saahity samiksha lekhan - 1 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -१

वाचक मित्र हो -

आपल्या सोबत लेखन करणार्या साहित्यिक मित्रांच्या पुस्तकावर परीचयात्म्क आणि

समीक्षण -लेखन "हा देखील एक महत्वाचा साहित्यिक -लेखन प्रकार समजला जातो .

असे पुस्तक -समीक्षण कार्य मी गेली अनेक वर्षे करतो आहे .

माझे हे लेखन - आपणासाठी .."माझे साहित्य-समीक्षा लेखन " या शीर्षकाने सादर करीत आहे .

प्रस्तुत आहे -भाग -१

आपले अभिप्राय जरूर कळवणे .

स्नेहांकित -

अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------

माझे साहित्य-समीक्षा लेखन

-अरुण वि. देशपांडे -

-भाग -१

-------------------------------------------------------

लेख - १.
"कविता -संग्रह- "भरलेलं आभाळ
कवियित्री - वर्षा चौगुले
------------------------------------------------------
पहिली कविता , पहिला पाउस - दोन्ही गोष्टी मनाला चिंब चिंब करून टाकणाऱ्या
अशाच असतात. आणि या दोन्ही आवडत्या भावनाना जर "कवितासंग्रहात "
पाहण्याचा योग आला तर? -अहो हा योग आलाच आहे.
वर्षा चौगुले -या परिचित कवियित्रीचा "पहिला कविता संग्रह- "भरलेलं आभाळ "
आपल्या भेटीस आला आहे, त्याचे स्वागत करू या .
या भरलेल्या आभाळात" ढग दाटून आले आहेत ते " प्रेम -भावनेचे "., सखा , त्याची
ओढ, प्रेम व्यक्त करतांनाची आतुरता , आणि समर्पण " अशा विविध भावनांच्या
ढगांची दाटी" या आभाळात झाली आहे.
एकूण ऐंशी (८० ) कवितांचा या संग्रहात समावेश केलेला आहे.आणि
हा प्रेम-कवितांचा संग्रह असल्यामुळे, इतर विषयांच्या कविता का नाहीत ?
हा प्रश्नच उद्भवत नाहीये ,हे फार छान झाले आहे. आपल्या मनोगतात
कवियित्री म्हणते आहे-
भरलेलं आभाळ म्हटले की आठवत तो त्या आभाळाने साठवून ठेवलेला पाऊस ,
त्याने त्या पावसाला रिकाम कराव म्हणून आपल्या जीवाची होणारी घालमेल
आणि त्यानंतरच मग त्याच भिजवण आणि आपल मनोसक्त भिजण ...!
कविमनाच्या प्रत्येकाला भोवतालीचां निसर्ग सारखा साद घालीत असतो.
आणि आभाळ, त्या आभाळाची क्षणागणिक बदलणारी मनमोहक रूपे ,
दिनमान आणि ऋतुमान " यांचे बदलणे -हे सारे मग कवितेतून येते .
वर्षा चौगुले या कवियत्रीला हे सारे जाणवते , आणि मग तिच्या कवितेतून
आभाळ येत, पाऊस आणि त्याचे मनाला भारावून टाकणारे दर्शन येते ,
या सोबत मनातील प्रीती -भावना ,साथ सोबत करणारा प्रिय सखा , त्याच्या
बद्दलचा अनावर भावना -एवढे सगळे कवितेतून सहजतेने येते.
संग्रहातील कविता आकाराने लहान आणि मोठ्या आहेत . त्यातील छोट्या
कविता अधिक अर्थपूर्ण झाल्या आहेत"
असे मला वाटले.आणि या कवयित्रीला फेसबुकवर कविता /काव्य रचना
प्रकाशित करण्याची सवय असल्यामुळे कदाचित, छोट्या-छोट्या रचनांतून
अधिक प्रभावीपणे सांगणे छान जमलेले आहे. त्याचीच प्रचीती या संग्रहातील
अनेकाक्नेक कवितेतून नक्कीच येईल.
काही छान -कवितांचे उदाहरण घेऊ या- म्हणजे हे "भरलेलं आभाळ" कस
इंद्रधनुष्यी रंगाने खुलून आलेले आहे " हे ही कळेल.
"भर दुपारी
वळवाच्या पावसाने
चेहेऱ्यावर शिंपडावे
तृप्तीचे थेंब..
तशी तुझी भेट ............( पृ..८५)
२. भरलेलं आभाळ , थोडासा पाऊस
मन कस विसरेल बरसायचं ?
थोडस तुझ , खूप काही माझ
गाव कस विसरेल तरसायाच ?........( सांग-....पृ.६६)
३. "भेटीला कारण तर सख्या ,
मीच देऊन जाते
आठवणीच्या पावसात माझ्या
भिजवून जाते............(कारण...पृ .२४)
४. स्वप्नात येतांनासुद्धा सख्या ,
मला भीती फार वाटते ...
माझ्या डोळ्यातल्या पावसाने
तुझी झोप मोडेन म्हणून.....( भीती ...पृ..३८)

दोन मनाच्या तारा जुळतात ,त्यानंतरच्या सहवासाचे सुरेल सूर झंकारून येतात,
प्रेमाचा साक्षात्कार होण्याच्या " दिव्य क्षणाची अनुभूती मनाला होते , आणि मग
भोवतालीचे जगच बदलते," हे मनोरम्य बदलणे , प्रेमाचे बहरून येणे, मनांचे फुलुनी येणे,
परस्पर ओढीने भेटणे,"प्रेमाची हे विभ्रम कवयित्रीने -वर्षा चौगुले यांनी अतिशय तरलतेने
कवितेतून व्यक्त केले आहेत.
'भरलेलं आभाळ, तू , आताशा , लाट , तुला गंधाळतांना ,
अंगण, मेहंदी , खास , प्राजक्त, सागरा , कवडसा , घाई, सांग,
तरीही , याद, अस रे कस ? , पापणी पापणी....आणि इतर...
या संग्रह्तील कवितेतून प्रेम- आणि प्रेमभावना , प्रेमातील
,आसक्ती, प्रेमाची भक्ती , मनाची समर्पण भावना ,
स्वप्न आणि वास्तव, मिलनाची आस, आणि विरह या विरुध्द
भावना -असे खुपसे पैलू कवितेतून आपल्याला पहायला मिळतात.
वर्षा चौगुले यांच्या पहिल्याच कविता संग्रहाचा हा परिचय आहे,
समीक्षण नाही. त्यामुळे काय भावले हेच सांगितले आहे, याचा अर्थ
असाही नाही की -यातील सर्वच कविता खूप छान वगेरे आहेत," काही
सुचवावे असे जरूर आहे, त्यासाठी कवयित्री -वर्षा चौगुले परिश्रम
घेतील,कारण त्या अभ्यासू लेखिका आणि कवयित्री आहेत.
" त्यांच्या कवितांचा पुढील प्रवास अधिक आश्वासक आहे " याच्या खाणाखुणा
"भरलेलं आभाळ" या कविता संग्रहातून दिसून येतातच. आणि प्रसिद्ध साहित्यकार
नीलम माणगावे यांच्या प्रस्तावनेने या कवितेला पाठबळ लाभलेले आहेच.
कवितेच्या प्रांतात संग्रहाच्या रूपाने वर्षा चौगुले यांचे हे आगमन
रसिकांना आवडणारे असेच आहे. "भरलेलं आभाळ" या कविता -
संग्रहाचे ते आस्थापूर्वक स्वागत करणार याची खात्री आहे.
प्राची प्रकाशन -पुणे यांनी हा संग्रह प्रकाशित केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

लेख-२

पुस्तक-परिचय "-

"कवितेच्या वाटचालीच्या पाउलखुणा -
"राजज्योत "
-------------------------------------------------------------------------------
असे म्हटले जाते की- "कविमन प्रत्येकात दडलेले असते, !" त्याच्या
शोधात ज्यांचा प्रवास सुरु असतो- ते कवितेच्या रूपाने जीवनाचे दर्शन
घडवतात. आपले अनुभव कवितेतून मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
अशाच एका कविमनाच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन "-त्याच्याच कवितेतून
आपण घेणार आहोत.
निमित्त आहे- कवियत्री- ज्योत्स्ना राजपूत यांच्या नुकत्याच प्रकाशित
"राजज्योत "-या चारोळी संग्रहाचे.-त्याचा हा आस्वादक -परिचय.
"चारोळी" या प्रकाराने अलीकडे कवितेच्या लेखन प्रकारात
लोकप्रिय स्थान मिळवले आहे असे दिसते. चार ओळीतून
होणारे भाव-दर्शन प्रभावीपणे झाले तरच या चार-ओळी "
रसिकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतात. अन्यथा हा येक
"शब्दांचा निर्जीव खेळ होऊ शकतो."
हा संभाव्य धोका "पत्करून ज्योत्स्ना राजपूत यांनी चारोळी
लेखन करून -त्याचा संग्रह देखील प्रकाशित केला आहे. त्यांच्या
या धाडसाचे आपण वाचक या नात्याने कौतक आणि अभिनंदन
करू या.
"राज ज्योत" या संग्रहात जवळपास सत्तर चारोळ्या आहेत.
स्व:":शी संवांद,, भावनाशील मनाला अपेक्षा-भंगाच्या तडाख्यातून
सावरून घेण्याची समजूतदार वृत्ती, तो आणि ती" यांच्यातील
प्रेम-भावनेचे वेगवेगळी भावरंग, याचे दर्शन घडवणाऱ्या चारोळ्यांची
संख्या प्राधान्याने जास्त आहे. दोन-चार चारोळ्या दोन वेळा वेगवेगळ्या
ठिकाणे दिसून येतात.
"अल्पाक्षरी रचना "-कवितेचे एक प्रमुख आणि प्रभावी
विशेष -रूप" मानले जाते. त्या मुळे ओळी जरी चारच असल्या ,
तरी" अल्प शब्द-संख्या आणि अर्थवाही शब्द-रचना " या दोन मुळे
चारोळी- रचना " प्रभावी होते. प्रस्तुतच्या संग्रहात याचे काही उत्तम
उदाहरणे आहेत.
" तू फुंकर घालशील म्हणून
मी जखमही बांधत नाही
तू फुंकर घातल्याशिवाय
तीही स्वतःला सांधत नाही........." (पृ-४)
आणि ....
काही प्रश्न उत्तरासोबत
सुखाने संसार मांडतात
काही उत्तराच्या प्रतीक्षेत
आयुष्यभर अश्रू सांडतात ..............."(पृ-३)
तुझ्या माझ्या प्रीतीने
रात्रही झाली बेधुंद
चंद्राची चालही मला
आज वाटते थोडी मंद...........(पृ-१३),
आणि...
या काही वेगळ्या भाव-छटा असलेल्या रचना ,
अपेक्षाच ओझ वाहण्यात
आयुष्य सार सरलं
स्वताहासाठी जगण्याच आता
कारणच नाहे उरलं.......(पृ..१५),
वाटते आपणास कि
वाऱ्यावरही हा उडतो पतंग
रीझाविन्या माणसाचे मन
वाऱ्याशी हा लढतो पतंग......(पृ--८),
राजज्योत " हा कवियित्री ज्योत्स्ना राजपूत यांचा पहिला
चारोळी-संग्रह आहे." समरसून केलेले त्यांचे हे लेखन रसिकांना
सहजपणे भावेल असेच झालेले आहे. उत्तम कवितेच्या पाउलखुणा "-
घेऊन आलेल्या या संग्रहातून ज्योत्स्ना राजपूत यांच्या काव्य्गुणांची
झलक दिसून आलेलेलीच आहे. त्यांचा हा प्रवास अधिक आश्वासकपणे
सुरु राहो, अशा शुभेच्छा देऊया .
महाराष्ट्र वृतपत्र लेखक असोसिएशन " यांनी हा चारोळी संग्रह ,नागपूर
येथे झालेल्या "शब्द साहित्य संमेलनात - ५ एप्रिल-२०१२ रोजी प्रकाशित
केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------

पुस्तक परिचय -3

-मन वाचण्यास शिकवणारी -कविता -

-हिरवी लिपी -" उर्मिला चाकूरकर....!

----------------------------------------------------

मराठी कवितेत -आपल्या कविता-लेखनाने आश्वासक स्थान

निर्माण केलेल्या कवयित्री - उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचा

५-वा कविता संग्रह- "हिरवी लिपी ",आपल्या आस्वादानासाठी

आला आहे.

या अगोदरच्या "चांदणचाफा " , " पर्णपाचू " , पर्जन्यास्त्र " ,

आणि "पलाशपंख " ,या कविता -संग्र्हांनी उर्मिला चाकूरकर

यांच्या कवितांची "भावमुद्रा " स्पष्टपणे शब्दरूपात उमटवली आहे .

प्रस्तुतच्या "हिरवी लिपी "या संग्रहातील कविता वाचकांना अधिक

आनंद आणि अनुभूती देणाऱ्या आहेत,असे म्हणावेसे वाटते ।

निसर्ग आणि मनुष्य " यांच्यातील नाते तसे एकरूप असायला हवे आहे,

परंतु सद्य:स्थिती पाहून हे नाते भंगलेले आहे असे पहावयास मिळते ,

"हिरवी लिपी - संग्रहाचे मुखपृष्ठ असेच काहीसे सांगणारे आहे असे मला

सारखे जाणवले .

- निसर्ग -रूप जाणून घेण्यास आपली दृष्टी कमी पडते आहे ",

आणि "दुरावलेले मन- निसर्ग -सहवासात "यावे असेच जणू या कविता

सांगत आहेत - फक्त -भाषा मात्र "हिरवी लिपी " मध्ये आहे.

या निमित्ताने दोन लिपी-मधला साम्य -योग" या ठिकाणी मला सांगावासा वाटतो -

तो म्हणजे आपल्या जुन्या -जाणत्या "मोडी लिपी - विषयी आपल्या मनात एक खासअशी

जिव्हाळ्याची भावना आहे ,आणि गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला

- तिच्या प्रसारा साठी आपल्याला कार्य करावे लागत आहे -,

अगदी असेच महत्वाचे कार्य "निसर्गास समजावून घेण्या साठी "हिरवी लिपी "लिहून

- कवयित्री -उर्मिला चाकूरकर आपल्या कवितेतून केले आहे .. -

आपल्या मनोगतातून त्या म्हणतात की -

माणूस- निसर्ग, माणूस-माणूस, माणूस-समाज या नात्यांचा

शोध हा या "हिरव्या लिपीचा " आशय आहे.

पांढऱ्यावरची काळी अक्षरे वाचायची सवय आपल्याला नेहमीच असते ;

पण काळ्यावरची "हिरवी लिपी " समजून घ्याची तर वेगळी दृष्टी ,समज

असायला हवी.

एकूण ६७ कवितांचा समावेश "हिरवी लिपी "संग्रहात केलेला आहे.

काही कविता चार ओळींच्या आहेत, काही कमी ओळींच्या तर काही

जास्त ओळींच्या कविता आहेत- माझ्या दृष्टीने या सर्व रचनेत एक

साम्य मात्र आहे ते म्हणजे- या सर्व कविता "आशय-संपन्न "आहेत.

काही उदाहरणे -

---------------------------------------

ती शिकली

झपाट्याने

शिक्षण नसतांना

अंगच्याच हुशारीने …. (परिवर्तन पृ-। ६८ ),

आणि-

बाहुल्या मेणाच्या

थिजून गेलेल्या ,

आनंदाने खळखळून

हसायचं विसरून गेलेल्या …… (बाहुल्या मेणाच्या पृ-६० ।)



या ओळी पहा -

------------------------------------------------

अन्याय करण्या एवढाच

तो सहन करण

हा ही गुन्हा आहे

हे समजेस्तोवर

अर्धी जन्मठेप सरूनही गेली होती …… ( सोशिक … पृ.४८ )



आणि -



कुठे वेळ आणि काळ

हाती मेंदी रेखायला

कष्टाचाच झुला होतो

ध्यानी मनी झुलायला ……. (झुला पृ.३३ …)

तसेच या ओळी -

सूर्य पाहून आलेली

माझी नाजूक कविता

झालीय आता

अधिकच तेजस्वी …… ( तेजस्वी पृ.२१ …. )

आणि -----



या शीर्षक ओळी -

----------------------------------

हिरवी लिपी

लिहिता येण्याजोगे

माझ्यातही असावे काही

थोडे हरितद्रव्य ……। ( हिरवी लिपी पृ.१० …।)



आपण आपल्या वास्तवा -पासून ,आपल्या अंतर्मानापासून फटकून राहू शकत नाही,

कारण बाह्य -जगात जे -जे घडते -त्यांची संयत तर , कधी संतप्त अशी प्रतिक्रिया मनात

उमटल्याशिवाय कशी राहील, सामन्य -जन कधी का होईना जागृत होतात , पण कवीचे

मन अधिक " गहिरे असते, जागृत असते", वर्तमानाच्या भीषण ज्वाला मनाला होरपळून

टाकतात , तेव्न्हा "त्याची कविता बोलून जाते , प्रखरतेने व्यक्त होत असते."

अस्वस्थ -कवी मनाचे स्पष्ट असे शब्द -रूप म्हणजे उर्मिला चाकूरकर यांच्या कविता ",

असे म्हणता येईल.

"हिरवी लिपी "-मधील कविता जीवन अनुभवांचे फक्त चित्रण करून थांबत नाहीत ,तर या

कविता "जीवना च्या विविध मुल्यांवर चिंतनशील असे भाष्य करतात ", त्यावेळी या कविता

आपल्याला विचार करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतात .

त्या द्र्ष्टीने - काही कविता -शीर्षके - "रसिया " , शल्यकर्मी " , २६ / ११ " , "मी आणि ज्वालामुखी "

"निखळ सत्य " , "ललना ", "वाळूंचे कण ",

या सर्व कवितातून जीवनानुभव आणि त्याचे अन्वयार्थ "हाती लागतात "असे जाणवेल.

आजूबाजूच्या वर्तमानाचे - आणि " विपरीत जगण्याचे दर्शन - घडवणाऱ्या कविता , त्यातील अर्थवाही शब्द-रचना"

हे या कवितांचे वैशिष्टय आहे.

निसर्ग - माणूस - समाज जीवन -आणि -जनजीवन या विषयी असलेल्या आस्था हे या

कवितांचे विषय आहेत हे "हिरवी लिपी " वाचतांना जाणवेल.

उर्मिला चाकूरकर यांच्या कविता -लेखनाचा दमदार प्रवास - अगोदरच्या कविता-संग्रहातून

आपण पाहिलेला आहेच - "हिरवी लिपी "या नव्या -संग्रहातील कवितांनी त्यांच्या पुढील सरस

कविता -प्रवासाचे अधिक सुंदर चित्र रसिकांच्या समोर रेखाटले आहे हे नक्की .

चित्रकार -नयन बारहाते - नांदेड -यांनी या संग्रहाचे बहारदार आणि

आशयघन मुखपृष्ठ केले आहे.

कवियत्री -उर्मिला राघवेंद्र चाकूरकर यांचे "हिरवी लिपी "या कविता -

-संग्रहाच्या निमित्ताने अभिनंदन , आणि लेखनासाठी शुभेच्छा.

-------------------------------------------------------------------------------------------------


"माझे साहित्य-समीक्षा लेखन "- भाग -१

-अरुण वि.देशपांडे -पुणे

९८५०१७७३४२