर्ण ठीक आहे ती.."

गोड कळी ती

उमलायचे आधीच तोडू कशी ..

वेदना त्या कळीच्या

आयुष्यभर मी पेलू कशी ..

"काय??.. आई.. काय म्हणालीस तू आई.??... मी प्रेग्नेंट आहे??.." ती बातमी ऐकून प्रीतीला धक्काच बसतो. "हो गं.. आणि सांग आता तरी बोल कसे झाले हे सगळे ?.. आणि कोण आहे कोण तो मुलगा??.." प्रीतीची आई तिला तिचे प्रेग्नन्सी बद्दल विचारते.. मग प्रीतीचेही डोळे अश्रूंनी भरून जातात आणि ती तिचे आईचे खांद्यावर रडत रडत आईला आर्यनवरील असलेले प्रेमाबाबत, महाबळेश्वर मधील त्यांचे ट्रिपबद्दल आणि नंतर तिचे कॉलेज मधील आर्यन सोबत झालेले ब्रेकअपबाबत सांगते. इतकेत प्रीतीचे बाबा तिथे येतात आणि प्रीतीला बोलतात "हे बघ प्रीती माझ्या एका मित्राशी आताच बोलणं झाले आहे माझं.. त्यांचे ओळखीचे एक डॉक्टर आहेत आणि उद्या आपलेला त्या डॉक्टरांना भेटायला जायचे आहे.. तुझ्या अबॉर्शनसाठी.." "काय म्हणालात बाबा!! माझे अबॉर्शनसाठी.. नाही बाबा नाही... अबॉर्शन नाही.. मी नाही असे त्या लहान निष्पाप जीवाला असे मारू शकत.. आपण असे नको करायला.. प्लिज प्लिज.. बाबा ऐका माझे.. आपण अबॉर्शन नको करायला ओ.. मी बोलेन आर्यनशी... आणि मला विश्वास आहे त्याच माझेवर आजही तितकंच प्रेम आहे जितकं माझे त्याचेवर.. तो मला म्हणाला देखील होता की, कॉलेज संपलेवर आपण दोघे घरच्यांशी बोलून लग्न करू लगेचच.. मी बोलेन त्याचेशी बाबा.." प्रीती आपल्या बाबांना समजावत समजावत आर्यनला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल काढते. बराच वेळ प्रयत्न करून देखील त्याचा मोबाईल लागत नसतो आणि प्रीतीला तर आर्यनचा मोबाईल नंबर आणि तो मुबंईला राहतो इतकीच माहिती असते त्याचे बद्दल.. ती मग आपल्या कॉलेजच्या फ्रेंड्स ग्रुप मध्ये दोघा-तिघांना फोन करून विचारते तर तिला इतकेच कळते की, आर्यन कॉलेजचे शेवटच्या दिवशी पेपर देऊन कोणालाच न भेटता मुंबईला त्याचे घरी निघून गेलाय आणि त्याच दिवसापासून त्याचा मोबाईलही लागत नाही आहे..

आता काय करायचं ?? हा मोठा प्रश्न प्रीती आणि तिचे आई-बाबांसमोर उभा रहातो. कारण ही गोष्ट जास्ती दिवस लपूनही राहणारी नव्हती.. प्रीतीचा विरोध असून देखील तिचे आई-बाबा प्रीतीचे भविष्याचा विचार करून तिचे अबॉर्शनचा निर्णय घेतात. दुसऱ्या दिवशी ते प्रीतीला घेऊन त्या डॉक्टरांना भेटायला जातात.. तिची तपासणी करून झालेवर डॉक्टरांना असे समजत की तिचे या स्थितीमध्ये आता अबॉर्शन केले तर तिचे जीवाला धोका होऊ शकतो. डॉक्टर त्या परिस्थितीची प्रीतीचे आई-बाबांना कल्पना देतात. प्रीती तिचे आई-बाबांची एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी असल्याने ते मग तिचे जीवाला धोका असल्याने तिचे अबॉर्शन न करण्याचा निर्णय घेतात. प्रीती आणि तिचे आई-बाबा आर्यनला शोधून त्याचे सोबत प्रीतीचे लवकरात लवकर लग्न लावून देण्याचं ठरवतात. आता एकच प्रश्न असतो तो म्हणजे आर्यनला शोधायचं तर कसे??

ओढ तुझ्या भेटीची

अंतर दोन मनातलं..

वाटे खूप दूर दूर

अंतर दोन श्वासातलं..

काही दिवसांनी प्रीतीला थोडं बरे वाटू लागलेवर प्रीतीचे बाबा प्रीती ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तेथील कॉलेजच्या रेकॉर्ड मधून आर्यांचे घरचा पत्ता शोधून काढतात. आर्यनचे मुंबईतील घरचा पत्ता मिळालेमुळे प्रीती थोडी टेन्शन फ्री होते तसेच तिचे आई बाबाही. मग सर्वजण मिळून मुंबईला आर्यांचे घरी जाऊन त्याला इकडे घडलेली हकीकत सांगून त्या दोघांच लग्न करून देण्याचं ठरवतात. दुसरे दिवशी ते सर्व आर्यनचे घरी मुंबईला जायला निघतात.. आर्यनची आणि आपली खूप दिवसांनी भेट होणार या कल्पनेने प्रीती खूप खुश असते. पण प्रीतीचे आई बाबांचे मनातलं थोडं फार टेन्शन त्यांचे चेहऱ्यावर दिसतच होते. मुंबईचे रेल्वे स्टेशनवर पोहोचलेवर ते टॅक्सीवाल्याचे मदतीने आर्यन ज्या अपार्टमेंटमध्ये रहात असतो तिकडे पोहोचतात. आर्यन आणि त्यांचे कुटुंबीयांचा फ्लॅट अपार्टमेंटचे ७व्या मजलेवर असतो. ते सर्वजण लिफ्टने वर जातात आणि पाहतात तर काय!!.. आर्यनचे घराला बाहेरून कुलूप असते त्यांचे घरी कोणीच नसते.

आर्यनचे घरचा पत्ता मिळालेने मनात एक आशेचा किरण होता पण तोही आता त्यांचे फ्लॅट वरील दाराला लागलेले ते कुलूप पाहून मावळला होता. प्रीतीचे बाबा आर्यनचे घराचे शेजारील फ्लॅटमध्ये त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांचे फ्लॅटची बेल वाजवतात पण बराच वेळ बेल वाजवून देखील त्यांना त्या फ्लॅट मधून कोणीच काही प्रतिसाद नाही देत. मग निराश मानाने पुन्हा सगळे लिफ्ट मधून खाली येतात आणि खाली गेलेवर त्यांना तेथील अपार्टमेंटच्या वॉचमन कडून असे समजते की, आर्यन आणि त्याची फॅमिली आर्यनच्या बाबांची दिल्लीला ट्रान्सफर झाली असलेने दोन दिवसांनपूर्वीच तो फ्लॅट सोडून कायमचे दिल्लीला निघून गेले आहेत. प्रीती आणि तिचे आई बाबांची वॉचमनचे ते शब्द ऐकून घोर निराशा होते व ते पुन्हा साताऱ्याला आपल्या घरी परततात. आर्यनचा काहीच ठाव ठिकाण लागत नसलेला पाहून प्रीतीचे आई-बाबा खूप हताश होतात. आशा परिस्थितीत त्यांना काय करावं हेच सुचत नसते कारण प्रीतीची प्रेग्नन्सीची बातमी जास्त काळ लपून राहणारी नव्हती. तिचे दुसरीकडे लग्न लावून द्यायचं म्हंटले तर प्रीतीचा या गोष्टीला विरोध होता कारण तिला फक्त आर्यनशीच लग्न करायचे होते.

तिकडे दिल्लीला जाऊन देखील आर्यन अजूनही प्रीतीला विसरलेला नसतो. त्याचे मनात अजूनही आशा असते प्रीती त्याला माफ करून पहिल्यासारखीच त्याचेवर प्रेम करेल. त्यांचे कॉलेजचे शेवटचे वर्षाचे परीक्षेचा निकाल आता काही दिवसांवरच आलेला असतो. आर्यनने स्वतःशी ठरवलेलं असते निकालाच्या दिवशी प्रीतीची कॉलेजवर भेट घेऊन तिची माफी मागायची. अखेर तो त्यांचे कॉलेजचे निकालाचा दिवस उजेडतो आणि आर्यन त्या दिवशी दिल्लीहून फ्लाइटने पुण्याला येतो. कॉलेजवर आलेवर त्याला जवळ जवळ सगळे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात ते सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा चार-पाच महिन्यांनी एकत्र भेटतात. पण आर्यन जिची मनापासून वाट पहात असतो तीच अजून आलेली नसते. आर्यन परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला असतो आणि आर्यनलाही माहीतच असते याच सार श्रेय हे प्रीतीचे असते. तिने त्याला वेळीच सावरले नसते तर आज त्याला हे घवघवीत मिळालेलं यश पाहायला देखील मिळालं नसते. आर्यन एक दोन मित्रांना विचारतो पण कोणाला काहीच माहिती नसते प्रीतीबद्दल. आर्यनचे मनाला पुन्हा तेच प्रश्न सतावतात खरचं इतकी चिडली आहे का प्रीती माझेवर??.. ती आजही मला भेटायला कॉलेजवर नाही आली.. ती का नसेल आली?? तिला खरचं आमच्यातील नातं तोडायचं होते का?? तिला खरचं कधीच काहीच नाही बोलायचं आहे का माझे सोबत??

क्रमशः भाग ५

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर