kadambari- jivlagaa - 15 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - जिवलगा ... भाग - १५

कादंबरी - जिवलगा...भाग- १५ वा , ले- अरुण वि. देशपांडे
--------------------------------------------------------------------------------

नेहाला तिच्या ऑफिस मध्ये बसवून ,तिचा सगळ्यांशी परिचय करून दिल्यावर मधुरिमा बाहेर पडली .गाडी चालवता चालवता तिच्या मनामध्ये नेहाबद्दलचे विचार चालू होते. .आपण राहतोय त्या घराच्या मालकांची निम-शहरी भागातून आलेली नात्याने अगदी जवळची असणारी मुलगी- नेहा ..

पहिल्यांदा तिला पाहून आपल्या मनात लगेच आले होते - .."कशी काय अशी राहते ही मुलगी ? ,गबाळी,वेंधळी असावी बहुतेक ? कसे होईल बाबा हिचे इथे ? काही खरे नाही हिचे "!असेच आपल्या मनात आले होते, हे आठवून आज मधुरीमाला नाही म्हटले तरी थोडे गिल्टी वाटत होते.


अशा या नेहाला आपल्या प्रयत्नाने जॉब मिळवून देता आला , ती आज जॉईन पण झालीय , एक छान काम आपल्या हातून पूर्ण झालय ,मधुरीमाच्या मनाला खूप समाधान वाटत होते .

मावशी आणि काकंना याचा किती आनंद होत असेल याची कल्पना मधुरीमाला होती. मावशी आणि काकांच्या परिवाराशी आपले नाते काय आणि कसे आहे ? नेहाने आल्यापासून आपल्या बद्दल एकदाही विचारले नाही तू कोण आहेस,? इथे इतक्या हक्काने कशी राहते आहेस ?आणि त्याबद्दल जरा ही उत्सुकता दाखवली नाही , या मुलीच्या या वेगळ्या स्वभावाचे खरे तर आपल्याला पहिल्यापासून आकर्षण वाटले आहे.

नाही तर ,ओळख व्हायचा अवकाश , लगेच पूर्ण हिस्ट्री जाणून घेण्याची उत्सुकता ,अशा स्वभावाची माणसे आपल्याला नेहमीच भेटत असतात . असे असतांना या नेहाने आपल्याला अगदी सहजतेने एक मित्र- मैत्रीण म्हणून मनापासून स्वीकारले


जसा जसा नेहाचा सहवास वाढत गेला , तिच्याशी बोलणे सुरु होत गेले ..आपल्याला तिच्यातील एक सालस ,निर्मल मनाची व्यक्ती खूप भावत गेली , " सहज ,स्वाभाविक वागण्याने सुद्धा माणसाची छाप इतरांच्या मनावर नक्कीच पडत असते " हाच धडा जणू नेहाच्या सहवासातून आपण शिकलो आहोत . बाह्य रूपावरून केलेले अंदाज खूप कमी वेळा खरे ठरत असावेत .हे नक्की ,त्याशिवाय का ..का रे भुललासी वरलीया रंगा " हे संत वचन .आपल्याला नेमके समजावून टाकणारे आहे.

आपण कुठे होतो , तिथले वातावरण कसे होते ?.या गोष्टीवर आपली जडण-घडण अवलंबून असते ,हे थोडे खरे जरी असले तरी ..एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून आपले "व्यक्तिमत्व " लोकांच्या समोर येण्यात "पारिवारिक संस्कारांचा खूप मोठा आणि
मोलाचा वाटा असतो .बहुतेक वेळा आपल्या सारख्या स्वतःला आधुनिक समजून वागणार्यांना ..अशा पारिवारिक नियमांचे ,बंधनांचे पालन करणे ",नकोसे वाटत असते, असा आग्रह करणार्या आपल्याच वडीलधार्यांचा सतत राग येत असतो , त्यांच्या विरुद्ध बंडखोरी करण्यात आपल्याला मोठी फुशारकी वाट असते ..पण ..जेव्ह्ना आपल्या मोठ्या माणसांनी सांगितलेल्या ,शिकवलेल्या गोष्टींचे महत्व कळते त्यातील अर्थ कळतो त्यावेळी
आपल्या नव्या पिढीला खूप वेळा पश्चताप करावा लागतो. हे कळण्यास सुद्धा उशीर होऊन गेलेला असतो.नेहाचे उदाहरण आपले डोळे उघडणारे आहे हे नक्कीच , म्हणून ही नेहा आपली लाडकी मैत्रीण कशी झाली,कधी झाली हे कळलेच नाही.

नेहाला येऊन आता बरेच महिने झालेत ,पण इतक्या दिवसात एकदा ही तिच्या घरचे कुणी इकडे आलेले नाही ,आणि नेहा तिकडे गेली नाही ?का बरे असे होत असेल ? तिच्या आई-बाबांना आपल्या लाडक्या लेकीला सोडून कसे राहवत असेल ? आणि नेहाला सुद्धा वाटतच असेल ना ?पहिल्यांदा आपण आपल्या आई-बाबांना सोडून राहतो आहोत ,तरी सुद्धा ती कधी दाखवत नाही .

अगदी शांतपणे वागते, बोलते .आपल्या भावनांचे प्रदर्शन कसे करता येईल ? अशी संधी शोधणार्या माणसात राहण्याची सवय असणार्या मधुरीमाला ,नेहाच्या अशा कंट्रोल स्वभावाचे खूप कौतुक वाटत होते . तसे म्हटले तर नेहाच्या वयात आणि आपल्या वयात ..चक्क एक पिढीचे अंतर आहे,म्हणतात ना १२ वर्षानंतर पिढी बदलत असते , नेहाच्या तुलनेत तर आपण अजून जुन्या पिढीचे आहोत .तरी ही नेहाच्या आणि .आपल्या वागण्या -बोलण्यात जाणवावा इतका फरक आहे .

घरासमोर आल्यावर माधुरीमाने गाडी बंद केली ,तसे तिच्या विचारांची गाडी पण थांबली .गेट मधून गाडी आत घेत ,ती नेहमीच्या जागी लावून टाकीत ती घरात गेली .

हॉलमध्ये बसलेल्या मावशी-काकांना ती म्हणाली- पहिल्या दिवशी शाळेत जाऊन वर्गात बसवून येतात तसे आज आपल्या नेहाला मी तिच्या जॉबच्या पहिल्या दिवशी ऑफिसच्या खुर्चीत बसवून आले बरे का , सगळ्या स्टाफ शी ओळख करून दिली .काही काळजी करायची नाही आपण . तिचा मेन बॉस माझा फ्रेंड आहे , तो दुरून लक्ष ठेवणार आहे नेहमी आपल्या नेहावर .

मधु -तू एक म्हणून आमच्यासाठी नेहमी इतक करत असतेस ,आता आम्ही सहा महिने अगदी निर्धास्त राहू परदेशी .नेहाची काळजी तू असतांना आम्हाला मुळीच नाही.

हो हो ..तुम्ही बिनघोर जा , मी आहे ना ..

मधु वर तिच्या ब्लॉक मध्ये आली पण तिच्या मनात एक विचार .भुंग्या सारखा गुणगुण करू लागला ..ती याचाच विचार करू लागली

आता लगेच मावशी -काका परदेशी जाणार आहेत म्हणून आणि त्यात भर म्हणजे दोन महिने आपल्याला पण जायचे आहे

..माझ्या जिवलगा ..ला भेटण्यासाठी .

त्या आधी नेहाला आपण आपली स्टोरी सांगायलाच हवी ..

आपण नेमके कोण आहोत ?

काय नि कसे वाटेल नेहाला आपली कहाणी ऐकल्यावर ?

बदलून जाईल का नेहाचे आपल्याशी वागणे ?

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पुढील कहाणी - भाग -१६ वा ..लवकरच येतो आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा ...भाग - १५ वा .

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------