saahity samikshaa lekhan Part - 7 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग - ७

रसिक मित्र हो -

साहित्य समीक्षा -लेखन -भाग -७ वा आपल्या समोर सदर करतो आहे .

या भागात खालील ३ पुस्तकंच्या बद्दल आपण वाचणार आहात.

१.कविता -संग्रह - जीवन खरचं सुंदर आहे - कवी - धनंजय शंकर पाटील ,

२.कविता -संग्रह - उत्तरा कवी - रमेश कलशेट्टी

३.विनोदी -कथा संग्रह - हास्यगाथा ले- शीलवंत वाढवे

----------------------------------------------------------------------------------------------

१.

परीक्षण...पुस्तक -परिचय -
------------------------------------------
जीवन खरंच सुंदर आहे. (कविता संग्रह)
(कवी धनंजय शंकर पाटील.)
इंटरनेट आणि फेसबुकवर साहित्य लेखन करणाऱ्या लेखक -कवी मध्ये..सातत्याने विविध स्वरूपाचे लेखन करणारे -लेखक-कवी-चारोळीकार -धनंजय शंकर पाटील- मंगळवेढा , हे नाव वाचकांच्या चांगलेच परिचयाचे झाले आहे.
त्यंची एक नव्हे तर तीन पुस्तके प्रकाशित झालीत.
१." जीवन खरचं सुंदर आहे'- कविता संग्रह.
२.हृदयी वसंत फुलाला - चारोळी संग्रह
३.ती पुन्हा भेटली - कथा संग्रह
या पैकी - जीवन खरचं सुंदर आहे " या कविता संग्रहाचा परिचय करून देतो आहे.
इंटरनेट आणि फेसबुकवरील प्रकाशित साहित्याला वाचकांचा त्वरित प्रतिसाद लाभत असतो आणि यामुळे लेखक-कवींना लेखनास प्रोत्साहन मिळत असते..हे पाहूनच आपले साहित्य पुस्तक-रुपात प्रकाशित करावे असे साहित्यिकास वाटणे ' यात वावगे असे काहीच नाही.अशीच भावना कवी-लेखक धनंजय शंकर पाटील यांची आहे. जीवन खरचं सुंदर आहे "..त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह
.....,या संग्रहातील कवितेचे स्वागत करतांना एक गोष्ट सुचवावीशी वाटते ..ती म्हणजे ..हा संग्रह --
"कवितेच्या शोधात निघालेल्या एक नवख्या कवीचा आहे ." .हे आपण वाचकांनी लक्षात घेऊन कवीच्या कवितांचे आस्वादन केले तर कवीच्या .पुढील लेखनास लेखन बळ देण्यासारखे प्रेरक कार्य होईल.
धनंजय पाटील हे लेखन करू शकतात हे त्यांच्या संग्रहातील कविता वाचून जाणवते. प्रस्तुत संग्रहातील कविता ..वाचून पहिली गोष्ट जाणवू लागते ती म्हणजे ..या कवीला जे दिसते ,, जे जाणवते त्यावर व्यक्त होण्याची त्याला एक प्रकारची असोशी आहे , अधीरता आहे.. यामागची त्यांची तळमळ आणि यामागची भावना निखळ आणि प्रामाणिक आहेत ,याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.
"जीवन खरचं सुंदर आहे " कविता संग्रहात एकूण ५७ कविता आहेत.
मनोगतात कवी म्हणतो आहे की- "शब्द जणू जीवनच झाले ,शब्दांशी घट्ट मैत्रीचे नाते जमले ..यातूनच अनेक विषयावर काव्य निर्मिती झाली ", हे अगदी खरे आहे.. कारण.. या संग्रहात - प्रेम विषयक अनेक कविता आहेत ,तसेच सामाजिक संदेश, माणसाच्या मनात असलेल्या विविध भावना ,आजच्या वर्तमानावर व्यक्त होणारी कविता ..अशा विविध कविता धनजंय पाटील यांनी लिहिल्या आहेत.
या संग्रहातील अनेक कवितांमधून कवी-धनंजय पाटील अतिशय भावनिक होऊन व्यक्त होतात ,त्यांच्या कवितेचे हे सुरेख लक्षण आणि वैशिट्य आहे.या संग्रहातील -
मला आवडलेल्या काही कवितांचा उल्लेख जरूर करू इच्छितो...
१.मनातल्या आठवणींचा हा लपंडाव सारा ,
वाहतात कधी-कधी अश्रूंच्या धारा .
चित्त नाही थाऱ्यावर ,
मनात फक्त आठवणींचेच घर . ...(मनातल्या आठवणी ..पृ.६ )
२.शब्द ओठावरी येतात ,
मनातली भावना ,
सांगुनि जातात .
सुख , दु:ख्हांचे चक्र सारे
जीवनात वाहतात कधी-कधी ,
तुफानी वारे ........(मनातले काही .पृ.१४ )
३. आज आहे पैसा , घरदार ,
पर आई तुझ्या नसण्याने ,
मनाला वाटतो अंध:कार .....(आठवण मायेची ..पृ.२६ )
४. एकटे हे मन कधी रमून गेले ,
या कवितांच्या दुनियेत .
ते कधी कळलेच नाही ,
आता ध्यानी, मनी कविता आणि कविता .(पृ.२९ )
५. वाढल्या वाड्या अन वस्ती ,
वाटते मज घरटे बांधण्याची धास्ती
वृक्षतोड अमाप ही वाढली
जणू जगण्याची व्यवस्थाच मोडली ...(संघर्ष जगण्याचा ..(चिऊताई ) .( .पृ.५६ )
६. कर सामना ,संघर्षमय जीवनाचा ,
तोल ढळू देऊ नको मनाचा .
खडतर प्रवासात या अपयशी मार्गाच्या ,
सूर गवसेल तुला जीवनाचा ...(जीवन संघर्ष ..(पृ.६४ ),
कवी धनंजय पाटील यांच्या कविता लेखनाची झलक ..त्यांची आशावादी कविता --या पुढील लेखन प्रवासात अधिक जोमाने आपली वाटचाल करणारी असेल ..हे नक्की. धनंजय शंकर पाटील हे नुसते कवीच नाहीत तर ते कथाकार देखील आहेत ..साहित्यिक म्हणून त्यांची कामगिरी अधिकाधिक बहरत जावो अशा लेखन-शुभेच्छा त्यांना देतो.
--------------------------------------------------------------------

२.

-उत्तरा "(कविता संग्रह)
------------------------------------------------------------------
सोलापूरचे श्री.रमेश कलशेट्टी एक सर्वपरिचित व्यक्तिमत्व आहे.प्रभावी व्यक्तिमत्वाचा हा कवी - बहुभाषी आहे ",
कन्नड , तेलगु आणि मराठी "या तीनही भाषेतून त्यांचा सहज-संवाद चालू असतो.इंटरनेट आणि फेसबुकच्या माध्यमातून "आपल्या सातत्यपूर्ण लेखनाने लक्षवेधी कविता रचना करणारे कवी " असाही "रमेश कलशेट्टी यांचा परिचय करून देता येईल.
या अगोदर त्यांचे ..१. सहज , २.आभास हा ..असे दोन चारोळी संग्रह संग्रह प्रकाशित झालेले आहेत ,यावरून या कवीचा कविता प्रवास मोठ्या नेटाने चालू आहे हे लक्षात येते.चारोळी लेखन हा या कवीचा नित्य लेखनाचा लेखन प्रकार असला तरी..कविता लेखन उर्मी "कशी स्वस्थ बसू देत नाही ? त्यांच्या कवितेचा अविष्कार आपल्याला घडतो आहे तो ..त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "उत्तरा " या कविता संग्रहातून.
या कविता-लेखनाला एक "लेखन-सूत्र आहे" ते कवीने त्याच्याच मनोगतातून व्यक्त करतांना म्हटले आहे की-
"उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते. जे स्त्रीच्या प्रत्येक गुणाला दर्शविते. या कविता संग्रहाच्या माध्यमातून मी स्त्रीचे प्रत्येक रूप माझ्या अनुभवातून मांडण्याचे प्रयत्न केले आहे ."
प्रस्तुत संग्रह्तील कविता याच लेखन-सूत्राभोवती - विषय--सुत्राभोवती आहेत" हे संग्रह वाचतांना नक्कीच जाणवते .
उत्तर " या संग्रहात ५३ कविता आहेत .आणि यातील बहुतेक कविता विस्ताराने मोठ्या रचना आहेत ..आटोपशीर कविता असत्या तर अधिक प्रभावी असा हा कविता संग्रह झाला असता' "असे माझे जरी मत असले तरी ते कसे बरोबर नाही हे " संग्रहातील कविता वाचून नक्कीच कळून येते . या कविता कवीच्या वैचारिक चिंतनातून आलेल्या आहेत ..कदाचित त्यामुळे ..थोडक्यात व्यक्त होणे "हे या कवितेला मुळीच शोभणारे नाहीये " हे मात्र नक्की .
संग्रहातील अंतिम रचना "लिहिणे माझे "(पृ.६० ) .या कवितेत कवीच्या व्यक्त होण्याची अपरीयार्हता आहे , मनातली तळमळ आहे ..ते कसे ..बघा -
सोडून दिलेले असते मी लिहिणे
पण अशा काही घटना घडतात
अपमानित होऊन ही कर्तव्यपूर्तीसाठी
लेखणी धरयला पुन्हा हात शिवशिवतात ....(लिहिणे माझे ..)
हे असे होण्याचे कारण .कवीच सांगतो आहे ते "असाच मी " या कवितेतून (पृ..५९ )..
"जे आहे ते
तोंडावर बोलणारा
मरणाच्या भीतीने
सत्याची कास न सोडणारा ...
मनाची अशी निर्भीड होऊन सांगण्याची तयारी आहे म्हणूनच ही कविता सडेतोड शब्दात व्यक्त होते ..आडून आडून किंवा सूचकता " असा सोपा मार्ग या कवितेला भावत नाही "असेच म्हणता येईल.
"निर्भया "..(पृ..९ )..
मेणबत्ती विझेपर्यंत
आम्हा खूप राग असतो
फोटो काढून झाले अन
आम्ही आपले कर्तव्य संपले समजतो ...
देशाला हादरवून सोडणाऱ्या "निर्भया " आणि "अरुणा " या दोन दुखःद घटनांवर दोन -दोन रचना आहेत ."अरुणा ", आणि "निराधार . "अतिशय नेमकेपणाने कवी "या कवितेतून व्यक्त झालेला आहे.
उदा -काय लिहू ? ( (पृ.१० )
"सांग ना मुली काय लिहू ?
तुझ्या भविष्यावर
की न्यायाच्या प्रतीक्षेत
असलेल्या निर्भायावर ?
"स्त्री आणि तिचा पदर " दोन्ही बाहेर वावरतांना काय काय अनुभवत असतात "याचे अस्वथ करणारे चित्रण "पदर" या कवितेत आहे.
"आज ही तू नारी बंदिस्त आहेस
वावरते खुलेआम इथे फक्त नावाला
तुझे तुलाच माहित रोज किती टोचतात
वासनेने बरबटलेल्या नजरा या देःआला ...(पदर ..पृ..३४ ).
दुनिया (पृ..२५ ) ही कविता .संग्रहाच्या मलपृष्ठावर सुद्धा आहे .या कवितेचे हे दुहेरी प्रयोजन या साठीचे असावे की -
कवीचा एक माणूस म्हणून हर प्रहरी संबंध येतो आहे तो याच दुनियेशी .आणि या कवीला कवीला आलेले जीवनानुभव "चांगले नाहीत , मग कवीमनाची झालेली उद्विग्नता" या कवितेत व्यक्त होते ती अशी...
"माणुसकी हे इथे
भ्रम आहे प्रत्येकाचे
या पापी दुनियेत आता
जगायचे आहे कुणाला ..." (दुनिया )
मनाची अशी उध्वस्त अवस्था होणे "म्हणजे जगणे असह्य होऊन जाणे " ,पण म्हणून काही या दुनियेत आपले जगणेच सोडून देणे सोपे असते का ?, नाही ,- मुळीच नाही कारण .भावनिक जगणे सुद्धा माणसांची एक गरज असते ,त्यातून सहवासाने जुळून आलेले ऋणानुबंध .."हा ताण हलका करणारे असतात ..त्या भावनांची अशी कविता होते...
"कळत नाही कधी कधी
अशी काही नाती जुळतात
त्यांच्यातले ऋणानुबंध
निभावणाऱ्यानाच समजतात ...(ऋणानुबंध ..पृ..१३)
स्त्री आणि नारी " आपल्या संस्कृतीतले महत्वाचा घटक.पण, या तिच्या वाट्याला "भीषण असा वर्तमान आलेला आहे..तिच्या अवस्थेवर नेमकेपणाने बोलणारी ही कविता ..
"भरल्या बांगड्या बेदीच्या रुपात
पदराला दिले संस्काराचे नाव
उंबरा म्हणे लक्ष्मणरेषा यांची
त्या चौकटीतली तू एक सुवासिनी ...(नारी ..पृ..२८)
कवी रमेश कलशेट्टी यांच्या "उत्तरा " संग्रहातील कविता फक्त अशाच एक विषयाला स्पर्श करणारी आहे असे नाही ,तर,समाजिक समस्या आणि उद्भवलेले ज्वलंत प्रश्न यावरच्या कविता आहेत.स्त्रीचे "आई" हे रूप कवीच्या कवितेत असतेच .अशा दोन कविता ..१."अशीच असते आई ..(पृ.५४ ), आणि "आई ..(पृ..५७) याही संग्रहात आहेत .."या दोन्ही कविता छानच आहेत हे वेगळे सांगणे न लगे ".
रुक्ष आणि व्यवहारी दुनिया ..कवीला भेटली-दिसली हे असले तरी .."प्रेम ही अशी भावना आहे की जिचा स्पर्श मनाला झाल्यावर जादूच होऊन जाते ..आणि मग .हा कवी "प्रेमाची दुनिया .. "सारखी कविता हा कवी सहजपणे लिहून जातो.संग्रहातील
प्रेम-कवितांची शीर्षके .."प्रेमाच्या दुनियेत ","मिलन ", "तुला वटते ना ...", "राणी ""आठवांचा पाऊस "ई....!
जीवनातील कडू-गोड अनुभव ", स्वतहाचे मन आणि समाज मन यातील संघर्ष ,समाजाप्रती आपली बांधलकी असतेच असते " ही भावना "आणि हे विचार कवीला कविता लेखनास प्रेरणा देतात ..कवी रमेश कलशेट्टी यांच्या दोन चारोळी संग्रहां नंतर आलेला त्यांचा हा कविता संग्रह "उत्तरा "" त्यांच्या काव्यलेखनाच्या स्वप्नापुर्तीचा आरंभ आहे" असे म्हणू या . कारण त्यांनी मनोगतात म्हटले आहे की - "उत्तरा " हे माझे एक स्वप्न होते ", " हे असे न होता यापुढे ही या कवीला अशीच कविता-स्वप्नं पडत रहावीत ..आणि त्यांची कविता नित्यनेमाने आपल्या भेटीस येत राहावी "अशा शुभेच्छा देतो.
सुप्रसिद्ध चित्रकार -खालील खान यांनी चितारलेले सुरेख मुखपृष्ठ -उत्तरा "संग्रहास लाभले आहे.
नंदिनी तांबोळी , आणि नंदिनी पब्लिशिंग हाउस पुणे .यांनी हा सुरेख कविता संग्रह प्रकाशित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद.
--------------------------------------------------------------------------------

३.

पुस्तक परिचय - "
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------------------------------
हास्यगाथा "- बहारदार विनोदी लेखन .
---------------------------------------------------------------------------
विनोदी -- लेखनाची उत्तम भट्टी जमली आहे ",याची दणकेबाज प्रचीती आपल्या हास्यरसायन "या पुस्तकातून देणारे लेखक म्हणून शीलवंत वाढवे प्रसिद्ध आहेतच ,
.तसे पाहीलेतर - .हास्यरसायन "या त्यांच्या" पहिल्याच कथा संग्रहाला -राज्य शासनाचा - २००९-१० चा "दत्तू बांदेकर -हा विनोदी लेखनासाठीचा राज्य पुरस्कार" -प्राप्त झाला आहे.

अशा या लेखकाचे विनोदी लेखनाचे दुसरे पुस्तक "हास्यगाथा " नुकतेच प्रकाशित झाले आहे
सहाजिकच प्रस्तुतच्या लेखनातून हमखास विनोदी शैलीतले लेखनवाचण्यास मिळणार", या अपेक्षेने वाचक हे पुस्तक हातात घेणार ..मग, .त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करणारे असे हे बहारदार विनोदी लेखन आहे" हे अगोदरच सांगावेसे वाटते.

"हास्यगाथा "- या विनोदी कथा संग्रहाच्या निमित्ताने वाचकांचे दोन फायदे झाले आहेत ते असे..
१.छान ,हलक्या-फुलक्या आणि मिस्कील विनोदी कथा वाचावयास मिळणार हे तर आहेच , त्या सोबत ,भारदस्त असा -शब्द-बोनस मिळालाय .
२.डॉ. श्रीपाल सबनीस सर यांची प्रस्तावना आणि जेष्ठ लेखक श्री.बाबाराव मुसळे यांचा अभिप्राय ,या स्वरूपात .
या दोन गोष्टी मुळे एक महत्वाचा फायदा असा झालाय की..हास्यागाथा "मधील विनोदी लेखनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन वाचकास लाभतो आणि या लेखनास अधिक न्याय मिळतो "हे खूप महत्वाचे आहे असे सांगावेसे वाटते.असो.

प्रस्तुतच्या संग्रहात एकूण १२ कथा आहेत .यातील कथा आहेत "असे वाटणारे जसे काही लेख आहेत .तसेच काही लेख -कथा असल्याचा भास नक्कीच होईल.विनोद निर्मिती "हेच या लेखनाचे प्रयोजन आहे ..मग त्यासाठी जे रसायन लागते ..तो सगळा कच्चा माल " आणि त्यासाठी जमवावी लागणारी भट्टी " ही कुशलता लेखकास चांगलीच अवगत झालेली आहे. अशा प्रकारच्या लेखनास आवश्यक असलेली लवचिक शब्द्शैली ..लेखकास लाभलेली आहेच . .त्याचा पुरेपूर असा सफाईदार वापर या लेखनात केलेला आहे .
वर्तमानातील वास्तव ..आणि त्यातले त्याचे संदर्भ यांचा विनोद निर्मितीसाठी वापर करून घेता येणे "हे तसे सोपे काम नाही .कारण त्यातील अर्थ-निर्मिती विनोदास पूरक ठरवण्यासाठी त्यातील विसंगती अचूकपणाने टिपता येणे " हे नेमकेपणाने साधता आले तरच त्यातून अपेक्षित विनोद निर्माण होईल अन्यथा हास्य-निर्मितीचा प्रयत्नच "हास्यास्पद "ठरण्याचा मोठा धोका लेखकाच्या समोर असतो .आपल्या लेखनाचे असे काही होणार नाहीये" याचे अवधान जपणे "या हास्यागाथा " चे लेखक शीलवंत वाढवे यांना छान जमले आहे .

ग्रामीण -जीवनाचा अनुभव घेत जगणारा हा लेखक आपल्या लेखनातून "नागरी जीवनमानाचे चित्रण करतांना .त्याच शब्दांचा वापर .विनोद निर्मितीसाठी करतो .त्यामुळे या लेखनातून एकाचवेळी ग्रामीण व नागरी अशा दोन्ही जीवनाचे जे चित्रण घडते .ते लेखकाच्या बहुश्रुत व्यक्तिमत्वाचे दर्शन आहे. तसे पाहिले तर .आपल्या दैनंदिन व्यवहारात जेजे शब्द सर्रास आणि सहजतेने बोलले जातात त्याचाच वापर या लेखनात आहे..यातील व्यक्तिरेखा तीच भाषा बोलतात जी नेहमी आपल्या कानावर पडते . म्हणजेच असेही म्हणता येईल की ..बोलण्याच्या भाषेतून .शब्दातून लेखकाने विनोद निर्मिती केली आहे .
प्रसंगनिष्ठ विनोद , व्यक्तीनिष्ठ विनोद हे तर या लेखनाचे वैशिष्ट्य आहेच त्यापेक्षा या लेखकाची निवेदनशैली जास्त प्रभावी आहे ..याचे कारण हे लेखक एक कलाकार आहेत , सादरीकरण कसे करायचे असते याची त्यांना उत्तम जाण आहे ..त्यामुळे त्यांच्या कथा ते वाचकासमोर जणू सादर करतात "असे वाटावे अशी सांगण्याची त्यांची पद्धत आहे.खुलवूनसांगणे, ते अधिक रंजक -स्वरूपात सादर करणे .याचा मोठाच लाभ या संगर्हातील लेखनास झाला आहे.

या लेखनात उपहास आहे ,उपरोध आहे ..बोचरा उपदेश आहे ..चांगले तेच अधिक चांगले कसे आहे ",हे पटवून देण्यासाठी "वाईट गोष्टीला ठळक दाखवून " जनमानसात त्याचा कसा प्रभाव असतो" हे अनेक कथातून लेखक सांगतो.सामजिक कार्य ,सार्वजनिक जीवनातील घटना या बरोबरच एक व्यक्ती म्हणून या सर्वांचा त्यातील वर्तन-सहभाग ..याचे खुमासदार शब्दरूप म्हणजे हे कथा -लेखन असे म्हणता येईल.
यातील कथानायक .स्वतहाचे स्वतंत्र असे जीवनविषय तत्वज्ञान अनेकवेळा सांगतो ..त्यातून इष्ट-अनिष्ट याचीच नेमकी चर्चा उपरोधिक मनोगतातून व्यक्त केली जाते ."आत्मा-परीक्षण "असेही करता येते " याचा शोध रंजक आहे.

प्रस्तावनेत या संग्रहातील कथांचा सविस्तर परामर्श घेण्यात आलेलाच आहे",त्यावर इथे अधिक भर ती काय घालावी.
काही कथांची शीर्षके -वानगीदाखल सांगतो-
१.निवडणूक (पृ.३१), २.तंटामुक्ती -(पृ-५७ ) ३- पासबुक, फेसबुक आणि स्मार्ट माणूस -(पृ.१११ )
लेखक ग्रामीण भागातील प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विषयावरील कथांमधून त्यांच्यातील लेखकास अधिक प्रभावीपणाने लेखन करता आलेले आहे हे जाणवते ..त्या कथा -अर्थातच उत्तम झाल्या आहेत.
१.पटपडताळणी - (पृ.१ ), आणि २.शाळा (पृ.३७)..यांचा उल्लेख करावा लागेल.
एकूणच हे लेखन विनोदी आहे हे तर खरेच ..त्याच बरोबर एका चिंतनशील व्यक्तीमत्वाने आजच्या विपरीत वर्तमानावर केलेले भाष्य आहे जे विचार करण्यास भाग पाडते.
अंतर्मुख करण्याचे विलाक्ष्ण असे सामर्थ्य विनोदी लेखनात असते" याची प्रचीती "हास्यागाथा " मधून नक्कीच येते.
लेखक शीलवंत वाढवे यांना आपणा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
-----------------------------------------------------------------