atmanirbhar books and stories free download online pdf in Marathi

आत्मनिर्भर

सुधाचे बालपण
आपल्या कादंबरीची नायिका आहे सुधा, जिच्या जीवनात अनेक चढ उतार आले तरी ती त्या सर्व संकटांना धैर्याने तोंड देऊन सामना केला. तिने जीवन जगण्याचा जो साहस दाखविला तसा साहस प्रत्येक महिलेने दाखविला पाहिजे. महिलांनी आता आत्मनिर्भर होऊन जगणे आवश्यक आहे. पन्नास टक्के राखीव जागा मिळून ही महिलांना म्हणावी तशी प्रतिष्ठा व मान सन्मान मिळतच नाही. कारण महिलांनी अजूनही स्वतःच्या प्रतिभेला ओळखले नाही. म्हणून प्रत्येक महिलांनी स्वतःच्या प्रतिभा ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवे आणि आत्मनिर्भर होऊन जगायला हवं, असा छोटा संदेश या कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे.
--------------------------------
डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हरिपूर नावाच्या गावात माधव आणि सविता मोलमजुरी करून सुखी जीवन जगत होते. त्यांना सुधा नावाची चुणचुणीत मुलगी होती. सुधा दिसायला सुंदर, बोलायला चतुर आणि अभ्यासात हुशार मुलगी होती. माधव हा विठ्ठलाचा परमभक्त होता. सकाळ - सायंकाळ नित्यनेमाने हरिपाठ करायचा. त्याची पत्नी सविता ही देखील सोज्वळ आणि भाविक होती. तो पंढरपूरची वारी कधीच चुकली नाही. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला तो पंढरपूरला जात असे. घरात असे भक्तिमय वातावरण होते आणि या मंगलमय वातावरणात सुधा चंद्रकलेप्रमाणे वाढत होती. मुलगी जशी मोठी होत जाते तशी आई-बाबांची काळजी वाढत राहते. सुधाचे वय वाढू लागले तशी ती अजून सुंदर दिसू लागली. तिची सुंदरता वाढू लागली आणि इकडे माधवची काळजी वाढू लागली. मुलीची खूप काळजी घेऊ लागले. तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आले होते. गावातील शाळा संपली आणि तिला शिकण्यासाठी शेजारच्या गावातील शाळेत जाणे आवश्यक होते. ती सातवीतून आठव्या वर्गात गेली होती.
" बाबा, मला पुढं शिकायचं आहे. "
" सुधा, तू सातवी पास झालीस, हेच खूप झालं. आता पुढे शाळा बिळा काही नाही."
" नाही बाबा, मला शिकायचं, माझ्यासोबतचे शकू आणि रमा दोघेही शिकणार आहेत. त्यांच्यासोबत जाते ना, मी पण ..."
" हे बघ बाळा, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते श्रीमंत आहेत, आपल्याकडे तेवढा पैसा नाही, आपण नाही शिकू शकत."
" आई, बाबाला सांग ना, मला जाऊ दे ना शाळेला "
" बेटा, बाबा म्हणतात ते बरोबर आहे, तुझं शाळा शिकण खूप झालं, आता जरा घराच्या कामाकडे ही लक्ष दे."
माधव आणि सविता आपल्या मुलीला खूप समजावून सांगत होते मात्र ती ऐकायला तयार होत नव्हती. शाळा शिकण्याच्या एकाच गोष्टीवर ती ठाम होती. त्या रात्री सर्वचजण चिंताग्रस्त होऊन झोपी गेले. सुधा एकुलती एक लाडाची लेक होती. तिचा हट्ट पूर्ण करणे आवश्यक होते. सर्व सोंग करता येतात मात्र पैश्याचे सोंग करता येत नाही. रोजच्या जेवणाचे वांदे आहेत,तर तिच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणावं हा प्रश्न माधवच्या समोर पडला होता. तेरा चौदा वर्षाची सुधा शिकण्यासाठी बाहेरगावी जाणार याची काळजी त्यांना लागून होती. पोटाला चिमटा देऊन एकवेळ तिचं शिक्षण पूर्ण करू पण तिची येण्या-जाण्याची काळजी माधवला सतावत होती. वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील अत्याचार व बलात्काराच्या बातम्या वाचून ऐकून त्याची काळजी अजून वाढत होती. ही सारी चिंता सुधाला कसं सांगावं ? ती तर अडून बसली होती. शेवटी सुधाला शाळेला जाण्याची परवानगी मिळाली. तिच्या मनाविरुद्ध काही करावं तर ती अजून काही उलटसुलट करून घेईल म्हणून माधवने शेजारच्या शाळेत तिला शिकण्यासाठी पाठवून दिला. ती आता आपल्या मैत्रिणीसह शाळेला पायी ये-जा करू लागली. आजपर्यंत ती कधी ही आई-बाबा शिवाय घराबाहेर पडली नव्हती पण शाळेच्या निमित्ताने ती बाहेर पडली. तिला बाहेरच्या जगाचा अनुभव यायला वेळ लागला नाही. तिला आता लोकांच्या नजरा, लोकांचे बोलणे आणि इतरांचा स्पर्श या सर्व बाबीची जाणीव होऊ लागली. आई-बाबा शाळा शिकण्यासाठी का नकार देत होते याची देखील तिला जाणीव झाली होती. सुधा तशी खूप समजदार आणि तल्लख बुद्धीची होती. त्यामुळे तिने बाहेरील वातावरणाशी फार लवकर जुळून घेतली. बघता बघता एक वर्ष संपले. ती आता धीट बनली होती आणि तिच्या आई-बाबांना देखील जरासा विश्वास वाढला होता. तरी सुधा ची आई अधूनमधून तिच्या लग्नाची गोष्ट काढत होती.
" अहो, सुधाचे दोनाचे चार हात करायला हवं, लवकर स्थळ शोधायला हवं."
" हो, मला ही तेच वाटतं, पण सुधा ऐकेल काय ?"
" तिला मी समजावून सांगते, तुम्ही स्थळ शोधा आता."
" होय, माझ्या नजरेत एक चांगलं स्थळ आहे, शेजारच्या गावातच आहे. एकुलता एक मुलगा आहे आणि चांगली जमीन आहे."
" मग बघा की, उद्याच्या उद्या जाऊन त्यांना आमंत्रण देऊन या"
" बरं, सकाळी पाहतो, झोप आता."
झोपेचं सोंग घेतलेली सुधा हे सारे ऐकत होती. आई-बाबा माझं शिक्षण बंद करून लग्न लावून देतात. काय करावं ? शाळा शिकावं की लग्नाला होकार द्यावं ? याच विचारात ती झोपी जाते
Share

NEW REALESED