Punahbhent - 4 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्भेट भाग ४

Featured Books
  • Safar e Raigah - 10

     منظر ۔ سلطان مرزا کے اس ایک فیصلے نے گھر کی فضا کو جیسے ہمی...

  • Safar e Raigah - 9

     باب ۔کشمیر کی برفیلی اور سرد شام تھی۔ باہر چنار کے درختوں س...

  • قلم کا قیدی

                     انتساب اُن کے نام...میرے 'استادِ محترم&...

  • صبح ہو گئی چچا

    خفیہ میں نے اپنے دل میں کیا راز چھپا رکھا ہے؟ میں نے تعلق کو...

  • لفافہ

    تصویر آج پھر میرا دل ملاقات کے لیے تڑپ رہا ہے۔ ایک بار پھر،...

Categories
Share

पुनर्भेट भाग ४

पुनर्भेट भाग ४

अनाथ आश्रमातच लहानपणापासुन तो वाढला होता .
त्याचे शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते .
एकदोन प्रयत्नात सरकारी नोकरी पण मिळाली होती .

पगार चांगला होता .

त्याचे दोन खोल्याचे एक घर सुद्धा होते गावाबाहेर..

थोडे पैसे शिल्लक टाकल्यावर आता त्याला लग्न करायचे होते .

त्याच्या बाजुने लग्नाचे पाहायला कोणीच नव्हते.

म्हणून त्याने स्वतःच ही स्थळे पाहायची मोहीम सुरु केली होती .

आज तो ऑफिसमधील आपला मित्र मोहन याच्यासोबत आला होता .

रमाचे स्थळ त्याला असेच समजले होते .

त्याने गावातच रमाला पाहिले होते .

साधीसुधी पण आकर्षक दिसणारी रमा त्याला आवडली होती .

म्हणूनच तिच्या घरच्यांकडे तो आपलेच स्थळ घेऊन आला होता .

त्या दिवशी संध्याकाळी रमा घरी आल्यावर काकांनी तिला सतीशचा प्रस्ताव सांगितला .

ते म्हणाले हे बघ तुही एकदा पहा त्याला,
कसा वाटतो बघ .

बोलून घे त्याच्याशी आणि तुला आवडले तरच कर लग्न .

आम्हाला तरी मुलगा बरा वाटला ,वागायला आणि बोलायला ..

नोकरी बरी आहे ,घर पण आहे म्हणतो स्वतःचे ..

आमची तुझ्यावर काहीच जबरदस्ती नाहीय .

त्याला तु पसंत आहेस ,त्याने पाहिले आहे तुला आधीच

आम्हालाही तुझे लग्न करायचेच आहे .

आता आमचे आयुष्य किती दिवस असणार आहे ?

त्याआधी तुझा सुखी संसार पहायची इच्छा आहे .
खरेतर रमा म्हणत होती की ती आणखी थोडे दिवस नोकरी करेल
चार पैसे शिल्लक टाकेल .
आपले सर्वांचेच राहणीमान सुधारेल आणि मग लग्न करेल .
पण काकांचे म्हणणे पडले या गोष्टीला काही अंतच नाही .
आता जर तुझे भले होत असेल तर लग्नाचा विचार करायला हरकत नाही .

मग रमाने या गोष्टीला होकार दिला .
इतके सारे बरे असेल आणि जर त्यालाच आपण पसंत असु तर काहीच हरकत नव्हती .

दुसऱ्या दिवशी सतीश एकटाच संध्याकाळी तिला भेटायला त्यांच्या घरी आला.

त्याने तिला आधीच पाहिले होतेच .

मात्र सतीशला पाहताच रमा चकीत झाली .

अतिशय देखणा ,गोरापान, उंच आणि बांधेसूद असलेला सतीश

त्याच्या उजव्या गालावर थोडा खाली एक ठळक तीळ होता .

जणूकाही त्याच्या देखण्या रुपाला दृष्ट लागू नये म्हणून लावलेला !!!

इतका देखणा मुलगा आपल्यासाठी स्थळ म्हणून आलाय हे पाहून

मनातून ती खुष झाली होती !!!

काकांनी सतीशला विचारले त्याला त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे ?

रमा सोबत तो संसार कसा करणार आहे ?

तेव्हा त्याने सांगितले की त्याचे एक स्वतःचे दोन खोल्याचे घर आहे .

बँकेत थोडे पैसे शिल्लक आहेत .

त्याला पगारही चांगला आहे ,आणि थोड्याच दिवसात त्याला प्रमोशन पण मिळेल .

रमाची नोकरी तिला हवी तर ती चालू ठेवू शकते .

नको असेल तर सोडुन देऊ शकते .

हे सर्व ऐकुन काकांनी समाधानाने मान डोलावली .
काकूंना पण खुप आनंद झाला .
अखेर पोरीने नशीब काढले म्हणायचे ..

रमाच्या रुकारामुळे..
काकांची परवानगी घेऊन थोडा वेळ सतीश रमाला बाहेर घेऊन गेला होता.
दोघेही जवळच्या एका बागेत जाऊन बसले .
त्या वेळच्या गप्पामध्ये रमाला त्याचा स्वभाव समजूतदार वाटला होता .
तुला सुखी ठेवायचा प्रयत्न करेन असेही त्याने तेव्हा रमाला सांगितले.
नोकरी करायची नसेल तर सोडू शकतेस असाही पर्याय दिला .
दोन दिवस रमाला विचार करायला वेळ दिला होता सतीशने .
काकांना तर हे स्थळ चांगले वाटले .
शिवाय लग्न साध्या पद्धतीने करायची सतीशची इच्छा होती .
लग्नाचा सर्व खर्च तोच करणार होता .
हुंडा म्हणून काकांकडून एक पैसाही त्याला नको होता .
रमाला मंगळसूत्र ,बांगड्या तोच घेणार होता .
त्याला फक्त पत्नी म्हणून रमासारखी मुलगी हवी होती .

काकांना वाटले खरेच देवाच्या कृपेनेच असे स्थळ चालून आले होते !!
एकच गोष्ट खटकत होती काकांना ती म्हणजे दोन तीन वेळच्या भेटीत
त्याच्यासोबत कोणीच नव्हते .
तो एकटाच सगळ्या गोष्टी करीत होता .
पण तेही साहजिक होते म्हणा ,तो अनाथ असल्याने त्याच्या बाजुने कोण येणार ?
रमाने दोन दिवस विचार केला .
तिलाही सतीशच्या स्थळात काहीच खोट दिसेना.
काही उणे काढावे अशी कोणतीच गोष्ट आढळेना.
नवीन चांगल्या आयुष्याची स्वप्ने तिने पण पाहिलेली होतीच .
ती पूर्ण होतील अशी तिलाही आशा वाटली .

दोन दिवसांनी परत सतीश घरी आला .
तेव्हा होकार घेऊनच परत गेला.
पुढच्या आठवड्यात लग्नाचा मुहूर्त ठरला .
थोडी गडबड होतेय असे वाटले काकांना..
पण कोणासाठी थांबायचे होते ?
पुढचा आठवडा गडबडीत गेला ,सतीशने काकूंना साडी काकांना कपडे घेतले .
रमाला चार साड्या ,एक छोटे मंगळसूत्र आणि चार बांगड्या घेतल्या .
सध्या हे लहान मंगळसूत्र चालवून घे ,हळूहळू तुला आणखी दागिने करीन .
असेही सांगितले .
रमा खुष होती ,सतीशच्या अशा बोलण्याने ती आणखीन आनंदी झाली .
अखेर हे लग्न पार पडले .

सतीशचा ऑफिसमधला मित्र मोहन
रमाच्या वाड्यातील चार पाच माणसे इतकेच लोक उपस्थित होते लग्नाला .
लग्नानंतर सतीशचे दोन खोल्याचे चांगले सजवलेले घर पाहून रमाला खुपच आनंद झाला.
सतीशची थोडीच रजा मंजूर झाली होती म्हणून
लगेच दुसऱ्या दिवशी रमा आणि सतीश हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेले .
चार दिवस चांगल्या हॉटेलमध्ये त्याने बुकिंग केले होते .
महाबळेश्वर ते चार दिवस रमा अतिशय खुष होती .
जगातले अत्त्युच्च सुख जणु तिच्या पायाशी होते .
सतीशने रमावर प्रेमाचा वर्षाव केला होता,जणु ते दोघे स्वर्गात विहरत होते .
चार दिवसांनी मात्र दोघांनाही जमिनीवर परत यावे लागेल .
आणि ते आपल्या घरी परतले .
आता दोघांचा संसार सुरु झाला .

दोन दिवसांनी काका आणि काकु पण रमाच्या घरी येऊन
तिचा संसार पाहून गेले आणि समाधानी झाले .
रमाच्या घरच्या आसपास फारशी घरे नव्हती .
गावाच्या थोडेसे एका टोकाला होते ते घर .
म्हणून शेजार पाजार मात्र नव्हता .
पण एकंदर असे सुंदर सजवलेले रमाचे घर पाहून काका काकु समाधानी झाले .

हळूहळू संसाराचा गाडा सुरु झाला .
रमाची नोकरी पण सुरु होती .
दोघे एकदम डबे घेऊन बाहेर पडत आणि संध्याकाळी एकत्रच परत येत.
दिवस असे अगदी कापरासारखे उडत होते .
रमाला तर वाटत होते जणु आता आपल्या आयुष्यात फक्त सुखच सुख आहे .
एकमेकांच्या सहवासात जगाची फिकीरच उरली नव्हती दोघांना.


बेलचा आवाज ऐकुन रमा एकदम भानावर आली आणि भूतकाळातून परत आली ..
घड्याळ पाहिले तर चार वाजले होते .
तिने दरवाजा उघडला कामवाली बाई आली होती .
आणि तिला रितुची आठवण आली ,अरेच्या फोन करायचा आहे नाही का तिला ..
मग लगेच तिने रितूला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .
रितू म्हणाली,”मावशी तुम्ही आला असता तर जास्त बरे वाटले असते .
तुमचे आशीर्वाद घेतले असते “
“माझे आशीर्वाद तर कायमच आहेतच ग तुझ्या पाठीशी .
खुप शिक आणि खुप खुप मोठी हो .“
“होय काकु ,तुम्ही दिलेले लाडू खाल्ले ,किती छान झालेत .
सर्वांनाच आवडलेत .“
तुमच्यासाठी काय काय पाठवू मी डब्यात ?”
“जास्त काही नको ग ,रात्रीचे फारसे खात नाही मी .
पण केक नक्की खाणार तुझ्या वाढदिवसाचा ..
तेवढा मात्र पाठव बरे ..
असे म्हणून आणखी थोडे किरकोळ बोलून रमाने फोन ठेवला .

क्रमशः