saahitya samiksha lekhan - 4 books and stories free download online pdf in Marathi

साहित्य -समीक्षा -लेखन - भाग -४

रसिक मित्र हो नमस्कार ,

विविध साहित्यकृतींचे हे आस्वादन परिचय लेख ,उपक्रम कसा वाटतो आहे ,आपले अभिप्राय जरूर देत चला .

या भागात -आपण खालील साहित्यकृती बद्दल जाणून घेणार आहात .

१. आत्मभान - कविता -संग्रह - कवी -कालिदास चवडेकर

२. अमृताचा धनु -

प्राचार्य -राम शेवाळकर- ललित -व्यक्तिचित्र -ले- नागेश शेवाळकर,

३.आभाळमाया -प्रातिनिधिक कविता -संग्रह . संपादन - अरविंद नेरकर

-----------------------------------------------------------------------------------------------------

१,

आत्मबल देणारी कविता -"
-आत्मभान ..!
-------------------------------------------------------------------
फेसबुक -जगतात -कालिदास चवडेकर हे सातत्याने कविता -लेखन करणारे एक कवी आहेत.संग्रह-रुपात कवीचे आपल्या कविते सहितचे येणे "एक अतिशय आनंददायक घटना असते. तितकीच ती त्याच्या कवितेची एक प्रकारे परीक्षा असते. कौतुक -प्रवास संपवून ही कविता पुढच्या प्रवासाची जाणीवपूर्वक तयारी करते आहे की नाही.याच्या खाणाखुणा संग्रहातील कवितेतून दिसू लागतात. म्हणून कवीच्या पहिल्या कविता -संग्रहाचे महत्व खूप असते.
कवी -कालिदास चवडेकर -- सोलापूरचे कवी म्हणून आता परिचित झाले आहेत. "आत्मभान " हा त्यांचा पहिलाकविता संग्रह .
कवीचा पहिला संग्रह आला म्हणजे अनेक अर्थाने कवीला प्रसिद्धी मिळते , असे असले तरी त्याची "कवी-म्हणून जबाबदारी वाढते " हे कवीने मनात ठसवले पाहिजे. "चवडेकर -यांच्या ८० पृष्ठांच्या संग्रहात विविध स्वरूपाच्या कविता आहेत.
डॉ.लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी या कवितेबद्दल शुभेच्छा देतांना म्हटले आहे.की- या कवीच्या कविता विचाराला प्रगल्भ करणाऱ्या, चिंतनाची खोली नि व्याप्ती वाढवणाऱ्या आहेत. त्यांची प्रसन्न शब्दकळा ", अर्थवाही प्रतिमा आणि काव्याला असलेली अंगभूत लय " यामुळे या कविता ओठावर घोळ्वाव्या अशा वाटतात .".
रसिक हो -
कविमनाला अनेक प्रश्न पडत असतात .आणि कवी आपल्यापरीने या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहतो .यात कधी त्याच्या हाती निराशा हाती येते, कधी खंत -तर कधी खेद वाटून जातो .अशा वेळी मनास व्यक्त झाल्या शिवाय राहवत नाही. कवी चवडेकर सुद्धा - "जाणिवेचे भान" असलेला हा कवी - आपल्या कवितेला "आत्मभान " असे नाव देऊन व्यक्त होतो आहे.
तसे पाहिले तर
कवी -कालिदास चवडेकर यांच्या कवितेचा आरंभ २५ वर्षापूर्वी झालेला आहे.. त्या आठवणी इथे कवितेतून व्यक्त झाल्या आहेत ही जाणवते.
" घाव त्यांचे सोसणे आता जमाया लागले
आसवांना रोखणे आता जमाया लागले ....! (पृ. ७५)
"कुठला तरी हवाच मुखवटा
हे जगण्याचे सोंग
वठवीन्यासाठी ...! (पृ- ७२ ),
" कळत नाही
कोणते ते धागे
ओढताहेत अजून
आतल्या आत ... (पृ ..५५ )-
ही काही उदाहरणे पुरेशी आहेत. बाकी कविता संग्रहातून जरूर वाचल्या पाहिजेत.
रसिक हो - अशा या कविता कवी -कालिदास चवडेकर यांच्या पुढील आश्वासक प्रवासाची साक्ष देणाऱ्या आहेत.
त्यांच्या लेखनास आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------२.

पुस्तक -परिचय लेख-
-अरुण वि.देशपांडे -पुणे.
-------------------------------------------------
गुरुवर्यांचे स्मरण-
अमृताचा घनु -
राम शेवाळकर
-------------------------------------------------------------------
गुरुवर्य , आदरणीय सर "- अशा संबोधनाने ज्यांनी जनमानसांच्या हृदयात स्थान मिळवले आहे अशा प्राचार्य -राम शेवाळकर यांच्या जीवन-प्रवासाचा आलेख पुस्तक रूपाने सादर करण्याचा प्रयत्न लेखक -नागेश सु.शेवाळकर यांनी केला आहे. त्यांच्या लेखनाचे आपण कौतुक करू या.
कविवर्य -लक्ष्मीकांत तांबोळी यांनी प्रस्तुतच्या लेखनाबद्दल म्हटले आहे की - अमृताचा घनु " मध्ये राम शेवाळकरांच्या लेखक , वक्ता , कवी , प्राचार्य ,शिक्षणतज्ञ , संघटक , प्रशासक ,आचार्यकुलाचा उपासक इत्यादी पैलूंचा मोठ्या आपुलकीने , आदराने परामर्श घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ".
लक्ष्मीकांत तांबोळीसर - या यांच्या अभिप्रायाची प्रचीती हे चरित्र -लेखन निश्चितच देते . नागेश शेवाळकर ही साहित्य-क्षेत्रातील सात्यायाने लेखन करणारे एक परिचित लेखक आहेतच .त्यांच्या लेखन-प्रवासाच्या आरंभीच नांदेड येथे त्यांना राम शेवाळकर सरांच्या सहवासाचा ,आणि लेखन-शुभेच्छांचा लाभ झाला .
गुरुवर्य राम शेवाळकर यांच्या विविध कार्याविषयक अनेकांनी लेखन केले आहे. असे असले तरी त्यांच्या विषयी असलेल्या अपार आदरापोटी - अजूनही अनेकांना शेवाळकर सर यांचे बद्दल लिहावेसे वाटत असते .प्रस्तून लेखन सिध्द करण्यात याच आपलेपणाचा आणि आदराचा मोठा भाग आहे. नागेश शेवाळकर यांनी मनोगतात याबद्दल लिहिलेले आहेच.
उत्तंग व्यक्तिमत्व " -याचे उदाहरण द्याचे असेल तर आपण प्राचार्य राम शेवाळकर "यांचा उल्लेख सह्जेतेने करतो. सरांच्या अफाट व्यासंगाचे ,विद्वत्तेचे ,व्यक्तिमत्वाच्या अष्टपैलू दर्शनाने .सर्वांना प्रभावित केले आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूवर नागेश शेवाळकर यांनी समरसून लिहिले आहे. वाचकांना आनंद देणारे असे हे लेखन झाले आहे.
एक दृष्टीने नागेश शेवाळकर यांनी नव्या पिढीतील वाचकांना एका थोर गुरूंचे चरित्र कथन केले आहे.ही कथन शैली खूप हृद्य आणि रसाळ अशी झाली आहे. हे लेखन म्हणजे गुरु परंपरेला केलेले अभिवादनच होय.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

३.

स्वागत पुस्तकाचे -
आभाळमाया -
(प्रातिनिधिक कविता संग्रह )
संपादक - डॉ.अरविंद नेरकर
------------------------------------------------------------------------
शब्द्गांधार " या सु-परिचित दिवाळी-अंकाचे संपादक अशी ओळख असलेले डॉ.अरविंद नेरकर एक उत्तम संपादक आहेत तसेच एक प्रकाशक देखील आहेत .
. अनेक लेखक -कवींच्या साहित्याला त्यांनी पुस्तकरूपात वाचकांच्या समोर आणलेले आहे.
. त्यांनी संपादित केलेला आभाळमाया हा प्रातिनिधिक कविता -संग्रह .
२२ कवींच्या प्रत्येकी ६ कविता या प्रमाणे एकूण १३२ कवितांचा सुंदर शब्द-नजराणा असा हा कविता-संग्रह आहे"असे म्हणावेसे वाटते
. हे २२ कवी आणि त्यांच्या काव्य-प्रतिभेचे विविध -रंगी स्वरूप ही एक छान अनुभूती आहे. कविता आणि त्यांचे आशय आणि विषय यांची विविधता हे ही या संग्रहातील कवितांचे वैशिष्ट्य आहे.
कवी मनास अभिव्यक्तीची ओढ असते ,आणि लिहिण्याची उर्मी कविता रूपातून येते ..यातील कवी जे विविध वयोगटाचे प्रतिनिधी आहेत -त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा अर्थातच वेगवेगळ्या आहेत. अनुभव, दृष्टीकोन ,जाणीवा यांचा परिणाम कवितेतून व्यक्त होतांना जाणवतो.
यातील सहभागी कवी या प्रमाणे आहेत-
१.जयश्री जोशी --पुणे . २- चारुशीला बेलसरे - -पुणे. ३- संजीवनी औटी -पुणे , ४- श्रीनिवास चंद्रात्रेय -तळेगाव दाभाडे ,

५-रवींद्र गाडगीळ -पुणे , ६- विजयकुमार देशपांडे -पुणे , ७, शरद अत्रे -पुणे, ८-सुनंदा कुलकर्णी -पुणे , ९-सुनिता भालेराव -डोंबिवली .

१०-भि.द .उशीर उर्फ रविकिरण- मुंबई , , ११- हेमंत परब -पुणे , १२- बाबू फिलीप डिसोजा -निगडी -पुणे.,

१३-उषा जोशी -पुणे, १४ -निर्मला जाधव -कोडोली -कोल्हापूर ,१५- गजानन प्रधान -पुणे, १६-मेधा थळे- नवे पनवेल.,

१७- पुरुषोत्तम बी.एम.कांबळे -वाशी- नवी मुंबई. १८-महालिंग शंकर मेणकुदळे- सातारा , १९-कल्पना मुकुंद कांबळे-साळवे -दादर -मुंबई,

२०-निर्मला केतकर -गोपालनगर -जि.वर्धा , २१- सुभाष गोखले -औंध-पुणे, २२- रोहिणी जाधव -बोरीवली-मुंबई.

या कवितेत लयबद्ध कविता आहेत, मुक्तछंद कविता मोठ्या प्रमाणात आहेत, गद्य -विधानात्मक अशा रचना आहेत..या कविता ओळींच्या संख्येने छोट्या -मोठ्या वाटाव्या अशा आहेत.यातून कवींनी आपले जीवन -तत्वज्ञान मांडलेच आहे , याच बरोबर काही चांगले घडावे ही अपेक्षा व्यक्त करतांना आपल्या कवितेतून त्यांचे मनापासूनचे व्यक्त होणे "जास्त भावणारे आहे.
काही कवितांचे उल्लेख उदाहरणादाखल करतो आहे-..यामुळे संग्रहातील कविता किती विविधतेच्या आहेत याची कल्पना येऊ शकेल.

आपल्या जगण्याची लढाईत मन कितीही दुखी झाले तरी ,आनंद तर शोधावा लागेल .त्यासाठी निरपेक्षपणे हे करता येईल.....कर्तव्य म्हणून...

१. तसा क्षण ही कुठेतरी भिजत
पडलेलाच असतो
रुजून वर येण्याची त्याचीही वेळ
ठरलेलीच असते
आणि म्हणूनच उगवण्याची वाट न बघता
आपण आनंदाच्या बिया पेरायच्याच असतात ...(कर्तव्य - जयश्री जोशी )


विठूमाउली आणि त्याचे भक्त म्हणजे एक वेगळे नाते आहे श्रद्धा आणि भक्तीचा संगम विठूच्या दर्शनाची ओढ अशी असते त्याची की कविता ...
२.पंढरीच्या वाटेवर पाऊलेही चालती
भक्तजनांच्या मनात विठूनाम जागृती
मन शांतविते जगन्माऊली ती
भवसागर पार करी भक्तांची नाव ती ...(विठूमाउली - चारुशीला बेलसरे )

मनाची समजूत घालणारी ,जगण्याचे भान देणारी ही रचना ...
३.न व्हायचे सप्तसुरात लुब्ध
न इंद्रधनूच्या रंगात बद्ध
मावळेल वेदना मन क्षुब्ध
हवा असा एक मायेचा शब्द ...(अपेक्षा - रोहिणी जाधव )

नारी रुपाचे यथार्थ दर्शन या कवितेतून होते.....
४. आग आहे पाणी आहे
लखलखती वीज आहे
बुरसटलेल्या विचारांनो
आजची मी आधुनिक नारी आहे ..( आदि- शक्ती..कल्पना मुकुंद कांबळे साळवे )

खंत ,विषाद मनात दाटून आल्यावर मनाची व्यथा अशा शब्दातच व्यक्त होते....
५.. वय उताराच झालं
नाव लागली पैलतीरी
परि दोन पिढ्यात उभी
अजुनी विचारांची दरी ...(कसा मी गप्प राहू ..रवींद्र गाडगीळ )

जगण्याने जे जे काही दिले त्यावर विचार न करता ,आयुष्य कसे जगावे याचे भान देणारी कविता..
६. कष्ट संकटे कायम ती तर
मनी बनवूया होड्या कणखर
तरू सोबतीने भवसागर
आयुष्य मिळाले आहे सुंदर ...(आयुष्य मिळाले आहे सुंदर ..विजयकुमार देशपांडे )

माणूस आणि नसर्ग यांच्यातील दुरावा चिंताजनक झाला आहे म्हणून या नात्याचं महत्व सांगणे ही एक जबाबदारीच ठरते ..अशी एक कविता ..
७.जीवनाचा आनंद घेण्यासाठी
अन जगण्याचा अर्थ
उमजून घेण्यासाठी
प्रत्येकानं निसर्गाशी
नातं जोडायला हवं ....(निसर्गाशी नातं ..शरद अत्रे )

८. पाउस नाही ..अवर्षण ..दुष्काळ , तहानलेली सृष्टी ..त्यासाठी ही प्रार्थना
तृषार्त व्याकुळ धरा
मृगा तू बरस खरा
प्रतीक्षा ती बीजांतरी
सुजन नवल जरा ....(वर्षायाचना ..बाबू फिलीप डिसोझा )

९/ आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचे महत्व असाधारण असेच असते म्हणूनच त्यांच्या सहवासाचे क्षण मनात असतात ..हा भावनिक असा अक्षय साठा असतो..त्याची ही भावूक कविता .
एकटेपणात सावली
आणि भेटल्यावर पाउस पाडतात
नदीसारखे नितळ पाणी
समुद्रापर्यंत ..वाहत आणतात
जिव्हाळ्याची माणसं अशी
मनात साठून राहतात ...(साठवण ..मेधा थळे)

१०. कवीच्या मनात कविते विषयीची कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता ..सुनंदा कुलकर्णी यांची..
कविता म्हणजे काय असते..? हे सांगतांना त्या म्हणतात ..
कविता म्हणजे माउली
कविता म्हणजे सावली
सतत माझ्या पाठी असते
जगण्याचे मला बळ देते.....( कविता म्हणजे काय असते..? .सुनंदा कुलकर्णी )

देशासाठी लढणारे सैनिक आमचे.हा तर देशाचा अभिमानाचा विषय ..या विषयीची ही कविता..
११.विनाश दाटता ऐसा
कुणी कुणाचा नसतो
तेथे सैनिक आमचा हा
देव होऊनी येतो ....(सैनिक आमचा ..भि.द .उशीर उर्फ रविकिरण )
राजकारण आणि त्यातील पक्ष बदलू मंडळी यांच्यावर भाष्य करणारी ही मार्मिक रचना ..
१२. सरड्यासारखे रंग बदलण्याची
किमया असते आमच्या अंगात
बाजी अंगलट आली तर
माफीनामा सदैव आमच्या खिशात ....(आम्ही आयाराम गयाराम ....गजानन प्रधान )
१३. निसर्गाशी फारकत घेणारा माणूस कसा आहे याचे वर्णन करणारी कविता अचूक चित्र उभे करते..

जंगलातल्या मुक्यांना म्हणतो आहे रानटी
स्वतःच्या महालासाठी मोडतोय त्यांची घरटी
माणूस माणूस राहिला नाही झालाय जनावर
अनावश्यक स्पर्धेपायी झालाय अनावर ....(रानटी ..हेमंत परब )
वरील विवेचनात सर्वच कवींच्या रचनांचे उल्लेख करणे शक्य नाही, लेखन मर्यादा लक्षात घ्यावी ही विनंती.
आभाळमाया 'हा प्रातिनिधिक कवितासंग्रह असला तरी यातील कवी -मंडळीनी कवितेचे प्रतिनिधित्व नक्कीच केले आहे .सर्वांच्या लेखन-प्रवासास मन:पूर्वक शुभेच्छा .
-----------------------------------------------------------------------------------------------