Tulshi VIvah books and stories free download online pdf in Marathi

तुळशी विवाह

तुळशी विवाह

कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.
हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.
श्रीविष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात
आणि चतुर्मास संपतो असा आहे समज आहे .
विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.

भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळश ही लक्ष्मी स्वरूप् मानले जाते.

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.
तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे.
बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते, सकाळी तिला पाणी घातले जाते व पूजले जाते आणि संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावर तुळशीपुढे उदबत्ती ओवाळून तिला नमस्कार केला जातो .
विष्णूचा तुळशीशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने करणार्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
यादिवशी घराला सजवले जाते .
तुळस ही आपल्या घरातीलच कन्या मानून, तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात व सजवितात.
त्यावर कृष्णाची नावे लिहितात.
बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात.
कुटुंब प्रमुख स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो.
नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात.
पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो.
कुटुंब प्रमुख यानंतर तुळशीचे कन्यादान करतो व नंतर मंत्रपुष्प आणि आरती केली जाते.
घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.
संध्याकाळची पूजा आटोपल्यावर वृंदावनाभोवती ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती, दीपाराधना उरकण्यात येते.
ज यावेळेस तिला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो .

व आप्तेष्टांना ही लाहय़ा, कुरमुरे, उसाच्या गंडे-या देण्यात येतात. प्रसाद म्हणून फराळ दिला जातो .

फटाके फोडले जातात .
हा विवाह केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे सांगितले जाते. ते व्रत तुलसीवनात करणे हे विशेष पुण्यप्रद मानले आहे. या व्रताने सौभाग्य, संतती, संपत्ती, विद्या इत्यादी गोष्टींची प्राप्ती होते. तसेच रोगनिवारणही होते, अशी समजूत आहे.

श्रीविष्णूस तुळस अतिप्रिय म्हणून तिला ‘हरिप्रिया’ म्हणतात. पुढे वृंदा हिनेही द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण त्यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले. अशा प्रकारे, हिंदू लोक रुक्मिणी-कृष्णविवाह तुळशी विवाह विधीच्या रूपाने त्या दिवशी दरसाल साजरा करतात.

काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर यथाविधी विवाहहोम करण्याचाही प्रघात आहे. पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशीस तुलसी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतलेली असतील, त्या सर्वाची समाप्ती करून व चातुर्मास्यात जे पदार्थ वर्ज्य केले असतील ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन मग स्वत: सेवन करण्याची पद्धत होती.

तुळशीच्या लग्नानंतर हिंदू लोकांच्यामध्ये विवाहासंबंधी कार्यास सुरुवात होते. मुलामुलींची लागणे जुळवली जातात .
या सुमारास वधुपिते घराबाहेर पडतात व मुलीचे लग्न जुळवण्यासाठी चपला झिजवू लागतात, असे पूर्वी म्हणत.

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते, तिच्या पानावरचे उदक मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य लाभते आणि मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठास जाते. इतके हिंदू धर्मातील धारणेमध्ये तुळशीला महत्त्व आहे.त्यामुळे मृत्युनंतर ओठावर तुळशीचे पाण ठेवले जाते .

‘‘तुळसीचे पान. एक त्रलोक्य समान,
उठोनिया प्रात:काळी, वंदी तुळसी
एक पूजन तुळसीचे न लगे तीर्थाधना जाणे,
नित्य पूजने तुळसीसी योगायोग न लागे काही,
तुळसीवाचुनी देव नाही’’अशा शब्दांत संत एकनाथांनी तुळशीचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

तुळशीमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन वायू सोडण्याचा गुणधर्म जास्त असल्यामुळे शरीर निरोगी राखण्यास तिचा उपयोग होतो.
दारात वा घरात तुळशीचे झाड असल्यास घरात पिसवा, हिवतापाचे जंतू शिरकाव करत नाहीत. तुळस प्रदूषणनाशक आहे. ताप, सर्दी, खोकला दूर करणे, हवा शुद्ध करणे हे तिचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

हिंदूंच्या अंत:करणात तुळशीसंबंधात पूज्यभाव आहेच; पण इतर धर्मीयदेखील तुळशीबद्दल आदर दाखवतात. इंग्रजी शब्दकोशात तुळशीला ‘पवित्र झाड’ असं म्हटलं आहे.
ग्रीक भाषेतील ‘बेंझिलिकॉन’ हा तुळशीसंबंधीचा शब्द ‘राजयोग’ या अर्थाचा आहे.
तुळशीला फ्रेंच व जर्मन भाषांतही ग्रीक शब्दांप्रमाणे बहुमानाचे अर्थ लाभलेले आहेत. इटली व ग्रीस देशांत प्राचीन काळी तुळशीच्या अंगी विशिष्ट शक्ती आहे, असे मानत असत.
प्रत्येक हिंदूच्या घरी तुळस असायलाच हवी’, असा संकेत आहे. ‘सकाळी आणि सायंकाळी सर्वांनीच तुलसीदर्शन करावे’, असे सांगितले आहे.

देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानांचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोचतो , सात्त्विक होतो आणि त्याच्यावर वाईट शक्तींचे आक्रमण होण्याची शक्यता रहात नाही .

नैवेद्यावर भावपूर्णरित्या तुळशीदल ठेवल्याने ते त्याच्या उपजत गुणधर्माप्रमाणे देवतेकडून येणारे चैतन्य ग्रहण करून प्रभावीपणे नैवेद्याकडे संक्रमित करते.
नंतर अशा नैवेद्याच्या सेवनाने जिवाच्या देहाला चैतन्यलहरी मिळण्यास साहाय्य होते असे समजले जाते .

हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे.

गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरॊहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या उपराज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले होते .

तुळशी विवाहा नंतर दिवाळीउत्सवाची समाप्ती होते .

समाप्त