Saubhagyavati - 18 books and stories free download online pdf in Marathi

सौभाग्य व ती! - 18

१८) सौभाग्य व ती!
अमरावतीला भाऊंकडे येवून नयनला सात महिने झाले होते. सात महिन्यांमधला एकही दिवस असा गेला नसेल ज्या दिवशी नयनला विठाबाईची आठवण झाली नसेल. त्याचे कारण म्हणजे आई-भाऊंचा अबोला! ते प्रत्यक्षात काही बोलत नसले तरी त्यांचा अबोला बरेच काही सांगत होता. आईचा तसा प्रत्यक्ष अबोला नसला तरी बोलताना आपलेपणा, उत्साहही नसायचा. तिच्या बोलण्यातून कधी कीव, कधी घृणा जाणवत असे. भाऊंनी दोन-तीन वेळा व्यावहारीक बोलणी तीही दोन-तीन शब्दात केली असेल... सदाच्या संबंधात! त्याच्याविरुद्ध कोर्टात पोटगीची केस टाकण्याबाबत. सुरुवातीला नयन त्याच्या विरोधात असली तरी तिने स्वतःपेक्षा मुलीचे भविष्य समोर ठेवून सदाशिवविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता..
त्यादिवशी भाऊ नागपूरहून परतले. हातपाय धुऊन ते बसले असताना आईने विचारले, "भेटले का हो वकील?"
"हो भेटले की..." तुसड्या स्वरात भाऊ उत्तरले.
"काय म्हणाले?"
"काय म्हणणार? सहा हजार रुपये फी मागताहेत."
"पण पोटगी मिळेल ना?" आईने विचारले.
"ती काय त्यांच्या खिशात आहे. एवढे पैसे..." भाऊ चिडून बोलत असताना गळ्यातील एकदाणी काढत नयन म्हणाली,
"घ्या भाऊ. ही विकून वकिलाची फीस भरा..." भाऊंनी झडप घातल्याप्रमाणे ती एकदाणी घेतली...
माधवीच्या रडण्याने नयन भानावर आली. होय! माधवी! सदाशिवच्या मरणयातनातून मिळालेले दुसरे एक फळ! संजीवनीच्या पाठीवर दोन महिन्यांपूर्वी माधवीचा जन्म झाला. तिच्या आगमनाचे फारसे स्वागत झालेच नाही. तिच्याकडे कुणी प्रेमाच्या, आपुलकीच्या नजरेने पाहत नव्हतं. आई कर्तव्य केल्याप्रमाणे, नयनवर उपकार केल्याप्रमाणे तिचे बाळंतपण करीत होती. भाऊ तर सोडा परंतु माधव आणि आशाही तिला बरे पाहत नव्हते. छोटी संजीवनी रडत असताना दोघेही तिच्याशी बोलत नसत. एकदा तिने पाटीवर वेड्यावाकड्या रेषा काढल्या. तितक्यात बाहेरून आलेल्या माधवला ती म्हणाली,
"मामा, बघ ले, मी चित्ल काढलंय..." माधवने तिच्याकडे लक्ष दिले नाही. तशी संजीवनी पुन्हा म्हणाली,
"ये मामा, बघ ना ले. असं काय कलतो ले..."
"ए कारटे, तिकडे जाय..." असे म्हणत माधवने तिच्या पाठीवर रपाटा दिला. ती रडत रडत नयनजवळ येवून म्हणाली,
"आई, मामा बघत नाही ग. मला माल्ले मामाने."
बाजेवर पडल्या पडल्या नयन माधवला म्हणाली, "लेकरू इतक म्हणतेय तर बघ ना रे."
"मला वेळ नाही ग..." माधव म्हणाला.
"माहिती आहे रे सगळ. लहान लेकरावर हात टाकतात का?"
"माधव, का मारले रे तिला? तिने काय घोडे मारले रे? भोग असतात रे नशिबाचे." आई म्हणाली.
"म्हणे भोग. दुसऱ्याच्या जीवावर जगायच आणि तोरा पहा... 'अन्नछत्री जेवायचे आणि वर मीरपूड मागायची." माधव म्हणाला. आशा तर माधवच्याही पुढे. कॉलेजात जात असल्यापासून तिचा नखरा वेगळाच! घरी असली म्हणजे सदानकदा दरदर्शनपुढेच बसलेली. त्यादिवशी सकाळी आशा वेणी घालत होती. नयनला कुठून सुचले काय माहिती. ती सहजच संजीवनीला म्हणाली.
"जा. मावशीकडून वेणी घालून घे. आशामावशी छान छान वेणी घालते" संजीवनी पळतच माधवीजवळ गेली. आरशासमोर उभी राहून म्हणाली,
"मावशी. ऐ मावशी. वेणी घाल ना ग..."
"ए, पळ बावळट! मला वेळ होतोय."
"आशा, अग तिच्या वेणीला किती वेळ लागेल?" नयनने विचारले.
"ताई, सांगितल ना, मला वेळ नाही फालतू कामाला..." असं म्हणत माधवीला आशाने चक्क ढकलून दिले.
आशा-माधवची तशी तऱ्हा असली तरीही नयनची आई बिचारी अधून-मधून काही तरी बोलायची. भाऊंना एका सिनेमागृहामध्ये व्यवस्थापकाची नोकरी मिळाली होती. सिनेमागृहाच्या मालकाचा फार मोठा उद्योग होता. शिवाय अनेक शहरातून त्याचे वैध-अवैध व्यवसाय होते. मंत्री-नेतेगण यांच्यासोबत सतत ऊठबस असल्यामुळे त्याला सिनेमा व्यवसायाकडे लक्ष द्यायला म्हणावा तसा वेळ नव्हता. काही महिन्यांत भाऊंनी मालकांचा विश्वास जिंकला. त्यांनी सिनेमागृहाचा सारा कारभार भाऊंवर सोपविला. भाऊ अनधिकृतपणे सिनेमागृहाचे मालक झाले आणि अधिकृत मालकी गाजवू लागले. तिथे पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी भाऊंना तिकिटांचा काळाबाजार शिकविला. त्या व्यवहारातून भरपूर पैसा भाऊंच्या खिशात खळखळू लागला आणि अल्पावधीतच त्यांच्या संसाराने उभारी घेतली. गावाकडून कफल्लक म्हणून आलेल्या भाऊंनी शहरात चांगले बस्तान बसविले. गळ्यात लॉकेट, बोटांमध्ये अंगठ्या घालून फिरत होते मात्र वकिलाची फी देण्यासाठी स्वतःच्या कन्येला... नयनला लंकेची पार्वती बनवत होते...
दुसरीकडे भाऊपाठोपाठ अमरावतीला आलेले अण्णा मात्र सावरू शकले नाहीत. खोट्या अहमपणामुळे त्यांनी स्वतः कुठे नोकरी केली नाही. त्यांच्या मुलाला किशोरला एका प्रेसमध्ये काम मिळाले होते. किशोरला मिळणाऱ्या पगारामध्ये तीन माणसांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड, कुचंबणा, उपासमार या गोष्टींची कल्पनाच केलेली बरी! माधवीला पाहायला आलेल्या काकींना नयनने क्षणभर ओळखलेच नाही. काकींच्या अंगावरील पोतेरे त्यांची दशा स्पष्ट करीत होते.
अल्पावधीत सावरलेले भाऊ अंगापिंडानेही सुधारले होते. त्यांच्या सिनेमागृहात नियमितपणे अश्लील सिनेमे चालायचे. सिनेमातील अश्लील-उघडी नागडी दृश्ये पाहून भाऊंची मनःस्थिती नियंत्रणात राहायची नाही. पन्नाशीच्या घरात पोहोचलेले भाऊ घरातील नवऱ्याने टाकलेल्या मुलीचा, वयात आलेल्या दुसऱ्या मुलीचा आणि तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलाचा विचार न करता रात्री... सहसा रोजच रात्री बायकोसोबत कार्यरत होत असत. भिंतीपलीकडे होणारे आवाज ऐकून तिघेही कासावीस होत. त्या आवाजाने नयनची आतंकित वासना अचानक जागी होई. तिच्याशेजारी असलेल्या बहीण-भावाची तळमळ लिच्या लक्षात येत असे. तशा वातावरणात त्यांच्या भावना अनावर झाल्या, त्यांना हवा मिळाली तर त्या दोघांच्या हातून वेगळाच अनर्थ पडू नये म्हणून नयन एके दिवशी आईला म्हणाली,
"आई, बोलू नाही पण..."
"आता आणखी तुझे काय?"
"माझे नाही परंतु आशा, माधवचा विचार करा..."
"होतील ना. योग्य वेळी त्यांचीही लग्न होतीलच..."
"मी त्यांच्या लग्नाचे म्हणत नाही. भाऊ आणि तू रोज रात्री..."
"नैने, काय करावे तेच समजत नाही ग. तू म्हणतेस ते मलाही माहित आहे, पटते आहे. पण त्यांना नकार दिला आणि हे...हे. दुसरे कुठे... हा विचारही अस्वस्थ करतो. या वयात आणखी काही वेगळे प्रकार नको म्हणून मी गुमाने पडून राहते ग..." नयनच्या आईचा आवाज आणि मजबूर परिस्थिती पाहून तिने तो विषय थांबविला.
त्या दिवशी दुपारी माधवीस पाजत असताना भाऊ नागपूरहून परतले. पोटगीच्या केसची तारीख होती. नयनची प्रकृती चांगली नव्हती म्हणून अनेक विनवण्या केल्यानंतर भाऊ नागपूरला गेले होते.
"भाऊ, केसचा निकाल..."नयन विचारत असताना भाऊ मध्येच म्हणाले,
"मी काय न्यायाधीश आहे? टोपलभर घाण करून बसलीस?"
"काय झाले हो?" नयनच्या आईने काळजीने विचारले.
"बाईसाहेबांनी संमती दिलेय, सदाशिवला... दुसरे लग्न करण्यासाठी..."
"काय? मी? स्वतः होवून परवानगी दिली..."
"मी खोटे बोलतोय का? त्याने पुरावा म्हणून तू संमती दिलेली..तुझ्या आवाजातील टेप दाखल केली आहे."
"क...क..काऽय? माय गॉड..." नयनला ती रात्र आठवली. सासरमधली ती निश्चितच एकमेव चांगली म्हणता येईल अशी रात्र होती. जी नयनच्या कायम स्मरणामध्ये राहिली होती. त्याच एका रात्री सदा तिच्याशी अतिशय प्रेमाने, तिच्या मनाप्रमाणे वागला होता. त्याच्या त्या नाटकात ती फसली होती. प्रथमच गवसलेलं सुख हिरावल्या जाऊ नये म्हणून तिने सहज, हसतहसत परवानगी दिली होती. त्या प्रसंगाचा, त्या होकाराचा सदाशिव तसा वापर करेल हे तिच्या मनातही आले नव्हते. मात्र तिला हे सुद्धा आठवत होते, की त्याने तिच्याकडून सहज म्हणून होकार मिळताच अत्यानंदाने टेप बंद करून तिला ती कॅसेट दाखवली. त्याच रात्री मामांचा...प्रभाच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच सकाळी तिने शोध घेऊनही ती कॅसेट सापडली नव्हती. नयनला सारे आठवले. बापरे! केवढा मोठ्ठा नियोजित कट होता तो. कशी हुशारीने पावले उचलली होती. प्रेमाचे नाटक करून नयनची संमती मिळवून त्याच रात्री मामांचा खून करून मैदान साफ केले होते. भरल्या डोळ्यानी नयनने विचारले,
"काही उपाय? वकील काय म्हणतात?"
"ते काय म्हणणार? त्यांचे हातच तोडल्याप्रमाणे झालंय. स्वतःच्या हाताने पायावर धोंडा पाडून घेतलाय. तशी संमती देताना कुणाला तरी विचारावे तर खरे." '
"मला काय माहित? कधी नव्हे ते त्या रात्री ते गोड गोड बालले. बोलण्या बोलण्यामध्ये... हसण्या...हसण्यात मी होकार दिला. नंतर मग त्यांनी ती कॅसेट दाखवली..."
"व्वा! व्वा! काय अडाणी आहे ग? यासाठीच का पदवी घेतली?"
"आता वकिलांचे म्हणणे काय?"
"वकिलच ते! आणखी पाच हजार रुपये मागतात."
"घ्या. भरा त्यांचे घर..." असे म्हणत नयनने हातातल्या पाटल्या काढून भाऊंपुढे ठेवल्या. सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार करून स्वतःचे घर भरताना मालामाल होणारे भाऊ स्वतःच्या लेकीलाही नागवताना मागेपुढे पाहत नव्हते. तिच्या अंगावरचे एक-एक करीत सारे दागिने काढून तिला कफल्लक बनवत होते...
"भाऊ, मी नोकरी करायची असं ठरवलंय."
"तेवढेच धिंडवडे राहिलेत काढायचे. तुला काय कमी आहे ग?"
"मला असं कुणावर अवलंबून राहणं जमणार नाही." नयन म्हणाली.
माधवी सहा महिन्यांची झाली आणि नयनने नोकरीचा शोध सुरू केला. कुठे अशी पटकन नोकरी मिळेल? नयनने अनेक ठिकाणी अर्ज केले, प्रयत्न केले. परंतु तिला यश मिळत नव्हते. अनेक ठिकाणी एकाच जागेसाठी शेकडो अर्ज येत. त्यात बऱ्याच स्त्रियाही असत. कुणी आमदार, खासदार, मंत्री कुणाचा तरी असा वशिला आणत. अनेकजणी पैशाच्या जोरावर नोकरी मिळवीत तर काही तरूणी स्वतःच्या शरीरास पणावर लावून नोकरी मिळवीत असत. परंतु तसा कुठलाही वशिला नसल्यामुळे नयन 'दरदर की ठोकरे' खात फिरत होती. कुणाचे पत्र नाही, पैसा नाही अशा परिस्थितीमध्ये तिच्या शरीराकडे लालसेने पाहणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढून, वासनेने आंधळे झालेल्या एका-दोघांच्या गालावर बोटे उमटवून तिने त्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातले होते...
प्रयत्न केल्यानंतर वाळूच्या कणातून तेलही गळते त्याचप्रमाणे अखेर नयनला यश आले. शहरात नवीन शाळा उघडणाऱ्या संस्थाचालकास एका शिक्षिकेची आवश्यकता होती. संस्थेचे पहिलेच वर्ष, अनुदान नाही शिवाय कमी पगार यामुळे त्या शाळेत कुणी नोकरी करण्यास तयार नव्हते. मात्र नयनने होकार दिला. नयन आणि संस्थाचालक दोघांनीही एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन विनाअट, बिनशर्त होकार दिला. पहिल्याच दिवशी एकही विद्यार्थी नसलेल्या त्या शाळेची नयन मुख्याध्यापिका, शिक्षिका आणि शिपाईही बनली. ताटव्याच्या त्या शाळेला तिसऱ्या दिवशी पहिला विद्यार्थी मिळाला. भवानी ... सुरुवात तर झाली...
००००