perjagadh - 19 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - १९




तिथून तयारीला मी निघालो.मनामध्ये एक विचार घोळत होता, की आज आपण ज्या दिशेला जात होतो. त्या दिशेला शंखाची कलाकृती त्या नक्षावर दाखवली होती.आणि ते सगळं नजरेत असावं म्हणून मी मोबाईलचं मॅप ओपन करून चालत होतो.

मी,मधुकर मामाजी आणि आदल्या दिवशी पेरजागडावर भेटलेला एक धनगर, ज्याला पैसे देऊन मी सोबतीसाठी आणले होते.असे तिघेजण मजल दरमजल करीत निघालो. सोनापुर पासून जवळपास तीन किलोमीटर अशा अंतरावर एक सारंगड नावाचे छोटेसे गाव आहे.आमच्या प्रवासाचा हा पहिला टप्पा.जंगलात जाण्यासाठी आम्ही सोनापुरवरूनसुद्धा निघू शकत होतो.पण सारंगड पासून काही मजेशीर बघायला मिळणार आहे, असे मधुमामाजी म्हटल्यामुळे आम्हाला पायी पायी सारंगडला जावे लागले.तिथून पुन्हा अर्ध्या एक किलोमीटरच्या अंतरावरून, जंगलाची सरहद्द तयार होते.त्यावर आम्ही येऊन थांबलो.

सहज मधुकर मामाजीने सचेत करण्यासाठी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले...

बघ पवन...तुला सांगतो ते नीट ऐक..इतर जंगल तू केव्हाही भटकंती केला असणार, यात काही शंका नाही..पण हे जंगल त्यापेक्षा वेगळं आहे.त्यामुळे मनात असलेली भिती आधी तू काढून टाक.कारण इथे ती चालत नाही.आणि पुन्हा एक महत्त्वाचं...इथे चालताना अंतर पाडू नकोस.नेहमी बरोबरच रहा...कारण वावटळ कधीही जो अंतरावर असते ना, त्यालाच आधी घेरते.आणि जमेल तितक्या शांतपणे आणि इशाऱ्याने चालायचं.जणू आपण जंगलातलेच पशू आहोत या पद्धतीने...

मी होकार दिला आणि सहज लक्ष पेरजागडाकडे टाकली. कारण आज आम्ही त्या पेरजागडाच्या उलट बाजूला होतो.मला वाटले इथून पेरजागडची ती निद्रेत असलेली छवी दिसणार नाही.पण जशी ती सोनापुरवरून दिसत होती.तसेच या जंगलातून पण ती दिसत होती.आणि जी भावाची डोंगर दरी बऱ्याच प्रमाणात विखुरलेली होती.तिचा तो काही खचलेला भाग ह्या बाजूने पण दिसत होता.अशा पद्धतीने तो भाग खचला होता की तिथे जणू एक भिंत तयार झाली होती.ज्याला गावकरी "पांढरी भिंत" असे म्हणतात.खास करून तिथे जंगली कबुतरांचे फार प्रमाणात वास्तव्य असते.

शेतात जाणारे कच्चे रस्ते सोडून आम्ही काही वेळानंतर जंगलातील आड मार्गाला लागलो.आमचे मार्गदर्शक सतत नवीन रस्ता दाखवत होते.कधी पायवाट, तर कधी पाणी वाहणारा कोरडा पाट.अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या मागोमाग चालू लागलो होतो.काही वेळातच आजूबाजूला दिसणारी दूरवरची घरे, आणि शेतीवगैरे डोळ्यांसमोरून नामशेष झाली.ज्यामुळे आपण आता घनदाट अरण्यात आलो आहे याची जाणीव झाली.

जास्त प्रमाणात तिथे कुणी जात नसल्यामुळे बऱ्याच छोट्या छोट्या काटेरी वनस्पतींचे तिथे उत्पादन होते.आणि त्यामधून आम्हाला रस्ता काढत जावे लागत होते.जवळपास अर्ध्या एक तासानंतर दगडांची ती उतराई दिसू लागली.म्हणजे आता आपण डोंगर चढायला लागलो अशी त्यांची इशाऱ्याने माखलेली नजर दिसली. मध्यंतरीच ते थांबून वाघाची ताजी संडास,तर मोराच्या पायाचे ठसे,असे प्रत्येक निशाण समजावून सांगायचे.आणि तो पशू कोणता आहे? आणि कोणत्या दिशेने गेला?वर कोणत्या वेळेला तो इथे आला असेल याची हुबेहूब तो माहिती आम्हांस देत होते.

चालताना वाट नसलेली ती खडकाळ वाट आणि वर त्या काटेरी वनस्पतींचा त्रास. टी शर्टच्या छातीच्या भागापर्यंत ती कपड्याला चिकटत होती.त्यामुळे प्रत्येक वेळा कपडे ओरबाळत राहावं लागायचं. आणि कुणी सहसा तिथे येत नसल्यामुळे वातावरण एकदम भयानक वाटत होतं.चालता चालता कितीतरी वेळा पायाखालची दगडे घरंगळत जायची.त्यामुळे सतत आपण पडतो की काय असा भास व्हायचा.आणि चालताना वाटपण नव्हती चालायला.त्यामुळे कित्येक वेळा उभे राहून कुठून जायचे हा विचार करत असायचो.

पण एक होतं.आम्ही चालत होतो, ते मधू मामजीच्या मार्गदर्शनाखाली.ते चालत असलेल्या वाटेवर.आणि ते सरळ चालत नव्हते.चालताना ते आडीमोडीचा वापर करत. खरंतर त्याचं कारण मी आधीच समजलो होतो, पण त्यांच्याकडून काही नवीन उत्तर मिळण्याच्या आशेने मी त्यांना विचारलं, की तुम्ही असे आडीमोडी का चालता? सरळ का नाही...?

त्यावर ते म्हणाले...याला म्हणतात श्रम वाचवणे.कारण डोंगराचा चढ भाग आपण जेव्हा सरळ चढतो तेव्हा आपल्या अंगातील सगळं श्रम संपून गेल्यागत होते.आणि जेव्हा आडीमोडी चालतो तेव्हा पायांना समान जमीन लागते.चढ असा वाटत नाही.ज्यामुळे आपल्याला फार प्रमाणात श्रम होत नाही.आणि निरंतर चालण्याची शक्ती संचारत असते.

इतक्या महत्त्वाची गोष्ट ही त्यांनाही माहीत असेल असं मी गृहीत धरलं नव्हतं.कारण आपल्या पायांची पण एक फिलासापी असते.सपाट रस्त्याने चालताना संपूर्ण पाय हा जमिनीवर पडतो.त्यामुळे संपूर्ण शरीराचं ओझं अगदी सहजगत्या दोन्ही पायांवर पेलून असतं.पण दगडांची पायवाट किंवा चढ चढताना संपूर्ण भार आपल्या पायाच्या बोटाकडील भागाकडे जाते.ज्यामुळे पायाचा मागील भाग पोकळ होतो चालताना.ज्यामुळे आपले पाय बऱ्याच प्रमाणात वाकून येतात गुडघ्यातून.आणि दुखून येतात.जितक्या कमी वेळेचा प्रवास असतो तितकाच तो ठीक असतो, पण जास्त प्रवास हा अशा पद्धतीने केला तर बरं राहतो...

थोड्याच वेळात खालून बघावं तर डोंगराचा शिखर जरा जवळच आला होता.तिथे असलेल्या दऱ्याखोऱ्या अगदी काही अंतरावरच दिसत होत्या.पण वातावरणात कसलीतरी भयानक दुर्गंध येत होती.त्यामुळे जवळपास काय आहे?हे मी फार चांगल्या पद्धतीने जाणून घेतलं होतं.पण शेवटी विसरलोच होतो की आपणही एक वाघ आपल्या सोबत आणला होता.जो त्यांच्यासारखाच अर्धाअधिक वेळ जंगलात घालवणाऱ्यापैकी होता.त्यामुळे काही अंतरावरच थांबून मी मधुमामाजीकडे बघत राहिलो.

जवळच एका सागवानाचे झाड उभे होते.ज्याच्या खाली त्याचीच एक वाळलेली फांदी पडलेली होती.मधूमामाने त्यापाशी येऊन त्याच्यावर कुऱ्हाडीच्या मागच्या बाजूने वार केले.ज्याचा ध्वनी जिथे तिथे कंपन पावत होता.जवळपास दोन ते तीन मिनिट तसे केल्यावर, अचानकच वातावरणात असलेली दुर्गंधी थोड्याफार प्रमाणात कमी झाली.समजून गेलो होतो की आता जायला मार्ग मोकळा आहे.

त्यानंतर मधूमामाने समोर चालण्यास शुरुवात केली. त्यांच्या मागोमाग मीसुद्धा चालण्यास शुरुवात केली.आणि सगळ्यात शेवटी होता तो धनगर.मग काही वेळातच आम्ही त्या शिखरावर पोचलो, तर नजरेच्या समोर एक प्रसन्न करणारे स्थळ होतं.

समोर दगडांत वसलेली एक प्रचंड गुंफा होती.जी दोन्ही बाजूंनी पोखरलेली होती.अगदी दोन दरवाजे असल्यासारखी.आणि आतमधून निरुंद होत, छोटी छोटी होत गेली होती.त्या गुन्फेच्या मध्यंतर एक शिडी ठेवलेली होती.ज्यावर मधूमामाने मला चढण्यास सांगितले.आणि स्वतः सिगरेट पित त्या गुहेच्या तोंडाशी बसले.ते तिथून सांगत असले तरी पण वर चढायला मला भिती वाटत होती.पण शेवटी एक एक पायरी वर करत वर चढलो तर त्यावर आणखी एक गुंफा होती.मी जसा त्या गुंफेच्या जवळ आलो, तसेच वटवाघळांचा एक झोत अंगावर उडून आला.आणि परत मी घाबरलो.

मामाजीने सांगितल्यावर मग पुन्हा त्या गुंफेत आलो.वर त्या गुंफेत चढल्यावर समोरच एक मूर्ती होती.ज्याला मी नमस्कार केला आणि परत चालायला लागलो.पण एक नवल तिथेही वाटलाच, कारण या गडाच्या शिखरावरही पाणी होतंच.त्या मूर्तीच्या समोर पण ती गुंफा कमी होत गेली ज्यात वटवाघळे होती.आणि तिथून आपल्याला दगडांवर निस्तारत असलेले पाणी येताना दिसते.जे त्या मूर्तीवर अभिषेक केल्यागत टिपकताना दिसते.पण ज्या वेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस पाणी थोडं कमी प्रमाणात होतं.

खाली उतरल्यावर मामाजीनेच सांगितलं की वरच्या गुंफेचं पाणी जेव्हा कमी होते, तेव्हा पाणी या डोंगराच्या आत जात असते.खाली जी गुंफा होती.ती गुंफा त्या डोंगराच्या फार आत जात होती.रस्त्यावरून आतला काळोख दिसून पडत होता.त्या गुंफेत काही अंतर आत गेल्यावर पाण्याचं जलाशय आपल्याला दिसून येते.जे आपल्याला मोठ्या टॉर्च शिवाय बघायला मिळत नाही.त्या दगडांवर असलेली ती पाण्याची रचना अगदी अद्वितीय होती.खरतर मलाच माझ्या डोळ्यांवर विश्वास नसल्यासारखं होतं.

तिथून परतल्यावर मधूमामाने सांगितलं.की इथे नेहमी पट्टेदार वाघाचे वास्तव्य असते.हे बघ तो नुकताच गेलाय..(वाघाच्या काही निशाणाकडे बोट दाखवत मधूमामाजी म्हणाले.) तसं इथे दुर्गंधी फारच प्रमाणात होती.कारण जिकडे तिकडे जनावरांचे हाडे पसरली होती,वर त्या दगडांना बऱ्याच प्रकारचे भुयार होते ज्यात साळई असायची. साळई जंगलातील एक जीव आहे जी तिच्या अणकुचीदार काट्यांसाठी ओळखली जाते.ज्यामुळे सहसा तिची शिकार कुणी करीत नाही.पण त्या गुंफेत तिचे काटे मात्र खूप प्रमाणात होते.ज्यातून काही निवडक मी माझ्या संग्रही पकडले होते.

पण इतक्यात ते गड काही संपले नव्हते.परत त्याच गुन्फेच्या वर अजून एक गुंफा होती.ज्यावर त्या गडाचा मुख्य "महादेव" बसला होता.बाजूच्याच दगडांवरून चढून वरच्या गुन्फेवर जावे लागते.ज्यामुळे बॅग वगैरे खालीच ठेवून मी त्यांच्या मागोमाग निघालो.त्या वरच्या गुंफेत एक दगड पुरलेला होता. गुन्फेच्या मधोमध.त्या संबंधी मी मामाजीला विचारलं तर ते सांगू लागले...

"ही मूर्ती म्हणजे त्या काळातील जुनाट महादेव आहे.ज्याची आजही बरेच लोक पूजा करतात."तो बघ त्रिशूळ आणि नारळाचे तुकडे...पलीकडे इशारा करत मधूमामाजी म्हणाले...

"मग ह्याला काही नाव असेल ना? आणि ह्या डोंगराला पण...?"

"या डोंगरांगेला "घोडपाक" असे नाव आहे.आणि या महादेवाला "बोंडा महादेव" असे म्हणतात.इथे सदोदित त्याचे वास्तव्य असते.त्या वास्तव्याला जपण्यासाठी नेहमी तो वाघ इथेच असतो.आपल्याला इथे यायचं असलं की सगळ्यात आधी त्याला सूचित करावं लागतं.अन्यथा त्याची भयावह डरकाळी स्वतःला भीतीनेच मारून टाकते.आणि जांगलाविषयी तर तुला माहीतच आहे."

त्या गुहेच्या बाहेरून मी सभोवतालचा परिसर बघितला तर पेरजागड इथून फार लांब दिसत होता.दाराशी झाडे असल्यामुळे बऱ्यापैकी आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते.आता फक्त सहवास होता जंगलाचा.त्यातील वन्य हिंस्त्र प्राण्याचा आणि माझ्या अनुत्तरित प्रश्नांचा.कारण मला जाणून घ्यायचं होतं, की काय दडलंय इथे.आत्ताशी हे एक कारण होतं.ज्याच्याशी माझा मला काहीच संबंध वाटला नाही.उलट माझ्यासाठी ते स्थळ प्रेक्षणीय झालं होतं...