Hartalika Vrat books and stories free download online pdf in Marathi

हरतालिका व्रत

हरितालिका व्रत

हे हरितालिका तिज म्हणुनपण ओळखले जाते .
कुमारिकेने इच्छितवर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य
मिळण्यासाठी हे व्रत करावे .
पार्वतीने शंकराला पती म्हणुन वरल्या नंतर त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हे व्रत केले होते .
याविषयीची कहाणी अशी आहे
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती.
पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते?
श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा.
तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे “हरितालिका” हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे.
ते तुला सांगतो.
तेच तु पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तु मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं.
ते पूर्वी तु कसं केले होतेस ते मी तुला आता सांगतो.
तु हिमालय कन्या होतीस .
तु लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस.
चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस.
थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस.
हे तुझे श्रम पाहुन तुझ्या वडिलांना फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली.
इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं.
तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तोच तिच्यासाठी योग्य नवरा आहे.
त्यांनीच मला तुमच्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे म्हणुन इथं मी आलो आहे.
हिमालयाला मोठा आनंद झाला.
त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले.
नारद गेल्यावर तुझ्या वडीलांनी ही गोष्ट तुला सांगितली.
ती गोष्ट तुला रुचली नाही.
तु रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तु सांगितलंस, महादेवावाचून मी कोणाशीच विवाह नाही करणार असा माझा निश्चय आहे, असं असुनसुद्धा माझ्या वडीलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे.
ह्याला काय उपाय करावा?
मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं
तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास.
तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस.
तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतियेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं.
नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं.
आणि वर मागण्यास सांगितलं.
तेव्हा तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली,व मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस.
मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस.
इतक्यात तुझ्रे वडील तिथं आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं.
मग तु सर्व हकीकत सांगितलीस.
हे ऐकुन त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं व ते
तुला घेऊन घरी गेले .
मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहुन त्यांनी तुझा माझ्याशी विवाह लावुन दिला .
अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली.
याला हरतालिका व्रत असं म्हणतात.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं.
त्यापुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी.
मनोभावे त्याची प्रार्थना करावी.
नंतर ही कहाणी कथन करावी व रात्री जागरण करावं.
या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो.
साता जन्मांचं पातक नाहीसं होतं.
राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं.
असे म्हणतात ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात.
कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति “वाण” द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपुजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.
ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे.
कुमारिका मनपसंत जीवनसाथीदार मिळवा तर सुवासिनी नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिका हे व्रत करतात.
हे व्रत कसे करायचे याची पूजा विधी तर आहेच पण याचे काही नियम आहेत ते पाळणे आवश्यक आहे .

व्रत करणार्‍यांना स्त्रियांनी क्रोध करू नये. स्त्रिया हाताला मेंदी लावतात त्यामागे क्रोधावर ताबा असला पाहिजे हे ही एक कारण आहे.

हरितालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणार्‍या स्त्रियांनी रात्री झोपू नये. जागरण करून भजन कीर्तन किंवा काही मनोरंजक खेळ खेळत जागरण करावे.

चुकून ही घरातील वडीलधार्‍यांना अपशब्द बोलू नये. त्यांचा अपमान करू नये . पूजे पूर्वी वडीलधार्‍यांच्या आशीर्वाद घेऊन पुजा करावी.

हरितालिका हे व्रत निर्जल केलं जातं. या कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाहीत.काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यास फलाहार करतात.

घरात शांतता ठेवावी. क्लेश, भांडण होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये .
हे व्रत कसे करावे याची माहिती अशी ..

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.
या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावा. रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
अक्षता, हळद कुंकु वाहुन मनोभावे नमस्कार करावा.
घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी.
पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पुजा ही करावी.
सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजाकरावी.
पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.
पूजे साठी लागणारे साहित्य असे आहे:
चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरआरती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये.
याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने.

पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.
हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्या अशा आहेत
बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी.
कुमारिकेने इच्छितवर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.
दिवसभर कडक उपास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खाऊ नये .
नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे.
दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी.
अशी हरतालिका पार पडल्यावर चतुर्थीला गणेश आगमन होते .
या दिवशी जेवण करून हा उपास सोडतात .
तसेच या हरीतालीकेंचे विसर्जन गणपती सोबत केले जाते .